शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

कृतार्थ साधक



कृतार्थ साधक
दाभोलकर, ग. प्र. प्रधान, मृत्युलेख, अनुभव, चरित्र

अनेक वेळा प्रधान मास्तरांचा हात हातात घेऊन साने गुरुजी रुग्णालयातील त्यांच्या खोलीत त्यांच्या बाजूला मी बसत असे. अस्थिपंजर उरले होते. गात्रे पार थकली होती. अंधुक दृष्टी, चालणे अशक्य. ऐकू येणे तर कधीचेच थांबलेले. निसर्ग आपले आक्रमण करीत होता. प्रधान मास्तर अस्वस्थ, असहाय्य होते. मास्तरांना संजीवनी कशी मिळेल? एका क्षणी मनात विचार चमकला - तुमच्या अस्थीपासून वज्र बनवले तर लोकशाही समाजवादाची लढाई जिंकता येईल. असे सांगितले तर हा जराजर्जर म्हातारा ताडकन् उठून म्हणेल, ‘अजिबात वेळ लावू नका. तसे म्हणण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. कारण जन्मभर देण्यासाठीच ती हाडे झिजत आली होती.

फकिरी मस्ती
१८ वर्षांची आमदारकीची अत्यंत यशस्वी कारकीर्द सरांनी पूर्ण केली. पुन्हा चौथ्या वेळी उभे राहिले असते तर निश्चितपणे निवडून आले असते; पण साने गुरुजींच्या साधनात काम करण्याच्या अनिवार इच्छेमुळे ते साधनात दाखल झाले. त्यांच्यामुळे साधना स्थिरावण्यास,साधना’चे रूप पालटण्यास मोठीच मदत झाली. जाणीवपूर्वक अकांचनता स्वीकारण्याची ही फकिरी मस्ती आणि स्वत:ला भिरकावून देणे, याची एक वेगळी ओढ मास्तरांना असावी. पाच वर्षांपूर्वी स्वत:चे घर सोडून ते कायमच्या मुक्कामासाठी साने गुरुजी रुग्णालयात गेले. त्यावेळी त्यांनी मृत्युपत्र करून माझ्याकडे दिले. त्यात मृत्यूनंतर स्वत:च्या खात्यावरचे साडेतीन लाख रुपये सात संस्थांना वाटण्याचा उल्लेख होता. १५ दिवसांनी माझ्याकडून मृत्युपत्र घेऊन ते फाडून टाकले. म्हणाले, ‘चांगल्या कामाला उशीर कशाला? ते पैसे संबंधित संस्थांना रवाना केले. त्यांचा चेहरा कृतार्थतेने भरून आला. याचे टोक म्हणजे आजच्या बाजारभावाने सुमारे एक कोटी रुपये किमतीचे घर सरांनी साधना ट्रस्टच्या झोळीत टाकले. मृत्यूनंतर हस्तांतर करण्याचा स्वत:चा आधीचा निर्णय त्यांनी बदलला आणि दोन वर्षांपूर्वीच घराचे उदक साधना ट्रस्टच्या हातावर सोडून ते तृप्त झाले.

लेखक मास्तर
लिहिणे, बोलणे, प्राध्यापकीचा व्यवसाय, संपादकत्व या क्षेत्रातील व्यक्तीच्या मागे विचारवंत ही पदवी सहज चिकटवली जाते. प्रधान सरांना तशी ती चिकटली होतीच; मात्र खरा विचारवंत कसा असतो आणि आपण विचारवंत कसे नाही, याची प्रधानसरांना नीट कल्पना होती आणि त्याबाबत ते अनेकदा मोकळेपणाने बोलतही असत. आणखी एक बाब त्यांना लख्खपणे माहीत होती, ‘मी भोळाभाबडा; प्रसंगी काहीसा बावळट आहे, असे लोकांना वाटते. हा त्यांचा समज कायम ठेवण्याचा फायदा समजलेला मी धूर्त माणूस आहे असे ते हसतच सांगत. आंबेडकरांवरील पुस्तक लिहून झाल्यावर त्यांनी मला मुद्दामहून बोलावले. आम्ही त्यांच्या टेबलासमोर उभे होतो. टेबलावर दोनच फोटो - एक महात्मा फुलेंचा, दुसरा महात्मा गांधींचा. पुस्तकेही दोनच - एक तुकारामगाथा व समग्र शेक्सपिअर. मला म्हणाले, आता इच्छा उरली नाही. मन तृप्त आहे. इस्टेट एवढीच आहे. वळकटी बांधून मी तयार आहे. आणि गर्रकन् मागे वळून हातातली काठी टेकत खोलीच्या बाहेर पडले. मला वाटते, साहित्य हाच प्रधानसरांचा खरा प्रांत होता. पण त्यांच्यातील कार्यकर्त्याने, त्यांच्यातील साहित्यिकावर मात केली.

...आहे मूळचाचि खरा।
      प्रापंचिक आसक्ती तोडण्याची भूमिका त्यांनी कठोरपणे स्वीकारली आणि निभावली. २००३ साली त्यांना पुणे येथे महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यात त्यांनी जाहीर केले, ‘यापुढे मी कोणत्याही समारंभात भाषण करणार नाही आणि कसलाही पुरस्कार स्वीकारणार नाही.’ लोकांची प्रचंड मागणी, प्रामाणिक इच्छा असूनही सर्व जाहीर कार्यक्रम पुढील आयुष्यात त्यांनी नाकारले. सदाशिव पेठेतील घर सोडून साने गुरुजी रुग्णालयात हडपसरला कायम मुक्कामी जाताना सर्व पुरस्कार तेथे अडगळीच्या खोलीत टाकले. मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित एक लाख रुपयांचा पुरस्कार मास्तरांनी घ्यावा, असा निवड समितीचा आग्रह होता. निवड समिती मास्तरांकडे थडकली. मास्तरांनी मोजून तीन वाक्ये उच्चारली. निर्णयाबद्दल धन्यवाद! पुरस्कार स्वीकारू शकत नाही. क्षमस्व! येण्याची उगीच तसदी घेतलीत.
      तुका म्हणे झरा। आहे मूळचाचि खरा।। या कोटीचे मास्तरांचे निखळपण होते.

मानवसन्मुख करुणा
भगवी वस्त्रे न घालता संन्यासी बनण्याचा अट्टाहास मास्तरांनी बाळगला होता. तो त्यांनी यशस्वीपणे पुरा केला. अध्यात्माचा एक पारंपरिक अर्थ आहे. आत्म्याचे अस्तित्व न मानवणाऱ्या मास्तरांचे या अध्यात्म्याशी अर्थातच काही देणे-घेणे नव्हते. मास्तरांचे अध्यात्म म्हणायचेच असेल तर वेगळे होते. लौकिक सुखापलिकडे जीवनाचे एक श्रेयस आहे आणि त्या सुखांच्या पेक्षा ते अनंतपटींनी मोलाचे आहे, याची नोनी जाण मास्तरांना झाली होती. या जीवनदृष्टीमुळे जीवनात संयम, साधेपणा, सदाचार अपरिग्रह येतो. तो त्यांना प्राप्त झाला होता. करुणेने मानवसन्मुख कृती घडते. जीवनात साक्षात् शूचिता व पावित्र्य प्रकटते, हे त्यांच्या रूपाने हाराष्ट्राने पाहिले. साने गुरुजींच्या मानसपुत्राने त्यांच्यापासून घेतलेल्या अस्तिक्य बुद्धीतून जीवनाचा हा अर्थ लावला होता. या जाणिवेतून मुक्तिपथावरील या कृतार्थ साधकाचा प्रवास झाला.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जुलै २०१०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...