बुवाबाजीचे घातक चाळे (भाग 2)
दाभोलकर, बुवाबाजी,
अंधश्रद्धा, कर्मविपाक सिद्धांत
बुवाबाजीबद्दल एक सुप्रसिद्ध वाक्य सतत ऐकवले
जाते, ते म्हणजे ‘ब्रह्म तेथे माया, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया.’ आपल्या समाजात ज्या
संख्येने स्त्रिया अत्यंत सहजपणे बाबांच्या भक्त बनतात, ती संख्या आणि त्यांचे समर्पण चकित करणारे
असते. अपवाद वगळता सर्व बाबांना स्त्रियांचे आकर्षण असतेच. सहजतेने स्त्रिया प्राप्त होण्याचा असा
दुसरा कोणताही लब्धप्रतिष्ठित धंदा नाही. स्वत:च्या वैवाहिक मांगल्याचे प्रतीक म्हणून
मंगळसूत्र गळ्यात घालणारी स्त्री त्या मंगळसूत्रात बाबांचा फोटो घालते. अंगावरील कपड्याची
शुद्ध नसलेल्या बाबाने चाल केल्यासारखी बाईच्या अंगावर जाऊन मंगळसूत्राला हात घालून
ते ओढून तोडले तर बाबांनी मंगळसूत्र वाढवले, यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढेल,
असे मानणाऱ्या स्त्रिया आहेत. सगळ्या भक्तांच्या
घोळक्यातून आपल्या आवडीच्या स्त्रीला बंद खोलीत अध्यात्मिक दीक्षेच्या नावाने घेऊन
बसण्याचे स्वातंत्र्य बाबा त्या स्त्रीच्या कुटुंबियांच्या साक्षीने उपभोगू शकतो. प्रत्यक्ष
डोळ्यांनी बाबाचे अनैतिक कृत्य बघितले तरी ते आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतील,
असे मानणारे कुटुंबीय असतातच; पण दस्तूरखुद्द त्या स्त्रीलाही तसे वाटू
शकते. खरा प्रश्न हा आहे की, स्त्रिया
अशा का वागत असतील? स्वत:च्या
मनाच्याविरुद्ध बाबाच्या दैवी प्रभावाला भुलून त्या बाबाच्या वासनाकांडात ओढल्या जात
असतील; आणि मग नाईलाज म्हणून
पुढे सारे सहन करत असतील की, त्यांच्या
अंतर्मनातील तीव्र अतृप्त कामवासना याला कारणीभूत असेल? स्त्रीची कामपूर्ती ही तिला अनेक कारणाने
बोलून दाखवता येणारी गोष्ट नाही. याबाबत अज्ञान प्रचंड असतेच. परंतु या विषयाबद्दल
बोलणे हे देखील पाप समजले जाते. स्त्री-पुरुष संबंधात पुरुषाची कामतृप्ती लवकर होते.
ती पुरुषाला प्रत्यक्षात जाणवते आणि त्यानंतर पुरुष क्रीडेपासून दूर होतो. याचा अटळ
परिणाम स्त्रीची
कामपूर्ती अर्धवट राहण्यातच होते. ही अतृप्तता त्या स्त्रीची आंतरिक मानसिकता व्यापून
टाकते. संस्कारांचे आणि सामाजिक बंधनांचे प्रचंड ओझे यामुळे स्त्रियांच्या या अतृप्त
भावना हा कधीच चर्चाविषय होऊ शकत नाही. पुरुषांना याबाबत अनेक वाटा मोकळ्या असतात.
स्त्रियांच्या बाबतीत ही शक्यता नसते. स्वत:चे मूल वाढवणे, नामजप, देव, पूजा, कथित अध्यात्म या मार्गांनी मनातील या वासनाप्रक्षोभाला
त्या आवर घालतात. तो तीव्र असेल तरीदेखील विवाहबाह्य संबंध जोडून तो तृप्त करण्याची
शक्यता स्त्रीच्या बाबतीत नसतेच. मात्र अध्यात्मिक बाता करणारा बाबा, गुरू, महाराज याच्या सहवासात जाताना हा धोका नसतो.
