विरोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

विचारांचा जागर कृतिशील व सर्वंकष करायला हवा!




विचारांचा जागर कृतिशील व सर्वंकष करायला हवा!
दाभोलकर, नाट्यप्रयोग, विरोध, आव्हानात्मक घटना
दोन घटना आणि मला जाणवलेला त्यांचा निष्कर्ष नोंदवत आहे. कार्यकर्त्यांना, वाचकांना काय वाटते, हे समजून घेण्यास मी उत्सुक आहे.

घटना क्र. १
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका जिल्हा शाखेने निधी उभारणीसाठी एक नाटकाचा प्रयोग घेतला. नाटकातील प्रमुख कलावंत हा महाराष्ट्रातील रंगभूमीवरचा सर्वाधिक लोकप्रिय आहे. नाट्यप्रयोग ठरवण्यासाठी त्याच्याशी संपर्क झाला, त्यावेळेला त्याने सिद्धिविनायकाच्या पुढे लागलेल्या रांगा पाहून स्वत:ला अस्वस्थ होते,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक नाटक यशस्वी केले. निधी चांगला जमवला. गर्दी उत्तम होती. शहरातील सुजाण वर्ग उपस्थित होता. अशा कार्यक्रमात नेहमीच मध्यंतराच्यावेळी एखादा छोटा कौतुक समारंभ होतो. निधी जमवण्यासाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्यांचे कौतुक, प्रमुख कलावंतांच्यातर्फे कामाला सदिच्छा, असा तो छोटेखानी कार्यक्रम असतो. स्वाभाविकच त्या कार्यक्रमात त्या सुप्रसिद्ध कलावंताला अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली, की त्याने ‘अंनिस’च्या कामाचे दोन मिनिट कौतुक करून या कामाला सदिच्छा द्याव्यात. त्याच्या करिष्म्यामुळे, त्याच्या तोंडातून आलेले शब्द लोकांना अधिक भावतील व ‘अंनिस’च्या कामाबद्दल त्यांच्या मनात अधिक अनुकुलता निर्माण होईल, अशी साधी अपेक्षा कार्यकर्त्यांनी बाळगली होती. अशी सदिच्छा देण्यास त्या अभिनेत्याने नकार दिला. कुठल्याही वैचारिक (आणि म्हणूनच मतभिन्नता असणाऱ्या) कामाबद्दल सदिच्छा व्यक्त करून त्या कामाबद्दल व विचारांबद्दल मतभिन्नता अथवा विरोध असणाऱ्या अव्यक्त रसिकजनांना हे आवडले नाही तर...? अशी त्याच्या मनात शंका होती आणि त्यामुळे सदिच्छा न देताच त्यांनी तिकीटविक्री करणाऱ्यांचा सत्कार केला.

घटना क्र. २
हुपरी, जि. कोल्हापूर येथे एका मुख्याध्यापिकेने असा दावा केला, की तिला साक्षात्कार झाला आहे. साक्षात्कार असा होता, की एका जागेत एक देवाची मूर्ती आहे आणि त्याच्या पलिकडे सोन्याने भरलेला हंडा आहे. एवढे सांगूनच ती थांबली नाही, तर तिने स्वत:च्या खर्चाने त्या जागेत जेसीबी वगैरे लावून जोरदार खोदाई चालू केली. खोदकाम चार दिवस चालले. विषय चर्चेचा, उत्सुकतेचा झाला. वृत्तपत्रे व दृक्श्राव्य माध्यमे यांना खमंग बातमी मिळाली. खोदाई स्थळाला जत्रेचे रूप येऊ लागले. कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाने हस्तक्षेप करून हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. आश्चर्य म्हणजे या मागणीला वृत्तपत्रांनी पाठिंबा दिला आणि प्रशासनाने तालुका तहसीलदारांमार्फत नोटीस देऊन खोदकाम थांबविण्यास आदेश दिला. स्वाभाविकच धार्मिक बाबतीत शासनाने हस्तक्षेप करून भावना दुखावल्याचा आरोप झाला. शासनाचे आम्ही काही चालू देणार नाही. खोदकाम करणे हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच. कोण विरोध करतो ते पाहू,’ अशी राणा भीमदेवी थाटाची आगखाऊ भाषणे जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदारांनी केली. गंमत म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांनी त्यांना अक्षरश: दोन ओळी जागा दिल्या. तरीही चिकाटीने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटवले आणि असे सांगितले, की आमच्या धार्मिक श्रद्धेच्या आड प्रशासनाने येता कामा नये आणि ते आले तर आम्ही मानणार नाही. प्रशासनाने अशी भूमिका घेतली, की ही अंधश्रद्धा आहे आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्था धो्क्यात येऊ शकते. मग ही अंधश्रद्धा कशी?’ असा पेटंट मुद्दा शिवसेनेनं काढला. शासनाने ठाम भूमिका घेतली की, हा निर्णय बदलणार नाही. तुम्ही कायदा हातात घेतल्यास कारवाई करू; परंतु तुमचा विरोध असल्यास तुम्ही कोर्टामार्फत आमचा निर्णय बदलून घेऊ शकता. धर्मरक्षकांना अर्थातच एवढा उत्साह नव्हता. त्यामुळे हे सर्व प्रकरण थांबलेच.

काय घडते आहे? स्वत:च्या व्यावसायिक यशाने सुखावलेल्या आणि त्याच वेळी ते यश कायम टिकावे, या इच्छेने धास्तावलेल्या कलाकाराने स्वत:ची भूमिका बदलून एक पलायनवादी भूमिका घेतली. खरे तर हे कचखाऊ व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. मात्र त्याला आता व्यावसायिक शहाणपणा असे नाव दिले जाते. उत्तुंग लोकप्रियता लाभूनही त्याची जराही पर्वा न करता आपले वैचारिक भान परखडपणे व्यक्त करणाऱ्या निळूभाऊ फुले वा श्रीराम लागू यांचे मोठेपण यातून अधिकच जाणवते.

दुसऱ्या उदाहरणातील अनुभव आश्वासक आहे. प्रसिद्धिमाध्यमांनी योग्य भूमिका घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कणखरपणा दाखवला. यामध्ये त्यांच्या त्यांच्या मूल्यमापनाचा भाग आहेच; परंतु याबरोबरच समाजामध्ये ‘अंनिस’ने सातत्याने जी भूमिका लावून धरली, त्याचे साद-पडसाद त्यांच्या मनात उमटले असण्याची ही खूण आहे.

अर्थ असा की, विचारांचा जागर अधिक कृतिशील, अधिक प्रभावी आणि अधिक सर्वंकष करावयास हवा. त्यामुळे असलेली अनुकुलता टिकून राहील आणि आज असलेली प्रतिकुलता उद्याच्या अनुकुलतेत रूपांतरित होऊ शकेल.

हे घडणे सोपे नाही; आव्हानात्मक आहे. मुळात हा निष्कर्ष बरोबर आहे का आणि असेल तर यासाठी काय करावयास हवे, याबाबत जरूर कळवावे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च २०१०




रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

फॅसिस्टांचा पराभव होत आहे



फॅसिस्टांचा पराभव होत आहे
दाभोलकर, विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता
शुक्रवार, ता. ४ जानेवारी २००८ रोजी माझे व्याख्यान जळगाव रोटरीने ठेवले होते. जाहीर सभा होती. त्याची तयारी उत्तम होती. त्याला जोडून आणखी तीन महाविद्यालयांनी भाषणे ठेवली होती. मी रात्री साडेनऊ वाजता जळगावसाठी रेल्वेने निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात जळगावहून फोन खणखणले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माझ्या भाषणावर बंदी घातली होती. भाषण घेतल्यास कारवाई करण्याची धमकी संयोजकांना दिली होती. थोडक्यात घडले होते, ते असे : माझे भाषण जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे काही हिंदुत्ववादी संघटना पोलीस स्टेशनला गेल्या. मी हिंदू देवतांवर टीका करणारे बोलतो, यासाठी माझ्या भाषणावर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली. दाभोलकरांच्या भाषणात देव-देवतांवर टीका झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, या संयोजकांना नेहमी दिल्या जाणाऱ्या धमकीऐवजी एक पाऊल पुढे टाकून थेट भाषणच रद्द करण्यात आले. रोटरी क्लबची मनःपूर्वक इच्छा होती. त्यांनी सर्व ते प्रयत्न केले. रोटरी क्लब पदाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या समान मित्राकडूनही बोलणी झाली. पण नन्नाचा पाढा कायम राहिला. शेवटी त्यांनी हे मला कळविले.

मी दोन फोन नंबर समोर ठेवले. एक गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा व दुसरा जळगाव जिल्हा पोलीसप्रमुखांचा. मी ते आळीपाळीने लावत होतो. त्यापैकी पहिल्यांदा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा लागला. मी त्यांच्याशी जे बोललो त्याला मराठी भाषेत कानउघाडणी म्हणतात. मी सुनावलेले मुद्दे असे :
·         पोलीस खाते भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मला भारतीय संविधानाने दिला आहे. तो बजावण्यासाठी मला कोणी अडथळा आणत असल्यास त्यांचा बंदोबस्त करणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र माझ्या भाषणाबाबत पोलीस खाते नेमके उलटे वागत आहे. ही गंभीर चूक त्यांनी सुधारावी.
·         मी गेली तीस वर्षांत हजारो व्याख्याने दिली. शेकडो लेख लिहिले. डझनभर पुस्तके लिहिली. त्यांना शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले. या सर्वांत मी उच्चारलेल्या वा लिहिलेल्या एकाही शब्दाबाबत आतापर्यंत माझ्यावर एकदाही गुन्हा दाखल झालेला नाही.
·         मी सतत भारतीय घटनेमध्ये लिहिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा पाठपुरावा करतो आहे. माझ्या भाषणावर आक्षेप घेणारी मंडळी सतत हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची घटनाविरोधी भाषा करीत असतात.
·         तुम्ही माझे भाषण रद्द करूच शकत नाही. मी उद्या येणार. भाषण देणार. माझ्या संघटनेची जळगाव शाखा ते आयोजित करेल. आपण खटला भरावाच. मी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे धरून बसेन. तुम्हाला निश्चितपणे माघार घ्यावी लागेल. तुमचा फोन आधी लागला. त्या आधी गृहमंत्र्यांचा लागला असता तर तुम्हाला तुमच्या साहेबांच्याकडून भाषणाला परवानगी देण्याचा आदेश ऐकायला लावला असता. साधारण दहा मिनिटे माझे सुनावणे अखंड चालू होते. पोलीस अधीक्षकांना असे ऐकून घेण्याची सवय थोडीच असते? पण तरीही त्या दिवशी त्यांना ते ऐकावे लागलेच. दहा मिनिटांनंतर ते मला म्हणाले, डॉक्टर, एवढेच सांगा, तुमचा विषय काय आहे? मी उत्तरलो, तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे’. ‘डॉक्टर मित्रत्वाच्या भावनेने ’- एस.पी. माझा विषय माझे अध्यत्मिक आकलनत्यात हिंदू देवदेवतांचा प्रश्न कुठे येतो?’ मी. परवानगी दिली, बंदोबस्त लावतो. काहीही घडणार नाही.’ -एस. पी. - धन्यवाद’.

फोनची चक्रे पुन्हा भराभरा फिरली. वृत्तपत्रात गेलेली दाभोलकरांचे भाषण रद्दही नोंद दाभोलकरांच्या भाषणाला अखेर परवानगीअशी पहिल्या पानावरची बातमी बनली. महाविद्यालयातील जळगाव, भुसावळमधील सर्व व्याख्याने उत्तम झाली. सायंकाळच्या जाहीर व्याख्यानालाही श्रोतृसमुदाय चांगला होता. भाषण पूर्ण शांततेत झाले. पुस्तकविक्री उत्तम झाली. सोलापूरच्या भाषणानंतर या मंडळींना मिळालेला हा दुसरा धडा होता. अर्थात, त्यामुळे ते शहाणे बनतील, अशी आशा बाळगावयास नको. त्यांच्या सनातन वृत्तीत ‘शहाण’पणाची प्रभात होणे म्हणजे सूर्याने पश्चिमेलाच उगवणे ठरावे.

