शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

मांढरदेवी : मौन वेदनादायी!

मांढरदेवी : मौन वेदनादायी!

दाभोलकर, यातुधर्म, मांढरदेवी दुर्घटना, भूमिका
मांढरदेवी दुर्घटनेनंतर निर्माण झालेला अव्वल दर्जाचा प्रश्न वेगळाच आहे. तो आहे श्रद्धा विषयाच्या कालोचित चिकित्सेचा. ज्या पद्धतीने तो बाजूला पडला किंवा खरे तर उपस्थितच झाला नाही, ती बाब निश्चितच गंभीर मानावयास हवी.
धर्माचा, धार्मिक उत्सवाचा, कर्मकांडाचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मात सुरू आहे. धर्माभिमान व धर्मविचार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याचा साफ विसर पडला आहे. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी, असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. आदिमानवाच्या सामाजिक जीवनात प्राथमिक धर्मभावना यातुप्रधान होती. विश्वातील माणसात, प्राणिमात्रात, निर्जीवात एक यातुतत्त्व आहे. यातु क्रियाद्वारे त्याची उपासना हे यातुधर्माचेरूप होते. जुन्या-त्याज्य श्रद्धांचे उल्लंघन करून चैतन्यपूर्ण नव्या श्रद्धा स्वीकारणे व्यक्तीच्या-समाजाच्या स्वास्थ्य व सामर्थ्यासाठी आवश्यक असते. विज्ञानाच्या आजच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी यातुनिर्भर रूढ धर्मश्रद्धेतून मानवी मन बाहेर पडणे हितावह होते. प्रत्यक्षात बहुसंख्य लोकसमुदाय आजही यातुप्रधान धर्मश्रद्धेला धरूनच आहे. जातपात, बळी देण्याची प्रथा, मंत्र, तंत्र, शकून, तोडगे, ताईत, काळी जादू, देवदेवस्की यांचा पगडा सर्वदूर आणि रावापासून रंकापर्यंत सर्वांवर आहे. या प्रभावाव्यतिरिक्त विकसित धर्मश्रद्धाही काही व्यक्तींच्या मनात आहे; परंतु या दोन्हीमध्ये मोठा संघर्ष झाल्याचे दिसत नाही. अमुक बकरी, कोंबडे बळी देणे, तमुक तंत्र म्हणून अभिषेक करणे, विशिष्ट क्षेत्री जाऊन जागृत दैवताला नवस करणे यातूनच देव पावेल, पुण्य मिळेल अशी अपेक्षा बहुसंख्य भाविकांच्या अंत:करणात असते. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने कर्तव्यकर्म करावे ते ईश्वराची आज्ञा म्हणून, ईश्वरार्पण बुद्धीने करावे. अंत:करणाच्या शुद्धीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने, करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही. पण नव्या श्रद्धेचा हा भक्तिमार्ग, विवेकमार्ग संतांच्या शिकवणीनंतरही यातू टाकू शकला नाही. पाप-पुण्याचे, त्यासाठी करावयाच्या यातुक्रिया, कर्मकांड यांचेच साम्राज्य अबाधित राहिले आहे, असे दिसते.
मांढरदेवीला फोडलेल्या नारळातील पाण्याचे लोट वाहिले. दीपमाळेला वाहिलेले तेल त्यात मिसळले, चार-पाच हजार बकऱ्यांचा नवस फेडण्यासाठी बळी ही नेहमीची बाब. दारू पिणे हा रिवाज. कमालीची अस्वच्छता हे अंगी पडलेले वळण. देवळाच्या मागील असंख्य झाडांवर मारलेले खिळे, टांगलेल्या बाहुल्या आणि लिंबे, दुसऱ्याचे वाटोळे व्हावे आणि त्याची श्रीमंती आपल्याकडे यावी, या इच्छा प्रकट करणाऱ्या झाडावर लटकवलेल्या शेकडो चिठ्ठया हे सारे यातुश्रद्धेचे उघड रूप आहे. सर्व पक्षांचे महाराष्ट्राचे नेते मांढरदेवीला भेट देऊन गेले. यापैकी शरद पवार यांनी उच्चारलेले ‘पुढील वर्षी दारू व पशुहत्या यावर बंदी आणावी, अशी विनंती आम्ही राज्य शासनाला करू’, हे वाक्य सोडता, एकही जण एकही वाक्य बोलला नाही. उठता-बसता महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या नावांचा गजर करणारी ही मंडळी हा वारसा विसरली कशी?
एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी धर्माला विवेकी रूप देण्याचा प्रयत्न केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. मानवी जीवनाचे नियमन केवळ शासन व कायदे करू शकणार नाहीत, तेथे माणसातील नैतिकतेलाही आवाहन करण्याची गरज आहे, अशी ही भूमिका होती. आज महाराष्ट्रात समाजप्रबोधनाच्या वाऱ्याचा वेग मंदावला आहे. विसाव्या शतकातील प्रबोधनाने आणलेली आधुनिकता समतावादी नैतिकतेचे मूल्य जोपासण्यात धडपडत होती. आता एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी विपरीत घडते आहे. ही आधुनिकता कर्मकांडात रमण्यात, जत्रा, यात्रा, मेळे यात मिरवण्यात, बाबा-बुवांच्या पालख्या उचलण्यात धन्यता मानते आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवून १९ व्या शतकातले समाजसन्मुख प्रबोधन २१ व्या शतकात समाजविन्मुख बनले आहे. खरी वेदना याची, की याबद्दल ना कोणाला सोयर, ना सुतक.....
हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर जे शाब्दिक वा प्रत्यक्षातील प्रहार सोसावे लागतात. ते अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या विवेकवादी चळवळी रोज अनुभवत आहेत. देवाच्या घरी धर्माने निषिद्ध मानलेली दारू कशी चालते की, यांना सुरापान करणारे आठवतात. शेकडो लिटर तेल वाया का घालवायचे, हा प्रश्न त्यांना पवित्र रूढी-पालनाचा वाटतो. स्वच्छता राखणे सरकारची जबाबदारी म्हणून अंग झटकले जाते. काळी बाहुली, लिंबे, करणीच्या चिठ्ठ्या या बाबी समाज सुशिक्षित झाल्यावर आपोआप जातील, असा (गैर) समज असतो. एकाच विशिष्ट दिवशी सर्व भाविकांची गर्दी आवश्यक आहे का, हा प्रश्न तर धर्मावरचा हल्ला वाटतो. श्रद्धा कोणत्याही स्वरुपातील असो, तपासाल तर खबरदार, असा पवित्रा असतो. खंत याची वाटते, की याबाबत सारेच कसे सोयीस्कर मौन बाळगतात? मांढरदेवीजवळील वाईला अनेक वर्षे धर्मकोशाचे काम चालते, त्यांना याबद्दल काही का म्हणावयाचे नसते? बहुजनांच्या विकासाचा वारसा घेतलेल्या शिक्षणसंस्था याबाबत मूग का गिळतात? राजकीय नेत्यांनी कातडीबचाव भूमिका समजू तरी शकते; पण कुलगुरू, शास्त्रज्ञ, साहित्यिक यांच्या मौनाचा अर्थ काय? संतांचा अभिमानास्पद वारसा सांगणाऱ्या वारकरी संप्रदायाला याबद्दल काय वाटते? शाळेत मूल्यशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रात यासारख्या घटितामागे कोणते मूल्य दिसते आणि खरे ते कोणते असावयास हवे, याचा ब्र शिक्षक का उच्चारत नाहीत? वायफळ वेळी तावातावाने बोलणारे, समाजसुधारकांचा जयघोष करणारे, वेळ येताच सारे कसे शांत शांत कसे होतात? पुरोगामी महाराष्ट्राची आजची प्रत्यक्ष अवस्था सांगण्यासाठी या सर्वांचे हे मौन खूप बोलके आहे, आणि वेदनादायीही!

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑक्टोबर २००३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...