‘भ्रमंती’ची
दैनंदिनी
दाभोलकर, चळवळ, संघटन, ताई महाराज, कायदा, वास्तुशास्त्र
‘भ्रमंती’ सदर म्हणजे धावपळीच्या दौऱ्यामध्ये भावलेले तुमच्यापर्यंत पोचविणे.
कधी एखादी घटना, कधी विचारतरंग, तर कधी चळवळीच्या अंतरंगाचे दर्शन; पण गेल्या महिन्यात भटकंती इतकी झाली की, ‘भ्रमंती’ सदरात यावेळी फक्त त्यातील काही नोंदीच
करायचं ठरवलं. शक्यता आहे (असावीच) की, त्यातले काही तुम्हाला
विचारप्रवृत्त, कार्यप्रवृत्त करेल. तसे नाही; तरीपण त्याबाबत पत्र लिहायला प्रवृत्त केले, तरी तेही नसे थोडके.
ऑगस्ट - बेळगावात तीन कॉलेजात व्याख्याने, सायंकाळी कार्यकर्त्यांची बैठक, त्यामध्ये महिला-विद्यार्थिनींची
उपस्थिती. हे चित्र आपल्याकडे इतके दुर्मिळ का बरे आहे? बैठकीला अनपेक्षितपणे दै. गोमन्तक-पणजीचे संपादक चंद्रकांत घोरपडे
आले. अगदी छोटेच भाषण दिले. पण आपल्या कामाचे सामाजिक, सांस्कृतिक संबंध काय आहेत, काय असावेत, यावर त्यामध्ये मर्मग्राही भष्य होते. आपल्या संघटनेतील किती जण
हे व्यापक भान जोपासतात?
३, ४ ऑगस्ट - पोतराज निर्मूलन परिषद, तुळजापूर- परिषद यशस्वी झाली म्हणता येईल इतपत संयोजन होते. पण
त्याला अन्यही कारणे होती. मला जाणवली ती गोष्ट वेगळीच. तुळजापूरला समितीची शाखा नाही.
मारुती बनसोडे खूप राबला; पण संघटनेची उणीव तो कसा भरून काढणार? असे मोठे कार्यक्रम घ्यावयाचे म्हणजे एकतर तेथे आपली संघटना हवी.
नाहीतर प्रसंगी बाहेर जाऊन चार-आठ दिवसांची सवड काढून तेथे मुक्काम ठोकणाऱ्या कार्यकर्त्यांची
फळी हवी. आज संघटनेत हुकमी कार्यकर्त्यांचा अभाव जाणवतो. तो कसा दूर करता येईल?
७ ऑगस्ट -वारणानगर - व्याख्यानमालेत बावन्न हजार रुपयांची पुस्तके
व्याख्यानानंतर विकली गेली. कोणत्याही कार्यक्रमाला कंटाळा न करता आपली पुस्तके बरोबर
हवीतच.
१९ ऑगस्ट- जालना - कॉलेजात शिबीर झाले. कामासाठी सायंकाळी बैठक.
२५-३० जण हजर होते. त्याच रात्री परतूरला खुल्या मुलाखतीचा कार्यक्रम. वीज गेल्याने
बराच वेळ अंधार होता. त्यामध्येही शंभरजण शांतपणे चर्चेसाठी आलेले. सकाळी कॉलेजात कार्यक्रम.
संस्थेचे चेअरमन म्हणाले, संस्थेच्या सर्व सोळा शाळांना पुस्तकांचे
संच घेतो. सायंकाळी औरंगाबाद येथील स्वामी विवेकानंद कॉलेजात प्राचार्यांसह वातावरण
उत्साही. जालना, परतूर, औरंगाबाद सर्वत्र मला
जाणवत होते की, लोक समिती समजून घेण्यास उत्सुक आहेत. मर्यादित
प्रमाणात; पण निश्चितपणे प्रत्यक्ष सहभागासाठीही अनुकूल
आहेत. हे तुम्हाला जाणवते का?
२० ऑगस्ट- नेवासा/शेवगाव- सत्यशोध प्रज्ञा परीक्षांची शिबिरे दोन्ही
ठिकाणी झाली. पण त्याशिवाय नेवासा येथे इन्स्पेक्टर जाधव मुद्दामहून भेटायला आले. शिबिरालाही
आले. ते मोठ्या उत्साहाने व चिकाटीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा आशय असलेली फिल्म तयार
करतात. (रहस्य शोधून काढणाऱ्या ‘अंनिस’च्या पथकाच्या प्रमुखाचे
काम मेहमूद करतोय) शेवगावला पत्रकार परिषदेत बहुतेक प्रमुख दैनिकांचे पत्रकार आले होते
आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ते सर्व समितीचे कार्यकर्ते होते, हेही सांगत होते. वेगवेगळ्या माणसांना आपल्याशी जोडून ठेवणे, ही जाणीवपूर्वक घडवावयाची गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात (सत्य न
सोडता केलेल्या) लोकसंग्रहाशिवाय पर्याय नाही, हे आपल्यापैकी किती जणांच्या
लक्षात आलंय!
२२ ऑगस्ट मरकळ (जि. पुणे) - दत्ताचा अवतार बनलेल्या ताईमहाराजांच्या
विरोधात सभा घेण्यासाठी गेलो. सभेला गर्दी ठीक होती. प्रतिसाद चांगला होता. स्थानिक
शिवसेना सभेत आपल्या बाजूने बोलली. गाव वारकरी संप्रदायाचे. त्यांनी सभेत मुद्दा काढला.
ताईमहाराजांची ही बुवाबाजी हा संतांना कलंक आहे. सभेसाठी वातावरण तयार करणे, आधी प्रचार करणे या बाबी आपल्या पुण्याच्या शाखेने फार परिश्रमपूर्वक
केल्या होत्या; पण हे चित्र एकीकडे आणि दुसरीकडे सात महिन्यांपूर्वी
दैवीसंचाराचा बनाव घडवून ताईमहाराज बनलेल्या अरुणा लोखंडेचा अफाट भक्तगण (यामध्ये फार
मोठ्या संख्येने स्त्रिया) हे चित्र, दुसरीकडे. आपल्या कामाच्या
खडतरपणाचाच नव्हे, तर मती गुंग करणाऱ्या वास्तवाचा वेध कसा
घ्यावयाचा?
२४ ऑगस्ट - अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने स्वत:हून समिती स्थापन केली.
त्यात न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कायदा खात्याचे माजी
सचिवही होते. विधान परिषदेत मान्य झालेला कायद्याचा ठराव त्यात घेऊन त्यांनी प्रत्यक्ष
कायद्याचा मसुदा काटेकोरपणे तयार केला होता. न्या. धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री मनोहर
जोशी यांना व्यक्तिगत पत्र लिहून प्रतिष्ठानच्या वतीने ती मागणी करावी आणि नकार आल्यास
विधानसभेच्या नोव्हेंबरच्या अधिवेशनात नागपूरला मागणी परिषद घ्यावी आणि त्यानेही नाही
भागले तर मार्चच्या विधानसभा अधिवेशनावेळी धरणे धरावे, असे ठरले. गेली सात वर्षे चिकाटीने आपण ही मागणी करत आहोत. त्याला
यामुळे निश्चितच यश येईल. पुन्हा तोच मुद्दा सहकार्याचे समर्थ हात शोधणे, जोडणे, जोपासणे अधिकाधिक प्रभावी कसे करता येईल?
२४ तारखेला सायंकाळी वनमाळी हॉलला वास्तुशास्त्रावर परिसंवाद झाला.
तुडुंब गर्दी. सध्याचा जिव्हाळ्याचा विषय. आपण महाराष्ट्रात तो प्रभावीपणे न्यावयास
हवा. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आवर्जून हे परिसंवाद व्हावयास हवेत. कुठलीही चळवळ हाती
घेताना महत्त्व असते, अचूक टायमिंग साधायला. तथाकथित वास्तुशास्त्राला
चळवळीचा विषय म्हणून पकडणे हे समितीच्या बहुसंख्य शहरी शाखांना का बरे जमले नाही? नोंद करण्यासारखी वेगळी बाब म्हणजे या कार्यक्रमानंतर समितीचे कार्यकर्ते
होण्यासाठी ८० जणांनी नावे नोंदविली. असा उत्साह पुढे संघटित कसा करावयाचा?
२५, २६ ऑगस्ट मुंबईत जाहिराती मिळविण्यासाठी
हिंडलो. कोठेही नकारघंटा मिळाली नाही. बहुतेक ठिकाणी तर प्रतिसाद अनुकूलच होता. जाहिराती
मिळवताना आणि वर्गणीदार नोंदविताना नि:संकोचपणे मागायला सुरुवात करून तर बघा आणि मग
अनुभव कळवा, देणाऱ्याचे हात किती?
३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर लातूरचे शिबीर - माध्यमिक शिक्षक
व प्राध्यापकांचे एकता शिबीर चांगले झालेच; पण कार्यकर्त्यांनी सर्व
दोनशे शिबिरार्थींचे भोजन माणसे लावून तयार करून घेतले आणि विशेष म्हणजे ही धावाधाव
करताना हिशेब तयार करून मी रात्री लातूर सोडण्यापूर्वीच माझ्या हाती सर्व हिशेब चोख
ठेवला. सर्वांनीच गिरवावा असा कित्ता हा झाला. एका महिन्याचा ताळेबंद; पण यामधून मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि संधीची
सार्थकता करण्यासाठी ज्यावेळी आपण कामाला भिडू, त्याचवेळी ही भ्रमंती
मनामनात आणि कामाकामात सुरू होणार.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा