व्यापक परिवर्तन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यापक परिवर्तन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

तरुणांनी टिकायला हवे




तरुणांनी टिकायला हवे
दाभोलकर, तरुण पिढी, व्यापक परिवर्तन, व्यक्तिमत्त्व विकास 
अलिकडेच दोन अनुभव आले. ते असे, परिवर्तनवादी चळवळीतील एका मोठ्या कार्यक्रमासाठी जाण्याचा प्रसंग आला. कार्यक्रम तसा महत्त्वाचा होता. लोक आपुलकीच्या, बांधिलकीच्या भावनेतून आवर्जून आले होते. परंतु बहुतेक श्रोतृसमुदाय साठीच्या पुढील होता. ४० ते ६० या वयोगटातील तुरळक होते आणि चाळिशीखालील तर अपवादात्मकच. दुसऱ्या अशाच एका प्रसंगी शिवसेनेच्या एका नेत्याला भेटायला जावयाचा योग आला. गर्दी होती. बहुसंख्य २० ते ३० वयोगटातील तरुण होते. त्या जिल्ह्यात काम करत असूनही त्यांचे चेहरे मला अपरिचित होते.

तरुणांचे जथ्थे पुरोगामी परिवर्तनाकडे का वळत नाहीत, हा शोध, हा प्रश्न आणि त्यांची चिंता तशी नवीन नाही. याची काही कारणे जाहीरही आहेत. तरुणांना भडकवणारी आक्रमक विद्वेषी भाषा; साध्य, साधनशूचिता यांचा घोळ न घालणारी कामाची बिनधास्त पद्धत; नंबर दोनच्या धंद्याला सहजपणे मान्यता देणे याबरोबरच उत्साही उपक्रमशीलता व तरुणांना दिली जाणारी विशेष संधी वगैरे. पुरोगामी चळवळीत तरुण न येण्याच्या कारणांमध्ये युवक नेतृत्वाचा अभाव, संघर्षाची किंमत द्यावी लागण्याची भीती, अशा अनेक बाबी आहेत. हाच प्रश्न अधिक नेमकेपणाने एप्रिलमधील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेला आला. आज समितीच्या कुठल्याही शाखेत आणि राज्य पातळीवरही डोक्यावर काळे केस असलेल्यांचीच गर्दी आहे. परंतु हे चित्र कायम टिकावयास हवे असेल तर समितीमध्ये तरुणांचा ओघ अखंड राहावयास हवा. ही गोष्ट जाणीवपूर्वकच घडवावी लागते. तसे झाले नाही तर आज रॅशनॅलिस्ट संघटनांची आणि काही प्रमाणात कम्युनिस्टांची स्थिती आहे तशी समितीची होईल. याचा अर्थ तरुण कार्यकर्ता समितीमध्ये येईल, टिकेल व वाढेल, अशी व्यवस्था हवी. ती कोणती याबद्दल चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आकर्षणाने येणारा तरुण तेवढ्यामुळेच टिकून राहत नाही आणि टिकून राहिला नाही तर त्याच्यातील कार्यकर्ता घडणार कसा? यासाठी त्या तरुणाला हवेहवेसे वाटणारे विचार देण्याची व उपक्रम करण्याची यंत्रणा हवी. संमोहन, लैंगिकता प्रशिक्षण, व्यसनमुक्ती, आकाशदर्शन, गिरीभ्रमण असे अनेकविध विषय त्याला हवेसे वाटणे स्वाभाविक आहे. ते आकर्षकपणे त्याच्या भाषेत त्याला मिळाले तर तो संघटनेत टिकून राहील. याबरोबरच त्याच्यावर काही जबाबदाऱ्या द्यावयास हव्यात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये यावी, यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे व नेतृत्वगुण वाढविण्याचे प्रशिक्षण त्याला द्यावयास हवे. संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवर्जून त्याच्या संपर्कात राहावयास हवे आणि वय वाढलेल्या कार्यकर्त्याने संघटनेच्या हितासाठी पदाचा त्याग करून (कामाचा नव्हे) तरुणांसाठी स्वत:हून वाट मोकळी करावयास हवी. या साऱ्याचा परिणाम एका वाक्यात सांगावयाचा तर असा दिसावयास हवा की, संघटनेचे सरासरी वय सदैव तीसच राहावयास हवे. याबाबत शिवसेनेचे यश लक्षणीय आहे. शिवसेना स्थापन होऊन ३० वर्षे झाली. स्थापनेच्या वेळेस तो तरुणांचा समूह होता. म्हणजे खरे तर आजचा शिवसैनिक पन्नाशीच्या पुढे पोचावयास हवा होता. परंतु आजही शिवसेनेत डोळ्यात भरणारी संख्या दिसते ती तरुणांचीच. अर्थात तरुण हवा म्हणूनच केवळ तरुण कार्यकर्ता निवडणे, असा याचा अर्थ नव्हेच. ध्येयवाद, वैचारिक बांधिलकी यांचा महत्त्वाचा संबंध आहेच. पण तरुण संघटनेकडे आकृष्ट कसे होतील, याची आखणी, मांडणी करणे, त्याप्रमाणे कृती करणे, त्या प्रयत्नाचे मूल्यमापन करणे आणि त्याआधारे सुधारित कृती करणे हे सतत घडत राहावयास हवे. याबद्दल कार्यकर्त्यांना आणि वाचकांना काय सुचते? काय वाटते, हे समजून घ्यायला मी उत्सुक आहे.

विस्तारणारी क्षितिजे हे सदर जवळजवळ वर्षभर चालले. या अंकापासून हे सदर आपला निरोप घेत आहे. वर्ष संपले हे त्याचे एक कारण. दुसरे कारण असे की, या सदरातील मांडणी प्रामुख्याने चळवळ व कार्यकर्ता यांच्यासाठी होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता समितीच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बुलेटीन चालू होत आहे. त्यामुळे या स्वरुपाच्या चर्चा आता तेथे होतील आणि वार्तापत्राचे हे एक पान सर्व वाचकांना आवडणाऱ्या मजकुरासाठी मोकळे होईल. हे सदर चालवण्याचे आणखी एक उद्दिष्ट होते, ते म्हणजे चळवळीत आणि संघटनेत ज्याला तोंड द्यावे लागते, अशा काही प्रमुख मुद्द्यांबाबत मांडणी व्हावी आणि वाचकांकडून आलेल्या प्रतिसादातून त्याबाबत अधिक चर्चा व्हावी. वस्तुस्थितीत हे मात्र फारसे घडून आले नाही. चळवळीची क्षितिजे विस्तारत आहेत, असे मला स्पष्टपणे जाणवते. मात्र अल्प प्रतिसाद हा परस्परसंवादाबद्दल आळस आहे की, अभाव याचे मलाही आकलन झाले नाही. कदाचित माझ्या मांडणीची परिणाकारकता ही कमी पडली असेल. असो.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र                             
 (मे १९९८)




बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

प्रतिसाद द्याल



प्रतिसाद द्याल
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, चळवळ, जनआंदोलन   
५ जूनला अण्णा हजारे यांनी बोलाविल्यामुळे राळेगणसिद्धी येथे गेलो होतो. अण्णांचा व माझा थोडाबहुत परिचय असला, तरी भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीच्या संदर्भात ही पहिलीच भेट होती. डॉ. श्रीराम लागू व मी पुण्याहून एकत्रितच गेलो. माझा जाण्याचा हेतू चळवळ समजून घेणे हा होता आणि डॉक्टरांना व मला दोघांनाही या चळवळीबाबत स्वत:च्या मर्यादा सांभाळून अण्णांना मदत करता येणे शक्य आहे काय? त्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत, याबाबत चर्चा करण्यात रस होता.

मेळाव्यासाठी सुमारे ४०० जण महाराष्ट्रभरातून आलेले होते. केवळ एका पत्राने स्वखर्चाने इतक्या जणांनी लांबलांबून येणे हे चळवळीचे आवाहन सर्वदूर पोचल्याचे एक लक्षण होते. विश्वस्त मंडळातील अण्णा व त्यांचे अन्य निवडक सहकाऱ्यांची (बाबा आढाव, गोविंदभाई श्रॉफ, पुष्पाताई भावे, ग. प्र. प्रधान, अविनाश धर्माधिकारी) एक स्वतंत्र बैठक झाली. त्यात देखील काही काळ मी सहभागी होतो.

मेळाव्यात मी बोलणार नव्हतो. पण नाव पुकारण्यात आले म्हणून मी बोललो. माझी व्यक्तिगत मते मी मांडली. मेळावा संपल्यानंतर अनेकजण भेटले. महाराष्ट्रात सतत फिरत असल्याने आणि अनेक संघटनांशी संबंधित असल्याने आलेले बरेच जण स्वाभाविकपणे ओळखत होते. पण आश्चर्य म्हणजे त्यातील बऱ्यापैकी संख्या ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणाऱ्या किंवा केलेल्या कार्यकर्त्यांची होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे प्रामुख्याने अंधश्रद्धा दूर करण्याचे आहे, हे खरेच तरी तेवढेच आहे, असे आपण कधी मानले नाही. व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे, हे आपण आपले काम मानलेच आहे. आपल्या समितीतील काही कार्यकर्ते अन्य पक्षसंघटनांत काम करतात. तसेच त्यापैकी काहींनी भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनात केले तर ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच. खरा प्रश्न आहे तो यापेक्षा थोडा वेगळा आणि त्याचा निर्णय आपल्याला आज ना उद्या घ्यावाच लागेल.

समितीचे संघटन आज महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी उभे आहे. समिती स्वत:ला पुरोगामी चळवळीचा भाग मानते, हेही सर्वांना माहीत आहे. स्वाभाविकच अन्य जनआंदोलनातील प्रश्न ज्यावेळी ऐरणीवर येतात, त्यावेळी समितीचे कार्यकर्ते किंवा एक संघटना म्हणून समिती काय करणार, असा प्रश्न विचारला जातोच. विशेषत: ही जनआंदोलने जेव्हा राजकीय पक्षाची नसतात, त्यावेळी हा प्रश्न अधिक जोरात विचारला जातो. अलिकडच्या काळातील अशी दोन जनआंदोलने म्हणजे एन्रॉनच्या प्रश्नावर मेधा पाटकर यांनी सुरू केलेले आंदोलन आणि दुसरे अण्णा हजारेंचे. एन्रॉनच्या प्रश्नावर एप्रिलअखेरपासून सत्याग्रहाने उचल खाल्ली. त्यानंतरच्या काळात आपण ठरविले असते, तर सत्याग्रहींची एक छोटी तुकडी आपण त्या चळवळीत उतरवू शकलो असतो आणि आपला भातृभाव सिद्ध करू शकलो असतो. अण्णा हजारे उपोषणाला बसले त्याही वेळी आपण लाक्षणिक पाठिंब्यासाठी एक दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपोषण करू शकलो असतो. अर्थात, ही पाठिंब्याची क्षमता आहे म्हणून केवळ तो देणे असे त्याचे स्वरूप असता कामा नये. काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत आणि त्याबाबत सगळ्यांनी; कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी मोकळेपणाने मला लिहावे, अशी विनंती आहे. त्यामुळे संघटनेची वाटचाल अधिक अचूक होऊ शकेल. सहजपणे उपस्थित होणारे मुद्दे असे-

१)    ज्या चळवळीत आपण प्रतीकात्मक सहभागी होणार, त्या चळवळीबरोबर आपले संपूर्ण मतैक्य नसणार, हे उघड आहे. एक तर ते प्रश्न गुंतागुंतीचे व मतभिन्नतेचे आहेत आणि दुसरीकडे समितीच्या कार्यकर्त्यांच्या विचारमंथनात ते आलेले नाहीत. वृत्तपत्रीय बातम्यांतून आणि पुरोगामी चळवळीशी संबंधित व्यक्ती म्हणून कार्यकर्त्याला या प्रश्नाची तोंडओळख आहे, एवढेच. अशा परिस्थितीत कोणत्या चळवळी आणि त्यातले कोणते कार्यक्रम याची निवड करण्यात यावी? त्याचे निकष काय असावेत?
२)    समितीचे काम विस्तारत आहे. संघटनेत वाढ, उपक्रमात वाढ आणि विचारात सकसपणा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये असलेला कार्यकर्ता आधीच गुंतून पडलेला असतो. अशावेळी आणखी जबाबदारी घेणे शक्य नाही. पाठिंबा जाहीर करावा; पण कृतीच्या क्षेत्रात उतरू नये.
३)    समितीच्या कामाबद्दल एक आक्षेप मित्रमंडळींच्याकडूनच असा येतो की,  तुम्ही मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात इतके कसे गुंतून पडलात? आपल्या आजूबाजूस महत्त्वाचे जीवन-मरणाचे लढे सुरू आहेत. त्यात  काही योगदान देणार की नाही?
४)    आपला सहभाग एकतर्फीच असावा की संबंधित संघटनेने आपल्या कामाला अशीच मदत द्यावी, या देवाणघेवाणीवर अवलंबून असावा?
५)    सहभाग घ्यावा तो समिती म्हणून संघटित करावा. संबंधितांना याची कल्पना द्यावी; परंतु प्रत्यक्ष सहभाग हा समितीचे नाव न वापरता द्यावा.       त्यामुळे समितीच्या कार्याचे अनेक हितचिंतक त्यांच्या मनात समिती आणखी काय-काय करू लागली (किंवा विनाकारण कशाकशात नाक खुपसू लागली?) ही प्रतिक्रिया उमटणार नाही, असे करणे योग्य की अयोग्य?
६)    आपण बरे, आपले बरे या पद्धतीने समितीचे काम जोमात सुरू ठेवावे. बाकीच्या घडामोडीत लक्ष घालण्यास आपले वेळ, श्रम व पैसे वाया घालवू नयेत.
वरील मुद्दे आहेत विचारार्थ. यापेक्षा वेगळे काही आपणांस सुचू शकतील. आपण त्यावर जरूर लिहावे.

संघटनेचा विस्तार आणि महिलांचा अधिक सहभाग या पहिल्या दोन्ही लेखांना प्रतिसाद आला नाही. हे फारसे चांगले लक्षण नाही. सततचे विचारमंथन, त्यातून नव्या कल्पनांचा स्वीकार आणि त्यामधून संघटनेसाठी वाढते बळ आणि पाठिंबा मिळवणे, हे कुठल्याही चळवळीला वर्धिष्णु राहण्यासाठी आवश्यक असते. आपण आता या टप्प्यावर आलो आहोत आणि म्हणूनच आव्हान म्हणा अथवा कर्तव्य, आपण ही जबाबदारी स्वीकारायलाच हवी.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जुलै १९९७)

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी



मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, अभियान, संघटन, पुस्तक विक्री, जनसंवाद
कोल्हापूरला डॉ. श्रीराम लागूंच्या सोबत कार्यक्रमाला गेलो होतो. रात्री कॉ. गोविंद पानसरे यांच्याबरोबर गप्पा झाल्या. पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस आहेत. कम्युनिस्ट संघटनेत हे पद त्या-त्या पातळीवरील सर्वोच्च असते. पानसरे हे चळवळीचे ज्येष्ठ मित्र आहेत. बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, ‘खरे सांगू, तुमची ही चळवळ मी गेली काही वर्षे पाहत आहे, ऐकत आहे; पण त्याकडे माझे फारसे लक्ष नव्हते. यावे असेही वाटले नाही; पण गेल्या दोन वर्षांत मला लक्षात आले की, चळवळ अंधश्रद्धेविरुद्ध चालवीत असला तरी तुम्ही भाषा बोलत आहात व्यापक परिवर्तनाच्या चळवळीची आणि ती मनापासूनची आहे; म्हणून मला तुमच्या कार्यात आस्था आली. समितीच्या कामाला व्यापक समाजबदलाच्या कामाचा भाग बनवण्याच्या आपल्या प्रयत्नाची ही उचित नोंद आपल्याला समाधान देणारी वाटावयास हवी.

याच विचाराचा एक भाग म्हणून आपण लढा नव्या स्वातंत्र्याचा, बेड्या तोडू गुलामीच्या हे अभियान घेत आहोत. त्यामागचा विचार व त्याबाबतचा व्यवहार हा दोन्ही चळवळीची बिरादरी वाढवण्यास उपयुक्त आहे. नगर जिल्ह्यात ता. २४ ते २८ हे अभियान प्रथम चालेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबरच, स्वातंत्र्य सैनिकांची संघटना, कामगार संघटना, युवावर्ग त्यामध्ये सहभागी होत आहे. ज्यासाठी स्वातंत्र्य मिळाले, त्यापेक्षा काही विपरीतच देशात घडत आहे. व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, फुटीरता, धर्मांधता जनजीवनात वाढते आहे, याची खंत स्वातंत्र्य सैनिकांना आहे. नवे आर्थिक धोरण हे बरोबर की चूक, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यामुळे लोकांच्या समोर प्रसारमाध्यमातून सादर होणारे बेबंद चंगळवादी जीवन हे निश्चितच घातक आहे. सरळपणे अर्थार्जन करून ते जीवन लाभणे केवळ अशक्य; मग भ्रष्टाचार वा दैववाद याचा आश्रय माणसे घेऊ लागली आहेत. अंधश्रद्धा वाढवण्याचा उद्योग राजकारणी लोक, शासन, प्रसारमाध्यमे करीत आहेत. गुलामगिरीची ही विविध रूपे आहेत. स्वातंत्र्यसैनिक राजकीय गुलामगिरीविरुद्ध लढले, कामगार लढू इच्छितो मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची धडपड आहे. या साऱ्यांनी आपली बिरादरी एकच आहे, हे ओळखून खांद्याला खांदा भिडवण्यास नको काय? ‘लढा नवा स्वातंत्र्याचा ही या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. आपण आपापल्या ठिकाणी प्रत्यक्ष कामातून ही बिरादरी बळकट करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

संघटनेच्या आघाडीवर या महिन्यात...
चळवळ सशक्त, मजबूत करावयाची तर संघटनाही तशीच हवी. संघटना तशी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हवा. क्रियाशील कार्यकर्त्यांचा, सामान्य सभासदांचा, वार्तापत्र वर्गणीदारांचा आणि वार्तापत्राचे केवळ वाचक असणाऱ्या हितचिंतकांचा देखील. हा सहभाग कसा असावा, याचे एक वेळापत्रकच आपण तयार केले आहे.

हा अंक तुम्हाला पोचेल, त्यावेळी आपला पुस्तक विक्री पंधरवडा सुरू झाला असेल. १ ते १५ ऑक्टोबर हा त्याचा कालखंड. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्रात स्वतंत्र चळवळ म्हणून अलिकडेच सुरू झाले. दलित चळवळ जशी दलित साहित्य घेऊन आली, तसे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू झाल्यावर या विषयाची पुस्तके मोठ्या प्रमाणात बाजारात आली. आपल्या समितीने देखील गेल्या तीन वर्षांत मिळून दहा पुस्तके-पुस्तिका प्रकाशित केल्या.
     
पण लक्षात घ्या, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. प्रकाशक पुस्तकांच्या प्रती काढतात. एक हजार वा दोन हजार आणि त्या खपतात दोन-तीन वर्षांत, आपल्याला हे परवडणारे नाही आणि महाराष्ट्रव्यापी संघटनेला शोभणारेही नाही.
     
आपली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेलीच पाहिजेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपण काही सर्वदूर पोचू शकत नाही. पण पुस्तके अनेकांच्या हातातून जातात. ठिकठिकाणी लोकांच्या मनात विचाराचे बीज टाकत जातात. चळवळीला हे खूप उपकारक ठरते. पुस्तके विकताना अनेकांशी संवाद होतो. चळवळीबद्दलचे जनमानस अधिक चांगल्या प्रकारे समजते. कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना एक कृती कार्यक्रम मिळतो. आपल्या पुस्तकांच्या किमती फारच माफक आहेत आणि ती विकत घ्या, असे सांगायला आपण तोंड उघडले तर लोकांचा हात विषयाच्या उत्सुकतेने, चळवळीच्या प्रेमापोटी, कमी किमतीमुळे-कारण कोणतेही असो; त्याच्या खिशात जातोच, असा अनुभव आहे.

तेव्हा १५ ऑक्टोबरपर्यंत; पण उशिरात उशिरा ऑक्टोबरअखेर क्रियाशील सचिव यांच्याकडून रोखीनेच घ्यावयाची. स्वत:चे शंभर रुपये घालायचे ते शाखा पातळीवर एकत्र करून वा स्वतंत्रपणे मारुतराव पांगे, ४०, शिवनेरी हौसिंग सोसायटी, अजिंक्यतारा रोड, गोडोली, सातारा. ४१५ ००१ या पत्त्यावर पाठवावयाचे. संघटनेच्या पोस्टेज खर्चाने, सवलतीच्या दरात पुस्तके आपल्याकडे येतील. पुस्तके विकायला बाहेर पडायचे. ती विकली जातातच, असा अनुभव आहे; परंतु समजा नाहीच विकली गेली तर पुस्तके परत पाठवा. संघटना आपले पैसे परत पाठवेल. पण ही पाळी येणारच नाही. मित्रांच्यात, शाळेत, ऑफिसात पुस्तके सहज विकली जातील. भाषणानंतर लोक हौसेने घेतील आणि वाढदिवस, लग्न अशा वेळी भेट म्हणून पुस्तकेच देण्यास विसरू नका.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९५)

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

वाचेल तो वाचेल



वाचेल तो वाचेल
दाभोलकर, वाचन-लेखन-चिंतन, अध्ययन, व्यापक परिवर्तन
एका शाखेची बैठक. नियमित कार्यरत असलेले आठ-दहा कार्यकर्ते उपस्थित. मला एका ठिकाणी विचारलेला प्रश्न चर्चेला घेतला. प्रश्न होता, ‘मानसिक आजार बरे होतात का हो?’ सर्वांना विचारले. उत्तरे अपुरी होती. काही चक्क चुकीची होती. नेमके मुद्देसूद उत्तर एकही नव्हते. मन आजारी का पडते? सौम्य व गंभीर मानसिक आजारातील फरक, उपाय कोणते? त्याची परिणामकारकता व मर्यादा, या मुद्द्यांना स्पर्श करणारे, समोरच्या व्यक्तीचे समाधान करू शकणारे उत्तर मिळाले नाही. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाची शिबिरे आता खूप होतात. शिबिरार्थी शिक्षक असतात. त्यांचेही चपखल समाधान होत नाही, असे अनेकदा कळते. असे का घडते? वाचणे, वाचलेले पचवणे, ते मुद्देसूदपणे प्रकट करणे, याला वैचारिक चळवळीत पर्यायच नाही. याकडे गांभीर्याने आणि आवडीने आपण लक्षच देत नाही, असे घडते आहे का? चमकदार उपक्रम आणि सतत काही कामाचा रेटा यामुळे वाचणे तेवढेसे महत्त्वाचे नाही, असे तर आपणास वाटू लागलेले आहे काय? कार्यकर्त्यांनी संघटनेत, वार्तापत्रात यावर मनमोकळेपणे बोलावयास, लिहावयास हवे. हा प्रश्न तसा जुनाच आहे. अंधश्रद्धांच्या बाबत लोकांच्या मनात जे प्रश्न सतत येतात, त्यांची उत्तरे पटतील अशी देणे, हे तर आपले कर्तव्यच आहे. परंतु त्यापलिकडेही आता त्याचा संघर्ष गेला आहे म्हणून तो पुन्हा घेतला. पुण्याच्या मेळाव्यात आलेल्या सहकाऱ्यांना हे निश्चित जाणवले असणार की, समिती व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग होण्याची गरज मेळाव्यात आलेले अनेक मान्यवर वक्ते व्यक्त करत होते. त्याचा अर्थ असा नव्हे की, भ्रष्टाचार, पर्यावरण, स्त्री-पुरुष समता आणि अशा अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांच्या लढ्यात समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट उतरावयाचे. मग काय करावयाचे? त्याचे सूत्र म्हणजे विचार वैश्विक करा, कृती स्थानिक करा. आपल्या आजूबाजूला बरेच काही घडत असते. अंधश्रद्धा जोपासणारे, अविवेकी बनणारे, अपरिहार्यपणे अंधश्रद्धांना शरण जाणारे व्यक्तिगत सामाजिक मन त्यामधून घडत असते. वैचारिक पातळीवर हे समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कार्याचे व्यापक सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ, समाजातील आपली वृत्ती अंधश्रद्धेच्या क्षेत्रात राहील; पण जाणीव वैश्विक राहील. हे घडावे कसे?




अड्डा संस्कृती व वालेचिं
अड्डा या शब्दाचा अर्थ गप्पा-टप्पा करण्याची, चहा पिण्याची, पत्ते खेळण्याची ठराविक मंडळींची जागा, असा केला जातो आणि एका मर्यादेत तो खराही अहे. पण पुरोगामी चळवळीत या शब्दाला विचारांची अनौपचारिक; पण जोरकस देवाणघेवाण जेथे घडते ते केंद्र असा देखील एक अर्थ अनुभवसिद्धपणे चिकटला आहे. संघटनेच्या बैठकीची शिस्त अड्ड्यावर नसते, वेळेचे बंधन नसते आणि यावयास हवेच, असा आग्रहही नसतो; पण तरीही अधून-मधून अड्ड्यावर चक्कर टाकली नाही, तर संबंधितांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत असते. याचे कारण एक मनमोकळी, निकोप, ताजीतवानी देवाणघेवाण तेथे सुरू असते. विचाराला नवनवे खाद्य मिळत असते, संदर्भ मिळत असतात. समज आपोआप प्रगल्भ होत असते. पुस्तके वाचणे, शिस्तशीरपणे विषय ठरवून चर्चा करणे, यापेक्षा स्नेहबंधातील अनौपचारिक संवाद एक वेगळी समज व समृद्धी देत असतो. डाव्या चळवळीत त्यांच्या जनसंघटना जेव्हा जोरात होत्या, तेव्हा अर्थातच ही अड्डा संस्कृती बहरात होती. आज ती सर्वत्र याच स्वरुपात असेल, असेही नाही; पण नवीन वाचावे, वाचलेले इतरांना सांगावे, त्यांच्याशी वाद-संवाद-विवाद करावा, अशी भूक असणारी माणसे, छोटे-मोठे गट सर्वत्र असतात. शिस्तशीर वैचारिक अभ्यास करावयाला वेळ नसला तर अशा अड्ड्याशी कार्यकर्त्यांनी जरूर संपर्क ठेवावा. स्वत:चा अड्डा तयार करता आल्यास फारच चांगले. त्यामुळे वैचारिक कक्षा सहजपणे रुंदावल्या जातील. स्थानिक संघर्ष करता-करता व्यापकतेचे भान वाढत जाईल.

 वालेचिं’ मंडळ
वालेचिं मंडळ हा खरे तर आपल्याच धुळे शाखेने केलेला उपक्रम. वा-वाचन, ले-लेखन, चिं-चिंतन. हे तसे ठरवून करावयास हवे आणि शक्य तर सामूहिकपणे. आपल्या चळवळीच्या विचारस्पष्टतेसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. वाचन आपण करतोच (असे आपण गृहीत धरूया) वाचलेले वा वाचनाशी सुसंगत असलेले विचार लिहून काढणे हे बहुधा कोणीच करत नाही. लिखाणाचा सर्वात सोपा; पण प्रभावी मार्ग म्हणजे वृत्तपत्रीय पत्रलेखन. त्या-त्या जिल्ह्यातील वा विभागातील वृत्तपत्रात आपल्या विचाराचे प्रतिबिंब पाडण्याचा एक परिणामकारक मार्ग पत्रलेखनातून मिळतो. आपल्या चळवळीशी संबंधित विचाराला तर तोटाच नसतो आणि बहुधा ती पत्रे छापली जातात आणि वाचलीही. अर्थात लेखन म्हणजे ते हेच, असा गैरसमज मात्र कृपया याबाबत कोणी करू नये. वाचलेले नीटपणे शब्दबद्ध करण्याची सवय लागली तर ती खूप फायद्याची ठरतेच; शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू मिळतो. लेखन दैनिकातील पत्रव्यवहाराचे असो वा चळवळीच्या वैचारिक मांडणीचे; पण त्यासाठी चिंतन हे लागतेच. याची जाणीवपूर्वक तयारी करण्याचा प्रयत्न करणारा वालेचिं मंडळाचा उपक्रम म्हणून महत्त्वाचा. जो वाचेल, तो वाचेल असे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते. वाचणे, पचविणे, लिहिणे आणि दुसऱ्याला समजावणे हीच तर आपल्या चळवळीची शस्त्रे आणि अस्त्रे. ती सदैव धारदारच ठेवावयास हवीत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९७)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...