वास्तुशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वास्तुशास्त्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

‘भ्रमंती’ची दैनंदिनी




‘भ्रमंती’ची दैनंदिनी
दाभोलकर, चळवळ, संघटन, ताई महाराज, कायदा, वास्तुशास्त्र  
भ्रमंती सदर म्हणजे धावपळीच्या दौऱ्यामध्ये भावलेले तुमच्यापर्यंत पोचविणे. कधी एखादी घटना, कधी विचारतरंग, तर कधी चळवळीच्या अंतरंगाचे दर्शन; पण गेल्या महिन्यात भटकंती इतकी झाली की, ‘भ्रमंती सदरात यावेळी फक्त त्यातील काही नोंदीच करायचं ठरवलं. शक्यता आहे (असावीच) की, त्यातले काही तुम्हाला विचारप्रवृत्त, कार्यप्रवृत्त करेल. तसे नाही; तरीपण त्याबाबत पत्र लिहायला प्रवृत्त केले, तरी तेही नसे थोडके.

ऑगस्ट - बेळगावात तीन कॉलेजात व्याख्याने, सायंकाळी कार्यकर्त्यांची बैठक, त्यामध्ये महिला-विद्यार्थिनींची उपस्थिती. हे चित्र आपल्याकडे इतके दुर्मिळ का बरे आहे? बैठकीला अनपेक्षितपणे दै. गोमन्तक-पणजीचे संपादक चंद्रकांत घोरपडे आले. अगदी छोटेच भाषण दिले. पण आपल्या कामाचे सामाजिक, सांस्कृतिक संबंध काय आहेत, काय असावेत, यावर त्यामध्ये मर्मग्राही भष्य होते. आपल्या संघटनेतील किती जण हे व्यापक भान जोपासतात?

, ४ ऑगस्ट - पोतराज निर्मूलन परिषद, तुळजापूर- परिषद यशस्वी झाली म्हणता येईल इतपत संयोजन होते. पण त्याला अन्यही कारणे होती. मला जाणवली ती गोष्ट वेगळीच. तुळजापूरला समितीची शाखा नाही. मारुती बनसोडे खूप राबला; पण संघटनेची उणीव तो कसा भरून काढणार? असे मोठे कार्यक्रम घ्यावयाचे म्हणजे एकतर तेथे आपली संघटना हवी. नाहीतर प्रसंगी बाहेर जाऊन चार-आठ दिवसांची सवड काढून तेथे मुक्काम ठोकणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी हवी. आज संघटनेत हुकमी कार्यकर्त्यांचा अभाव जाणवतो. तो कसा दूर करता येईल?

७ ऑगस्ट -वारणानगर - व्याख्यानमालेत बावन्न हजार रुपयांची पुस्तके व्याख्यानानंतर विकली गेली. कोणत्याही कार्यक्रमाला कंटाळा न करता आपली पुस्तके बरोबर हवीतच.

१९ ऑगस्ट- जालना - कॉलेजात शिबीर झाले. कामासाठी सायंकाळी बैठक. २५-३० जण हजर होते. त्याच रात्री परतूरला खुल्या मुलाखतीचा कार्यक्रम. वीज गेल्याने बराच वेळ अंधार होता. त्यामध्येही शंभरजण शांतपणे चर्चेसाठी आलेले. सकाळी कॉलेजात कार्यक्रम. संस्थेचे चेअरमन म्हणाले, संस्थेच्या सर्व सोळा शाळांना पुस्तकांचे संच घेतो. सायंकाळी औरंगाबाद येथील स्वामी विवेकानंद कॉलेजात प्राचार्यांसह वातावरण उत्साही. जालना, परतूर, औरंगाबाद सर्वत्र मला जाणवत होते की, लोक समिती समजून घेण्यास उत्सुक आहेत. मर्यादित प्रमाणात; पण निश्चितपणे प्रत्यक्ष सहभागासाठीही अनुकूल आहेत. हे तुम्हाला जाणवते का?
     
२० ऑगस्ट- नेवासा/शेवगाव- सत्यशोध प्रज्ञा परीक्षांची शिबिरे दोन्ही ठिकाणी झाली. पण त्याशिवाय नेवासा येथे इन्स्पेक्टर जाधव मुद्दामहून भेटायला आले. शिबिरालाही आले. ते मोठ्या उत्साहाने व चिकाटीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा आशय असलेली फिल्म तयार करतात. (रहस्य शोधून काढणाऱ्या अंनिसच्या पथकाच्या प्रमुखाचे काम मेहमूद करतोय) शेवगावला पत्रकार परिषदेत बहुतेक प्रमुख दैनिकांचे पत्रकार आले होते आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ते सर्व समितीचे कार्यकर्ते होते, हेही सांगत होते. वेगवेगळ्या माणसांना आपल्याशी जोडून ठेवणे, ही जाणीवपूर्वक घडवावयाची गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात (सत्य न सोडता केलेल्या) लोकसंग्रहाशिवाय पर्याय नाही, हे आपल्यापैकी किती जणांच्या लक्षात आलंय!

२२ ऑगस्ट मरकळ (जि. पुणे) - दत्ताचा अवतार बनलेल्या ताईमहाराजांच्या विरोधात सभा घेण्यासाठी गेलो. सभेला गर्दी ठीक होती. प्रतिसाद चांगला होता. स्थानिक शिवसेना सभेत आपल्या बाजूने बोलली. गाव वारकरी संप्रदायाचे. त्यांनी सभेत मुद्दा काढला. ताईमहाराजांची ही बुवाबाजी हा संतांना कलंक आहे. सभेसाठी वातावरण तयार करणे, आधी प्रचार करणे या बाबी आपल्या पुण्याच्या शाखेने फार परिश्रमपूर्वक केल्या होत्या; पण हे चित्र एकीकडे आणि दुसरीकडे सात महिन्यांपूर्वी दैवीसंचाराचा बनाव घडवून ताईमहाराज बनलेल्या अरुणा लोखंडेचा अफाट भक्तगण (यामध्ये फार मोठ्या संख्येने स्त्रिया) हे चित्र, दुसरीकडे. आपल्या कामाच्या खडतरपणाचाच नव्हे, तर मती गुंग करणाऱ्या वास्तवाचा वेध कसा घ्यावयाचा?

२४ ऑगस्ट - अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने स्वत:हून समिती स्थापन केली. त्यात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कायदा खात्याचे माजी सचिवही होते. विधान परिषदेत मान्य झालेला कायद्याचा ठराव त्यात घेऊन त्यांनी प्रत्यक्ष कायद्याचा मसुदा काटेकोरपणे तयार केला होता. न्या. धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना व्यक्तिगत पत्र लिहून प्रतिष्ठानच्या वतीने ती मागणी करावी आणि नकार आल्यास विधानसभेच्या नोव्हेंबरच्या अधिवेशनात नागपूरला मागणी परिषद घ्यावी आणि त्यानेही नाही भागले तर मार्चच्या विधानसभा अधिवेशनावेळी धरणे धरावे, असे ठरले. गेली सात वर्षे चिकाटीने आपण ही मागणी करत आहोत. त्याला यामुळे निश्चितच यश येईल. पुन्हा तोच मुद्दा सहकार्याचे समर्थ हात शोधणे, जोडणे, जोपासणे अधिकाधिक प्रभावी कसे करता येईल?

२४ तारखेला सायंकाळी वनमाळी हॉलला वास्तुशास्त्रावर परिसंवाद झाला. तुडुंब गर्दी. सध्याचा जिव्हाळ्याचा विषय. आपण महाराष्ट्रात तो प्रभावीपणे न्यावयास हवा. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आवर्जून हे परिसंवाद व्हावयास हवेत. कुठलीही चळवळ हाती घेताना महत्त्व असते, अचूक टायमिंग साधायला. तथाकथित वास्तुशास्त्राला चळवळीचा विषय म्हणून पकडणे हे समितीच्या बहुसंख्य शहरी शाखांना का बरे जमले नाही? नोंद करण्यासारखी वेगळी बाब म्हणजे या कार्यक्रमानंतर समितीचे कार्यकर्ते होण्यासाठी ८० जणांनी नावे नोंदविली. असा उत्साह पुढे संघटित कसा करावयाचा?

२५, २६ ऑगस्ट मुंबईत जाहिराती मिळविण्यासाठी हिंडलो. कोठेही नकारघंटा मिळाली नाही. बहुतेक ठिकाणी तर प्रतिसाद अनुकूलच होता. जाहिराती मिळवताना आणि वर्गणीदार नोंदविताना नि:संकोचपणे मागायला सुरुवात करून तर बघा आणि मग अनुभव कळवा, देणाऱ्याचे हात किती?
     
३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर लातूरचे शिबीर - माध्यमिक शिक्षक व प्राध्यापकांचे एकता शिबीर चांगले झालेच; पण कार्यकर्त्यांनी सर्व दोनशे शिबिरार्थींचे भोजन माणसे लावून तयार करून घेतले आणि विशेष म्हणजे ही धावाधाव करताना हिशेब तयार करून मी रात्री लातूर सोडण्यापूर्वीच माझ्या हाती सर्व हिशेब चोख ठेवला. सर्वांनीच गिरवावा असा कित्ता हा झाला. एका महिन्याचा ताळेबंद; पण यामधून मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि संधीची सार्थकता करण्यासाठी ज्यावेळी आपण कामाला भिडू, त्याचवेळी ही भ्रमंती मनामनात आणि कामाकामात सुरू होणार.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९६)




बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक! (भाग 2)



आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक! (भाग 2)

दाभोलकर,   सत्यनारायण, फलज्योतिष, वास्तुशास्त्र,  सत्यशोधकी विवाह,  कुंडलिनी
१) पुणे शहरातील एका नामवंत शाळेला साठ वर्षे झाली म्हणून त्या शाळेने एकाच वेळी सत्यनारायणाच्या साठ महापूजा घातल्या. त्या विरोधात समितीच्या पुणे शाखेने पूर्ण दिवसभर धरणे धरले. स्फोटक वातावरणात असा कार्यक्रम घेणे म्हणजे लोकक्षोभाचा बळी होण्याची शक्यता असते. हा धोका पत्करून समितीचे कार्यकर्ते तेथे नुसते बसलेच नाहीत; तर त्यांनी तेथे एक बंद पेटी ठेवली आणि त्यावर लिहिले, ‘बोलते व्हा. मोठ्या प्रमाणात धरण्यांबाबतच्या प्रतिक्रिया पेटीत जमा झाल्या. पेटी उघडल्यावर हे लक्षात आले की, त्यातील निम्म्या प्रतिक्रिया तरी समितीच्या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या होत्या. हा प्रतिसाद नक्कीच आश्वासक होता. विशेष म्हणजे त्यानंतर गेल्या चौदा वर्षांत पुण्यात कोणत्याही शिक्षण संस्थेने आपला रौप्य, सुवर्ण अथवा हीरक महोत्सव साजरा करताना सत्यनारायणाचे जाहीर प्रदर्शन करण्याची हिंमत दाखविली नाही.
२) ब्राह्मणी संस्कृतीचा आधार आहे वेद. फलज्योतिष हे वेदाचे उपांग मानण्यात येते. या कथित ज्योतिषशास्त्राला जेवढ्या प्रमाणात व जेवढ्या तीव्रतेने समितीने विरोध केला, तेवढा महाराष्ट्रात कोणीही केलेला नाही. फलज्योतिष शास्त्र का नाही आणि थोतांड का आहे, याबद्दल अक्षरश: शेकडो व्याख्याने महाराष्ट्रात दिली गेली. याबरोबरच समिती गेली १३ वर्षे शिक्षक, प्राध्यापकांच्यासाठी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवते. यामध्ये आतापर्यंत सुमारे १५ हजार शिक्षक, प्राध्यापकांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या सर्वांना फलज्योतिष व विज्ञान हा विषय नीटपणे शिकवण्यात आला. त्यामुळे तो विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचला. निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिषांना आव्हान पत्रे पाठवून संभाव्य निकालांची भाकिते ज्योतिषशास्त्राच्या आधारे देण्याचे आव्हान देण्यात आले. त्यासाठी ११ लाख रुपये ही आव्हान रक्कम समितीकडे आहे, ती पणाला लावण्यात आली. महाराष्ट्रातील एकाही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत दाखविली नाही. अजूनही कोणी दाखविल्यास समितीची तयारी आहे. सातारा येथे अखिल भारतीय ज्योतिष महामंडळाचे संमेलन झाले. अधिवेशनाआधी सतत २१ दिवस वृत्तपत्रांतून या संयोजकांना रोज एक प्रश्न विचारण्यात आला. यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर ही मंडळी देऊ शकली नाहीत. या अधिवेशनासमोर समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील तरुण-तरुणींना बरोबर घेऊन जन्मकुंडली हा दैववादाचा नकाशा आहे म्हणून त्याची होळी करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. यातून प्रक्षोभ निर्माण झाला. कार्यक्रम घेतल्यास अटक करण्याची धमकी मिळाली. हा कार्यक्रम देणाऱ्या दाभोलकरांना अपमानित करण्यासाठी एका गाढवावर त्यांचे नाव लिहून त्याची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तरीही कुंडलींची होळी हा कार्यक्रम जोरदारपणे पार पडला. डॉ. एन. डी. पाटील, आ. ह. साळुंखे यांचा त्यात समावेश होता. विद्यापीठ अनुदान आयोगाने फलज्योतिष हा विषय विद्यापीठात शिकवण्याची शिफारस केली. या विरोधात समितीने आकाश-पाताळ एक केले. महाराष्ट्रातील सर्व कुलगुरूंना त्यांच्या विद्यापीठात हा विषय न शिकवण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे त्यावेळचे उच्च शिक्षणमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी समितीची मागणी उचलून धरली व विद्यापीठ अनुदान आयोगाला असे कळवले की, फलज्योतिष या विषयाऐवजी त्यांनी जलसंवर्धन या विषयाचा अभ्यासक्रम तयार करावा. औरंगाबाद खंडपीठासमोर याबाबतची याचिकाही समितीने दाखल केली. यानंतर थोड्याच कालावधीत उच्च न्यायालयाने फलज्योतिष विषय शिकवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नीटपणे अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालावर भाष्य न करण्याचा संकेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती कायम ठेवली आहे. याचाच अर्थ असा की, विद्यापीठ अनुदान आयोगाने, नवी तज्ज्ञ समिती नेमली व त्यांनी पूर्वीचा निर्णय रद्दबातल केल्यास सर्वोच्च न्यायालय त्याच्या आड येणार नाही. मधल्या कालावधीत केंद्रातील सरकार बदलले. शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न हे सरकार चालवणार नाही, तो पूर्णत: बंद करेल, हे निवडणुकीतील अभिवचन होते. त्याला जागून मानव संसाधन विकास खात्याने नवी समिती नेमावी व फलज्योतिषाची हकालपट्टी शिक्षणातून करावी, असा समितीचा प्रयत्न आहे. याच कालखंडात फलज्योतिष शास्त्र आहे काय, याबाबत जाहीर वादविवाद महाराष्ट्रातील कोणत्याही ज्योतिषाशी, कोणत्याही व्यासपीठावर करण्याची तयारी समितीने दाखवली. ते आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. फलज्योतिष शास्त्र या निकषावर टिकू शकत नाही, याबद्दल परदेशात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे. मात्र भारतात या स्वरुपात संशोधन झालेले नाही, हे लक्षात घेता समितीने एक संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. मतिमंद मुले व सतत उत्तम मार्काने पास होणारी मुले यांच्या नेमक्या जन्मतारखा, वेळ व स्थळ जमवण्यात येत आहे. याआधारे कोणाही ज्योतिषाने त्यांच्या कुंडल्या मांडण्यात आणि त्याआधारे त्यातील कोणत्या कुंडलीत ग्रहयोग मतिमंदत्व दाखवतात आणि कोणते ग्रहयोग उच्च दर्जाची बुद्धिमत्ता दाखवतात, याचे अचूक निदान करावे, अशी कल्पना आहे. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे याला मार्गदर्शन लाभले असून संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी पुणे विद्यापीठ मदत देणार आहे. हे सर्व लक्षात घेतले, तर फलज्योतिषाविरोधात केवढी व्यापक आघडी समितीने उघडली आहे, हे लक्षात येते.
३) फलज्योतिष या स्वरुपाची दुसरी ब्राह्मणी विद्या म्हणजे वास्तुशास्त्र किंवा भ्रामक वास्तुशास्त्र शास्त्रीय पद्धतीने शिकवल्या जाणाऱ्या वास्तुशास्त्रापेक्षा हे भ्रामक वास्तुशास्त्र पूर्णत: वेगळे आहे, व्यक्तीची दिशाभूल करणारे आहे. व्यक्ती कोणतीही वास्तू बांधताना ती सुखकारक, सोयीची व सुरक्षित असावी, असा स्वाभाविक प्रयत्न करते. मात्र भ्रामक वास्तुशास्त्र विचार करते वास्तू लाभेल कशी, याचा. वास्तूचे दार, खिडकी, पाण्याची जागा, स्वयंपाकगृह, बंगल्याचे फाटक या गोष्टी कशा पद्धतीने असल्या तर वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीची भरभराट होते आणि नसल्या तर तेथे वाटोळे होते, याचे कथित शास्त्र (!) म्हणजे वास्तुश्रद्धाशास्त्र. हा सर्वच पाया उघडपणे दैववाद आणि प्रारब्ध यांना बळकटी देणारा आहे. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी शेजारच्या आंध्र राज्यातून वाजत-गाजत या शास्त्राचे महाराष्ट्रात आगमन झाले. एका नवीन अंधश्रद्धेने वास्तुरचनाकार, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांचा ताबा घेतला. उत्तम प्रकारे बांधलेल्या वास्तूंची तोडफोड सुरू झाली. या विरोधात समितीने वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक जाहीरनामा प्रस्तुत करणारी एक राज्यव्यापी परिषद पुणे येथे घेतली. वास्तुरचनाकारांच्या मदतीने एक विवेकी वर्ग या कामात समिती बरोबर होता. त्यांच्या सहकार्याने व जयंत नारळीकर यांच्या सहीने वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या विषयातील बुवाबाजी स्पष्ट करणारे अनेक लेख समितीने लिहिले. भ्रामक वास्तुशास्त्र हे डॉ. प्रदीप पाटील यांचे पुस्तकही प्रसिद्ध केले. या विषयाची ही शास्त्रीय बाजू दाखविणारे ते मराठीतील एकमेव पुस्तक आहे. बहुतेक जिल्ह्यात वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भाषणे, परिसंवाद, चर्चासत्रे झाली. या सर्वांमधून वस्तुस्थिती लोकांना समजून आली. यामुळे भ्रामक वास्तुशास्त्राच्या घोडदौडीला नक्कीच आळा बसला. याबरोबरच वास्तुशास्त्रदृष्ट्या अपशकुनी असलेल्या वास्तूत राहण्याचे आव्हानही समितीने स्वीकारले.
४) सत्यशोधकी विवाह ही पद्धत ब्राह्मणी पुरोहितशाहीचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी महात्मा फुले यांनी सुरू केली. यातील वैशिष्ट्य म्हणजे पुरोहिताची गरज लागत नाही. मंगलाष्टके आधुनिक विचाराची असतात. स्त्रीला समतेने वागवण्याचे आश्वासन त्यात दिलेले आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेली हीच मंगलाष्टके म्हणावयास हवीत, अशीही सक्ती नाही. वैशिष्ट्य म्हणजे यातील एक मंगलाष्टक वधूने, एक मंगलाष्टक वराने व एक उपस्थितांनी म्हणावयाचे असते. तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळल्या जाव्यात, अशी महात्मा फुले यांची कल्पना होती. या सत्यशोधकी विवाह पद्धतीचा गाभा कायम ठेवून त्यात कालसुसंगत बदल करून असे विवाह लावण्यास समितीने सुरुवात केली. तेरा वर्षांपूर्वी असा पहिला विवाह समितीने नेवाशाचे कार्यकर्ते डॉ. मच्छिंद्र वाघ यांच्या मुलांचा अमावस्येच्या दिवशी संपन्न झाला. त्याला निळूभाऊ फुले व प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत समितीने हे विवाह लावले. यांची संख्या १६० च्या पुढे जाते. समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी असे विवाह करुन बोले तैसा चाले याची प्रचिती दिली. या विवाह पद्धतीत समितीने काही बदल केले. विचारपीठावर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवली जाते. वधू-वरांच्या बरोबरच अशा आगळ्या वेगळ्या विवाहाला अनुमती देणाऱ्या त्यांच्या माता-पित्यांचा फुलांनी सत्कार केला जातो. नंतर वधू-वरांचा परिचय करून दिला जातो. यानंतर मान्यवरांची पाठिंबा देणारी भाषणे थोडक्यात होतात. नंतर वधू आणि वर शपथ घेतात. एकमेकांच्या गळ्यात हार घालतात व विवाहबद्ध होतात. मंगलाष्टके काही ठिकाणे होतात. जेथे होतात त्या ठिकाणी आवर्जून फुलांच्या पाकळ्या उधळल्या जातात. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही लग्ने शक्य तेवढ्या कमी खर्चात पार पडावीत, असा प्रयत्न समिती करते. तसेच लग्नाचा हा वाचलेला खर्च वधू-वरांच्या नावाने दीर्घकाळच्या मुदत ठेवीत संयुक्तपणे गुंतवला जावा, असाही प्रयत्न समिती करते. म्हणजे हे विवाह सत्यशोधकी बचत विवाह व्हावेत, असा समितीचा प्रयत्न असतो.
५)  प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कुंडलिनी असते. ती योगसाधनेने जागृत करता येते. पाठीत असलेल्या सहा चक्रातून ती वर सरकली आणि टाळूतील बाह्यरंध्रातून बाहेर पडली की, त्या व्यक्तीला सर्व ज्ञान प्राप्त होते, असा कुंडलिनी जागृती ही कल्पना मान्य करणाऱ्यांचा दावा असतो. याचा घाऊक प्रचार निर्मलामाता करतात. त्यांच्या मते, त्यांनी सहजयोग नावाचा साधना करण्याचा प्रकार शोधून काढला आहे आणि अवघ्या दहा मिनिटांत कुंडलिनी जागृत करण्याचे ट्रेनिंग त्यांच्याकडून घेता येते. त्याद्वारे अक्षय्य आनंद, आरोग्य यांची प्राप्ती होते. निर्मलामाता यांच्या या दाव्याला समितीने पुणे, सातारा येथील कार्यक्रमात जोरदार विरोध केला. त्यानंतर अंगापूर (जि. सातारा) येथे निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर निर्मलामातेच्या कथित भक्तांनी हल्ला केला. त्यांना मारहाण केली आणि चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने सातारा येथील कोर्टात त्यांच्यावरच केस दाखल केली. ही केस आठ वर्षे चालली. कार्यकर्त्यांनी तितके दिवस हेलपाटे घातले. यातले काही कार्यकर्ते तर नोकरी करणारे होते. सर्वजण निर्दोष सुटले. यानंतर हायकोर्टामध्ये त्यांनी अपील केले. त्याचाही काही उपयोग झाला नाही. तेवढा त्रास देणे पुरेसे नाही म्हणून की काय, याबाबत नरेंद्र दाभोलकर यांनी जो लेख लिहिला होता, त्यामुळे निर्मलामाताजींची बदनामी झाली, असा कांगावा करत दिल्ली कोर्टात त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. दिल्लीला जाऊन सात-आठ वर्षे तो त्यांनी लढवला. अगदी अलिकडे प्रचंड जाहिरातबाजी करून सातारा येथे निर्मलामातेचा कार्यक्रम जाहीर झाला, त्या विरोधात समितीने जो अभिनव सत्याग्रह केला. त्यामुळे निर्मलामाता यांचे येणे रद्द झाले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र/ (विशेषांक २००५)


बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

भ्रामक वास्तुशास्त्राचे जोखड झुगारून द्यावयास हवे!



भ्रामक वास्तुशास्त्राचे जोखड झुगारून द्यावयास हवे!

दाभोलकर, वास्तुशास्त्र, शास्त्रीय दमबाजी, दैववाद, मानसिक गुलामगिरी
स्वत:ची वास्तू, स्वत:चे घर ही व्यक्तीला प्राणप्रिय गोष्ट असते. जीवनातील सुख-दु:खे तो वास्तूच्या चार भिंतीत अनुभवतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे प्रमुख संस्कार त्या चार भिंतीत होतात. व्यक्तीच्या भावभावना, स्वत:च्या घराशी अगदी सहजपणे निगडित असतात. हे घर सोयीचे, सुरक्षित आणि सुखावणारे असावे, अशीच प्रत्येकाची भावना असते. घरामधल्या आवश्यक बाबी उदा. स्वयंपाकघर, कोठीची खोली, कपडे वाळत घालण्याची वा भांडी घासण्याची जागा अशा छोट्या-मोठ्या सर्व बाबी सोयीप्रमाणे असणे, ही वास्तूची गरज असते. वास्तू बळकट, दीर्घकाळ उत्तम प्रकारे टिकणारी असावी, याची काळजी म्हणजे वास्तूची सुरक्षितता. तिसरी बाब मन सुखावण्याचा. कोणत्या स्वरुपाच्या वास्तूत आपल्याला प्रसन्न वाटते, याचे अक्षरश: व्यक्तीगणिक वेगळे गणित असते. म्हणूनच बंगल्याचे असंख्य प्रकार नजरेस पडतात. थोड्याफार फरकाने हीच गोष्ट घरातील फर्निचर, व्यवसायाचे ऑफीस अथवा कारखाना यांना लागू पडते.
वास्तूच्या बांधकामाशी अनेक गोष्टी निगडित असतात. ज्या ठिकाणी वास्तू बांधावयाची ती जागा (तिथला परिसर, जमिनीचा पोत, तेथील हवा, पाणी, ऊन, तापमान, पाऊस इत्यादी); तसेच तेथे अगर आजूबाजूच्या परिसरात प्राप्त होऊ शकणारे बांधकाम साहित्य या सर्वांचा वापर कौशल्याने योग्य त्या प्रकारे करून वास्तुरचना उभारणे आणि ती दीर्घकाळ उभी राहील, याचीही काळजी घेणे हा भाग शास्त्र आहेच; तसेच कलादेखील. या वास्तूत राहाणारा माणूस बुद्धिमान असतो; तसेच भावनाशीलही. म्हणूनच त्याची सामाजिक स्थिती, सवयी, चाली रीती, वागणूक, भावभावना याचा शास्त्रीय व कलापूर्ण वापर म्हणजेच वास्तुशात्र.
पण स्वत:चे घर ही तर प्राणप्रिय वास्तू असते. जीवनातील सर्व सुख-दु:खे व्यक्ती त्यामध्ये अनुभवते. वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीला जर प्रश्न पडले - घरात वारंवार आजारपण का येते? ठरत आलेले मुलीचे लग्न का मोडते? घरात भांडणे का होतात? स्वत:चा व्यवसाय का बसला? हे आणि असे असंख्य प्रश्न असोत. या सर्वांचे उत्तर एकच सांगितले जाते, ‘वास्तू न लाभल्याने. घरातील आजारपण हे आरोग्याच्या सवयी व आहार यावर अवलंबून नसते, तर ते असते झोपणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे डोके उत्तरेस करून झोपण्याच्या सवयीवर; मुलीचे लग्न मोडण्यासाठी हुंडा, मानापमान कारणीभूत नसतात, तर घरातील अग्नी कोणत्या दिशेला पेटवला जातो, त्यावर हे ठरत असते. भांडणे होण्याचा संबंध कुटुंबातील स्वभाववैशिष्ट्यांशी संबंधित नसतो, तर घरसजावटीसाठी दिवाणखान्यात ठेवलेल्या कॅक्टसच्या कुंड्यांचा काटेरीपणा ही भांडणे घडवून आणतो आणि न चालणारा उद्योगधंदा याचा संबंध आर्थिक धोरण व तीव्र अनिष्ट स्पर्धा याऐवजी असतो, ईशान्य दिशेला संडास बांधण्याची घोडचूक केल्याचा परिणाम. याचा अर्थ एवढाच की, माणसाचे मन थोडेच वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करते? त्याचे खेळ काही औरच असतात. त्यामुळे घरदार, व्यवसायाची जागा ही केवळ सोयीची आणि सुरक्षित असून चालत नाही, ती लाभणारी असावी लागते. म्हणजे असे की, त्या वास्तूत राहावयास गेले की, सुखाची बरसात सुरू व्हावी, अशी अपेक्षा माणूस बाळगतो. मुलीचे लग्न उत्तम ठिकाणी जमावे, मुलाला शैक्षणिक यश लाभावे, आजारपण घरातून दूर पळावे, दिगंत कीर्ती लाभावी अशा अनेक स्वप्नांचे मनोरे व्यक्तीने रचलेले असतात आणि ही स्वप्ने साकार करणारे असे घर त्याला हवे असते. याचा परस्परसंबंध काय? कार्यकारणभाव कोणता? हा विचार करण्याची गरज त्याला वाटत नाही. हीच गोष्ट व्यवसायांच्या जागांची. व्यवसाय त्वरित भरभराटीला यावा, कामगारांचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, अपघात टळावेत, हे सगळे घडून येणारी म्हणजेच थोडक्यात लाभणारी जागा व्यावसायिकाला हवी असते. गरज तसा पुरवठा हे व्यवहाराचे सूत्र आहे आणि दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए हा जगाचा अनुभव आहे. यामुळेच आर्किटेक्चर कॉलेजमध्ये पाच वर्षे घालवून शिकलेला वास्तुविशारद ही पदवी मिळवतो आणि वास्तू लाभेल कशी, याचा आद्यशोध ज्या विश्वकर्माने लावला, त्याप्रमाणे व्यवसाय करणारा स्थपती अथवा वास्तू या नावाने ओळखला जातो. दोघांचा विषय वास्तुशास्त्र हाच; पण एकाचा भर आधुनिक विज्ञानावर, दुसऱ्याचा जोर प्राचीन दैवी ज्ञानावर.
प्राचीन शास्त्राच्या नावाने सुरू झालेला हा कल्पनाविलास मग कसाही उधळतो आणि तरीही त्याला वास्तुशास्त्राचा शास्त्रीय आधार समजावा, असा दावा करतो. याचे काही नमुने पाहा. दिशामहात्म्य सांगण्यासाठी कथन केलेले उत्तर दिशा-उत्तरेकडची वस्तू वा व्यक्ती स्थिर असते. सहजासहजी जागा सोडत नाही. उदा. ध्रुवतारा. ही दिशा कुबेराची असून त्याकडे धन आणि ऐश्वर्य यांचे अपरिमित भांडार आहे. जर घराचे तोंड उत्तरेस असेल तर या कुबेरदेवतेची दृष्टी त्या कुटुंबावर सदैव पडते. कोणतीही आर्थिक कमतरता राहत नाही. पश्चिम या दिशेचा अर्थ टाकाऊ अगर निरुपयोगी. ही दिशा वरुणाची. पाऊसपाणी यावर त्याचा अधिकार आहे. या दिशेला कोणतीही गोष्ट केल्यास ती भरभराटीस येत नाही. म्हणून या दिशेला कमीत कमी खिडक्या, दरवाजे ठेवावेत म्हणजे त्या दिशेचा वास्तूवर परिणाम होत नाही. दक्षिण-दक्षिण म्हणजे मौजमजा, व्यसन, भांडण, नुकसान, मृत्यू, वास्तुपुरुष मंडलामध्ये दक्षिण दिशेस यमदेवता आहे, असे मानले जाते. म्हणून या दिशेला कमीत-कमी खिडक्या व दारे असावीत किंवा नसावीतच.
ही सगळी शास्त्रीय (!) दमबाजी झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष केले तर काय भोगावे लागते, याचे गडद चित्र अर्थात रंगविलेले असतेच. पुन्हा-पुन्हा अपघात, सतत आजारपण, शस्त्रक्रिया, अकाली मृत्यू हे वास्तुदोषामुळे उद्भवतात. वांझपणा, मतिमंदपणा, वेडेपणा, आत्महत्या हे प्रकार घरात आढळल्यास वास्तुदोष जरूर शोधावा. व्यवसायात अपयश, आर्थिक अडचण, लग्न न जुळणे, घरातील अशांती हे सारे वास्तुदोषानेच घडते. हे सारे ऐकल्यावर होम, स्वीट होम या कल्पनेने ते घर बांधावयास निघालेल्या माणसाने वास्तू व त्याचे वास्तुशास्त्र यांचे पाय न धरले तरच नवल!
केवळ प्राचीनता व धार्मिकता पुरेशी नाही म्हणून की काय (नकली) वैज्ञानिकता जोडीला आणली गेली आहे. काही वास्तुविशारद, अभियंते व बांधकाम व्यावसायिक शास्त्राचे नाव घेत या प्रकाराला खतपाणी घालत आहेत. एनर्जी फ्लो थिअरी, टोपोलॉजी थिअरी, कॉन्डंट थिअरी, हार्टमन ग्रिड असे शब्द आले की, आभास तर निश्चितच शास्त्राचा निर्माण होतो.
एवढे सारे पुरेसे नाही म्हणून या मांडणीला प्रारब्ध कल्पनेची जोड दिली जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेले घर व्यक्तीला त्याचे दैव अनुकूल करण्यात बदत करते म्हणे आणि तसे झाले नाही तर... बी. एन. रेड्डी हे माजी खासदार आहेत व वास्तुशास्त्रीही. त्यांच्या मते, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, नरसिंह राव, चंद्रशेखर या साऱ्या पंतप्रधानांना सत्तेवर असताना आणि नंतर जे सोसावे लागले, याचे कारण त्यांच्या वास्तूची दारे दक्षिण-पश्चिम आहेत. त्यामुळे नशीबच उफराटे झाले. हेच दरवाजे जर पूर्व-उत्तर दिशेला असते तर तकदीर नक्कीच बदलली असती.
धंदा भरभराटीला आणावयास हवा तर त्यासाठी काही नामवंतांच्या साक्षी हव्यातच. काही दिवसांपूर्वीच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये या प्राचीन वास्तुशास्त्रामागे धावणाऱ्या कंपन्यांची नावे आली आहेत. त्यामध्ये लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो ही इंजिनिअरिंग कंपनी, लिंटास ही अग्रगण्य जाहिरात कंपनी, ‘झी टीव्ही’चा दिल्ली येथील स्टुडिओ, ‘इस्पातचा पोलाद कारखाना, बिर्ला कंपनीचा सेंच्युरी केमिकल; तसेच जहाज बांधणी, हिंदुस्तान मोटर्स, ओरिएन्ट फॅन अशा बड्याबड्यांच्या साक्षी आहेत. या कंपन्यांनी आपल्या धंद्याच्या नवीन जागा वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्या. काहींनी जुन्या जागांच्यात या शास्त्रानुसार बदल केले; तर काहींनी कर्मचारी बसण्याची अंतर्गत रचना बदलली. या सगळ्या कंपन्यांना त्यामुळे आणखी चांगले दिवस आले. काहींना तर चक्क निर्यातीच्या ऑर्डर मिळाल्या, असे त्यांचे मत बातमीत नोंदवले आहे.
मध्यंतरी बंगळुरू येथे वास्तुविशारद परिषद झाली. त्यामध्ये अशी मागणी करण्यात आली की, कर्नाटक राज्याचे बांधकामाचे नियम प्राचीन वास्तुशास्त्राशी सुसंगत नाहीत म्हणून ते बदलावयास हवेत. अर्थात, या साऱ्याबरोबर वास्तुशास्त्रामुळे त्या वास्तूत राहणाऱ्याचे दैव २५ टक्केच बदलले जाते. उरलेले ७५ टक्के त्याच्या पूर्वप्राक्तनातील कर्मावर अवलंबून असते, असे सांगावयासही परिषद विसरली नाही.

प्रश्न माणसांनी आणि समाजव्यवस्थेने निर्माण केलेले असतात. राहावयाचे घर कसे आहे, यावर त्यात राहणारा तरुण बेकार राहत नाही. त्याचा संबंध असतो देशाच्या अर्थकारणाशी. कारखान्याचा प्लॉट आणि त्यावरची इमारत यांचा कामगारांच्यात उडालेल्या हिंसाचाराचा काही संबंध नसतो. तो असतो मालक-मजूर संबंधांमध्ये. भरभराट होणे, संपन्नता येणे हे व्यक्तीचे परिश्रम आणि गतिमान अर्थकारण याची सांगड घालण्यावर अवलंबून असतो.
हे सर्व समजते; पण उमजत नाही. युक्तिवाद साधारणपणे असा केला जातो की, फारसा तोटा नसताना या शास्त्राचा आधार घेऊन प्रचिती येते की, नाही, हे का पाहू नये? बाकीचे छोटे-मोठे तोटे सोडा; पण या तर्कदुष्ट विचाराने, तथाकथित वास्तुशास्त्राच्या आहारी जाणे म्हणजे देशाच्या घटनेचा आणि त्याबरोबर स्वत:चा आणि मानवजातीचाच अपमान आहे.
खरे तर घर बांधण्यासाठी शासनाने तयार केलेले नियम हे सर्वसाधारण नागरिकाचे आरोग्य उत्तम राहावे, सुरक्षित राहावे, आग, भूकंप अशी आपत्ती आलीच, तरी एकामुळे सर्वांचे नुकसान होऊ नये, या उदात्त हेतूने शास्त्रीय पायावर केलेले असतात. घर बांधताना सर्व खोल्यांची प्रायव्हसी राखली जाईल. दिवाणखाना, शयनकक्ष वाऱ्याच्या योग्य दिशेला आणि शौचकूप, स्नानगृह वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असेल, हे पाहावे. ओट्यावरील बेसिन, मोरी ज्या बाजूस असेल त्याच्या विरुद्ध बाजूस गॅस सिलिंडरचा कप्पा असावा. स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅनची तरतूद असावी, अशा कार्यकारणभावाशी जोडलेल्या साध्या गोष्टी तर सामान्यांनाही कळतात. त्याहीपलिकडे सल्ला देण्यासाठी वास्तुविशारद आता तालुका पातळीपर्यंत उपलब्ध आहेत.
प्राचीन वास्तुशास्त्राला कवटाळताना हे सारे शहाणपण आपोआप मोडीत निघते. बौद्धिकदृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहाराला दुय्यम स्थान मिळते. सामाजिक अवनती होते. संशोधन मागे पडते. व्यवसायाचे अपयश, घरातले आजारपण, भांडण या सर्वांना भलतीच कारणे सुचवली जातात आणि वास्तूची रचना झाली असेल तर पाडापाडी करून फेररचना करणे श्रीमंतांनाच परवडते. गरिबांची फरफट होते. नवी बुवाबाजी बोकाळते. माणसे स्वत:ची विवेकशक्ती विसरतात, इच्छाशक्ती गहाण टाकतात. नकळत भित्री, दुबळी बनतात. वास्तू लाभण्याच्या व न लाभण्याच्या गूढ प्रकाराबरोबरच भविष्य, मंत्र, ताईत, तोडगे, यज्ञ, होम, हवन, बाबा, गुरू, महाराज यात अडकतात. स्वत:ची स्वतंत्र दृष्टी हरवतात. व्यक्तिस्वातंत्र्य गमावतात. त्याहीपुढे जाऊन या निर्णयाचे समर्थन करतात. त्याला शास्त्र म्हणून गौरवतात. स्वत:च्या जीवनात आणि जनमानसात दैववादी विचार घट्ट करतात. कोणताच लाभ झाला नाही तर असे का, याचा विचार करण्याऐवजी आपले पूर्वपाक्तनच याला जबाबदार. वास्तुशास्त्र तरी काय करणार, अशी समजूत करून घेतात. शहरी सुशिक्षितांच्यात वाढत जाणारी ही मानसिकता मन विषण्ण करते, भयसूचक इशारा देते.
 तथाकथित प्राचीन वास्तुशास्त्राचे आजच्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबरच जीवन-मरणाचा बनलेल्या घरबांधणीच्या प्रश्नाचे आणि व्यक्ती, समाज, देश यांना आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नाचे एकेक पाऊल मागे पडत असते.
आरोग्यासाठी औषधे लागतात. व्यक्ती औषधे काही काळच वापरते. परंतु काटेकोर पद्धतीने चाचण्या घेतल्याशिवाय औषधे बाजारात आणता येत नाहीत. तो लोकांच्या जिवाशी खेळ होतो. म्हणून गुन्हा होतो. ज्या वास्तूच्या सान्निध्यात जीवनभर निवास अथवा व्यवसाय होणार, त्याबद्दलची तथाकथित शास्त्रीयता कोणतीही तपासणी न करता बाजारात आणली जातेच कशी? ग्राहकासमोर भुलभुलैय्या उभा करण्याचा हा प्रकार आक्षेपार्ह नव्हे काय? पदवीप्राप्त डॉक्टर उपचारात चुकला तर त्याला ग्राहक संरक्षण कायदा लागू होतो. कोणतीच पदवी नसताना वास्तूमध्ये पाडापाडी करून घरमालकाला भरपूर खर्चात टाकणाऱ्या वास्तुपंडिताला हा कायदा लावला जाणे आवश्यक आहे. विशेषत: आधुनिक विज्ञानावर आधारित उत्तम प्रकारे विकसित असे एक मान्यताप्राप्त वास्तुरचनाशास्त्र अस्तित्वात असताना तर वास्तुश्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना तथाकथित जबाबदारीला सामोरे जावयास नको काय?
कमी दरात स्थानिक वास्तुघटक वापरून बांधलेले शक्य तेवढे चांगले घर हे आजचे खरे गरजेचे वास्तुशास्त्र आहे. या देशातील कोट्यवधी लोकांना स्वत:चे घर नाही. नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता नाही. लक्षावधी कुटुंबे ज्याला घर हा शब्द वापरणे थट्टा ठरेल, अशा खोपटात अथवा नरकासमान झोपडपट्टीत राहत आहेत. फूटपाथवर राहणाऱ्या असंख्यांना तर थेट आभाळाचेच छत आहे. स्वातंत्र्याचे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना वास्तूच्या संदर्भात या देशाची जर कोणती गरज असेल तर ती आहे, या कोट्यवधी लोकांना त्यांच्या नागरिकत्वाचा हक्क म्हणून छोटासा का होईना, स्वत:चा निवारा देण्याची.
याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, माणसाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बुद्धिवादी मन आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य. माणूस ज्या वेळेला हे विचारस्वातंत्र्य दुसऱ्या कोणाकडे तरी कोणत्याही कारणाने गहाण ठेवतो, त्यावेळी माणसाचे माणूसपण ते काय उरते? आणि स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यास तरी कितीसा अर्थ राहतो? तथाकथित वास्तुशास्त्र नेमके हेच घडवून आणत असते आणि तेही ज्यांच्या खांद्यावर देशाचा अधिक भार आहे, असे मानले जाते त्या उच्चविद्या-विभूषित लोकांत आणि उद्योजकांत. भारताची आजची स्थिती अशी का आहे? वाढत्या भ्रष्टाचारामुळे? राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामुळे? अकार्यक्षम शासनामुळे? की अमर्याद सत्तालोभामुळे? वास्तवाचा आधार असलेले हे सर्व प्रश्न भ्रामक वास्तुशास्त्र एका तडाख्यात रद्द ठरवते. देशातील प्रमुखांची निवासस्थाने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कशी चुकीची आहेत, याच्याशी वरील आपत्तींना नेऊन जोडते. श्रीलंकेचा आकार हाच या देशातील कायम अशांततेला कारणीभूत आहे, असे छातीठोकपणे सांगणारे तज्ज्ञ (!) वास्तुशास्त्रज्ञ भारताच्या सद्य:स्थितीचे विश्लेषण; तसेच काही प्रकारे करणार, यात आश्चर्य नाही. या भ्रामक वास्तुशास्त्राच्या नादी लागलेला माणूस आत्मविश्वास गमावलेला असतोच. पण तो अधिकच भित्रा व दुबळा बनवला जातो. स्वत:वरचा ताबा तो गमावतो, प्रयत्नवाद सोडतो. विवेक व इच्छाशक्तीला रजा देतो आणि हे सारे गमावल्यानंतर समजा त्याला काही जरी मिळालेच (ती शक्यता अर्थात नाहीच), तरी त्याची किंमत राजकीय गुलामगिरीपेक्षा घातक असलेली मानसिक गुलामगिरीची निर्मिती हीच असते. भ्रामक वास्तुशास्त्राचे जोखड झुगारून द्यावयास हवे, ते ही मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर २०११)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...