माझ्या वरील उक्तीचा प्रत्यय मला माझे भाषण झाल्यावर तासाभरातच आला. नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई) हा राज्य कार्यकारिणीचा पदाधिकारी. त्याचा फोन आला. अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनवरून तो बोलत होता. घडले होते ते असे - आपला तरुण कार्यकर्ता स्वप्नील तावरे हा कुर्ला रेल्वे स्टेशनवर समितीची पुस्तके व दिवाळी अंक विकणे, संपर्क नोंदविणे, याचे कार्य करत होता. एकटाच होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागरण समिती या संघटनांचे नाव सांगणारे ४०-५० जण तेथे अचानक गेले. पुस्तके फेकली गेली. बॅनर फाडला गेला. स्वप्नीलला धक्काबुक्की झाली. त्यालाच धरून रिक्षात बसवण्यात आले. त्याला अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनला आणण्यात आले. अंधश्रध्देची दुनिया, चमत्काराची किमया या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर त्रिशूलाचे चित्र आहे. त्यावर लिंबू खोचलेले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, याखाली स्वप्नीलवर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक करा, असा दबाब ते आणत होते. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या याच! मी एन. डी. पाटील यांना फोन केला. त्यांनी तेथील पोलीस इन्स्पेक्टरला फोनवरून सुनावले : समिती जी मासिके विकत आहे, ती काही सरकारने बंदी घातलेली प्रकाशने नाहीत. तेव्हा संघटनेची पुस्तके विकताना झालेला हस्तक्षेप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. अशा बाबतीत तुम्ही गुन्हा दाखल केल्यास तुम्हीच अडचणीत याल. पोलीस उपनिरीक्षकाने प्रक्रिया थांबवली. एफ. आय. आर. दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते. तोपर्यंत गृहमंत्र्यांच्या सचिवाशी मी बोललो होतो. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता. वातावरण पूर्ण बदलले होते. वागणूक चांगली मिळाली, चहा मिळाला. रात्री गोंधळ घालणाऱ्यांच्यापैकी फक्त एकच जण सकाळी उगवला होता. त्याला पोलिसांनी स्पष्ट सुनावले की, ते खटला दाखल करणार नाहीत. त्यांना पाहिजे असल्यास व्यक्तिगत पातळीवर काय ते करावे. संबंधिताला निमूटपणे बाहेर जावे लागले. समितीच्या पुस्तकाच्या विक्री वेळेस आवश्यक तर पोलीस देण्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करणे पोलिसांनी टाळले, ही उणीव राहिली. मात्र ज्या हिमतीने स्वप्नील तावरे वागला आणि त्याला नंदकिशोर तळाशीलकर व राजू निरभवणे यांनी साथ दिली, त्याला दाद द्यावयासच हवी.

बोध काय द्यावयाचा..?
आपली भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपली संघटना भारतीय घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता लोकशाही या तत्त्वाशी बांधलेली आहे. आपण लोकांच्या धर्म व देव भावनांचा आदर करतो. कारण ही भूमिका भारतीय घटनेचीच आहे. जे या संदर्भात आपणाला विरोध करतात, ते हिंदू राष्ट्रधर्मनिर्मितीचे जाहीर पुरस्कर्ते आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अजिबात मान्य नाही. लोकशाही, खुली चर्चा, अहिंसक मार्ग याऐवजी हिंसा, ठोकशाही, कटकारस्थाने, खोटे खटले यातच त्यांना रस आहे. ही फॅसिस्ट मंडळी आहेत. ती सुधारतील, ही आशा व्यर्थ आहे. आपणच सावध, सतर्क, सजग व समर्थ राहावयास हवे. या मंडळींच्या उचापती आपल्या सहज लक्षात येतात. त्या दृष्टीने आधीच तयारीत असावे. परस्पर संपर्क, शाखा संघटन भक्कम असावे. भूमिका आग्रही घ्यावी; पण शब्द जपून वापरावेत. प्रत्येक शाखेने एका वकिलाशी चांगला संपर्क ठेवावा. कधीही हक्काने त्यांची मदत मिळावयास हवी. अशा गोष्टींनी आपण दुप्पट उत्साहाने व ताकदीने कामाला लागावयास हवे. आपल्या विरोधकांच्या या उचापतीमधून समितीचा फायदाच होतो आहे, हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग आपोआपच त्यांचे ताबूत थंडे होतील.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी २००८)

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

‘विवेकजागरा’वरील हल्ला : अर्थ व अन्वयार्थ





विवेकजागरावरील हल्ला : अर्थ व अन्वयार्थ
दाभोलकर, विवेकजागर, विरोध
३१ मार्चला जो प्रसंग घडला, तो स्वाभाविकच मन प्रक्षुब्ध करणारा होता. वातावरण बराच काळ तणावपूर्ण होते. मात्र डॉ. लागू व मी दोघेही शांत होतो. इतके शांत आम्ही कसे राहू शकतो, याचा विचार करताना आमच्या लक्षात आले की, हा कार्यक्रम करताना मनामध्ये नकळत; पण निश्चितपणे अशा हल्ल्याची शक्यता आम्ही गृहीत धरली होती. त्यामुळे एका अर्थाने अनपेक्षित असलेला हल्ला दुसऱ्या अर्थाने अजिबात अनपेक्षित नव्हता. वादावादी, कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न, दमदाटी हे प्रकार या कार्यक्रमात यापूर्वीही कुर्डुवाडी, सांगली येथे झाले होते. सगळीकडे प्रकार साधारण सारखाच. गंध लावलेल्या तरुणांचे टोळके, स्वत:ला कट्टर धर्माभिमानी म्हणवणारे, तोंडात अरेरावीची भाषा देवाधर्माबद्दल बोलला तर याद राखा, धडा शिकवू. चर्चा करण्याऐवजी हाणामारी करण्याची इच्छा.

औरंगाबादचा प्रकार यापुढे महाराष्ट्रात अन्यत्र होणारच नाही, असे मानता येत नाही. या प्रवृत्तींना मिळालेला सत्तेचा ‘आशीर्वाद’ विसरणे चूक ठरेल; पण मग आपण काय करायचे? डॉ. लागू व मी यांचा निर्धार आहे की, हे कार्यक्रम (आणि अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य) पूर्ण ताकदीने चालू ठेवायचे. पण लोकांना काय वाटते? हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना काय वाटते?

