बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

बुवा तेथे राजकारणी



बुवा तेथे राजकारणी

दाभोलकर, बुवाबाजी, नरेंद्र महाराज, नाना महाराज, अध्यात्म, शोधक पत्रकारिता   
बुवा, बाबा, स्वामी, महाराज, कथित संत-महंत यांचा एक खळाळलेला प्रवाह संपूर्ण भारतात; आणि स्वाभाविकपणे त्याच जोमदारपणे महाराष्ट्रातही वाहत आहे. जागतिकीकरणामुळे सैरभैर बनलेला जनसमूह, धार्मिक राजकारणासाठी लोकांच्या धर्मभावनांना उधाण आणण्याचा चाललेला धंदा, नंबर दोनच्या अर्थव्यवस्थेचा प्रभाव, त्या पैशाच्या आधारे विकत घेतलेल्या प्रसारमाध्यमांचे गारूड अशी अनेक कारणे यामागे आहेतच. परंतु त्यातील एक विशेष पैलू म्हणजे सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी या वाहत्या गंगेत स्नान करण्यासाठी दाखवलेला उतावळेपणा. ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे नाणीजला नरेंद्र महाराजाच्या दर्शनास गेले, त्याच दिवशी पुट्टपर्थीला सत्य साईबाबाच्यापुढे नम्रतेने झुकलेल्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची छबी वृत्तपत्रात झळकली. हे कमी म्हणून की काय, अलिबागला नगराध्यक्षा सौ. सुनीता नाईक यांनी नरेंद्र महाराजांना मानपत्र दिले. घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य सांगितले आहे. अशा वेळी स्वत:ला उघडपणे चमत्काराचा अवतार म्हणवून घेणाऱ्या व चिल्लर चमत्कार (म्हणजेच जादूचे प्रयोग) आपल्या दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून दाखवणाऱ्या सत्य साईबाबाकडे जाताना देशाच्या पंतप्रधानांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हे कर्तव्य आडवे झाले नाही. उठता-बसता फुले-शाहू-आंबेडकरांची भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नरेंद्र महाराजांच्यावर स्तुतिसुमने उधळताना हा वारसा आठवला नाही. हायटेक मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आधुनिक मन सत्य साईबाबापुढे झुकताना खंतावले नाही आणि आजही जो पक्ष निष्ठेने मार्क्सवादाचे नाव घेतो त्या शेतकरी कामगार पक्षाच्या नगराध्यक्षा सौ. सुनीता नाईक यांना नरेंद्र महाराजांना मानपत्र देताना गंभीर चूक घडते आहे, असे जाणवले नाही.
नाणीज भेटीचा नमुना
मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरेंद्र महाराजाला भेटावयास जाण्यास रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसवाल्यांचा स्पष्ट विरोध होता. त्यांनी जाऊ नये, यासाठी प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयात सतत प्रयत्न केला, जो निष्फळ ठरला. समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री वादग्रस्त बाबाच्या भेटीला जातात. त्यामुळे संत आणि समाजसुधारकांपेक्षा बाबाचे पारडे जड झाल्याचा संदेश जातो. याचा देखावा रत्नागिरी अंनिसने शहरात उभा केला व हे पाहवत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधून अभिनव पद्धतीने धरणे धरले. पत्रकारांनी रत्नागिरी जिल्ह्यातच ग्रामसेवक असलेल्या नरेंद्र महाराज ऊर्फ पूर्वाश्रमीच्या सुर्वे याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या, तरीही नरेंद्र महाराजाच्या भेटीला मुख्यमंत्री गेले. महाराष्ट्रातील सर्वांत तरुण संत म्हणून त्यांनी त्याचा उदोउदो केला. त्यांच्यात गाडगेबाबांचा कर्मवाद आणि विवेकानंदांचे चिंतन आढळते, असे जाहीर केले. नरेंद्र महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य करत आहेत, हे त्यांचे उद्गार तर निराश करणारे ठरावेत.
