रविवार, ३ डिसेंबर, २०१७

बांधिलकीची व्यापक वाट



बांधिलकीची व्यापक वाट
दाभोलकर, सामाजिक कृतज्ञता निधी, नवे वाण, शनि-शिंगणापूर
आपली चळवळ व्यापक समाजपरिवर्तनाशी जोडण्याची भाषा आपण नेहमी बोलतो. आपली तशी मनापासून इच्छाही असते; प्रत्यक्षात मात्र हे तसे अवघडच असते. व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उरलेल्या वेळात आपले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य यामध्ये वेळ मिळणे जमत नाही. तरीही काही वेळा, प्रसंग असे येतात की, ही बांधिलकी सांभाळावी लागते. भावकीला मदत करताना हातातले काम बाजूला ठेवावे लागते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या एक उपवास कृतज्ञतेचा या उपक्रमाला आपल्या कार्यकर्त्यांनी जो हातभार लावला, त्यामुळे त्यांच्या या व्यापक सामाजिक बांधिलकीची प्रचीती आली.

पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाप्रती समाजाची कृतज्ञता म्हणून मानधन देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना दहा वर्षांपूर्वी झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, बाबा आढाव, अनिल अवचट, पुष्पाताई भावे ही आपली सारी ज्येष्ठ मित्रमंडळी त्यामध्ये आहेत; मीही आहे. निधीची रक्कम वाढवण्यासाठी एक उपवास कृतज्ञतेचा ही अभिनव मोहीम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ३० जानेवारीस हुतात्मादिनी एकवेळचा उपवास करावा आणि त्यातून वाचलेले पाच वा दहा रुपये फक्त या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना. महाराष्ट्रात ती पहिल्या टप्प्यावर आठ जिल्ह्यात पोचवायची ठरली. त्यापैकी अनेक ठिकाणी उत्साहाने याचे संयोजन करणारे कार्यकर्ते नव्हते किंवा होते तरी त्यांना मदतीची गरज होती. हे काम आपल्या समितीच्या शाखांच्या विविध कार्यकर्त्यांनी फार तत्परतेने केले.

सावंतवाडी येथे नागरिकांची सभा आयोजित करणे, जिल्हाभर नागरिकांच्या पातळीवर निधी संकलनासाठी संपर्क साधणे हे काम डॉ. कदम, त्यांच्या पत्नी, डॉ. विजया चिंडक व तेथील शाखेच्या अन्य कार्यकर्त्यांनी यांनी स्वत:ला तोशिष लावून केले. रत्नागिरी जिल्ह्यात संयोजन मुळातच उभे राहत नव्हते. त्यासाठी दापोली, चिपळूण, रत्नागिरी अशी त्रिस्थळी धावाधाव स्वत:च्या खर्चाने स्वत:ची मोटार बाहेर काढून अमृते यांनी केली. छपाई, पोस्टिंग ही सारी हमाली कामे अनिश पटवर्धन यांनी पार पाडली. नगरलाही अशीच अडचण होती. तेथील जिल्हा अध्यक्ष पी. बी. कडू-पाटील, कार्यवाह बाबा आरगडे, नीलिमाताई बंडेलू, रवींद्र सातपुते, रामचंद्र तावरे यांच्या धडपडीतून नगरला संयोजन होऊ शकले. नाशिकला एकूण आखणी उत्तम केली होती. त्यामध्ये इतरांच्या जोडीने तेथील सामाजिक कृतज्ञता निधी मित्रमंडळाचे एक निमंत्रक व आपल्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. किशोर पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. जळगावच्या संयोजनात अविनाश पाटीलची धडपड होती. आपापल्या ठिकाणी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा म्हणून तासगाव (जि. सांगली) व सिंदखेडा (जि. धुळे) येथे अनुक्रमे प्रताप घाटगे व परेश शहा यांनी जणू मोहीमच राबविली आणि खरे तर इथे नावे न लिहिलेल्या आपल्या इतर अनेक कार्यकर्त्यांनी घरचेच काम आहे, असे समजून अगत्य दाखविले. चळवळीच्या ज्या ज्येष्ठ मित्रांची नावे वर लिहिली आहेत, त्या सर्वांना या सहभागाबद्दल आनंद वाटला. व्यापक समाजकारणाशी दैनंदिन कामात जोडून घेणे शक्य होत नसेल; पण गरज पडताच हे तर आपलेच काम आहे, ही समज, उमज व कृती आपल्या कार्यकर्त्यांनी सहजपणे, परिणामकारकपणे दाखविली, याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करावयास हवे.

नवे वाण
रूढी, प्रथा, कर्मकांडे यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी आहे, अशी सर्वसाधारणपणे कल्पना असते. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी, कुटुंबियांनी या स्वरुपाचे कोणतेही वर्तन केले की, ते लगेच चर्चेचा विषय होते. याबाबत नेहमी दोन-तीन मुद्दे पुढे येतात. एक म्हणजे सगळी कर्मकांडे सरसकट नाकारावीत. दुसऱ्या काहीजणांचा आग्रह असतो, असे वागणे म्हणजे समाजापासून तुटून पडणे होईल. त्यामुळे ज्या कर्मकांडांना शोषण, मिथ्याकथन याचा आधार असतो, ती तेवढी नाकारावीत; परंतु ज्यामध्ये परस्परातील चांगल्या भावनांचा परिपोष असेल ती आचारावीत, जसे तिळगूळ देणे-घेणे, समारंभ, स्वागतप्रसंगी श्रीफलाचा स्वीकार करणे. आणखी तिसरा एक मतप्रवाह आहे, तो असा की, आपण पारंपरिक कर्मकांडे; प्रसंगी केली तरी काय बिघडते? त्यामध्ये नवा आशय आपणाकडून भरण्याचा प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर.

विषय गुंतागुंतीचा आहे, नाजूकही. कार्यकर्त्यांच्या वर्तनावर समाजाचे बारीक लक्ष आणि बऱ्याच वेळा आसपासचे लोक टीकेसाठी टपलेले. त्यामुळे त्याला हे आचारस्वातंत्र्य कमी उपभोगता येते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची; विशेषत: पत्नीची गोष्ट काहीशी वेगळी असते. त्यांना स्वत:ला मत असते आणि ते कार्यकर्त्यांपेक्षा वेगळे असणे सहज शक्य असते. समाजाशी अशा कर्मकांडातून जोडलेले नाते एकदम तोडणे त्यांना शक्य नसते; अनेकदा इष्टही वाटत नाही. दुसऱ्या बाजूला आपल्या माणसाची विचारसरणी त्यांना माहीत असते, बरीचशी पटतही असते. अशा वेळेला कर्मकांडांना काही वेगळा संदर्भ देण्याचा प्रयत्न करतात.

बाबा आरगडे हे आपले महाराष्ट्राचे कार्यवाह. नगर जिल्ह्यातील. त्या जिल्ह्यातील शनि-शिंगणापूरच्या देवस्थानात स्त्रियांना असणारी बंदी उठवावी, अशी आपली मागणी आहे. स्त्रियांनी देवपूजेला जावे, याची ही चळवळ नाही, तर लिंगभेदामुळे उपासनेचे व्यक्तिस्वातंत्र्य नाकारले जाऊ नये, हा समतेचा मूल्यविचार त्यामागे आहे. या चळवळीचे नेतृत्व बाबा आरगडे करतात. आपली भूमिका नीटपणे मांडणारी एक पुस्तिकाही यानिमित्ताने आपण प्रकाशित केली आहे. बाबांच्या पत्नी सूर्यकलाबाई. रूढार्थाने फारसे शिक्षण न झालेल्या. त्यांनी हळदीकुंकू समारंभ म्हणजे एका अर्थाने महिलांचे स्नेहमिलनच बनविले. मात्र विधवा स्त्रियांना त्यातून वगळले जाते, ही मोठीच विषमता. हा दोष टाळून हळदी-कुंकू समारंभ केला तर तो एक सांस्कृतिक कार्यक्रम बनतो. त्यातलाच एक भाग असतो, वाण लुटण्याचा. आलेल्या प्रत्येक स्त्रीला काहीतरी उपयुक्त वस्तू द्यावयाची. सूर्यकलाबाईंनी स्वत:च विचार केला आपण शनि-शिंगणापूरची वस्तुस्थिती विषद करणारी पुस्तिकाच सर्वांना दिली तर... त्यांनी तसे केले. ज्या स्त्रियांच्या पर्यंत एरव्ही ही पुस्तिका पोचली नसती, त्यांच्यापर्यंत ती सहज पोचली. त्यातल्या अनेकांच्या घरात विचार वाचला गेला. पटला. महिलांची मने बदलू लागली, नगर जिल्ह्यातील अनेक हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये या पुस्तिकाचे वाण जागोजागी दिले गेले, तर परिवर्तनाचा विचार थेट संबंधितापर्यंत पोचण्याचा मार्ग वेगळ्या प्रकारे झाला. तुम्हाला याबद्दल काय वाटते?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...