बाबाच्या कथित मान्यतेमुळे एखाद्या स्त्रीसोबत बाबाचे असे संबंध येतील, असे कुटुंबियांना वाटत नाही, हा परंपरेने जनमानसात रूजलेल्या श्रद्धा
या रसायनाचा परिणाम असतो. त्यामुळे अर्थातच बाबाच्या सोबत सहजपणे शरीरसंबंध प्रस्थापित
होऊ शकतात आणि बाबा तरबेज असेल तर सतत अतृप्त राहिलेली कामवासनापूर्ती होऊ शकते. या
शारीरिक कारणाबरोबरच दैवी वलय लाभलेला बाबा, ज्याच्या दर्शनासाठी अनेक स्त्री-पुरुष भक्तगण
ताटकळत असतात, त्याचा
अग्रहक्काने मिळणारा सहवास हेदेखील एक कारण ठरू शकते. वाघमारे बाबासारख्या सामान्य
रूप असलेल्या बाबाकडे सर्व थरांतील, वयांतील स्त्रिया मोठ्या संख्येने अतिशय सहजपणे गेल्या आणि त्यामध्ये
एकाच घरातील सून आणि सासू, मुलगी
आणि आई यांचा देखील समावेश होता, हे
धक्कादायी वास्तव ही मांडणी सिद्ध करण्याच्या पुराव्यासाठी पुढे केले जाते.
मात्र तरीही हे स्पष्टीकरण बरेच वादग्रस्त
आहे. कामशास्त्रतज्ज्ञांच्या मते स्त्रीच्या कामपूर्तीचा फार मोठा भाग शारीरिकतेपेक्षा,
त्या संबंधातून तिला प्रतीत होणारा जिव्हाळा,
आपुलकी, लाभणारे प्रेम या मानसिकतेशी संबंधित असतो. अपवाद वगळता
अतृप्त शारीरिक वासनेसाठी आपल्या समाजातील स्त्रिया अशा सहजपणे बाबाच्यासोबत व्यभिचार
करण्यास तयार होणे अशक्य आहे. बाबा व त्याचे स्थान याभोवती एक धार्मिक, अध्यात्मिक वलय असते. अशा ठिकाणी दोन घटका
काढून मनाला विरंगुळा मिळावा, थोडे
सांत्वन लाभावे, चार
चांगले शब्द कानावर पडावेत, बाबाच्या
कृपाकटाक्षाने अथवा हस्तस्पर्शाने संसारातील व्यथावेदनांवर मात करता येईल, असा दिलासा मिळावा; हाच तेथे जाण्याचा उद्देश असतो. अशा स्वरुपाच्या
आधाराची आजच्या भारतीय समाजात स्त्रीला असलेली गरज आणि अध्यात्मिक वा दैवी मार्गाने
धार्मिक गुरू अथवा महाराज यांच्याकडून ती पूर्ण करून घेण्याची त्यांना लाभलेली परंपरा,
यामुळे बाबांच्याकडे स्त्रियांचा राबता दिसतो.
मात्र तो असा कामवासनापूर्तीशी जोडणे हे या विषयाचे अज्ञान असून स्त्रियांच्यावर अन्याय
करणारे आहे, अशीही
एक मांडणी आहे.
बुवाबाजी फोफावण्याचे एक कारण सहज भीतिग्रस्त
होणारा जनसमूह अथवा भक्तगण हे देखील आहे. साताऱ्याजवळच्या एका खेडेगावातील केस आमच्याकडे
आली होती. बुवाबाजी करणारी बाई देवीची पॉवरफुल्ल भगत होती. तिच्याबद्दल गावात वचक होता.
थंडी-तापाने माणसे हैराण झाली. भगतबाईने देवीचा कौल दिला. तो असा की, देवीचा कोप झालाय, देवीचे वारे गावात खेळत आहे. देवीला शांत
करायचे असेल तर तिच्या उत्सवासाठी दरवर्षी लागणारे ढोल-ताशे, आणखी असेच इतर साहित्य गावकऱ्यांनी विकत
घेऊन द्यावे, असे
देवीचे मागणे आहे. मुळात रेणुकामाता ही कोपिष्ट देवी म्हणून प्रसिद्ध. त्यामध्ये तिचे
भगत पॉवरबाज. गावात लोक आजाराने हैराण, परवडत नसताना आणि पटत नसताना घरटी शे-दोनशे रुपयांची वर्गणी काढण्यात
आली आणि देवीची शांती करण्यात आली. उगाच कशाला विषाची परीक्षा करा, असा गावकऱ्यांचा सूर होता. एकदा तर एका निवृत्त
पोलीस महासंचालकांचे पत्र आले. अशाच एका बाईच्या दैवी सामर्थ्यावर त्यांचा विश्वास
होता. त्या बाईच्या मठाला त्यांनी दोन खोल्या लाखभर रुपये खर्च करून बांधून दिल्या
होत्या. रोख आर्थिक मदतही भरघोस केली होती आणि हे सगळे झाल्यावर आलेल्या काही अनुभवातून
ही बाई पक्की भोंदू आहे, याची
त्यांना खात्री पटली होती. यामुळे त्या बाईवर कारवाई करण्याची त्यांची इच्छा होती.
त्यांनी मला पत्र लिहिले. आश्चर्यचकित होऊन मी त्यांना कळवले की, ‘तुम्ही कळवलेली बाब ही तर उघडउघड फौजदारी गुन्हा आहे. तुम्ही वरिष्ठ
पोलीस अधिकारी, तुम्हाला
कसली अडचण? कायदा वापरा आणि बाईला
सरळ करा.’ त्यांचे मला आलेले पत्र बुवाबाजीत फसलेल्या
लोकांची मानसिकता स्पष्ट करणारे होते. त्यांनी लिहिले होते, ‘आपण यावे. एकदा आपण स्वत: या प्रकरणाची नीट चौकशी करावी. त्या बाईच्यात
खरेच काही दैवी सामर्थ्य नाही, अशी
खात्री तुम्ही आम्हाला दिली की मग आम्ही पुढील पोलीस कारवाई नक्की करू.’ सहज भीतिग्रस्त होणाऱ्या भक्तगणांच्या मानसिकतेचा हा नमुना ठरावा.
याबरोबरच याच प्रकारातील एक महत्त्वाचे सामाजिक व जैविक वास्तव लक्षात घ्यावयास हवे.
या देशात सौम्य मनोरुग्ण असलेल्या व्यक्तींचे प्रमाण जवळपास १० टक्के आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. ही व्यक्ती
आपले रोजचे जीवन कमी-अधिक प्रमाणात चारचौघांच्यासारखे जगत असल्याने ही मनोरुग्णता आपल्या
लक्षात येत नाही. शिवाय काहीसे तऱ्हेवाईक वागणे हे आपल्या समाजात कौटुंबिक चौकटीत सहजपणे
खपून जाते. हा सौम्य मानसिक आजार आहे अथवा व्यक्तिमत्त्वाचा कमकुवतपणा आहे. त्यासाठी
मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला उपयोगी ठरू शकेल. ही कल्पना मुळात अशा व्यक्तींना वा त्यांच्या
कुटुंबियांना नसते व असली तरी रूचत नसते. अशा व्यक्ती अथवा त्यांच्या वागण्याने वैतागलेले
त्यांचे कुटुंबीय यांना बाबा, बुवा
देतात तो आधार फार हवाहवासा वाटतो. याबरोबरच काहीजण जन्मत:च कमी-जास्त प्रमाणात भोळसट
असतात. जगाच्या धकाधकीच्या मामल्यात त्यांचा टिकाव लागणे तसे अवघडच असते. त्यांना
महाराजांच्या नादी लागणे हे दुहेरी फायद्याचे ठरते. एकतर आधार मिळाल्याचे समाधान लाभते
व दुसरे म्हणजे स्वत:च्या जीवनातील अपयश महाराजांच्या कथित भक्तीच्या सेवेत झाकले जाते.
जीवनातील वैफल्याने मन मोडून पडलेल्या स्त्रियांना बाबांचा सहज मिळणारा मान्यताप्राप्त
आधार हवाहवासा वाटतो; तर दुसरीकडे जीवनातील अनेक बाबतीत अपार कुतूहल असणारे तरुण त्या
कुतुहलापोटी बाबांच्या स्थानाची पायरी चढतात. माणसाला सांस्कृतिकरित्या स्वत:ला व्यक्त
करण्याची गरज असते. स्वत:चा सहभाग असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कोणत्याही कारणाने आनंदाने काही वेळ हसत-खेळत
सामुदायिक जीवन जगणे यामध्ये मन सुखावतेच, एकाकीपणा सहजपणे जातो. आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात टिकून असलेल्या
एकत्र कुटुंब पद्धतीत अनेकदा अधिकारांची, नात्यांची, परंपरांची
एक उतरंड असते व त्यामुळे जाच असतो. त्यातून माणूस इतरांपासून तुटत जातो आणि लोकांच्यात
राहूनही एकाकी बनतो. दुसरीकडे गतिमान महानगरात व शहरात माणूस फ्लॅट संस्कृतीचा गुलाम झालेलाच असतो. धावपळ करत
नोकरी अथवा व्यवसायाची पाटी टाकणे आणि नंतर स्वत:च्या घराच्या चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेणे हे अटळ बनते. त्याला
एकाकी बनवते. एकाकी बनणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना सांस्कृतिकदृष्ट्या व्यक्त होण्याची
गरज असते. ज्यांना ते जमत नाही, ते
टी.व्ही.समोर बसून ही गरज भागवतात. परंतु ही गरज बाबा, बुवा, महाराज, स्वामी यांच्याकडून चांगल्याप्रकारे भागवली
जाते. (असा निदान त्या एकाकी व्यक्तींना अनुभव येतो.) बाबांच्या भक्तीत लीन होण्यासाठी
समुदायाने जमणे, शरणागत
बनणे, कथित अध्यात्माने आपला
दैनिक विकास होत आहे, असा
समज करून घेणे या सर्वांमध्ये एकाकीपणा तुटतो. आधार आणि सांत्वन लाभते. आपल्या समाजात
अवतारवादावर तर जवळजवळ सर्वांचाच विश्वास असतो. अनेक बाबा स्वत:ला कुणाचे ना कुणाचे
अवतार म्हणून घोषित करतात आणि त्यांनी तसे केले नाही तर भक्त गणांच्या लेखी ते तसा
अवतार असतातच. बहुसंख्यांचा असा पारंपरिक विश्वास आहे, की विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती
आहे. तिचा कृपाप्रसाद आजीवन उद्धरून नेणारा परमकल्याणाचा मार्ग बनतो. सत्यसाईबाबा असे
म्हणतात की, माझे
चमत्कार हे माझे व्हिजिटिंग कार्ड आहे. याचा अर्थ असा की, व्हिजिटिंग कार्डमुळे आपल्याला भेटावयास
आलेल्या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळते. चमत्कार करण्याचे व्हिजिटिंग कार्ड त्या जगद्नियंत्याने
सत्यसाईबाबांना यासाठी दिले आहे की, त्यामुळे लोकांनी समजावे की, आपल्या मुक्तीसाठी परमेश्वराने पाठवलेला
महामानव तो हाच. अनेकांना तर बाबांच्या रूपाने जणू देवच बोलतो, असे वाटते. बाबा वापरत असलेले आत्मा,
ब्रह्म, मोक्ष, परमार्थ हे शब्द गूढ वाटण्याऐवजी ओळखीचे,
परिचित वाटतात. या शब्दांचा सहजपणे वापर
करणारा महाराज भक्तगणांच्या मनाचा कब्जा फारसे काही न करता मिळवू शकतो.
बुवाच्या नादी लागणे, त्याचे शिष्य बनणे, त्याचा अनुग्रह घेणे ही आजच्या काळातील रूढी
होऊ लागली काय, असा
संशय येतो. मनुष्याला व्यावहारिक, राजकीय
मोठेपणा पाहिजे असतो, तसाच
धार्मिक मोठेपणाही पाहिजे असतो. याबाबतच्या इतर धार्मिक नियमांचा नित्य आचार अवघड असतो.
मग सर्वांत सोपा व धार्मिक म्हणवून घेण्याची इच्छा, असे सर्व काही एकत्रित असते. आपल्या देशात
धर्मभोळेपणा फार. देव-धर्म या विषयावर जो बोलेल, प्रवचन करेल तो श्रेष्ठ आहे, असे समजण्याचा प्रघात आहे. मला ईश्वरी प्रेरणा झाली, असे बोलून कोणी वर आकाशाकडे अंगुलीनिर्देश
करू लागला की, त्या
व्यक्तीबद्दल विलक्षण भावना उत्पन्न होते. ईश्वरी प्रेरणेच्या आख्यायिका या अनादिअनंत.
वैदिक ऋषींना ईश्वरी प्रेरणा होऊन वेद स्फुरले. महंमद पैगंबराला कुराण शरीफही ईश्वरी
प्रेरणेनेच स्फुरले, येशू
ख्रिस्ताच्या बायबलबद्दलही तोच ईश्वरी साक्षात्कार ईश्वरी प्रेरणांच्या उदाहरणांनी
परंपरा काठोकाठ भरलेल्या; मग
ती परंपरा स्वामी अथवा महाराज यांच्या वाणीतून मुखर होण्यात अडचण ती काय? देव आणि धर्म आणि त्यांच्या नावाने व वतीने होणारे वर्तन
हे आपल्या देशात क्वचितच चर्चेचा विषय होते. त्यामुळे बाबा, बुवांचे न फावले तरच नवल.
पारंपरिक, धार्मिक विचार, अवतार कल्पना, ईश्वरीबदल व्यक्तीच्या मुखातून आपल्यापर्यंत
पोचतो. अशा बाबींच्यावर श्रद्धा यामुळे बाबा, गुरू, महाराज यांच्याकडे जाणाऱ्या भाविकांमध्ये,
शिष्यामध्ये आणि गुरूंमध्ये जणू एक अबोध,
अलिखित करारच जन्म
घेतो. शिष्य स्वत:ला कमी
लेखून गुरूला सर्वशक्तिमान मानतात. गुरूला शरण जाणे ही त्यांच्या लेखी बुद्धीची शरणागती
नव्हे, तर आनंदाची अनुभूती असते.
स्वत:च्या बुद्धीने स्वतंत्र विचार करणे, स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: संघर्ष
लढवणे, या
बाबी भक्तगणांना क्षुल्लक वाटतात. आपण गुरुस्थानी मानलेल्या व्यक्तीचे उदात्तीकरण करणे,
ती सर्वगुणसंपन्न आहे
असे मानणे, तिच्याशी
एकरूपता पावणे, मनाच्या
या सुप्त प्रक्रिया गुरूला शरण जाताना घडतात. कुणीतरी एक व्यक्ती सर्वगुणसंपन्न आहे
व आपणास त्या व्यक्तीचा सहवास लाभल्याने, सत्संग घडल्याने आपल्या मनातील पराभूत उदास
भाव पळून जातो. उत्साह व जोम येतो असे मानणे व तसे अनुभवणेही. त्यामुळे बाबांच्यावरील श्रद्धा दुणावते.
प्रार्थना, प्रवचने, गुरूच्या विचारांचा प्रसार, पारायणे, गुरुभक्ती या सर्वांमधून शिष्य संसाराच्या
चिंतेतून मुक्त होण्याचे आश्वासन मिळवतो. गुरूसमवेत हे सहजीवन जगणे, त्याच्याशी तादाम्य पावण्याची धडपड करणे
यामधून आपल्या समस्यांचे आकलन झाले व मार्ग दिसला असे मानणे, हा आपल्या संस्कृतीच्या संस्काराचा भाग आहे.
अनेकांना हा संस्कार बुवा-बाबांच्याकडे नेतो, तेथे बांधून ठेवतो.
अनेक धार्मिक उपचारपद्धतीमध्ये बाबा,
गुरू, महाराज यांच्या आशीर्वादाने व मंत्राने भाविक
अथवा भक्तरुग्ण व्याधीमुक्त होतो. याचा संबंध बाबाच्या दैवी, चमत्कार करण्याच्या सामर्थ्याशी नसतो,
तर त्या रुग्णाच्या अंतर्गत असलेल्या आरोग्यवर्धक
शक्तीत असतो. संमोहित अवस्थेचे मूळ कारण हे जसे त्या व्यक्तीची सूचना स्वीकारण्याची
तीव्र इच्छा व कल्पनाशक्ती हे असते; त्यामध्ये संमोहनतज्ज्ञाला फारसे काही करावे लागत नाही,
तसेच रुग्ण व्यक्तीला बाबाच्या शब्दांनी,
हस्तस्पर्शाने बरे होण्याची खात्री,
उचंबळून आलेल्या भावना याद्वारे व्याधीमुक्त
होणे, हा खरा चमत्कार नाही,
तर अतिशय गुंतागुंतीच्या शारीरिक प्रक्रिया
घडवण्याची अंतर्मनाची शक्ती हा खरा चमत्कार आहे. शरीराचे संरक्षण करणारी पेशींची जी
संरक्षक व्यवस्था म्हणून सिस्टिम आहे,
त्यावर बाबांच्या सूचनांचा प्रभाव पडतो.
सूचनांद्वारे स्वत:मध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे ही व्याधीमुक्तता
बाबांचे दैवी सामर्थ्य म्हणून गणली जाते, एवढेच.
बुवाबाजीचे पीक या भूमीत भरघोस येण्याचे
कारण या देशाच्या मनोभूमीची मशागत नियती, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या कल्पनांनी केली आहे. या सर्व शब्दांचे संदर्भ आणि अर्थ काहीसे
भिन्न आहेत. परंतु बुवाबाजीचे पीक येण्यासाठी त्यामुळे काही फरक पडत नाही. दैव,
नशीब, विधिलिखित यात भविष्य पूर्वनिश्चित असल्याची
कल्पना आहे. प्रारब्धाची गोष्ट थोडी वेगळी आहे. मनुष्याला आपल्या कर्माची उचित फळे
(सत्कर्माची गोड फळे आणि दुष्कर्माची कटू फळे) भोगावी लागतात. या मताला नाव आहे ‘कर्मसिद्धांत.’ त्यानुसार कर्माचे वर्गीकरण केले जाते.
ते म्हणजे क्रियामाण संचित आणि प्रारब्ध. क्रियामाण म्हणजे आपण करीत असलेली कर्मे.
त्यांचा संचय होतो आणि तो पूर्वीच्या संचित कर्मामध्ये जमा होतो. या संचित कर्मापैकी
काहींची फळे भोगण्याकरिता वर्तमान जन्म मनुष्याला प्राप्त झालेला असतो. त्यांना
‘प्रारब्ध कर्म’ म्हणतात. भविष्यात केव्हा काय होईल, हे आपण कर्म केल्यावर निश्चित होते, असा प्रारब्धवादाचा दावा आहे. चार्वाक दर्शन
सोडले तर सर्व भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धांत स्वीकारला आहे. त्यामुळे कर्मसिद्धांत
हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक वैशिष्ट्य आहे. कर्मसिद्धांत हा विश्वाचा नियम मानला आहे.
हा जो कर्मविपाकाचा सिद्धांत आहे,
तो भारतीय मनावर प्रचंड
अधिराज्य गाजवून आहे. अगदी आजही आयुष्यात घडलेली चांगली घटना सुदैव म्हणून व वाईट घटना
कमनशीब म्हणून मांडली जाते. ‘समयसे
पहले और नशीब से जादा किसी को कुछ नहीं मिलता’ याची मनोमनी खात्री बहुसंख्य भारतीयांना
असते. ‘शेवटी वेळ यायला लागते, हेच खरं,’ हे प्रतिपादन चटकन मान्य होते. सोसाव्या लागणाऱ्या अडीअडचणी, हालअपेष्टा, दु:खे याकडे नियतीचा अटळ तडाखा म्हणून बघितले
जाते. या विरोधात हातपाय हलवले जातात, पण तरीही दैव आहे आणि ते आपल्याला अनुकूल व्हावयास हवे आहे,
ही भावना असते. चांगल्या वर्तनाला वा कर्माला
आज ना उद्या चांगलेच फळ येणार. वाईट कर्माचे कधीतरी परिणाम संबंधितांना सोसावे लागणार, असे कर्मसिद्धांत मांडतो. असे झाले असते
तर खरोखरच फारच चांगले झाले असते. परंतु तसे घडावे असे वाटण्यापोटी तसे घडत असले पाहिजे,
हा निष्कर्ष केवळ सदिच्छेवर आधारित आहे,
सत्यावर नाही. न्याय ही गोष्ट नैसर्गिक नाही.
समाजस्थापनेचा प्रवास खूप प्रदीर्घ आहे आणि मानवाचीच निर्मिती असलेला न्याय अवघ्या
तीन हजार वर्षांपूर्वीच निर्माण झाला. त्यापूर्वी तर न्याय आणि अन्याय हा भेदच अस्तित्वात
नव्हता. अजूनही न्याय फारच थोड्या प्रमाणात प्रत्यक्षात येतो आहे. कर्मसिद्धांताच्या
बाजूने केले जाणारे सर्व युक्तिवाद हे अतिशय दुर्बल व गैरलागू आहेत. हा सिद्धांत निराधार
तर आहेच; परंतु अन्यायकारकही आहे.
सुखकर अनुभव सत्कर्माची फळे आहेत व दु:खद अनुभव दुष्कर्माची फळे आहेत, असे सांगितले जात असेल तर ती सत्कर्मे कोणती
आणि दुष्कर्मे कोणती, हे
कळायलाच हवे. कर्मविपाकाच्या सिद्धांतात हे कळण्याची कोणतीच सोय नाही. ही गोष्ट न्यायाच्या
तत्त्वाच्या पूर्ण विरुद्ध आहे. अपराध्याला शिक्षा कोणत्या सत्कृत्याबद्दल दिली गेली
हे जर त्याला कळले नाही, तर
तो ती-ती कर्मे टाळणार कशी, वा
पुन्हा पुन्हा करणार कशी? अशा
निवाड्याला त्याग म्हणताच येणार नाही. अशा असमंजस, अर्थहीन कर्मकांडाद्वारे निसर्गाच्या
नैतिक शासनाची शेखी मिरविली जावी, हे
दु:खद असले तरी भारतीय जनमानसाचा विचार करता सत्य आहे. पुन्हा नीतिकल्पना आणि नैतिक
नियम स्थलकालसापेक्ष
असतात. त्यामुळे अनेक कर्माच्या बाबतीत ते चांगले आहेत का वाईट, याचा निर्णय करणे अशक्य आहे. भिन्न नीतिकल्पना
आणि नैतिक नियम स्थलकालसापेक्ष असतात. त्यामुळे अनेक कर्मांच्या बाबतीत ते चांगले
वा वाईट किंवा निषिद्ध अथवा अनुज्ञेय, असे असू शकते. शिवाय हा कर्मसिद्धांत म्हणे अनादिकालापासून,
निदान सृष्टी निर्माण झाल्यापासून तरी चालत
आला आहे. परंतु माकडापासून माणूस होणे या गोष्टीला काही लाख वर्षे लागली आहेत. त्यावेळी
त्याच्या ठिकाणी नैतिक विवेकशक्ती नव्हती. ती अतिशय हळूहळू काही हजार वर्षांत झाली.
अजूनही माणसातील पशू मोठ्या प्रमाणात कायम आहे. या सर्व गोष्टींचा कर्मसिद्धांताशी
मेळ बसूच शकत नाही. कर्मसिद्धांताच्या तत्त्वज्ञानातून मानवाच्या हातून उपक्रमशीलता,
बदलाचा आग्रह धरण्याची वृत्ती, जीवनातील अमंगल नष्ट करण्याची प्रेरणा नाहीशी
होते. केवळ उदासीन निष्क्रियता त्यांची जागा घेते. ही सर्व विचारधारा बुवाबाजीला अतिशय
पोषक आहे. आदिमानव खरोखरच अतिशय दुर्बल होता. त्यामुळे जे होणार तेच होते, ते कधी चुकत नाही, असे त्यांनी मानले. मनुष्याचे प्रयत्न वारंवार
विफल होताना दिसत असल्यामुळे आणि अनेकदा अत्यंत अनपेक्षित घटना घडत असल्यामुळे कर्मसिद्धांतावर
विश्वास बसतो. परंतु आदिम मानव यांनी मानलेली नियती या गोष्टीला एखादी
गोष्ट पूर्वनियत आहे, या
स्वरुपाचा पुरावा देणे अशक्य आहे. याकरिता काय घडणार, हे माहीत हवे आणि एखादी घटना घडणारच आहे,
असे वारंवार आणि अचूकपणे सांगता यावयास हवे.
आता यात अडचण अशी आहे की, यासाठी
भविष्याला अस्तित्व आहे, असे
मानावे लागेल. जसे अवकाशात काही प्रदेश जवळचा असतो आणि अन्य बरेच दूर असतात,
काही अंतर पार केल्यावर दूरचे प्रवेश दृष्टीस
पडतात, तसेच काळ या परिणामाबद्दलही
मानावे लागेल. म्हणजे भविष्य अस्तित्वात असतेच. पण हळूहळू उलगडत जाते, असा याचा अर्थ होतो. परंतु काळाला फक्त वर्तमानकाळ
अस्तित्वात असतो; तोही
क्षणमात्रच. दुसऱ्याच क्षणी तो भूतकाळात जमा होतो आणि त्याच्या जागी एक भविष्य;
परंतु खरे तर वर्तमान आकार घेतो. म्हणजे
भविष्य अस्तित्वात आलेले नसतेच, हे
जर मानले तर कोणत्याही माणसाला ते दिसणार कसे? नियतीची दृढ कल्पना या देशातील बहुसंख्य
लोक मानतात. यामुळे सद्य:स्थितीतील शोषण प्रारब्धाने आहे, अशी स्वत:च्या मनाची ते समजूत करून घेतात;
परंतु बाबांच्या, गुरूच्या कृपाप्रसादाने हे शक्य आहे,
असे मानले जाते. कारण बुवा अथवा महाराज साक्षात्
परमेश्वर असतो किंवा त्याचा दूत असतो. त्यामुळे शोषणाचे मूळ सामाजिक आणि भौतिक परिस्थितीत
शोधण्याऐवजी ते प्राक्तनात शोधले जाते. समाजातील शोषण प्रारब्धाने आहे, या वृत्तीला खतपाणी घातले की, त्यापासून सुटका होण्यासाठी कोणीतरी असा
हवा असतो की, जो
प्रारब्ध समजू शकेल व बदलू शकेल. कर्मविपाकाच्या सिद्धांताने बुवाबाजीला ताकद मिळेल.
बुवाबाजीविरोधी लढण्यासाठी आणि लोकांची मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी कर्मसिद्धांत
आणि दैव या कल्पनांतील तर्कदुष्टता लोकांना सांगावयास हवी.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा