पुस्तक विक्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पुस्तक विक्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७

रचनात्मक संघर्षाचे शिक्षण




रचनात्मक संघर्षाचे शिक्षण
दाभोलकर, संघर्ष, प्रबोधन, चळवळ, पुस्तक विक्री, प्रशिक्षण शिबीर
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्याख्यानांना, चमत्काराच्या प्रात्यक्षिकांना मिळणारा प्रतिसाद उदंड असतो. त्याही पुढे जाऊन एखाद्या बाबाचा पर्दाफाश करायचा असेल तर काहीजणांचा उत्साह अनावर होतो. भानामतीच्या घटना इतरांना गूढ वाटतात, तर आपल्या कार्यकर्त्यांना ती चांगली संधी वाटते. भूत दाखविणे अथवा कोणत्याही कार्यकर्त्याला भूत लावून दाखविणे, यासाठी संघर्षाच्या पवित्र्यात कार्यकर्ते सदैव सिद्ध असतात. चमत्कारांना द्यावयाचे आव्हान असाच उत्साह निर्माण करते. ही सारी आणि या स्वरुपाची इतर कारणे ही संघर्षाची असतात. त्यामध्ये नाट्य असते, आव्हान असते. बातमी असल्यामुळे प्रसिद्धी असते. समितीची ओळख आज महाराष्ट्राला आहे. त्यामध्ये अंधश्रद्धांच्या विरोधात सतत संघर्षात उभे राहणे, यात समितीच्या लढाऊपणाचा नक्कीच वाटा आहे.

याबरोबरच संघर्षाच्या कार्यक्रमाची एक मर्यादाही जाणवते. एक तर संघर्षाचे विषय सतत असतातच, असे नाही. चळवळ स्थिरावल्यानंतर आता गूढ भानामतीचे प्रकार फारसे आढळत नाहीत आणि आढळले तरी टिकत नाहीत. भुताबाबतचे आव्हान घेऊनही आता सहजासहजी कोणी पुढे येत नाही. चमत्काराचा दावा करणारे बुवा, बाबा, स्वामी, महाराज देखील अपवादानेच दिसतात. बुवाबाजीचे प्रकार घडत असतात व शाखा त्याचा प्रतिकारही करीत असतात.

संघर्ष करण्याचे कार्यक्रम घेण्यात आणखी एक अडचण असते. अनेकदा अंधश्रद्धेचे रूप अप्रकटपणे देवाधर्माशी जोडलेले असते. त्याबाबत किती कठोर प्रहार करायचा व त्याचा परिणाम काय होईल, हे ठरविणे, सांगणे सोपे नसते. मूळ मुद्दा बाजूला राहून भलतेच काही उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे संघर्ष टाळण्याकडे काही कार्यकर्त्यांचा कल असतो. शिवाय एकदा लढाईला तोंड फुटले की, किती वेळ लागेल हे सांगणे शक्य नसते. त्यासाठी हुकमी वेळ, पैसा, धावपळ याचे गणित जमवावे लागते. याबाबतही अनेक अडचणी असू शकतात. या साऱ्याचा परिणाम असा होतो की, चळवळीच्या चमकदारपणाच्या आकर्षणातून आपण चळवळीकडे येतो; परंतु या ना त्या कारणामुळे ती झळाळी राहत नाही. मग कार्य थंडावते, कार्यकर्ते पांगतात.

रचनात्मक कार्य
कुठल्याही चळवळीत लढाईचे, आकर्षणाचे, प्रसिद्धीचे प्रसंग कमीच असतात व असणार. पण ज्यावेळी संघर्षाला सामोरे जावे लागते, त्यावेळी हुकुमी उपलब्ध असा असावा म्हणून शक्तिसंचय करावा लागतो. तो करता येतो रचनात्मक कार्यामधून. शांत, संथ, झळाळी नसलेले; पण उपयुक्तता असलेले हे असे कार्य असते. त्याबाबत जेवढा उत्साह, चिकाटी, कल्पकता, सातत्य दाखवावयास हवे, तेवढे दाखविले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खरे तर भाषणे देणे हा कार्यक्रम शुष्क रचनात्मक नाही. समोरच्या श्रोतृवर्गाचा प्रतिसाद तुम्हाला ताबडतोब तुमच्या श्रमाचे फळ देतो. परंतु अर्थातच सन्मानाने मानधनासह निमंत्रण येईल, अशी वाट बघत बसले तर संपलेच. अनेक मोठ्या संघटनांचे कार्यकर्ते आजही स्वखर्चाने झपाटल्याप्रमाणे वेळ देऊन आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जिवाचे रान करीत असतात. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ मूलत: प्रबोधनाची चळवळ आहे. व्याख्यानाचे निमंत्रण मिळविणे ही बाब आता चळवळीच्या प्रभावाने अवघड राहिलेली नाही. खरा प्रश्न आहे, व्याख्यानाचा. रचनात्मक कार्यासाठी स्वत:च्या पुढाकाराने स्वत:चा वेळ देण्याचा.

आज अनेकविध रचनात्मक कामे संघटनेमार्फत निर्माण झालेली आहेत. माझा मुद्दा आहे तो असा की, ही रचनात्मक कामे संघटनेतील क्रियाशील कार्यकर्त्यांचा स्थायी भाव झालेली नाहीत. पुस्तकविक्री हे एक अतिशय उपयुक्त रचनात्मक हत्यार आहे. एका बाजूला समितीचा विचार त्यामुळे सर्वदूर जातो, तर दुसऱ्या बाजूला संघटनात्मक कामासाठी हुकमी निधी पुस्तकविक्रीच्या माध्यमातून उभा राहतो. मात्र यासाठी पुस्तक जवळ ठेवण्याची, इतरांना दाखविण्याची, त्याबद्दल बोलण्याची, पुस्तक विकत घेण्याचा आग्रह करण्याची वृत्ती हवी. आज संघटनेत असे आढळत नाही. सत्यशोध प्रज्ञा परीक्षा हे असेच एक रचनात्मक कार्य आहे. त्याचे प्रशिक्षण शिबीर घेतले की, आपले काम संपले, अशी जाणीव अनेक कार्यकर्त्यांच्यात आढळते. यामुळे शिबिराचा पाठपुरावा करून शिक्षकांना आपल्या शाळेत केंद्र सुरू करण्यासाठी उद्युक्त करणे, हे घडत नाही. मग स्वत:च्या शाखेमार्फत किमान एक-दोन शाळांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षेचे केंद्र चालविणे तर दूरच. खरे तर याही उपक्रमांतून विद्यार्थी अथवा तरुणांशी संपर्क आणि शाखेला काही निधी याचा लाभ होऊ शकतो. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पात आता आपण व्यसनमुक्ती, सर्पविज्ञान, महिला आरोग्य असे छोटे-छोटे अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर हे तर अधिकच गरजेचे झाले आहे.

कोणत्या कार्यकर्त्यांची उभारणी हवी?
याचे भान विसरले की, समितीच्या कामाला प्रासंगिक उत्साही उपक्रमाचे स्वरूप प्राप्त होते. आज अन्य कोणीही तेवढे करीत नाही. त्यामुळे त्या कार्याबाबत कौतुकही होते; परंतु यामधून ना संघर्षासाठी शक्तिसंचय होतो ना रचनात्मक कामाच्या भक्कम पायावर संघटनात्मक उभारणी होते. ही त्रुटी असूनही आज समितीचे कार्य तरून जाते, याचे कारण काहीजण खूप अधिक काम करतात आणि एकूण फायद्याची बाजू वरचढ दाखवतात. जसे-काही व्यक्ती, शाखा निष्ठेने मोठ्या संख्येने आपली प्रकाशने विकतात आणि समितीचा प्रकाशन व्यवसाय फायद्यात ठेवतात.

कुठल्याही संघटनेत रचनात्मक संघर्षाचे हे संतुलन कसे राखलेले असते, यावरच प्रगतीची वाटचाल अवलंबून असते. मला तरी आज याबाबत संघटनेची स्थिती समाधानकारक वाटत नाही. कामाची यापुढची झेप घ्यायची तर ही उणीव दूर करावयास हवी. मोजक्या संघर्षात असो; पण ठामपणे उभे राहतील आणि संथपणे, सातत्याने प्रसिद्धिविन्मुख राहून रचनात्मक कामाला स्वत:ला जोडून घेतील, अशा कार्यकर्त्यांची उभारणी हे आजचे अग्रहक्काचे काम आहे. हे कसे घडून येईल? आजची नेमकी स्थिती याबाबत काय आहे आणि ती कशी पालटेल, याबाबत मी सहकाऱ्यांचे मनोगत जाणून घेण्यास उत्सुक आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९७)




बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी



मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, अभियान, संघटन, पुस्तक विक्री, जनसंवाद
कोल्हापूरला डॉ. श्रीराम लागूंच्या सोबत कार्यक्रमाला गेलो होतो. रात्री कॉ. गोविंद पानसरे यांच्याबरोबर गप्पा झाल्या. पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस आहेत. कम्युनिस्ट संघटनेत हे पद त्या-त्या पातळीवरील सर्वोच्च असते. पानसरे हे चळवळीचे ज्येष्ठ मित्र आहेत. बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, ‘खरे सांगू, तुमची ही चळवळ मी गेली काही वर्षे पाहत आहे, ऐकत आहे; पण त्याकडे माझे फारसे लक्ष नव्हते. यावे असेही वाटले नाही; पण गेल्या दोन वर्षांत मला लक्षात आले की, चळवळ अंधश्रद्धेविरुद्ध चालवीत असला तरी तुम्ही भाषा बोलत आहात व्यापक परिवर्तनाच्या चळवळीची आणि ती मनापासूनची आहे; म्हणून मला तुमच्या कार्यात आस्था आली. समितीच्या कामाला व्यापक समाजबदलाच्या कामाचा भाग बनवण्याच्या आपल्या प्रयत्नाची ही उचित नोंद आपल्याला समाधान देणारी वाटावयास हवी.

याच विचाराचा एक भाग म्हणून आपण लढा नव्या स्वातंत्र्याचा, बेड्या तोडू गुलामीच्या हे अभियान घेत आहोत. त्यामागचा विचार व त्याबाबतचा व्यवहार हा दोन्ही चळवळीची बिरादरी वाढवण्यास उपयुक्त आहे. नगर जिल्ह्यात ता. २४ ते २८ हे अभियान प्रथम चालेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबरच, स्वातंत्र्य सैनिकांची संघटना, कामगार संघटना, युवावर्ग त्यामध्ये सहभागी होत आहे. ज्यासाठी स्वातंत्र्य मिळाले, त्यापेक्षा काही विपरीतच देशात घडत आहे. व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, फुटीरता, धर्मांधता जनजीवनात वाढते आहे, याची खंत स्वातंत्र्य सैनिकांना आहे. नवे आर्थिक धोरण हे बरोबर की चूक, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यामुळे लोकांच्या समोर प्रसारमाध्यमातून सादर होणारे बेबंद चंगळवादी जीवन हे निश्चितच घातक आहे. सरळपणे अर्थार्जन करून ते जीवन लाभणे केवळ अशक्य; मग भ्रष्टाचार वा दैववाद याचा आश्रय माणसे घेऊ लागली आहेत. अंधश्रद्धा वाढवण्याचा उद्योग राजकारणी लोक, शासन, प्रसारमाध्यमे करीत आहेत. गुलामगिरीची ही विविध रूपे आहेत. स्वातंत्र्यसैनिक राजकीय गुलामगिरीविरुद्ध लढले, कामगार लढू इच्छितो मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची धडपड आहे. या साऱ्यांनी आपली बिरादरी एकच आहे, हे ओळखून खांद्याला खांदा भिडवण्यास नको काय? ‘लढा नवा स्वातंत्र्याचा ही या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. आपण आपापल्या ठिकाणी प्रत्यक्ष कामातून ही बिरादरी बळकट करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

संघटनेच्या आघाडीवर या महिन्यात...
चळवळ सशक्त, मजबूत करावयाची तर संघटनाही तशीच हवी. संघटना तशी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हवा. क्रियाशील कार्यकर्त्यांचा, सामान्य सभासदांचा, वार्तापत्र वर्गणीदारांचा आणि वार्तापत्राचे केवळ वाचक असणाऱ्या हितचिंतकांचा देखील. हा सहभाग कसा असावा, याचे एक वेळापत्रकच आपण तयार केले आहे.

हा अंक तुम्हाला पोचेल, त्यावेळी आपला पुस्तक विक्री पंधरवडा सुरू झाला असेल. १ ते १५ ऑक्टोबर हा त्याचा कालखंड. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्रात स्वतंत्र चळवळ म्हणून अलिकडेच सुरू झाले. दलित चळवळ जशी दलित साहित्य घेऊन आली, तसे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू झाल्यावर या विषयाची पुस्तके मोठ्या प्रमाणात बाजारात आली. आपल्या समितीने देखील गेल्या तीन वर्षांत मिळून दहा पुस्तके-पुस्तिका प्रकाशित केल्या.
     
पण लक्षात घ्या, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. प्रकाशक पुस्तकांच्या प्रती काढतात. एक हजार वा दोन हजार आणि त्या खपतात दोन-तीन वर्षांत, आपल्याला हे परवडणारे नाही आणि महाराष्ट्रव्यापी संघटनेला शोभणारेही नाही.
     
आपली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेलीच पाहिजेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपण काही सर्वदूर पोचू शकत नाही. पण पुस्तके अनेकांच्या हातातून जातात. ठिकठिकाणी लोकांच्या मनात विचाराचे बीज टाकत जातात. चळवळीला हे खूप उपकारक ठरते. पुस्तके विकताना अनेकांशी संवाद होतो. चळवळीबद्दलचे जनमानस अधिक चांगल्या प्रकारे समजते. कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना एक कृती कार्यक्रम मिळतो. आपल्या पुस्तकांच्या किमती फारच माफक आहेत आणि ती विकत घ्या, असे सांगायला आपण तोंड उघडले तर लोकांचा हात विषयाच्या उत्सुकतेने, चळवळीच्या प्रेमापोटी, कमी किमतीमुळे-कारण कोणतेही असो; त्याच्या खिशात जातोच, असा अनुभव आहे.

तेव्हा १५ ऑक्टोबरपर्यंत; पण उशिरात उशिरा ऑक्टोबरअखेर क्रियाशील सचिव यांच्याकडून रोखीनेच घ्यावयाची. स्वत:चे शंभर रुपये घालायचे ते शाखा पातळीवर एकत्र करून वा स्वतंत्रपणे मारुतराव पांगे, ४०, शिवनेरी हौसिंग सोसायटी, अजिंक्यतारा रोड, गोडोली, सातारा. ४१५ ००१ या पत्त्यावर पाठवावयाचे. संघटनेच्या पोस्टेज खर्चाने, सवलतीच्या दरात पुस्तके आपल्याकडे येतील. पुस्तके विकायला बाहेर पडायचे. ती विकली जातातच, असा अनुभव आहे; परंतु समजा नाहीच विकली गेली तर पुस्तके परत पाठवा. संघटना आपले पैसे परत पाठवेल. पण ही पाळी येणारच नाही. मित्रांच्यात, शाळेत, ऑफिसात पुस्तके सहज विकली जातील. भाषणानंतर लोक हौसेने घेतील आणि वाढदिवस, लग्न अशा वेळी भेट म्हणून पुस्तकेच देण्यास विसरू नका.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९५)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...