रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद




वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी, संघटन
आज समाजात वैचारिक चर्चा करण्यात कोणाला रस राहिलेला नाही; कृती तर दूरच. सर्वत्र मरगळ आली आहे. या दृढ होत चाललेल्या नेहमीच्या समजांना महाराष्ट्रातल्या शिक्षणक्षेत्राच्या वैज्ञानिक जाणिवा कृती परिषदेने जोरदार धक्का दिला. ३० जून आणि १ जुलैला लातूरला ही परिषद संपन्न झाली. महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले व्यापक प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, कार्यकर्ते यांची ओसंडून वाहणारी संख्या; या सर्वांत प्रामुख्याने वयाने तरुण असलेल्यांचा सहभाग, उदंड उत्साह, चोख व्यवस्था व शिस्त आणि कृतीचा निर्धार या सर्वच बाबी मनाची उमेद वाढविणाऱ्या होत्या.

अंधश्रद्धा निर्मूलन पुढच्या टप्प्यावर
गेले एक तपाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काहीसे यश लाभले, तशाच मर्यादाही जाणवू लागल्या. चळवळीमधील सामर्थ्य कायम ठेवून मर्यादा ओलांडण्याचा लक्षणीय प्रयत्न म्हणजे ही परिषद. विज्ञानाची करणी हरघडी वापरताना विज्ञानाची विचारसरणी मात्र दूर ठेवण्याच्या प्रवृत्तीला या परिषदेने धक्का दिला. याची सुरुवात शिक्षण क्षेत्रातून होणेही उचितच होते. खरे तर भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे सर्व नागरिकांचेच कर्तव्य सांगितले आहे. पण शिक्षण क्षेत्रात त्याचे महत्त्व अधिक. कारण शिक्षणाचा गाभाघटकातील महत्त्वाचा घटक आहे, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती. शिक्षण म्हणजे जर वर्तनबदल असेल तर त्याबाबत शिक्षण क्षेत्राने विचार देणे व कृतीचा संस्कार करणे, दोन्ही मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारांचा पैलू देखील याला पूरकच आहे. व्यवहारात मात्र आज माणसे, युवक डोळस विचारांच्या आधारे कृती करून समाजजीवन अनुकूल पद्धतीने बदलता येते, हा वैज्ञानिक दृष्टिकोनातील आत्मविश्वास गमावताना आढळतात. फलज्योतिषाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, पंतप्रधानांना आराम पडण्यासाठीचा यज्ञ, समाजधुरिणांचे चमत्कार करणाऱ्या बाबापुढचे लोटांगण, ही त्याची एक बाजू वाढता दैववाद, छद्मविज्ञानाचा प्रभाव, प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात दीर्घदृष्टीचा अभाव व विवेकहिनता ही त्याची दुसरी बाजू. देशाचे वैज्ञानिक धोरण मांडताना पंडित नेहरू यांनी Scientific temperament is spirit of a free man असे उद्गार काढले होते. ते पुन्हा कसे आणावयाचे, हा खरा प्रश्न होता. याची सुरुवात केवळ विचारमंथनातून नव्हे, तर स्वत:च्या जीवनात आग्रहाने व निर्धाराने बदलण्यापासून व्हावी. हा संकल्प सामूहिक स्वरुपात व्यक्त व्हावा, ही कल्पना शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद संयोजनामागे होती.

विचारमंथन - वैज्ञानिक दृष्टिकोन
हेमू अधिकारी, ना. य. डोळे, विकास आमटे व दत्ता देसाई यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर सखोल चर्चा घडवून आणली. त्यातील सकारात्मक भाग पुढे आणला. ही विचारपद्धती मानवाच्या अंगभूत समतेचा विचार करून उत्तरे शोधता येतात, याकडे लक्ष वेधले गेले. राखीव जागांनी शिक्षणाचा दर्जा घसरला, मुसलमानांची संख्या या देशात एकदा हिंदूंना मागे टाकेल, मोठी धरणे हेच पाणी नियोजनाचे प्रभावी उत्तर आहे, या सर्व (गैर) समजाची चिकित्सा करतानाही वैज्ञानिक विचारपद्धती वापरता येते. मात्र यासाठी खुली चर्चा व चूक स्वीकारण्याची प्रवृत्ती आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नीतीसाठी काहीच उपयोग नाही, हेही खरे नाही. मूल्यनिर्मितीसाठीही त्याचा वापर करता येतो. देवावरची श्रद्धा ही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत; पण हा दृष्टिकोन रोज प्रश्न विचारावयास शिकवते, ही प्रवृत्ती केवळ निसर्गविज्ञानात नाही, तर मानवी दैनंदिन जीवनात वाढीला लावावयास हवी. विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेला, अनुयायांनी नेत्याला, सज्जनांनी गुंडाला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावयास हवी. ही मनोवृत्ती वाढीस लागली, तरच आपण ही अवघड लढाई हरतो आहोत, असे वाटते. तिचे विजयात रूपांतर होऊ शकेल, असा प्रतिपादनाचा सूर होता.

धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, धर्मचिकित्सा
गोविंद पानसरे, पुष्पाताई भावे, डॉ. आ. ह. साळुंखे व रावसाहेब कसबे यांच्या सहभागाने रंगलेले हे चर्चासत्र परिषदेचे परमोच्च बिंदू ठरावे. माणसाने चांगला माणूस होण्यासाठी स्वत:च्या गरजा निर्माण केल्या, त्यात धर्म आहे. जगात सर्व लोकसमूह धर्म मानणारे. त्यात एक असले तरी धर्माचा विनियोग तपासावयास हवा. माणुसकीचे वर्तन करणारा धर्म मान्य करावयास हवा. शोषण करणारा धर्म नाकारावयास हवा. यासाठीच चिकित्सा हवी. धर्माचे विलक्षण सामर्थ्य हे की, त्याच्यामुळे ज्यांचे शोषण वाढते, तेच त्याच्यासाठी रक्त सांडतात. ही माणसे सश्रद्ध व अगतिक फसवली गेलेली आहेत त्यांच्याबद्दल कणवच हवी. त्यांना योग्य बाजूने आणण्यासाठी केवळ शुष्क युक्तिवाद नाही, तर हृदय त्यांच्याशी जोडावे लागेल. जे चूक असेल ते निर्भयपणे नाकारावे लागेल. याचबरोबर धर्मग्रंथ, कर्मकांड, व्रतवैकल्य या सर्वांची चिकित्सा करावी लागेल. जनसमुदायाला असेच अंधश्रद्ध ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, ते या चिकित्सेवर हिंसक हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्याचा मुकाबला शक्तीने करावा लागेल आणि भौतिक वास्तव सामान्यांना सुखकर करणाऱ्या लढ्याशी त्यासाठी जोडून घ्यावे लागेल.

उद्घाटन-समारोप
परमेश्वर नाकारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन अशक्य, ही आपली नेहमीची भूमिका उद्घाटनाच्या सत्रात डॉ. श्रीराम लागू यांनी रोखठोक मांडली. मात्र पुढच्या काही सत्रात दत्ता देसाई व पुष्पाताई भावे यांनी त्याचा समर्थ प्रतिवाद केला. धर्म, विज्ञान व समाज यातील गुंतागुंत प्रा. य. दि. फडके यांनी समर्थपणे मांडली. शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले. समारोपाच्या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा विचार अजून शिक्षण क्षेत्राच्या बाहेर अडकलेल्या लक्षावधी तरुणांपर्यंत पोचविण्याचा सल्ला प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. अतिशय छोटे; पण आशयसंपन्न बोलताना निळूभाऊ फुले यांनी वैज्ञानिक जाणिवा रूजवण्यासाठी स्वत:च्या पातळीवर यासंदर्भातील कथनी आणि करणी यातील फरक नष्ट करावा, असे आवाहन केले. निर्धाराने केलेल्या कृती कार्यक्रमाने काय घडू शकते, याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रातील विविध पुरोगामी प्रवाह या परिषदेनिमित्त एकत्र आले, याचा आनंद आवर्जून व्यक्त केला आणि हे शहाणपण पुढेही चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कृती कार्यक्रम
सर्व प्रतिनिधींना विवेकजागर ही पुस्तिका नोंदणी करताना देण्यात आली होती. त्यामध्ये पंचवीस कृती कार्यक्रम देण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा त्याला आधार होता. यापैकी काही कार्यक्रमांबाबतचे अनुभवकथनही एका सत्रात झाले. वटसावित्रीच्या व्रताचे केलेले व्यापक सर्वेक्षण, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, भानामती निर्मूलनाची धडक मोहीम, पंधरा हजारांहून अधिक गणपती दान मिळवणारी विसर्जित गणपती दान करा ही मोहीम, फलज्योतिषाला आव्हान देण्याची शास्त्रीय पद्धती, याबाबतची माहिती प्रतिनिधींना उद्बोधक वाटली. खरे तर इतर उपक्रमही अनेक आहेत. प्रश्न आहे ते निर्धाराने अमलात आणण्याचा. याबाबतही ठोस निर्णय झाले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत दीडशे महाविद्यालयांत याबाबत व्याख्याने, चर्चा घडविल्या जातील. जे विद्यार्थी, प्राध्यापक यासाठी स्वत:हून पुढे येतील त्यांचे गट करण्यात येतील, त्यांना विवेकवाहिनी समर्पक नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मान्यतेने व त्यांच्यामार्फतच चालविली जातील. त्यांना मदत, मार्गदर्शन, प्रशिक्षित करण्याचे कार्य परिषद संयोजन समिती करेल. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वैज्ञानिक जाणिवा कृतिशील करण्याच्या निर्धाराने केलेला उठाव, असे त्याचे स्वरूप असेल. याचा प्रभाव त्या-त्या महाविद्यालयातील युवकांवर व सर्वांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर पडावा, अशी अपेक्षा आहे. हा प्रभाव समाजजीवनाला डोळसपणे, विवेकाने स्वत:चे आत्मभान जागृत करून अधिक समर्थ बनवेल, कृतिशील करेल, असा विश्वास परिषदेने निर्माण केला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लातूर जिल्हा शिक्षणसंस्था चालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, लातूर.
ठराव
समाजात आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. त्यामुळे समाजापुढील खरे प्रश्न बेकारी, दारिद्र्य, विषमता, जाती निर्मूलन, धर्मांधता यांचा डोळसपणे विचार करून उपाय शोधण्यास समाज अपुरा पडत आहे. मूल्याधिष्ठित वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अंग आहे, याचा जाणीवपूर्वक उल्लेख आम्ही करत आहोत. यामुळे सामाजिक मूल्यनिर्मितीसाठीही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे आम्हाला वाटते. या विचाराचा उठाव महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात व्हावयास हवा. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने जनमानसात प्रभावी व कृतिशील बनण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही परिषद करीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)




शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद




शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे संयुक्तपणे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद घेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे जाण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमास व्यापक स्वरुपात कृतीचा पाया लाभण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती ही प्रत्यक्ष कार्यक्रमातून हल्ली महाराष्ट्रातील लोकांपर्यंत कमी पोचते. कारण हल्ली वृत्तपत्रांना जिल्हा अथवा विभागाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रव्यापी परिषदेसारखी महत्त्वाची घटनाही योग्य प्रकारे महाराष्ट्रातील वृत्तपत्रीय प्रसारमाध्यमात नोंदवली जाईलच, असे नाही.

दुसरे असेही आहे की, अशा परिषदेच्या निमित्ताने आपला विचार सर्वदूर पोचवणे व त्यासाठी त्या विचाराच्या पैलूबाबत छोट्या-मोठ्या स्वरुपात लेखन करणे ही बाबदेखील महत्त्वाची असते. असे लेखन स्वत: करणे किंवा ज्यांना लेखनक्षमता आहे, अशा समविचारी मित्रांच्याकडून किंवा पत्रकारांकडून करवून घेणे. लेखन प्रकाशित होईल, याची काळजी घेणे हे कार्य ‘अंनिस’चे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून अपेक्षित आहे. या लेखनात कोणते मुद्दे यावेत, यासाठी पुढे विस्तृत नोंदी दिल्या आहेत. त्यापैकी काही मुद्द्यांचा वापर करून स्थानिक पातळीवरील छोटी-मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके यामध्ये छोटे-मोठे लेख द्यावेत. आधी संपादकांशी बोलून त्यांना अपेक्षित शब्दसंख्या विचारून घ्यावी. त्याबरोबरच लेखात त्यांना कोणत्या मुद्द्यांच्या चर्चा अधिक आवडेल, हेही विचारावे. लेख २१ अथवा २८ सप्टेंबर या दरम्यान प्रसिद्ध होण्यासाठी त्याआधी १० दिवस संपादकांना पोचावे लागतात. यासाठी माझ्या टिपणाचे वाचन होताच त्वरित कार्यवाही करावी. तसेच प्रसिद्धीला दिलेल्या लिखाणाची एक प्रत (ते कोठे प्रसिद्धीला दिले, या वृत्तपत्राच्या नावासह) माझ्याकडे पाठवावी.

लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या शैक्षणिक जाहीरनाम्यावरील लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे.

१) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभी राहिली. या टप्प्यापासून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत समितीच्या वैचारिकतेचा झालेला कृतिशील विकास समितीची प्रगल्भता स्पष्ट करते. हे टप्पे थोडक्यात पुढीलप्रमाणे.
अ) जादूटोणा, भूत, भानामती, डाकीण प्रथा, चमत्कार या सर्वांच्या विरोधात संघर्ष करणे हे समितीचे एक प्रमुख कार्य आहे. याबाबत समिती सतत संघर्षशील आहेच. जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती व अंधश्रद्धेला प्राधान्याने बळी पडणाऱ्या महिला व अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत राज्यव्यापी परिषद व जाहीरनामा या महत्त्वाच्या बाबी आहेत.
ब) वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी समितीने अथक प्रयत्न केले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण, त्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे, सुसज्ज वाहनातून विज्ञानबोध वाहिनी आणि फिरते नभांगण यासाठीचे प्रकल्प, सर्प, पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतची राज्यव्यापी परिषद शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद ही सर्व या वाटचालीची उदाहरणे आहेत.
क) अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढच्या टप्प्यावर विवेकवादाकडे वाटचाल केली. शासनाने व्यसनविरोधी समग्रनीती स्वीकारावी, यासाठी; तसेच एच.आय.व्ही.बाधित नसल्याची विवाहपूर्व चाचणी करावी, यासाठी एक लाख सह्यांचे निवेदन शासनाला दिले व राज्यव्यापी परिषद घेतली. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी राज्यव्यापी केंद्र सुरू केले व त्यामार्फत सुमारे २०० विवाह संपन्न झाले. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह समर्थन व संघटन परिषद घेतली.
ड) शिक्षण क्षेत्रात मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद चालू व्हावा म्हणून सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता याची शैक्षणिक सनद तयार केली.
इ) वरील सर्व वाटचालीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा ता. २३ व २४ फेबु्रवारीला राज्यव्यापी चर्चासत्रात तयार करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या सहकार्याने हा जाहीरनामा स्वीकृती परिषद ता. २७, २८ सप्टेंबर रोजी जळगावला होते आहे. या स्वरुपाचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील हा पहिला प्रयत्न आहे.

२) संघटनात्मक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मांडणी कालसुसंगत व समाजाला पुढे नेणारी आहे. याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण खाते, वनखाते, सामाजिक वनीकरण संचालनालय, पर्यावरण खाते अशा अनेक शासकीय यंत्रणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर आनंदाने सहयोग केला. ही बाब देखील समिती मांडत असलेल्या विचाराला मान्यता दाखवते.
३) हा जाहीरनामा ज्या गृहितकावर तयार केला आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूल्यांना व्यापक प्रमाणावर अधिमान्यता आहे. ती खालीलप्रमाणे-
अ) भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी व मानवतावाद यांची जोपासना करणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे.
ब) शिक्षणाच्या गाभाघटकात महत्त्वाचा गाभाघटक म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. याबरोबरच मूल्यशिक्षणातही त्याचा अंतर्भाव आहे.
क) महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी हाच विचार प्रभावीपणे मांडला आहे, व्यक्तिगत जीवनात आचरला आहे व सामाजिक जीवनात पुरस्कारला आहे.
ड) महाराष्ट्रातील बहुसंख्य शिक्षण संस्था आज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्रातील विद्यापीठांना संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांची नावे देण्यात आली आहेत, हे लक्षणीय आहे आणि या दोन्ही संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.

४) भारतीय घटनेने व्यक्तीला धर्मपालनाचे व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. या मूलभूत स्वातंत्र्याचा पूर्ण आदर करून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याचा विचार पसरवता येतो. याबरोबरच हेही लक्षात घ्यावयास हवे की, सामाजिक हितासाठी धर्मचिकित्सा करणे हे देखील संविधानास अभिप्रेत आहे. अशी धर्मचिकित्सा समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख करते, परमेश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री करते. त्यामधून धर्मनिरपेक्षतेचा विचार अधिक प्रगल्भ बनतो. यामुळे जाहीरनाम्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गाभा रूजवला जाईल.

जाहीरनामा अंमलबजावणीत अपेक्षित असलेल्या बाबी
१) शाळेचे प्रार्थना, परिपाठ यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देणाऱ्या गीतांचा, वचनांचा समावेश करावा.

२) आजही ग्रामीण महाराष्ट्रात जादूटोणा, भूत, भानामती, मंत्र-तंत्र, मूठ मारणे, चेटूक या स्वरूपाच्या अनेक अनिष्ट व अघोरी बाबी सुरू असतात. त्याबाबत विद्यार्थीमनात एक गूढता व संदिग्धता आढळते. अशा सर्व बाबी स्पष्टपणे व धैर्याने नाकारण्याचे विद्यार्थीमानस घडवावयास हवे. आजची पिढी अशी घडल्यास उद्याच्या समाजातील अंधश्रद्धा कमी होतील. महाराष्ट्र शासनाच्या संकल्पित जादूटोणाविरोधी कायदा हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे या कार्याला थोडी अनुकुलताही प्राप्त झाली आहे.

३) समाजात सर्व प्रकारची धार्मिक कर्मकांडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, वाढवली जात आहेत. समाजाच्या धार्मिक मानसिकतेला नैतिकतेकडे नेण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. याउलट सध्या सर्वच धर्मवादी शक्ती ही धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा खटाटोप राजकारणासाठी करत आहेत. अशा वेळी कालबाह्य रूढी, परंपरा याबाबतीत विधायक पर्याय देण्याची गरज आहे. असे प्रयत्न काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रात आज चालू आहेत. त्याला व्यापक पाठबळ जाहीरनामा व त्याची अंमलबजावणी यामुळे लाभेल. महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण करतात. याला पर्याय म्हणून मातीच्या अथवा कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार करून त्या वनस्पती रंगाने रंगवल्या व विसर्जन घरोघरी केले तर संपूर्ण परिस्थिती बदलते. लाकूड जाळणाऱ्या होळीला दुर्गुणांच्या होळीचा अभिनव पर्याय देता येतो.

४) केवळ विज्ञान विषयच नव्हे, तर शिक्षणातील सर्व विषय यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी पद्धतीने देता येतो, कृतिशील करता येतो. शिक्षकांचे सक्षमीकरण त्यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून मिळवून हे करता येते. याचे प्रयोग भारत ज्ञान-विज्ञान समुदायाने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत सिद्ध केले आहेत. शाळेत आलेले सुतार, सायकल दुरुस्तीवाले, शेतकरी या व्यवसायातले पालकही एक कृतिशील वैज्ञानिक दृष्टिकोन देतात व तो उपयुक्त ठरतो. या प्रयोगांचे अनुकरण व सार्वत्रिकीकरण व्हावयास हवे.

५) अवैज्ञानिक आत्मघातकी जीवनशैली आज विद्यार्थ्यांना सतत खुणावते व बाजारी व्यवस्थेने त्यांच्यावर लादलीही जाते. व्यसनाची ओढ, फास्टफूडचे सेवन, व्यायाम व वाचनाचा अभाव, यामुळे संपूर्ण जीवनशैलीच अशास्त्रीय बनते व आजारी पडते. दुसरीकडे ग्रीन हाऊस परिणामासारख्या बाबी पृथ्वीची मृत्युघंटा वाजवत आहेत. ही बाब शास्त्रीयपणे सर्वमान्य झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला संपूर्णपणे मानव जबाबदार आहे. २०३६ पर्यंत ग्रीन हाऊस वायूचे प्रमाण इतके वाढेल की, त्यामुळे संपूर्ण जगाचे भीषण व अपरिवर्तनीय नुकसान होईल, असे मानले जात आहे. काही मान्यवर तज्ज्ञ हे साल २०१२ असेच सांगतात. हा आघात सोसावा लागू नये म्हणून अनेकविध उपाययोजना व यंत्रणा आज कार्यरत आहेत. परंतु गाभ्याचा मुद्दा असा आहे की, वाढलेल्या ग्रीन हाऊस वायूचा संबंध सरळसरळ आजच्या चंगळवादी जीवनशैलीशी आहे. वातानुकूलित व्यवस्था, दिव्यांचा झगमगाट, असंख्य मोटारी, गगनचुंबी इमारती व जीवनशैलीला प्रगती मानणारा आणि त्या चंगळवादात बुडालेला वर्ग आज समाजनियंत्रण करतो आहे. हा वर्ग प्रभावी व संघटित आहे आणि या चंगळवादी जीवनशैलीचे गारूड त्याने भारतातील नव्हे, तर जगातील फार मोठ्या वंचित समूहावर घातले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने म्हणजेच विवेकवादाने जगत असताना पर्यायी जीवनशैलीची सामाजिक गरज निर्माण करणारी मानसिकताही तयार करावी लागेल. जसे खाजगी मोटारीऐवजी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यकतेशिवाय वातानुकूलित व्यवस्थेला नकार इत्यादी. हा विचार एक संस्कार म्हणून शिक्षणात रूजवला जावयास हवा.

६) भारतीय संदर्भात एका विशिष्ट महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख अपरिहार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला तर जन्मजात लाभणाऱ्या जातीप्रमाणे व्यक्तीला उच्च-नीच मानले जाते व त्याप्रमाणे व्यवहार करणे, ही निखालस अंधश्रद्धाच आहे. सर्व व्यक्तींची जन्मजात प्रतिष्ठा सारखी आहे हा संस्कार करावयास हवा. अर्थात, भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाची जी कल्पना आहे, तिला पाठिंबा देणे व जातीला अंधश्रद्धा मानणे या परस्परपूरक बाबी आहेत, याचे भान हवे.

शैक्षणिक जाहीरनामा अंमलबजावणी
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या शैक्षणिक जाहीरनाम्याचा वरील विस्तृत आशय पाहता हे कार्य संस्थांच्याकडून कसे पार पडेल, अशी एक आशंका येऊ शकते. त्याबाबत पुढील वस्तुस्थिती ध्यानात घ्यावयास हवी.

१) नव्या मूल्यजाणिवा रूजविण्याचे कार्य हे कोणत्याही देशात नेहमीच शिक्षण क्षेत्राचे मानले जाते. यामुळे ते स्वीकारणे हे शिक्षण व्यवस्थेने स्वत:चे कर्तव्य मानावयास हवे. भारतीय संविधानाची; तसेच शैक्षणिक धोरणाची शिक्षण क्षेत्राकडून हीच अपेक्षा आहे.

२) संपूर्ण शिक्षण क्षेत्राने या स्वरुपाचा निर्णय घेणे व राबवणे हे शासनावर अवलंबून असेल; परंतु महाराष्ट्रातील ज्या शिक्षण संस्था मनापासून शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हा वारसा मानतात, त्यांनी स्वत:च्या शिक्षण संस्थेच्या पातळीवर या जाहीरनाम्याची अंमलबजावणी आग्रहपूर्वक करावी, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे १५० शिक्षण संस्थांनी या जाहीरनाम्यास लेखी मान्यता कळवली आहे. या शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालये यांची संख्या याहीपेक्षा बरीच जास्त आहे. या सर्व शाळा, महाविद्यालयात जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास ते इतर संस्थांना नक्कीच पथदर्शक ठरू शकेल.

३) हा जाहीरनामा स्वीकारणाऱ्या संस्थांमधील अंमलबजावणी दोन टप्प्यात असेल -
अ) याबाबतच्या जाणीवजागृतीत मनापासून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांचे प्रशिक्षण घेतले जाईल.
ब) त्यांच्या मार्फत प्रामुख्याने विद्यार्थ्यांत; तसेच सहकारी प्राध्यापकांत हा विचार रुजवणारे प्रबोधन व कृती कार्यक्रम घेतले जातील. याचा आराखडा गेल्या २० वर्षांच्या वाटचालीतून समितीकडे आहे.

४) शिक्षकाने हे कार्य कोणतेही जादा काम या भावनेने करू नये आणि तसे ते त्याला करावे लागणारही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने स्वत: अधिक आधुनिक, यशस्वी व नैतिक व्यक्ती बनण्याचा आनंददायी प्रयत्न व त्याला सामूहिक रूप देणे, असे या कामाचे स्वरूप आहे.

५) शाळा अथवा महाविद्यालयात विचार प्रसार करणारे हे गट विवेकवाहिनी या नावाने कार्यरत होऊ शकतील. विवेकी स्वयंविकासाची ही प्रक्रिया विवेकवाहिनी या नावाने चालवण्यात महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण संचालनालयाची मान्यता आहे. शालेय पातळीवर ती मिळू शकेल व त्यामुळे एक अधिकृतता लाभू शकेल.

६) जाहीरनामा अंमलबजावणी करताना प्रधान कार्य योग्य विचार करावयास शिकवणे आणि त्या विचाराचा जाहीर प्रसार करणे, हे राहील. शक्य तेवढा आचार करावा हे अभिप्रेत आहेच; परंतु प्रत्यक्ष संघर्ष हा अभिप्रेत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१२)




शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

शैक्षणिक सनद परिषदेमागील वैचारिक सूत्र




शैक्षणिक सनद परिषदेमागील वैचारिक सूत्र
दाभोलकर, संविधान, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आरक्षण, विवेकवाहिनी
सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता हे भारतीय संविधानाचे फार महत्त्वाचे मूलभूत भाग आहेत. विशेष म्हणजे ते केवळ वैचारिक चर्चेतून नव्हे, तर १५० वर्षांच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्याचा जो अर्थ विकसित झाला, त्याच्याशी जोडलेला आहे. भारतातील सामाजिक, सांस्कृतिक स्थिती वेगळी असल्यामुळे या मांडणीलाही वेगळेपण प्राप्त झाले आहे. हा विचार जनसामान्यांपर्यंत सक्रिय पद्धतीने पोचवणारी राजकीय वा सामाजिक जनचळवळ समाजात सध्या अस्तित्वात नाही. यामुळे भारतीय संविधानात ही मूल्ये कशामुळे आली, याचा इतिहास, या मूल्यांचे पालन करण्यासाठी विचार व वर्तन कसे असावे, या संदर्भातील कोणतेही प्रबोधन सध्या समाजात होत नाही. याबाबतचा नेमका विचार शिक्षण क्षेत्रात चर्चेसाठीही टाळला जातो. ही बाब गंभीर आहे. मूल्यविचार रूजवणे हेच शिक्षण क्षेत्राचे प्रधान कार्य आहे. हे घडून यावे यासाठी विवेकी जनमानस घडवण्याचा प्रयत्न करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेकवाहिनी या संघटना सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता याची शैक्षणिक सनद तयार करण्यासाठी राज्यव्यापी अभ्यास वर्ग व त्याला जोडून परिषद घेत आहेत. या विचारमंथनातून तयार होणारी सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता यांची शैक्षणिक सनद महाराष्ट्र शासनाला सादर केली जाईल. शासनाने शिक्षण क्षेत्रामार्फत यासाठी पुढाकार घेतल्यास चांगलेच आहे. तसे नसेल तर स्वयंसेवी पद्धतीने हे कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना तरी ही सनद शिक्षक व विद्यार्थी यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी सहकार्य लाभावे, अशी कल्पना आहे. या विषयांची सूत्रमय मांडणी पुढे केली आहे. ती अंतिम नाही. परिषदेत तिला अंतिम रूप दिले जाईल.

धर्मनिरपेक्षता
१) भारतीय समाजात धर्मनिरपेक्षतेचा जो विचार रूजवावयाचा, त्याची मांडणी व कार्यपद्धती पाश्चिमात्य देशापेक्षा वेगळी असणार, याची स्पष्ट जाणीव घटनाकारांना होती. परदेशासारखे शासन व समाज यात धर्मविषयक पूर्ण फारकत करणे भारतात शक्य नव्हते व इष्टही नव्हते. कारण भारतात धर्माच्या नावानेच अनेकविध प्रकारचे शोषण चालू होते.
२) भारतीय घटनेतील धर्मविषयक भूमिका अशी आहे की, प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वत:च्या उपासनेचे, धर्मपालनाचे, पारलौकिक कल्याणाचे व अध्यात्मिक उन्नतीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे; मात्र हे स्वातंत्र्य निरपवाद नाही. सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक नीतिमत्ता, कायदा आणि सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता व नागरिकांचे मूलभूत अधिकार याबाबत जर धर्मस्वातंत्र्याचा अडथळा येत असेल तर ते स्वातंत्र्य शासन मर्यादित करू शकते. ही बाब स्पष्टपणे व प्रसंगी कृतीचा आग्रह धरत समाजात पोचवावयास हवी.
३) पंडित नेहरूंच्या कालखंडापर्यंत धर्मनिरपेक्षतेबद्दल काही एक आग्रही भूमिका घेतली जात होती. त्यानंतर अनेकविध कारणांनी धर्मनिरपेक्षता हा तत्त्वविचार हिंदू-मुस्लिम सलोखा आणि दुसऱ्या बाजूने मुसलमानांचे लांगुलचालन या चौकटीतच बसवला गेला.
४) लोकांच्या धार्मिकतेचा गैरफायदा घेऊन विविध स्वरुपाच्या कर्मकांडांतून व प्रचारातून त्यांची मने धर्मांध बनवणे. धर्म हा राजकीय फायद्याचा विषय बनवला गेला. याचा प्रतिवाद कसा करावा, या आखणीची गरज आहे. तो पुढील दोन प्रकारे होऊ शकतो.
अ) ज्या गोष्टी विज्ञानाने निखालस असत्य ठरवल्या आहेत, ज्यामुळे लोकांचे कमी-जास्त प्रमाणात शोषण होते, अशा बाबी धर्माचा भाग असूच शकत नाहीत, याचा प्रसार करणे, जादूटोणा, अघोरी प्रथा यासारख्या बाबीदेखील धर्माचा भाग मानून त्याविरोधी कायद्याला केला जाणारा तीव्र विरोध. या प्रबोधनाची गरज स्पष्ट कळते.
ब) लोकांची धार्मिकता ही त्यांची जगण्याची पद्धत समजून त्याचा आदर करावयास हवा. क) महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी ही धार्मिकता नैतिकतेकडे वळवण्याचा सक्रिय प्रयत्न केला. विधायक धार्मिकतेचा हा वारसा नीटपणे अभ्यासून प्रामाणिकपणे समाजात रूजवण्याचा प्रयत्न करावयास हवा.
५) धर्मनिरपेक्षतेच्या शैक्षणिक सनदेची मांडणी वरील विचारांच्या आधारे होईल.

सामाजिक न्याय
१) सामाजिक न्यायाची भूमिका ही व्यापक आहे; परंतु या परिषदेपुरता त्याचा संबंध हा राखीव जागांचे आरक्षण एवढ्यापुरताच घेतला आहे. सामाजिक न्यायासाठी आरक्षण ही कल्पनाच मुळात अन्याय करणारी आहे, गुणवत्ता डावलणारी आहे, समाजात फूट पाडणारी आहे, असा एक चुकीचा विचार समाजात हितसंबंधी वर्ग पद्धतशीरपणे रूजवतो आणि समाजातील एक मोठा घटक त्याला बळी पडलेलाही आढळतो. त्यामुळे समाजाला आतून दुभंगलेपण येते. ही बाब गंभीर - राष्ट्राला कमजोर करणारी आहे. यामुळेच याबाबतची वस्तुस्थिती नीटपणे समजावून सांगणे आणि तात्त्विक भूमिका विषद करणे आवश्यक आहे.
२) वस्तुस्थितीबाबत अनेक गैरसमज हेतुत: घडवून आणलेले आढळतात. उदा.
अ) राखीव जागा फक्त १० वर्षांसाठीच होत्या.
ब) राखीव जागेमुळे गुणवत्ता डावलली जाते.
क) पूर्वजांनी जातिव्यवस्था पाळण्याची चूक केली. त्याची शिक्षा त्यांच्या आजच्या वारसांना नको.
ड) १२ वीपर्यंत सर्वांना मोफत दर्जेदार शिक्षण द्या; पण त्यानंतर पुढील वाटचाल फक्त गुणवत्तेवरच व्हावयास हवी.

वरील स्वरुपाच्या सर्व हेतुत: पसरवण्यात येणाऱ्या अपप्रचाराला योग्य ती उत्तरे आहेत. मात्र विद्यार्थी सोडाच; त्यांचे शिक्षक, प्राध्यापक एवढेच नव्हे, तर समाजातील सुशिक्षित वर्गही वरील बाबतीत पूर्णत: अनभिज्ञ आढळतो.

३) वस्तुस्थितीची काही परिमाणे नीटपणे समजावून सांगावयास हवीत. त्यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे :
अ) वेगवेगळ्या स्वरुपात, समाजात आरक्षण असतेच याचा तपशील.
ब) जगातील सर्व देशात कोणत्या ना कोणत्या कारणाने मागास राहिलेल्या समाजासाठी तरतूद केलेली असतेच. त्याचे नाव वेगळे असेल; परंतु तत्त्व सामाजिक न्यायाचेच आहे. क) आरक्षण व्यवस्था चालू होऊनही काही दशके उलटली; परंतु आजही देण्यात आलेले आरक्षणही पूर्णपणे भरलेले नाही.
ड) आरक्षण मिळणाऱ्या वर्गातील जे स्थिर व संपन्न झाले आहेत, त्यांच्याऐवजी त्याच समाजातील दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ देणे हे न्यायोचित आहे.

४) या प्रश्नाबाबत काही मूलभूत मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अ) आरक्षण ही कायमस्वरुपी चालू ठेवण्याची गोष्ट नाही. जातिव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता यावरील तो उपाय आहे; परंतु सैद्धांतिक भूमिका अशीच घ्यावयास हवी, की जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे होऊ शकते. ते निर्धाराने करावयास हवे. राखीव जागांचा प्रश्न मग आपोआपच संपुष्टात येतो.
ब) जातिव्यवस्थेचे निर्मूलन होत नाही, तोपर्यंत राखीव जागासदृश्य उपाययोजना बंद करणे हा राष्ट्रीय एकात्मतेवरील मोठा आघात ठरेल.
क) आर्थिक निकषावर राखीव जागा ठेवणे, हे व्यवहारात तर शक्य नाहीच; परंतु ते भारतीय संविधानातील तरतुदी लक्षात घेता अशक्य आहे.
ड) भारतात उच्च शिक्षणाची संधी फारच छोट्या वर्गाला उपलब्ध आहे. ही संधी फार मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आणि त्यासाठी शिक्षणावरील खर्चाची पुनर्रचना करण्याची गरज आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००६)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...