नरेंद्र महाराजाच्या मठातर्फे अधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या नरेंद्र लीलामृतच्या पानापानावर चमत्कार आहेत. यापैकी एकाही चमत्काराचा कसलाही पुरावा महाराज देऊ शकत नाही, याची कबुली त्याच्या स्वत:च्याच तोंडाने देणारी चित्रफीत उपलब्ध आहे. अजूनही महाराज नवनव्या चमत्कारांचे दावे करत असतो, ‘चित्रलेखाच्या दोन वार्ताहरांना पाच वर्षांपूर्वी नाणीजच्या मठात बेदम मारहाण झाली होती. १९९९ मध्ये निश्चितपणे जगबुडी होईल, अशी भंपक भाकिते याच महाराजाने केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या आपल्या विरोधकांच्या बाबतीत नरेंद्र महाराज अत्यंत अनुदार, असभ्य व असहिष्णू भाषा वापरतो. खोटे-नाटे आरोप समितीच्या कार्यावर करतो. सर्वसंग परित्याग करून निखळ मानवतावादी व विवेकवादी भूमिकेतून समाजसेवेसाठी आपले उभे आयुष्य पणाला लावणारे गाडगे महाराज कोठे, तुकडोजी महाराज आणि विनोबाजींच्यासारखे संत कोठे आणि भपकेबाज अलिशान राहणीत मग्न असलेले नरेंद्र महाराज कोठे? महाराष्ट्राच्या सुविद्य मुख्यमंत्र्यांना हे माहीतच नाही, इतके ते अडाणी अथवा गाफील आहेत, असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. म्हणूनच हे सर्व राजकारणी बुवा-बाबांच्या चरणी का लागले आहेत, याचा शोध अधिक खोलात जाऊन घ्यावयास हवा. या सर्वांपासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार बरेच दूर आहेत. तरीही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नाना महाराज धर्माधिकारींना मानपत्र दिले ते त्यांच्या हातून. अगदी अलिकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या अमृतमहोत्सवाचा जंगी सोहळा रायगड जिल्ह्यात झाला. त्या कार्यक्रमात व्यासपीठावर राजकीय नेत्यांच्या सोबतच नाना धर्माधिकारी सन्मानपूर्वक उपस्थित होतेच. स्वत:ला सनातनी हिंदू असे अभिमानाने म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना कोणत्याही कथित बाबा-बुवांचे पाय धरावेत, असे कधीही वाटले नाही. पंडित जवाहरलाल नेहरू १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते; परंतु कोणत्याही बाबा, बुवा, महाराज, स्वामी यांची पायरी त्यांना चुकूनही चढाविशी वाटली नाही. इंदिरा गांधींच्यापासून काँग्रेस पक्षात आणि इतर सर्व पक्षातही बाबा, महाराज यांच्यासमोरची लोटांगण स्पर्धा जोरात सुरू झाली. अपवाद मधु दंडवते, माजी पंतप्रधान गुजराल, अशा काही व्यक्ती आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष एवढाच दिसतो.
खुजेपणाची कबुली
निवडणुकीच्या राजकारणात कोणत्याही प्रकारे निवडून येणे ही सर्वाधिक प्राधान्याची बाब बनली आहे. स्वत:चे कर्तृत्व, चारित्र्य, पक्षसंघटना, सचोटीचा राजकीय व्यवहार यामधून निवडणुकीत निवडून येण्याचा विश्वास बहुतेक राजकीय नेत्यांनी गमावला आहे. अशा वेळी ज्याच्याकडे आयतीच गर्दी आहे, तेथे जाणे अथवा बाबामुळे गर्दी असते म्हणून आपल्या कार्यक्रमांना त्यांना बोलावणे अटळ होऊन बसते. सत्तेचा सारीपाट सतत अस्थिर असतो. त्यामध्ये स्वत:ची सत्ता मिळणे व टिकणे हा जणू जीवन-मरणाचा प्रश्न असतो. या सर्व राजकारणी मंडळींचा नशिबावर दांडगा विश्वास असतो. त्यामुळे बाबा आपले प्रारब्ध जाणेल व स्वत:च्या दैवीशक्तीने ते बदलेलही, असेही राजकारणी भक्तांना वाटत असते. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा राजकारणी हा फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा यांचे नाव घेऊनच बोलतो; मात्र त्याच्या वागण्यात या महापुरुषांच्या विचारांचा अंश असला पाहिजे, याबद्दल तो बिलकूल फिकीर करत नाही. कथनी आणि करणी यात फरक असणारच आणि तो फारसा मनावर घेण्याची गरज नाही, असेच जणू ते मानतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे व स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ना. सुशीलकुमार शिंदे राजरोसपणे नरेंद्र महाराजाच्याकडे जातात, याचा अर्थ एरव्ही कसा लावायचा?
श्रद्धांची तपासणी नाही
मानवी संस्कृतीच्या विकासाचा इतिहास हा खरे तर श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे. जो वैज्ञानिक दृष्टिकोन घटनेत भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे व शालेय मूल्यशिक्षणात ज्याचा समावेश आहे, तो कृतीत आणण्याचा आग्रह शिक्षणसंस्था क्वचितच धरतात. वैज्ञानिक दृष्टिकोन मानावयाचा तर चमत्कार करण्याचा दावा करणारा बाबा; मग तो सत्यसाईबाबा असो वा नरेंद्र महाराज, ते फ्रॉड आहेत, असे शाळेत ठामपणे मुलांना सांगावे लागेल. त्यामुळे निदान आपले राजकारणी विसंगत वर्तन करतात, हे मुलांच्या मनावर रुजेल व ही मुले उद्या मतदार झाल्यावर काही आग्रह धरण्याची शक्यता निर्माण होईल. परंतु सध्या सर्व बाबा, बुवा हे श्रद्धेचे विषय झाले आहेत. त्यांची तपासणी खुलेपणाने करणे म्हणजे रोष ओढवून घेणे. प्रसारमाध्यमेही बहुधा रोखठोक भूमिका घेण्याऐवजी बातम्या देण्यातच धन्यता मानतात. या आधुनिक बुवाबाजीच्या क्षेत्रात शोधक पत्रकारितेची खूप गरज आहे. मात्र अनेक अडचणींनी तसे घडत नाही. नाना महाराज यांच्या बैठका हे रायगड जिल्ह्यातील एक प्रचंड प्रकरण आहे. या बैठकीतील व्यक्ती आपले जीवनविषयक सर्व महत्त्वाचे प्रश्न तेथील प्रमुखामार्फत नाना महाराजांपर्यंत पोचवतात व महाराजांच्या मुखातून आलेले उत्तर शिरसावंद्य मानून आचरण करतात. ही गंभीर स्वरुपाची मानसिक गुलामगिरी नव्हे काय? परंतु अशा बाबी सविस्तर व सखोलपणे पुढे येत नाहीत. एकूणच वाढत्या बुवाबाजींच्या वातावरणाला छेद देणारे काही घडत नाही. यामुळेही बाबा, बुवाकडे जाणाऱ्या राजकारण्यांना त्याबाबत विचार करण्याची गरज पडत नाही.

नैतिकतेची गरज व व्यापक व्यवस्था परिवर्तन
सध्याच्या मूल्यप्रदूषित वातावरणात नैतिकपणे जगू इच्छिणाऱ्या कोणाचीही घुमसट होते. जे वागत आहोत ते उचित नाही, हे कळत असते; मात्र उचित वागण्याचे धैर्य उरलेले नसते. राजकारणी माणसेही संवेदनशील असतात. आपले स्खलन त्यांनाही डाचत असते. परंतु त्यासाठी खरेखुरे नैतिक जगणे त्यांच्या आवाक्याच्या पलिकडचे असते. अशा वेळी या बाबा, बुवा, महाराजांचे भ्रामक नकली अध्यात्म त्यांना तात्पुरता दिलासा देणारे ठरते.    
खरे तर आजचा समाज नीतिमान बनण्यासाठी एका व्यापक व्यवस्था परिवर्तनाची गरज आहे. हे परिवर्तन बाबा, बुवा, महाराज समजू शकतील, हा त्यांचा वकूब नाही आणि अशा व्यवस्था परिवर्तनामध्ये त्यांचे हितसंबंध सांभाळले जाणार नाहीत. वामनराव पै त्यांच्या प्रवचनात स्त्रीमुक्ती व व्यसनमुक्ती याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते सांगतात की, हे प्रश्नच आमच्याकडे अस्तित्वात नाहीत. आमच्याकडे येणारे सर्वजण पत्नीला समतेनेच वागवतात आणि व्यसनाधिनतेचा तर आमच्याकडे प्रश्नच येत नाही. हे समस्यांचे अतिसुलभीकरण झाले. पुरुषप्रधान व्यवस्था अथवा शासनाची व्यसनवर्धक धोरणे याचे भान न बाळगता दिलेली अशी उत्तरे चमकदार वाटली, तरी खऱ्या प्रश्न सोडवणुकीपासून शतयोजने दूर असतात. बाबांना खरे प्रश्न सोडवायचे नसतातच. त्यांना कोठे मते मागायला जायचे असते? राजकारण्यांना समाजाचे गंभीर प्रश्न खऱ्या मूलगामी पद्धतीने सोडवणे आपल्याला जमणार नाही, याची पुरेपूर जाण असते. खरे तर सध्या बहुसंख्य राजकारणीही आपल्या अत्यंत मर्यादित हितसंबंधासाठी राजकारण करत असतात. अशा वेळी हे राजकारणी आणि बुवा, बाबा, स्वामी, महाराज यांची मांदियाळी यांनी गळ्यात गळा घातला नाही तरच आश्चर्य! 
त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन, बुवाबाजीविरुद्धची, मानसिक गुलामगिरीविरुद्धची, विवेकी आत्मभान समाजात रूजवण्याची लढाई अवघड होत आहे, हे खरेच. परंतु या परिस्थितीवर देखील मात करण्याचा मार्ग आणि हिंमत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसाच देईल, असा दृढ विश्वास आम्ही बाळगून आहोत.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २००४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...