हलकारेची
हलकी कृती
दाभोलकर, गणेश हलकारेची भ्याड कृती, विरोध, काळे फासणे
ता. ४ डिसेंबर १९९६. अकोला येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचा हॉल.
गावातील दोन्ही रोटरी क्लब व आर्किटेक्ट असोसिएशन यांनी माझे व्याख्यान आयोजित केलेले.
विषय ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व वास्तुशास्त्र.’ तुडुंब गर्दी. भाषण रंगले. प्रश्नोत्तरे झकास झाली. पुस्तकविक्री
चांगली झाली. बहुतेक श्रोते परत गेले. संयोजकांपैकी काही जण आणि मी एवढेच उरलो. मी
हॉल सोडला. पायऱ्या उतरून खाली येणार आणि पुढच्या कार्यक्रमाला जाणार एवढ्यात अमरावतीचा
अॅड. गणेश हलकारे पाच-सहा जणांच्या टोळक्यासह अचानक समोर आला. दारूचा भपकाराही त्याचवेळी
आला. मला घेरून ते उभे राहिले. हिंदी सिनेमाच्या पद्धतीने. मला मारहाण करण्याची खूण
त्यांनी एकमेकांना केली. गणेश हलकारेने माझ्या डाव्या गालावर एक थप्पड जोराने मारली.
त्याबरोबरच तोंडाला काळे फासले. माझा चष्मा बाजूला पडला. आजूबाजूला असलेले संयोजक धावले.
त्यांची संख्या या टोळक्याला सरळ करण्याएवढी सहज होती. परंतु सभ्यतेमुळे त्यांनी मारहाण
केली नाही. गणेश हलकारेला खेद नव्हताच. बहुधा त्या अवस्थेतही तो नसावा. सुरेंद्र घाडगे
(तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हा कार्यकर्ता
माझ्याबरोबर होता. त्याला तो म्हणाला, ‘गरज पडली तर दाभोलकरांना
चाकूही मारेन.’
प्रा. नितीन ओक हा अकोल्याचा उमदा तरुण प्राध्यापक. चळवळीचा मित्र.
त्याच्याकडेच मी उतरलो होतो. त्याच्या मोटारसायकलवरून त्याच्या घरी निघालो मुक्कामासाठी.
घरी त्याची वृद्ध आई एकटीच होती. ही गुंडागर्दी मला शोधत त्याच्या घरी गेली, तर त्याच्या आईला अकारण त्रास नको. यासाठी तो मला घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांच्याकडे
गेला. जिल्हा पोलीसप्रमुख त्याचे परिचित तर होतेच; पण एकूण कामाबद्दल आस्था
बाळगणारे होते. त्यांनी सर्व प्रकार नीट समजावून घेतला. मला विचारले, ‘तुम्ही गणेश हलकारेविरुद्ध गुन्हा नोंदवू इच्छिता का?’ मी सांगितले,
‘असल्या गुंडगिरीचा मुकाबला
आम्ही लोकांत जाऊन करू इच्छितो. पोलीस, कोर्टकचेऱ्या
यामध्ये मला रस नाही.’ जिल्हा पोलीसप्रमुख मला म्हणाले, ‘निर्णय तुमचा आहे. तुमचे कार्यक्रम आहेत. ते स्थळ आणि प्रा. ओकांचे
घर येथे बंदोबस्त ठेवतोच; परंतु तुम्ही म्हणालात तर केव्हाही तक्रार
नोंदवतो.’ मी तेथून स्काऊट-गाईड शिक्षकांचे अंधश्रद्धा
निर्मूलन प्रशिक्षण शिबीर चालू होते तेथे गेलो. कुमार मंडपे, अनिल इंगवले व सुरेंद्र घाडगे तेथे होते. आम्ही चर्चा केली. प्रकरण
पोलिसांमार्फत न्यायप्रविष्ट झाले की, मग
मूळ मुद्दा बाजूला जाणार आणि कोर्टाच्या निकालाकडे नजरा लागणार. तो निकाल कधी होणार
हे सांगणेही अशक्य. लोकांच्या विवेकबुद्धीच्या न्यायालयाला सामोरे जाणे अधिक इष्ट, असे आम्ही सर्वानुमते ठरविले. ओकच्या घरी जाण्यापूर्वी संबंधित विभागाच्या
पोलीस निरीक्षकांना भेटलो. त्याला जिल्हा पोलीसप्रमुखांचा फोन आला असल्याने काम आणखी
सोपे झाले. ओक याच्या घरावर; तसेच शिबीरस्थळी तेथून पुढे २४ तास म्हणजे
मी अकोला सोडेपर्यंत पोलिसांचे लक्ष होते. पोलिसांना एक प्रश्न होता. तो असा की, मला मारहाण करणे, तोंडाला काळे फासणे हे
सगळे का केले गेले? आपल्याच विषयातील आपल्यापेक्षा वेगळी संघटना
जनमान्यता मिळवत आहे. संघटनात्मकरित्या बलिष्ठ बनत आहे, याची गणेश हलकारेच्या मेंदूतील खुन्नस ही पोलिसांच्यादेखील आकलनापलिकडची
होती. म्हणजे किती विद्वेषी असेल,
यावर भाष्य न केलेले बरे.
डॅडी
देशमुखांचा खेद
प्रा. ओकच्या घरी पोचलो. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. परंतु
माझी वाट पाहत, रोटरीचे पदाधिकारी आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे
अध्यक्ष थांबले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेला असे घडावे, याचे त्यांना खूप वैषम्य वाटत होते. अकोल्यामध्ये कोणत्याही वक्त्याबद्दल
असे पूर्वी घडले नव्हते. त्यामुळे बाहेरच्या कोणीतरी येऊन गोंधळ घातला आणि अकोल्याला
कमीपणा आणला, हा संतापही होता. रात्रीच अखिल भारतीय अंधश्रद्धा
निर्मूलन समितीच्या अकोला येथील दोन-तीन प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन नितीन ओकला आले.
झाल्या प्रकाराबद्दल त्यांना लाज वाटत होती. त्यापैकी शरद वानखेडे या जुन्या जाणत्या
कार्यकर्त्याला नितीन म्हणाला, ‘दाभोलकरांच्या बरोबर बोलावयाचे आहे काय?’ तो म्हणाला, ‘बोलण्यासाठी आम्हाला तोंड कुठे राहिले आहे?’
दुसऱ्या दिवशी सकाळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन परिषदेचे
अध्यक्ष संजय चंदनगीर व सचिव अॅड. उज्ज्वला रोकडे यांची भेट झाली. अखिल भारतीय अंधश्रद्धा
निर्मूलन समितीच्या मुंबईतील नेत्यांच्या कारवायांमुळे त्यांच्याबरोबर पहिल्यापासून
काम करणाऱ्या या दोघांची फरफट झाली. असंगाशी संग भोगावा लागला. कामात ठेच आली. त्यामुळे
त्यांनी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन परिषद या नावाने स्वतंत्र काम उभे करण्याचा प्रयत्न
सुरू केला. त्यांना ही कार्यपद्धती नवी नव्हतीच. त्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला.
त्यानंतर मी प्राचार्य डॅडी देशमुख यांना भेटलो. अकोला येथील समाजकारण, राजकारण यामधले ते मोठे नाव आहे. एकेकाळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे ते विदर्भ विभागाचे अध्यक्ष; आजही त्यांचे नाव अ. भा.
अंनिस वापरत असते. झालेला प्रकार समजताच या घृणास्पद घटनेबद्दल स्पष्टपणे त्यांनी चीड
व्यक्त केली. स्वत:च्या पुढाकाराने मी या विरोधात पत्रक काढेन, असे सांगितले.
अकोला येथून निघणारे ‘देशोन्नती’ हे दैनिक अकोला येथे जास्त खपाचे; तसेच अमरावती,
यवतमाळ, बुलढाणा, नांदेड येथून स्वतंत्र आवृत्त्या काढणारे
दैनिक. त्यांचे संपादक श्री. पोहरे यांनी मला भेटण्यासाठी आवर्जून बोलवले होते. शेतकऱ्यांसाठी; तसेच अन्यायाविरुद्ध सतत संघर्षशील असणारे असे हे संपादक मालक.
त्यांच्याबरोबर समाजकारण, राजकारणाच्या बाकीच्या गप्पा झाल्याच; परंतु आदल्या दिवशीच्या प्रकरणाची चर्चा अटळपणे झालीच. त्यांनी
अतिशय स्पष्टपणे झाल्या प्रकाराबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे मुंबईतील श्रेष्ठी ज्या पद्धतीने विदर्भातील दोन-चार जिल्ह्यांत चळवळ चालवत
आहेत, त्याला असहमती दर्शवली. झालेल्या गुंडगिरीच्या
प्रकाराबद्दल सर्व काही परखडपणे व सविस्तरपणे छापण्याचे स्वत:हून आश्वासन दिले.
सायंकाळी डॉ. दीपक केळकर भेटले. ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत. शिवसेनेचे
कार्यकर्तेही आहेत. व्यसनमुक्तीचे कार्यही हिरिरीने करतात. झालेला प्रकार त्यांच्या
कानावर गेलेलाच नव्हता. त्यांना तो आमच्या भेटीत समजला आणि त्यांनी त्याबद्दल अतिशय
कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते मत जाहीर करण्याचेही आश्वासन दिले. वृत्तपत्रातून
(अकोला विभागातील) या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. गणेश हलकारेची गुंडगिरी सव्याजपणे
पेपरवाल्यांनी त्यांच्या पदरात बांधली. रजनीकांत हा विदर्भातील शेतमजूर संघटनेचे व
अन्य परिवर्तनाचे कार्य करणारा एक महत्त्वाचा कार्यकर्ता. त्याने लिहिलेले पत्र या
अंकात स्वतंत्र चौकटीत दिले आहे.
काम आणि व्यक्तीला बदनाम करण्यासाठी झालेल्या
हल्ल्यातून हल्लेखोरांना त्यांच्या या कृत्याने जनमानसात निर्माण झालेले त्यांचे स्थान
कळले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाऊल घट्टपणे विदर्भात रोवण्याची
क्षमता निर्माण झाली.
गणेश हलकारे करायला गेले एक आणि झाले वेगळेच. असो.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी १९९७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा