पुन्हा एकदा शनि-शिंगणापूर
दाभोलकर, शनि-शिंगणापूर, चमत्कार, डुंगेश्वर देवस्थान,
विरोध
नगर जिल्ह्यातील शनि-शिंगणापूर हे देवस्थान
गेल्या काही वर्षांत दैवी चमत्काराचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. तेथील घरांना
दारे नाहीत. परंतु शनिदेवाच्या प्रभावाने कोणीही व्यक्ती तेथे चोरी करूच शकत नाही.
प्रयत्न केलाच तर तिचे डोळे जातात वा ती भ्रमिष्ट बनते. देवस्थानचा हा चमत्कार बहुचर्चित
आहे. महाराष्ट्रात याबाबत कार्यकर्त्यांना सतत प्रश्न विचारले जातात.
दोन वर्षांपूर्वीच्या समितीच्या दीपावली
अंकात याबाबतची सत्यस्थिती सांगणारा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. चमत्काराच्या दाव्यातील
फोलपणा त्यामुळे स्पष्ट होतो. त्याबरोबर आणखी एक विषमतेची प्रथा त्या ठिकाणी आहे. शनिदेवाच्या
चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिला जात नाही. एवढेच नव्हे, तर ज्या विहिरीतील पाण्याने शनिदेवाला अंघोळ
घातली जाते. त्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी स्त्रियांना मज्जाव आहे. तशा पाट्याच
त्या विहिरीवर लटकत असतात.
हा प्रश्नही समितीने पुढे आणला होता. दोन वर्षांपूर्वी नगरला संमेलन झाले. त्यावेळी
एक प्रचार मोहीम उघडून, पुस्तिका
वितरीत करून ही सर्व बाजू समितीने लोकांच्यासमोर मांडली होतीच.
सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने
महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक
समाजाचे अधिवेशन ता. १९, २०
डिसेंबर रोजी शनि-शिंगणापूर येथील सोनई येथे भरणार होते. सत्यशोधकी चळवळीचा पूर्ण वारसा
हा धर्मचिकित्सेचा (चमत्कारविरोधाचा, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध करणारा) आहे. स्वाभाविकच यानिमित्ताने
या विषयावर पुन्हा एकदा विचारमंथन व्हावे म्हणून हा प्रश्न लोकांच्यासमोर मी मांडण्याचे
ठरविले. नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बोलणेही झाले होते. सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ
कार्यकर्ते श्री. किशन हरिदास यांनी तसे आग्रहपूर्वक सुचवलेही होते.
‘लोकमत’ पुणे येथील वार्ताहर प्रसाद घारे
यांच्याशी बोलण्यात हा विषय निघाला. पत्रक काढून प्रसिद्धीला देण्याआधी व्यक्तिगत बातमीदाराकडून
ही बातमी वृत्तपत्रांना गेली. शनि-शिंगणापूरच्या दैवी चमत्काराबाबत मला असंख्य वेळा
महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा चमत्कार घडत नाही, याचे वस्तुस्थितीतील स्पष्टीकरण मी देतोच.
तेथील पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या चोरीच्या नोंदी, व्यापारी वर्गाचे नोटा खिशात ठेवणे,
शाळेचे महत्त्वाचे रेकॉर्ड गुरुजींनी कुलूप
नसलेल्या कपाटात देवाच्या भरवशावर न ठेवता स्वत:च्या घरी ठेवणे आणि देवासमोरील पैशाची
पेटी उघडी न ठेवता कुलूप नसतानाही चोरी शक्य नसावी, अशा खुबीदारपणे बंद असणे या सर्वांचा उल्लेख
मी माझ्या भाषणात करत असे. याबरोबरच मी गमतीने असेही म्हणत असे की,
पाहिजे असल्यास शनि-शिंगणापूर
येथे चोरी करण्याची आमची तयारी आहे. मात्र आम्हाला शिक्षा देण्याचे काम शनिदेवाने
करावे. पोलिसांनी व ग्रामस्थांनी मध्ये येऊ नये. हे माझे प्रतिपादन हा याबाबत प्रसिद्ध
झालेल्या बातमीचा मुख्य गाभा ठरला व चोरी करण्यास समिती जाणारच, असा कृती कार्यक्रमही बातमीत जाहीर करण्यात
आला. दैवी चमत्काराची वस्तुनिष्ठ
तार्किक चिकित्सा; तसेच
स्त्रियांना मिळणारी देवस्थान ठिकाणची विषम वागणूक हे सर्व मुद्दे साफ मागे पडले.
गदारोळ
या बातमीनंतर शनि-शिंगणापूर येथे प्रक्षुब्ध
प्रतिक्रिया वाढली. तीन दिवस शनि-शिंगणापूर निषेधार्थ बंद राहिले. माझी प्रतिमा जाळण्यात
आली, असे पत्रकारांनी मला सांगितले.
मी सत्यशोधकी अधिवेशनाला आलोच तर त्याच मंडपात माझा तेरावा घालण्याचाही निर्णय झाला
होता. अधिवेशनाआधी नगर येथे मी समितीच्या शिबिराला जाणार होतो. मला नगर प्रवेश बंद
केल्याचा इशारा बजरंग दलाने दिला. मी आलोच तर रस्ता अडवून माझ्या तोंडाला काळे फासण्याचा
कृती कार्यक्रमही जाहीर झाला. नगर येथे एका लग्नाला मी सकाळी पोचलो. मी कधी येणार,
हे विचारून पोलिसांनी लग्नघरातील माणसांना
हैराण केले होते. पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. लग्न संपवून मी शिबिराला निघालो. शिबिराच्या
जागी मला अडवण्यात येऊन मारहाण होण्याची शक्यता पोलिसांनी सांगितली. आम्ही संरक्षण
देण्याचा प्रयत्न करू. परंतु आम्ही पुरे पडलो नाही तर... असा त्यांचा प्रामाणिक
चिंतेचा सूर होता. मी शिबिराला गेलो. वेळ दुपारी दोनची होती. कारण काहीही असो;
परंतु निदर्शक तेथे नव्हते. पोलीस बंदोबस्त
चोख होता. माझे भाषण झाले. तीन वाजता हमालभवनात पत्रकार परिषद झाली. ती चांगली झाली.
ती संपवून मी बाहेर पडत असताना ‘जय भवानी, जय शिवाजी’चा घोष करत सात-आठ शिवसैनिक आले. मी जीपमध्ये बसणार तेवढ्यात तेथे
धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यांच्या हातात काळ्या
शाईच्या बाटल्या होत्या. झटापटीत त्याचा प्रसाद एका पोलिसालाच मिळाला. पोलिसांनी निदर्शकांना
अटक करून नेले. (नंतर सोडून दिले.) जिल्हाधिकाऱ्यांनी मला भेटण्याची इच्छा प्रकट केली
होती म्हणून मी, बाबा
आरगडे, कडू-पाटील व विनायक बंगाळ
ही ज्येष्ठ कार्यकर्ते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. तेथे कलेक्टर व जिल्हा
पोलीसप्रमुख होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मला विचारलेले प्रश्न थक्क करणारे होते. एक तर
त्यांचे असे मत होते की, मी
सातारा व त्याला जवळ असणाऱ्या कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातील अंधश्रद्धा दूर करण्याचे
सोडून इतक्या दूर नगर जिल्ह्यात का आलो आहे? दुसरा प्रश्न असा होता की, देवाच्या भीतीने चोरी होत नाही, ही चांगली गोष्ट घडते. त्याला अंधश्रद्धा
निर्मूलन म्हणून विरोध का? एखादा
चोर भुताच्या भीतीने रात्रीची चोरी करत नसेल तर भूत नसते, हे त्याला कशाला सांगायचे? असे त्यांचे मत. मी वाद घातला नाही;
फक्त त्यांची व समितीची मते भिन्न आहेत,
एवढे त्यांना सांगितले. समितीची चळवळ ही
अतिशय जाणीवपूर्वक चालणारी आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आमच्या बाजूने
कधीच उपस्थित केले जाणार नाहीत; परंतु
आमची मते मांडण्याचा अधिकारही दुसऱ्यांच्या गुंडागर्दीमुळे नाकारता येणार नाही,
हे स्पष्ट केले. यानंतर पोलीस बंदोबस्तात
मला नगर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आले व पुढे बसमध्ये बसवून देण्यात आले.
वैचारिक भूमिका
या सर्व प्रकरणात प्रक्षोभकता निर्माण होण्याचे
कारण वरपांगी असे सांगण्यात येते की, ‘चला
शनि-शिंगणापूरला, चोरी
करायला’ या बातमीच्या शीर्षकाने भाविकांच्या श्रद्धा
मोठ्या प्रमाणात दुखावल्या.
याबाबत मी पत्रकार परिषदेत देखील स्पष्ट केले होते की, दैवी चमत्कारावर श्रद्धा ठेवण्याचा लोकशाही
अधिकार भाविकांना असेल तर असा चमत्कार घडत नाही, ही श्रद्धा (विश्वास) बाळगण्याचा अधिकार
समितीला आहे. विशेषत: वस्तुस्थितीत ज्या वेळेला चोऱ्या होतात आणि त्या होत नाहीत,
असा दंभ फक्त तयार केला आहे, तेथे तर हे सत्यशोधन अधिकच महत्त्वाचे आहे.
असे सत्यशोधन समिती संबंधितांच्या अनुमतीनेच करते. कारण संबंधितांनी अनुमती नाकारणे
यामधूनही तथाकथित चमत्कारावरील त्यांची डळमळीत श्रद्धा सिद्ध होते. तेव्हा चोरी न होण्याच्या
दैवी चमत्काराचे सत्यशोधन करण्यास ग्रामस्थांनीच पुढे यावे. दुसरी गोष्ट अशी की,
समिती चोरीसारख्या अनैतिक गोष्टींचे समर्थन
करते, असा तिरका अर्थ यातून
कोणी काढू नये. कारण हे आवाहन फक्त शनि-शिंगणापूर या अत्यंत छोट्या गावातील चोरीशी
(जे दैवी चमत्काराशी जोडलेले आहेत) संबंधित आहेत. समिती विवेकाचा प्रचार करत असल्यामुळे
ती चोरी करायला शिकवणार काय, असा
प्रश्नही हास्यास्पद ठरेल.
धमक्या
शनिशिंगणापूर येथे माझ्यावर हल्ला करण्याच्या
धमक्या उच्चारल्या गेल्याच; परंतु
सर्वांत कहर म्हणजे न्याय व विधी खात्याचे राज्यमंत्री दिलीप सोपल यांनी श्रद्धांना
हात घालणाऱ्या दाभोलकरांना लाथांनी तुडवून नीट केले पाहिजे, असे जाहीर वक्तव्य शनि-शिंगणापूरला केले.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दाभोलकरांनी स्वत:च्या पत्नीला घेऊन शनिच्या चौथऱ्यावर
उभे राहावे आणि शनिच्या अवकृपेची प्रचिती घ्यावी, असे आव्हान दिले. (हे आव्हान समितीने लगेच
स्वीकारले आणि अनेक कार्यकर्त्यांच्या पत्नीसह देवाच्या चौथऱ्यावर चढून शनिच्या अवकृपेची
जाहीर प्रचिती घेण्याची तयारी दाखविली.) जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या हातातील शस्त्र उचलले.
विरोधकांची भूमिका अशी होती की, दाभोलकर
परिषदेला आल्यास ती उधळून लावण्यात येईल. त्यांचे निमंत्रण रद्द करावे. माझी भूमिका
अशी होती की, संयोजक
माझे मित्र आहेत. त्यांची अडचण होत असेल व त्यांनी विनंती केली तर मी परिषदेस जाणार
नाही. मात्र महाराष्ट्रातील सत्यशोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने ही गोष्ट उचित नव्हे.
मी परिषदेस गेलो नाही, तरी
माझे अनेक वैचारिक मित्र परिषदेत या ना त्या स्वरूपात निमंत्रित आहेत. त्यामुळे ते
माझ्या अनुपस्थितीत देखील हा विषय मांडतील, अशी मला खात्री होती. (बाबा आढाव,
निळू फुले, पुष्पाताई भावे, प्रा. एन. डी. पाटील, पन्नालाल सुराणा, हरी नरके, गोविंद पानसरे, डॉ. य. दि. फडके वगैरे) माझे निमंत्रण संयोजकांनी
परत घेतले. पण तेवढ्याने भागले नाही. या अधिवेशनानिमित्ताने लोकभावना प्रक्षुब्ध होऊन
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा अहवाल कलेक्टर यांना तालुका मामलेदार यांनी
दिला. त्यामुळे असे घडणार नाही, याची
खबरदारी घेण्याचे बंधन जिल्हाधिकाऱ्यांनी संयोजकांच्यावर टाकले. याची खात्री मुळात
अवघड आणि समजा ती दिली तरी ऐनवेळी कलेक्टरने बंदीच आणली (वा १४४ कलम लावले) तर सर्वच तयारी
वाया जाणार, या
भीतीतून संयोजकांनी अधिवेशनच स्थगित करून टाकले.
कारणमीमांसा
शनि-शिंगणापूर येथील चमत्काराबाबत समिती
गेली अनेक वर्षे बोलत आहे, लेख
लिहिले आहेत, पुस्तके
वाटली आहेत. याचवेळी इतकी तीव्र प्रतिक्रिया का यावी? याची काही कारणे दिसतात.
पहिले असे की, शनि-शिंगणापूर हे देवस्थान गेल्या काही
वर्षांत अफाट वाढले आहे. व्यापारी व सर्व अनुषंगिक लोकांचे हितसंबंध त्यामध्ये तयार
झाले आहेत. दैवी चमत्काराची खुलेआम चिकित्सा करणे म्हणजे त्या चमत्काराला संपुष्टात
आणणे, देवस्थानचे अद्भुत वलय
लयाला जाणे. तसे घडले तर सगळी आर्थिक आवकच थांबणार. त्यामुळे प्रथेवर हल्ला या नावाने
प्राणपणाने विरोध सुरू झाला. अनेक देवस्थानाबाबत असतात, तशा तक्रारी शनि-शिंगणापूरबद्दल यापूर्वी
वृत्तपत्रांतून अनेकदा छापून आल्या आहेत. शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावयाचा असतो. ते
गोडेतेल दुप्पट दराने विकले जाते (रोज एका भाविकाकडून अर्धा लिटर असे जवळपास दोन हजार
अभिषेक होतात. १ हजार लिटर तेल म्हणजे १०००x६० = ६०,००० रुपये रोज अक्षरश: वाया जातात.) पूजेच्या
वेळची सोवळी भाड्याने देणे, पूजेच्या
वस्तू, वाहनांचे पार्किंग,
खाद्यपदार्थ असे अनेक आर्थिक हितसंबंध मजबूत
निर्माण झाले आहेत. त्या सगळ्यांनाच थेट धक्का बसण्याचा प्रश्न निर्माण झाला.
बजरंग दल, शिवसेना आदींनी आंदोलनाची आगखाऊ घोषणा केली.
महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की, भावनांना हात घालणारे भडक कार्यक्रम ही या संघटनांच्या अस्तित्वाची
गरज निर्माण झाली आहे. शिवाय अशा चळवळी चालवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा देणारे लोक
अनायसे तयारच होते. त्यामुळे तीही अनुकुलता होती. स्थानिक आमदार शिवाजीराव कर्डिले
हे अपक्ष आहेत. ते पुन्हा निवडून येण्याची शक्यता खूप कमी मानली जाते. त्यामुळे त्यांना
लोकमताला पेटवणारे काही हवेच होते. शासनाने हा प्रश्न निव्वळ कायदा व सुव्यवस्थेचा
मानला. त्यातही ही अंधश्रद्धा आहे, असे
जिल्हाधिकाऱ्यांनाच वाटत नव्हते. सत्यशोधकी अधिवेशनाचे मुख्य प्रवर्तक, स्थानिक नेते यशवंतराव गडाख यांनी बोटचेपी
भूमिका घेतली आणि माझे निमंत्रण रद्द करून परिषद वाचवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील
सत्यशोधक समाजाने याबाबत एक ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे क्षुब्धतेचे दर्शन.
विचारमंथनाचे मुद्दे
ज्या चमत्काराने चांगले काही घडत आहे,
त्याला विरोध कशाला?
हा अनेकांच्या मनातील
सवाल आहे. त्याचे उत्तर असे - खरोखरच असे घडत असले तरी ती गोष्ट वेगळी होती. प्रत्यक्षात
परिस्थिती पूर्णत: वेगळी आहे आणि हे समितीने वारंवार मांडले आहे आणि ते सिद्धही केले. याबाबत नि:पक्षपाती तपास केव्हाही करता
येईल. दैवी चमत्काराच्या नावाने दांभिकता तर वाढतेच; परंतु चोरी करणाऱ्यांचे डोळे जातात वा तो
भ्रमिष्ट होतो, या कल्पनेतून (चोऱ्या न थांबताच) शनिदेवाभोवती चमत्काराचे वलय तयार
झाले. प्रसारमाध्यमांनी ते घट्ट केले. चमत्कार मान्य करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन
नाकारणे. हा दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनादत्त कर्तव्य आहे. शासनाचे
शैक्षणिक धोरण, मूल्यसंस्कार
शिक्षण यातही वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्राधान्य आहे. त्यामुळे चमत्काराच्या चिकित्सेची
मागणी अत्यंत योग्य ठरते. शनिदेवावरील भाविकांच्या भक्तीचा समिती आदर करते. प्रश्न
आहे तो दैवी चमत्काराचा. (जसे -गणपतीवरील श्रद्धा मान्य असली, तरी गणपती दूध पितो या चमत्काराला विरोधच
करावा लागतो.) दैवी चमत्कार घडतातच, ही श्रद्धा बाळगण्याचा जर अधिकार असेल तर विज्ञानाचे नियम ओलांडणारे चमत्कार घडत
नाहीत ही श्रद्धा बाळगण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा समितीचा अधिकार आहे. असे असताना
काळे फासणे, प्रतिमा
जाळणे, प्रवेश नाकारणे ही दंडेली
कशासाठी? खरे तर एकाच व्यासपीठावर
याबाबत जाहीर वादविवाद करण्याचे माझे आवाहन संबंधितांनी स्वीकारावयास हवे होते. विश्वस्तांनी
अनुमती दिल्यास माझ्या पत्नीसह इतर अनेक कार्यकर्ते शनिच्या चौथऱ्यावर चढून दैवी कोपाची
प्रचिती तपासण्यात तयार असताना तर संबंधितांनी स्वत:च्या दैवी चमत्काराच्या सत्यशोधनाची
तयारी ठेवावयास हवी होती. स्त्रियांना देवाच्या चौथऱ्यावर असलेला मज्जाव व अभिषेकासाठी
काढण्यात येणाऱ्या विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायलाही मज्जाव ही बाब अनुचित आहे हे
मात्र बहुतेकांना पटले आहे. तिसरा एक मुद्दा असा की, थेट हल्ला कशाकरिता? हा व्यूहरचनेचा, मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो. या प्रकरणात जे
काही घडले ते या थेट सवालातूनच. सत्यशोधनाला अशी परवानगी नाकारणे म्हणजे दैवी चमत्काराच्या
सत्यतेबद्दल स्वत:ची साशंकताच जाहीर करणे आहे, हे अनेकांना आपोआपच समजून येईल.
या सर्व वादविवादात एक आश्चर्यकारक गोष्ट
म्हणजे सत्यशोधकी समाज, महात्मा
फुलेंचे अनुयायी स्वत:ला म्हणवून घेणारे अनेकजण, व्यक्तिस्वातंत्र्याचे पाठीराखे यांनी कोणीही
याबाबत ताबडतोब कोणतीही लेखी वा तोंडी प्रतिक्रिया माझ्याकडे दिली नाही. महाराष्ट्रभर
पसरलेल्या समितीच्या शाखातील कार्यकर्त्यांनाच ही लढाई लढावी लागली.
पत्रकार परिषदेतील समितीचे निवेदन
अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांच्या उपासना
स्वातंत्र्याचा आदर करते; मात्र
याचा संबंध चमत्काराशी आहे, असे
समितीला वाटत नाही.
शनि-शिंगणापूर गावात चोरी करणाऱ्या व्यक्तीचे डोळे जातात अथवा तो भ्रमिष्ट होतो
किंवा त्याला देव अद्दल घडवतो. हे सर्व चमत्कार शनिदेवाच्या प्रभावाने होतात,
असे तेथील ग्रामस्थांना वाटते. अंधश्रद्धा
निर्मूलन समिती दैवी चमत्कार मानत नाही. त्यांना ही समज अंधश्रद्धा वाटते. अशी मतभिन्नता
समाजात राहणारच. याबाबत सत्य वा अहिंसा या दोन तत्त्वांच्या आधारे व्यवहार व्हावा,
असे समितीला वाटते. अहिंसा याचा अर्थ असा
की, दोन्ही बाजूंना स्वत:ची
मते मांडण्याची मुभा असली पाहिजे. त्याबाबत कोणीही हिंसक पद्धतीने वागता कामा नये.
दुसरा मुद्दा असा की, सत्यशोधन
करण्याची व त्यातून सिद्ध होईल ते स्वीकारण्याची मनमोकळी तयारी दोन्ही बाजूंनी ठेवावयास
हवी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रथमपासून त्या दोन्ही निकषांचे पालन
केले आहे. तरीही सत्यशोधन करणे ही गोष्ट समिती संबंधितांच्या अनुमतीनेच करते. संबंधितांचा
विरोध असेल तर हे सत्यशोधन होत नाही. मात्र वैचारिक मतप्रदर्शन होत राहते. जे शनि-शिंगणापूरबाबत
गेली काही वर्षे समिती करत आहे व करत राहील.
या स्वरुपाचे एक उदाहरण काही वर्षांपूर्वी
डुंगेश्वर देवस्थान (ता. कुडाळ, जि.
सिंधुदुर्ग) येथे घडले आहे. तेथील देवाला भक्तांनी असंख्य घंटा अर्पण केल्या आहेत.
देव व घंटा दोन्हीही खुल्या मोकळ्या जागेवर आहेत. येथील घंटा कोणीही उचलून घेऊन गेले,
तर संबंधित व्यक्तीला असह्य वेदना होऊन
महिन्याच्या आत तो शरण येतो व घंटा परत आणून देतो. हा चमत्कार आहे, असे तेथील ग्रामस्थांचे मत होते. त्यांची
अनुमती घेऊन तेथील चौदा घंटा समितीने उचलून आणल्या. चार महिने विविध कार्यकर्त्यांच्याकडे
ठेवल्या. त्यापैकी एकाही कार्यकर्त्याला काहीही झाले नाही. नंतर त्या पुन्हा देवस्थानला
दिल्या. अर्थात, शनि-शिंगणापूर ग्रामस्थांची अनुमती असल्यासच दैवी चमत्काराची चाचणी
होऊ शकते, अशीच समितीची भूमिका आहे.
बहुजन समाजाला अज्ञ समजुतीत गुरफटून ठेवल्यामुळेच
त्याचे शोषण होते, असे
महात्मा फुले यांचे मत होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नेवासा
येथे होत असताना हा प्रश्न उपस्थित करणे आम्हाला औचित्यपूर्ण वाटते.
देवाची पूजा व त्याच्या अभिषेकाचे पाणी यामध्ये
स्त्रियांना मज्जाव करण्याची परंपरा प्राचीन असली तरी समर्थनीय नाही. लिंगभेदाने दिली जाणारी ही विषम वागणूक देवत्वाच्या कल्पनेशीच
विसंगत आहे, असे
समितीचे मत आहे. त्यामुळे विहिरीवरील मनाईच्या पाट्या व पूजेला प्रतिबंध या गोष्टी
देवस्थानच्या विश्वस्तांनी मोठ्या मनाने स्वत:हून दूर कराव्यात, असे समितीचे त्यांना आवाहन आहे. आवश्यकता
पडल्यास याबाबत एक मोठी महिला परिषद समितीतर्फे नगर येथे यथावकाश घेण्यात येईल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी
१९९९)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा