सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

वाचेल तो वाचेल



वाचेल तो वाचेल
दाभोलकर, वाचन-लेखन-चिंतन, अध्ययन, व्यापक परिवर्तन
एका शाखेची बैठक. नियमित कार्यरत असलेले आठ-दहा कार्यकर्ते उपस्थित. मला एका ठिकाणी विचारलेला प्रश्न चर्चेला घेतला. प्रश्न होता, ‘मानसिक आजार बरे होतात का हो?’ सर्वांना विचारले. उत्तरे अपुरी होती. काही चक्क चुकीची होती. नेमके मुद्देसूद उत्तर एकही नव्हते. मन आजारी का पडते? सौम्य व गंभीर मानसिक आजारातील फरक, उपाय कोणते? त्याची परिणामकारकता व मर्यादा, या मुद्द्यांना स्पर्श करणारे, समोरच्या व्यक्तीचे समाधान करू शकणारे उत्तर मिळाले नाही. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाची शिबिरे आता खूप होतात. शिबिरार्थी शिक्षक असतात. त्यांचेही चपखल समाधान होत नाही, असे अनेकदा कळते. असे का घडते? वाचणे, वाचलेले पचवणे, ते मुद्देसूदपणे प्रकट करणे, याला वैचारिक चळवळीत पर्यायच नाही. याकडे गांभीर्याने आणि आवडीने आपण लक्षच देत नाही, असे घडते आहे का? चमकदार उपक्रम आणि सतत काही कामाचा रेटा यामुळे वाचणे तेवढेसे महत्त्वाचे नाही, असे तर आपणास वाटू लागलेले आहे काय? कार्यकर्त्यांनी संघटनेत, वार्तापत्रात यावर मनमोकळेपणे बोलावयास, लिहावयास हवे. हा प्रश्न तसा जुनाच आहे. अंधश्रद्धांच्या बाबत लोकांच्या मनात जे प्रश्न सतत येतात, त्यांची उत्तरे पटतील अशी देणे, हे तर आपले कर्तव्यच आहे. परंतु त्यापलिकडेही आता त्याचा संघर्ष गेला आहे म्हणून तो पुन्हा घेतला. पुण्याच्या मेळाव्यात आलेल्या सहकाऱ्यांना हे निश्चित जाणवले असणार की, समिती व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग होण्याची गरज मेळाव्यात आलेले अनेक मान्यवर वक्ते व्यक्त करत होते. त्याचा अर्थ असा नव्हे की, भ्रष्टाचार, पर्यावरण, स्त्री-पुरुष समता आणि अशा अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांच्या लढ्यात समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट उतरावयाचे. मग काय करावयाचे? त्याचे सूत्र म्हणजे विचार वैश्विक करा, कृती स्थानिक करा. आपल्या आजूबाजूला बरेच काही घडत असते. अंधश्रद्धा जोपासणारे, अविवेकी बनणारे, अपरिहार्यपणे अंधश्रद्धांना शरण जाणारे व्यक्तिगत सामाजिक मन त्यामधून घडत असते. वैचारिक पातळीवर हे समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कार्याचे व्यापक सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ, समाजातील आपली वृत्ती अंधश्रद्धेच्या क्षेत्रात राहील; पण जाणीव वैश्विक राहील. हे घडावे कसे?




अड्डा संस्कृती व वालेचिं
अड्डा या शब्दाचा अर्थ गप्पा-टप्पा करण्याची, चहा पिण्याची, पत्ते खेळण्याची ठराविक मंडळींची जागा, असा केला जातो आणि एका मर्यादेत तो खराही अहे. पण पुरोगामी चळवळीत या शब्दाला विचारांची अनौपचारिक; पण जोरकस देवाणघेवाण जेथे घडते ते केंद्र असा देखील एक अर्थ अनुभवसिद्धपणे चिकटला आहे. संघटनेच्या बैठकीची शिस्त अड्ड्यावर नसते, वेळेचे बंधन नसते आणि यावयास हवेच, असा आग्रहही नसतो; पण तरीही अधून-मधून अड्ड्यावर चक्कर टाकली नाही, तर संबंधितांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत असते. याचे कारण एक मनमोकळी, निकोप, ताजीतवानी देवाणघेवाण तेथे सुरू असते. विचाराला नवनवे खाद्य मिळत असते, संदर्भ मिळत असतात. समज आपोआप प्रगल्भ होत असते. पुस्तके वाचणे, शिस्तशीरपणे विषय ठरवून चर्चा करणे, यापेक्षा स्नेहबंधातील अनौपचारिक संवाद एक वेगळी समज व समृद्धी देत असतो. डाव्या चळवळीत त्यांच्या जनसंघटना जेव्हा जोरात होत्या, तेव्हा अर्थातच ही अड्डा संस्कृती बहरात होती. आज ती सर्वत्र याच स्वरुपात असेल, असेही नाही; पण नवीन वाचावे, वाचलेले इतरांना सांगावे, त्यांच्याशी वाद-संवाद-विवाद करावा, अशी भूक असणारी माणसे, छोटे-मोठे गट सर्वत्र असतात. शिस्तशीर वैचारिक अभ्यास करावयाला वेळ नसला तर अशा अड्ड्याशी कार्यकर्त्यांनी जरूर संपर्क ठेवावा. स्वत:चा अड्डा तयार करता आल्यास फारच चांगले. त्यामुळे वैचारिक कक्षा सहजपणे रुंदावल्या जातील. स्थानिक संघर्ष करता-करता व्यापकतेचे भान वाढत जाईल.

 वालेचिं’ मंडळ
वालेचिं मंडळ हा खरे तर आपल्याच धुळे शाखेने केलेला उपक्रम. वा-वाचन, ले-लेखन, चिं-चिंतन. हे तसे ठरवून करावयास हवे आणि शक्य तर सामूहिकपणे. आपल्या चळवळीच्या विचारस्पष्टतेसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. वाचन आपण करतोच (असे आपण गृहीत धरूया) वाचलेले वा वाचनाशी सुसंगत असलेले विचार लिहून काढणे हे बहुधा कोणीच करत नाही. लिखाणाचा सर्वात सोपा; पण प्रभावी मार्ग म्हणजे वृत्तपत्रीय पत्रलेखन. त्या-त्या जिल्ह्यातील वा विभागातील वृत्तपत्रात आपल्या विचाराचे प्रतिबिंब पाडण्याचा एक परिणामकारक मार्ग पत्रलेखनातून मिळतो. आपल्या चळवळीशी संबंधित विचाराला तर तोटाच नसतो आणि बहुधा ती पत्रे छापली जातात आणि वाचलीही. अर्थात लेखन म्हणजे ते हेच, असा गैरसमज मात्र कृपया याबाबत कोणी करू नये. वाचलेले नीटपणे शब्दबद्ध करण्याची सवय लागली तर ती खूप फायद्याची ठरतेच; शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू मिळतो. लेखन दैनिकातील पत्रव्यवहाराचे असो वा चळवळीच्या वैचारिक मांडणीचे; पण त्यासाठी चिंतन हे लागतेच. याची जाणीवपूर्वक तयारी करण्याचा प्रयत्न करणारा वालेचिं मंडळाचा उपक्रम म्हणून महत्त्वाचा. जो वाचेल, तो वाचेल असे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते. वाचणे, पचविणे, लिहिणे आणि दुसऱ्याला समजावणे हीच तर आपल्या चळवळीची शस्त्रे आणि अस्त्रे. ती सदैव धारदारच ठेवावयास हवीत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...