वाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाचन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

प्राथमिक अध्ययनाची गरज



प्राथमिक अध्ययनाची गरज

दाभोलकर, विवेकवाद, वैचारिक शिबीर, अध्ययन, वाचन
विवेकवादाचे शिबीर सातारला झाले. मे महिन्यातील महाराष्ट्र पातळीवरच्या बैठकीत असे शिबीर घेण्याचे ठरले होते. कार्यकर्त्यांचे वैचारिक भान सकस करण्यासाठी. शिबीर घेतले, या विषयाचे भारतीय पातळीवरचे गाढे अभ्यासक प्रा. मे. पु. रेगे यांनी. या विषयावरचा त्यांचा व्यासंग व अधिकार सर्वमान्य आहे. कोणत्याही स्वरुपात प्रवासखर्च वा मानधन न घेता ते आले होते. निवास, भोजनाचा सर्व खर्च एकता शिक्षण प्रसारक संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने उचलला होता. थोडक्यात, चळवळीच्या वैचारिक वर्धिष्णुतेसाठी आपल्याला निरपेक्षपणे मदत करण्यास लोक तयार होते, आहेत.

आठ जिल्ह्यांतले आपले चाळीसहून अधिक कार्यकर्ते शिबिराला आले होते. ही बाब मला आश्वासक वाटली. प्रा. रेगे यांना आम्ही विनंती केली होती की, विषयाची मांडणी शक्य तेवढी साधी सोपी करावी. प्रा. रेगेंनी ती मानली, प्रत्यक्षात आणली. युरोपमधला प्रबोधनाचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा उदय, प्रभात, त्याची चिकित्सा, विवेकवादाचा उदय, त्याचे सामर्थ्य, त्याबाबत निर्माण होणारे महत्त्वाचे काही प्रश्न, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना, त्याचा विवेकवादाशी संबंध, हे त्यांनी थोडक्यात नेमकेपणाने मांडले.

शिबीर कसे वाटले, याच्याबद्दल माझ्याशी फारसे कुणी बोलले नाही. परंतु कार्यकर्त्यांच्यात आपापसांत झालेली चर्चा कानावर आली. चौकशी केल्यावर थोडे अधिक कळले. कळले ते असे की, शिबिरातील मांडणी नीटपणे फारशी कोणाला उमगली नाही. बऱ्याच जणांना तर ती दुर्बोधच वाटली. आपण सातत्याने सांगत आलो आहोत की, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही केवळ बुवाबाजी, भूत, भानामती, फलज्योतिष अशा अंधश्रद्धांना विरोध यासाठी नाही. या प्रकारावर व्यक्ती विश्वास ठेवते. त्याचे कारण या चुकीच्या बाबींचा तिच्यावर झालेला संस्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तिच्यामधील अभाव. हा संस्कार दूर करणे, शास्त्रीय जाणीव रूजविणे, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह धरणे, खऱ्याखुऱ्या राष्ट्राच्या उभारणीला मदत करणे, हा आपल्या चळवळीचा व्यापक आशय आहे. याबाबत आपली चळवळ पुरेशी स्पष्ट आहे; परंतु ही झाली कागदावरची भूमिका. ती स्वत:च्या जीवनात उमटावयाची, इतरांवर संस्कारित करायची, समाजजीवनावर प्रभावी करावयाची तर स्वत:च्या अध्ययनात ती स्पष्ट हवी. मला हल्ली स्पष्टपणे जाणवू लागले आहे की, याबाबत आपण अजून फार म्हणजे फारच मागे आहोत. अंधश्रद्धेच्या लोकप्रिय प्रकाराबाबतची खुमासदार भाषणे, ठराविक पुस्तकातील तेच ते मुद्दे यापलिकडे व्यापक विचाराला भिडण्याचेही आपण टाळतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आपण शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगू का, याचा विचार प्रत्येकाने केला तर स्वत:लाच त्याचे काय उत्तर मिळेल. धर्माचा इतिहास, विवेकवाद, नीती, धर्मनिरपेक्षता हे तर मग फार पुढचे झाले.

एक मला मान्य आहे की, या अभ्यासाची गरज काय? असा प्रश्न आपल्यातील बहुतेकांना पडत नाही, त्यांना गरज जाणवते, आवश्यकता पडते; परंतु प्रत्यक्षात त्या पलिकडे पाऊल पडत नाही. वाचन, लेखन, चिंतन याची एक स्वाभाविक अनिच्छा, वैचारिक परिश्रम घेण्याबद्दल निरुत्साह आणि बुवाबाजी, भूत, भानामतीविरोधी लढताना उदंड उत्साह, असे चित्र जाणवते. चळवळीला कृतीची गरज असतेच; परंतु कृती म्हणजेच चळवळ नव्हे. आपल्यासारख्या समाजपरिवर्तनाच्या व्यापक चळवळीला एक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लागते. आपले अधिष्ठान आहे धर्मनिरपेक्ष विवेकवादी नीतीचे. पण हा शब्द उच्चारून भागत नाही. तो नीट समजावा लागतो, पचावा लागतो. स्वत:च्या जीवनात चळवळीच्या कृतीत उतरावा लागतो.

यासाठी प्राथमिक अध्ययनाची गरज अनिवार्य असलेली मला वाटते. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यासाठी सजगपणे सुरुवात करावयास हवी. इतर समविचारी संघटनेतील मित्रांचेही सहाय्य घेण्यास हरकत नाही. पण महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतातील समाजसुधारणांचा इतिहास, प्रमुख धर्मतत्त्वज्ञानाची प्राथमिक नीट ओळख, मानवेंद्रनाथ रॉय, बर्ट्रांड रसेल यांचे लेखन, नीतिशास्त्राबद्दलची प्राथमिक माहिती. धर्मनिरपेक्षतेबाबतची मांडणी या व अशा अन्य गोष्टी आपल्या वाचनाच्या, अध्ययनाच्या भाग बनवावयास हव्यात. आपापल्या ठिकाणी केंद्रातील अन्य कार्यकर्त्यांपर्यंत हा विचार पोचवायला हवा. चर्चेतून, चिंतनातून स्पष्टता वाढवावयास हवी, बुवाबाजी आणि इतर अंधश्रद्धा या विरोधातील संघर्ष महत्त्वाचा आहेच; पण तो पुरेसा नाही. शिवाय अनेक जण या ना त्या कारणाने त्या रणधुमाळीत नसतात. तेव्हा कसाही विचार केला तरी खोल पाण्यात उतरण्याचे महत्त्व वादातीतच राहतं. तुमच्या विवेकाला काय वाटतं?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९३)  

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

वाचन मनन, चिंतन



वाचन मनन, चिंतन     
दाभोलकर, सत्याग्रह, पशुहत्याविरोध, वाचन
१७ फेब्रुवारीला बार्शीला पोचलो. १८ तारखेला चाळीसजणांसह निपाणीकरांच्या नेतृत्वाखाली चिवरीच्या यात्रेत सत्याग्रहासाठी दाखल झालो. मागच्या वर्षीच्या आठवणी मनात जाग्या होत्या. निवडणुकीच्या प्रचारासारखी रणधुमाळी मागील वर्षी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात उठवली होती. शासनाची साथ होतीच. देवीसमोरच्या जागेवरचे बळी थांबले हे खरे; पण बाजूबाजूला हजार-बाराशे पशुहत्या झालीच. शिवाय दुसऱ्या दिवशी भुताच्या यात्रेच्या वेळी प्रबोधन करणाऱ्या सत्याग्रहींना मार खावा लागला. या वर्षी काय होणार याचे प्रश्नचिन्ह मागील वर्षीपेक्षा मोठे होते. मागील वर्षीची स्थिती यावर्षीही कायम राहावी, असा आपला आग्रह होता. यंदा पशुहत्या करावयाचीच, असा शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अट्टाहास होता. शासन सांगत होते की, प्रबोधन मोहीम चालवू नका, सत्याग्रह करू नका, आम्ही सारे बघून घेतो. अशा तणावाच्या वातावरणात लाख-दीड लाखाच्या यात्रेत काय होणार, याचा दबाव आणि चिंता सर्वांनाच होती. १८ तारखेला सकाळी यात्रास्थळावर गाडी पोचली आणि लक्षात आले प्रश्न खरा सोडवलाय भाविकांनीच, यात्रेकरूंनीच. म्हणजे असे की, ते यात्रेला फिरकलेच नाहीत. लाखाची यात्रा मांडली जाणाऱ्या त्या विस्तीर्ण माळरानावर जेमतेम पाच-दहा हजार यात्रेकरूच आले होते. अनेक गावांत तर आठवडा बाजाराला यापेक्षा जास्त गर्दी असते; शिवाय येताना त्यांनी रेडे, बकरी, कोंबड्या काहीच आणले नव्हते. त्यामुळे हत्या होण्याची शक्यता मुळातच निकालात निघाली होती. तापलेल्या वातावरणाचा हा सारा अप्रत्यक्ष परिणाम होता.

मला आणि सोबतच्या अनेकांना प्रश्न पडला. यात्रा जवळपास मोडलीच. हे चांगले घडले की वाईट? योग्य की अयोग्य? यात्रेतील पशुहत्या थांबायला हवीच, अंगात येऊन बेभान घुमणे बंद व्हायला हवेच, याबद्दल शंकाच नाही. पण यापलिकडे जाऊन यात्रा भरण्यालाच आपला विरोध आहे का? यात्रा म्हणजे त्याला येणाऱ्यांच्या दृष्टीने जणू स्नेहसंमेलनच. हजारोंच्या संख्येने जथ्थ्या-जथ्थ्याने येऊन लहानमोठे, पुरुष-बाया, अडाणी, ग्रामीण समाजाला सामुदायिक आनंद लुटण्याचे ठिकाण म्हणजे त्यांच्या यात्रा. त्यामध्ये पशुहत्या होऊ नये हे बरोबर; पण पूर्ण यात्राच बंद पडणे किती श्रेयस्कर? आपला विरोध नेमका कशाला? उत्तर वाटते तितके सोपे नाही; पण टाळता येणारेही नाही. आपण साऱ्यांनीच स्वत:च्या विचाराला यासाठी ताण द्यावयास हवा. तो तुम्ही द्यावा, मनमोकळेपणाने यावर बोलावे, लिहावे असे मला आग्रहाने सुचवावेसे वाटते.
मुंबईला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. जहागीरदार यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. ते अलिकडेच निवृत्त झाले. विवेकनिष्ठ, वैज्ञानिक विचारसरणीचे न्या. जहागीरदार हे कृतिशील उपासक. खंदे पुरस्कर्ते. निवृत्तीनंतर न्यायमूर्तींना या ना त्या स्वरुपात सन्मानित कामे व पदे सहज मिळतात; पण जहागीरदार यांनी निर्णय घेतला की, वेळ फक्त वाचन-मननात घालवायचा आणि एवढेच नाही, तर आपल्याला कोणीही कार्यक्रमाला बोलवले तर आपल्या खर्चाने सामाजिक भावनेने जायचे. त्यांना वाटते, निवृत्ती आधीच घेतली असती तर बरे झाले असते. कारण वाचायला महासागर पडलाय आणि वेळ तर इतका अपुरा. मी त्यांना विनंती केली, दर महिन्यातून एखादा दिवस मुंबईतील आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तुमच्या या वाचनातले काही कण देत चला. त्यांनी ती आनंदाने मान्य केली.

मला वाटतं, आपला प्रश्न दुहेरी आहे. महाराष्ट्रात फिरताना मला सतत जाणवतं की, कार्यकर्त्यांचे नवे मराठी वाचनही थांबले आहे. मग त्यांचे मनन, चिंतन आणि स्वत:च्या मांडणीत त्याचा समावेश तर दूरच राहिला. हा विचारांचा शिळेपणा घालवायला निर्धारपूर्वक कंबर कसायला हवी. चळवळ पुढे जाते आहे आणि कार्यकर्ता विचारात मागे रेंगाळतो आहे, हे चित्र बदलावयास हवे. पण समजा अगदी नाहीच झाला वेळ तर निदान आपापल्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशा कार्यकर्त्यांना, मित्रांना आणि सहानुभूतीदारांना एकत्र घेऊन महिन्यातून किमान एकदा तरी एक बैठक घ्यावी आणि आपल्याकडे असलेल्या चळवळीवरील एखाद्या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करायला हरकत नाही. सुरुवातीला एखादा विषय घ्यायचा, त्यावर वाचन करायचे, चर्चा करायची, असा प्रयत्न केला तरी विचारांची देवाणघेवाण होईल. पुढच्या बैठकीकरिता प्रत्येकाने काहीतरी वाचन करून यायचे आणि मग त्यावर चर्चा करायची. या चर्चेच्या अनुरोधाने आपल्या समोरील प्रश्नांकडे पाहण्याची एक वैचारिक पातळी निर्माण होण्यास मदत होईल. 
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९२)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...