मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

बुवाबाजी संघर्षाचा नवा टप्पा



बुवाबाजी संघर्षाचा नवा टप्पा

दाभोलकर, बुवाबाजी, आंदोलन, संघर्ष, विरोध, अभियान
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या दहा वर्षांत अंधश्रद्धांच्या विविध प्रकारांबाबत अनेकविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्या सर्वांत यावर्षी   संघटित केलेले बुवाबाजी संघर्ष अभियान हे व्यापक आहे. या अभियानाची वाटचाल पुढीलप्रमाणे झाली.
अ) ६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या स्वतंत्र कायद्यासाठी धरणे.
ब) बुवाबाजीबाबत समग्र भूमिका मांडणाऱ्या ऐसे कैसे झाले भोंदू? या पुस्तकाचे प्रकाशन.
क) बुवा कसा पकडावा, याचे; तसेच चमत्कार सादरीकरण याबाबतचे महाराष्ट्रव्यापी शिबीर.
ड) बुवाबाजी संघर्ष अभियानाची दोन टप्प्यात महराष्ट्रव्यापी यात्रा, त्यामध्ये पुढील जिल्ह्यांत थेटपणे हे अभियान यात्रेद्वारे पोचले.
जिल्हेः मुंबई, पुणे, सातारा,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, ठाणे, रायगड, मुंबई.
दुसरा टप्पा :- लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक.
इ) ता. ३१ जानेवारी इचलकरंजी येथे महाराष्ट्रव्यापी निर्धार परिषदेने समारोप.
स्वरूप
अभियानाचे स्वरूप असे होते की, तीन वाहने, तीन जथ्थे होते. प्रत्येक जथ्थ्यात पाच कार्यकर्ते. त्यांच्या सोबत स्थानिक कार्यकर्ते असत. हे जथ्थे दिवसात प्रत्येकी तीन कार्यक्रम करत. हे कार्यक्रम शाळा, कॉलेज, महिला मंडळे व नागरिकांसाठी जाहीर या स्वरूपाच्या श्रोतृवर्गांसमोर असत. शक्यतो प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न असे. जथ्थ्याबरोबर पोस्टर्स; तसेच विक्रीसाठी पुस्तके असत. पुस्तकांची विक्री समाधानकारक झाली. वार्तापत्राची नोंदणीही करण्यात येई. जथ्थ्यातील कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बुवाबाजीचे चमत्कार हे असे. चमत्कारांचे सादरीकरण प्रभावीपणे होत असे व लोकांना ते चांगल्याप्रकारे आवडतही असे.
वैचारिक आशय  
अ) बुवाबाजी ही समाजात सर्वच स्तरावर आढळते. त्याबाबत समग्र मांडणी, प्रभावी जनजागरण व शक्य तेवढा विरोध संघटित करावयास हवा.
ब) बुवाबाजी संघर्ष यामध्ये दोन मुद्दे मांडण्यात आले.
१)  बुवाबाजीविरोधी कायदा करणे.
२) बुवाबाजी संघर्ष ही जनचळवळ म्हणून लोकांनीच हातात घेणे.
क) चमत्कार सत्यशोधन यामध्ये मांडण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे.
१) समितीने लोकवर्गणीतून जमवून रु. अकरा लाखांची आव्हान रक्कम चमत्कार सिद्ध करणाऱ्यांसाठी ठेवली आहे.
२) कोणीही, कसलाही चमत्कार सिद्ध केल्यास समिती त्याला अकरा लाख रुपये देईलच; परंतु त्याबरोबरच ‘अंनिस’ची चळवळच बंद करेल. कारण चमत्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचे नाते प्रकाश-अंधाराचे आहे. चमत्कार सिद्ध होणे याचा अर्थ भारतीय घटनेत नागरिकाचे कर्तव्य म्हणून सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पराभूत होणे, इतकी ही बाब गंभीर आहे. संपूर्ण मोहिमेत कोणीही हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत दाखवली नाही. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन काहीशा अभिनवपणे लोकांच्यापर्यंत पोचला.
ड) आवाहन अभियानातील हे आवाहन प्रसारमाध्यमे, शिक्षणसंस्था व राजकीय नेतृत्व यांना आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांना ठोसपणे वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्यास, राजकीय नेतृत्वाने जबाबदारीने वागल्यास व प्रसारमाध्यमाने कृतिशील होकारात्मक भूमिका घेतल्यास बुवाबाजी संघर्षाचे काम अधिक प्रभावीपणे होऊ शकेल.
संयोजन     
अ) महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कार्यक्रम आयोजित झाले.
ब)  सर्वत्र कल्पनेचे उत्तम स्वागत झाले. गर्दी भरपूर होती आणि चमत्काराबरोबरच वैचारिक आशय समजून घेण्यातही लोकांना रस होता.
क) चमत्कार व वैचारिक आशय हा कार्यक्रमातून एकत्रितपणे पोचवण्याचे कसब आपल्या जथ्थ्यांनी बऱ्याच चांगल्या प्रमाणात आत्मसात केले.
ड) विनायक सावळे यांनी बोलक्या बाहुल्या या तंत्राद्वारे आशय पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली. दुसऱ्या टप्प्यात त्याचे अनुकरण विवेक सांबरे व संजय बनसोडे यांनी केले.
इ) सर्व जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे संयोजन खूप परिश्रमपूर्वक केले होते. दुसरीकडे अविनाश पाटील, माधव बावगे, शालिनीताई ओक आणि मच्छिंद्र मुंडे यांनी जथ्थ्यांच्या मार्फत करावयाचे नियोजन परिणामकारकपणे केले.
फ) स्थानिक वृत्तपत्रांनी कार्यक्रमांना चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली.
ग) स्थानिक केबल, तसेच दूरदर्शन, ई.टी.व्ही., अल्फा मराठी या वाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांमुळे सर्व महाराष्ट्रात यात्रा पोचली.
ह) आव्हानाचा चित्ररथ तयार केला होता. तो लोकांना आवडत असे. मात्र हा चित्ररथ फक्त एकाच जथ्थ्याबरोबर जाऊ शकत असे. उरलेल्या दोन्ही जथ्थ्यांच्या सोबत फक्त बॅनर लावलेली वाहने होती. मात्र त्यांचे स्वागतही उत्तम प्रकारे होत असे. त्यामुळे चित्ररथ आवश्यकच होता असे नाही, असे जाणवले.
ज) अरुण टिकेकर, निखिल वागळे, श्रीराम लागू, प्रतीक्षा लोणकर,             प्रताप पवार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोळस्कर, मोहन धारिया, पुष्पाताई भावे, सोनाली कुलकर्णी, सुभाष भेंडे, निळूभाऊ फुले, कुमार केतकर, मृणाल गोरे, सुनील देशमुख (अमेरिका), माजी पोलिस महासंचालक भास्करराव मिसर, किसनरावजी देशमुख, दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, दै. ‘पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, ना. लक्ष्मणराव ढोबळे आदी अनेक मान्यवर विविध ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
विरोध
अ) एकूण तीनशे कार्यक्रमांपैकी मिरज, सोलापूर, डोंबिवली व मुंबई या चार ठिकाणी स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यापैकी कोठेही तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. सोलापूर व डोंबिवली येथे सभेमध्येच त्यांना गप्प बसवण्यात आले. मिरज व मुंबई येथे सुमारे १५ ते २० जणांच्या घोषणाबाजीमुळे कार्यक्रम १५ ते २० मिनिटे थांबला. मात्र त्यानंतर पुढील कार्यक्रम अतिशय उत्तमप्रकारे पार पडला. गर्दी केलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या लोकांना अजिबात साथ दिली नाही. सनातन भारतीय संस्था यांच्या सनातन प्रभात या वृत्तपत्रात अतिशय खोट्या स्वरुपात याबाबतची माहिती छापण्यात आली.
ब) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिवेशन आम्ही उधळून लावू. कारण ही मंडळी हिंदू देव, धर्म यांच्यावर टीका करतात, अशी धमकी धर्मरक्षणाच्या नावाने एकत्रित आलेल्या स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या इचलकरंजी येथील संघटनांनी दिली. अधिवेशनात काय बोलावे, काय बोलू नये याचे आदेश देण्याचा हास्यास्पद प्रयत्नही त्यांनी केला. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी तो ताबडतोब धुडकावून लावला आणि काय बोलायचे ते आम्हाला समजते, असे ठणकावून सांगितले. तसेच कोणत्याही संघटनेचा कार्यक्रम या पद्धतीने उधळणे या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी, असाही आग्रह धरला. या नोंदी लिहीत असताना (ता. १७ पर्यंत) एवढीच नोंद उपलब्ध आहे. प्रत्यक्षात काय घडले, हा वृत्तांत मार्च महिन्याच्या अंकात वाचकांना कळेलच.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (फेब्रुवारी २००३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...