पहिला मुद्दा तर व्यावहारिक आहे. कार्यक्रमात वा त्यानंतर गोंधळ घालणे वा गुंडगिरी करणे याची शक्यता गृहीत धरावयास हवी. त्यासाठी पोलिसांच्या उपस्थितीची मागणी सनदशीरपणे करावयास हवी. परंतु केवळ पोलिसांवर अवलंबून राहून चालणार नाही. आपण हात उगारणार नाही, हे अगदी खरे; पण उगारलेला हात धरण्याची ताकद आपल्याकडे नक्कीच हवी. ती आपण कमवावयास हवी (खरे तर आजही अनेक ठिकाणी ती मित्रसंघटनांसह आपणात आहे) याही पुढे जाऊन आपल्यावर हात उगारण्याची हिंमतच होणार नाही, एवढे सामर्थ्य आपण मिळवावयास हवे.
यापुढे जाऊन या प्रकाराच्या मानसिकतेकडे कसे पाहता येईल?
मारहाण करण्याचा प्रयत्न ही चूकच अशी धादांत खोटी बातमी प्रसृत करणाऱ्या देवगिरी तरुण भारतलाही म्हणावे लागले. (चित्रलेखा ८ एप्रिल) बहुतेक जणांनी मुद्द्यांचे उत्तर देता येत नाही म्हणून गुद्द्यावर आले, याचाही आवर्जून उल्लेख केला आहे. परंतु तरीही हितचिंतकांनीच काही मुद्दे उपस्थित केले. त्यातील एक असा की, तुम्ही अगदी एकसारखे, नेटाने हे अंधश्रद्धा निर्मूलन इतके का लावून धरता? त्यामुळे तुम्ही लक्ष्य बनता - हा मुद्दा मला तर चूक वाटतो. आपल्या कार्याला आज जे काही थोडेबहुत यश, मान्यता मिळाली आहे, ती आपल्या कार्याच्या दहा वर्षांच्या चिकाटीमुळेच. दुसऱ्या काहीजणांचे म्हणणे असे की, ‘देवाधर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत, ही भूमिकाही सोडा. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य बुवाबाजी, भूत, भानामती, जादूटोणा अशा गोष्टींच्या पुरतेच मर्यादित करा. हे शक्य नाही इष्टही नाही, अशी भूमिका घेतली, असे क्षणभर गृहीत धरू, तरीही विरोधकांचे समाधान त्यामुळे होईलच कशावरून? यात्रेतील देवाच्या नवसाच्या नावाने होणारी पशुहत्या थांबवा म्हटले (जे सर्व साधू-संत, समाजसुधारकांनी म्हटले आहे) तरी यांचा देव कोपतो, धर्म बुडतो. चमत्कार नाही म्हटले की, यांना परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी अविश्वास दाखवला म्हणून राग येतो. गणपती दूध पित नाही, असे शास्त्रीय सत्य सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या मिळतात. अंगात देवी येत नाही, असे म्हटले की, देवीचा अपमान होतो. त्यामुळे देव, धर्म या कल्पनेच्या चिकित्सेला विरोध करावयाचे म्हटले तर पाऊल पुढे पडणे अवघड. तटस्थता याचा अर्थ एवढाच की, देवधर्म सोडूनच चळवळीत या, असे समिती म्हणत नाही आणि व्यासपीठावरून नास्तिकवादाचा व दुसऱ्या बाजूला देवाधर्माचा प्रचार करत नाही. ही भूमिका समजून घेताना लोकांना वेळ लागतो, हे खरे; पण दहा वर्षांपूर्वीपेक्षा आता ही भूमिका पटत चालली आहे, हेही खरे. तुम्ही तटस्थ आहात फक्त बोलण्यापुरते. वस्तुस्थितीत तुम्ही नास्तिकच आहात, असाही एक आक्षेप आहे. चळवळीत काही काळ राहिलेला कार्यकर्ता हळूहळू आपोआप देव धर्माचे अस्तित्व प्रश्नचिन्हांकित करू लागतो, हे खरे आहे. यामधून पुढे तो देवधर्म नाकारतोही; परंतु चळवळीत सहभागी होण्याची ही पूर्वअट नाही आणि चळवळीतले त्यांचे स्थानही त्याच्या नास्तिक असण्या-नसण्यावर अवलंबून नाही; शिवाय समितीच्या कार्यात विविध धर्माचे लोक आहेत आणि त्यांचे याबाबतचे आचरण यामध्ये फरकही आहे. तो स्वाभाविक आहे. समितीच्या व्यासपीठाच्या वर संघटनेच्या सहभागाच्या चौकटीत देवधर्माबाबत तटस्थता समिती आवश्यक मानते. व्यक्ती नास्तिक आहे का, हा मुद्दा त्यामध्ये गौण बनतो.

विषमता आणि शोषण यांचा पाया : धर्म
विचारले जाणारे सर्व प्रश्न, मुद्दामहून उठवले जाणारे काहूर, हे सर्व लक्षात घेताही ‘विवेकजागरा’चा कार्यक्रम मला समितीसाठी, आपल्या चळवळीसाठी उपयुक्त वाटतो. गेली तीन वर्षे हा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी जो नावाजला आहे. जेथे-जेथे तो झाला, तेथे-तेथे संयोजकांनी श्रोत्यांनी त्यातील मांडणी विचाराला चालना देणारी वाटल्याचे आवर्जून सांगितले आहे. याही पुढे जाऊन एका ज्येष्ठ दलित कार्यकर्त्याने याबाबत औरंगाबादला याबद्दल व्यक्त केलेले मत परखड; पण वास्तवाचा वेध घेणारे आहे. त्याच्या मते, ‘लागू, दाभोलकर या आडनावाची माणसे देव, धर्म, अंधश्रद्धा याची चिकित्सा करावयास बसतात, त्यावेळी इथल्या प्रतिगामी सनातन्यांना खरा हादरा बसतो. स्वत:च्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या गोटाला आतून हादरा बसल्यासारखा वाटतो. याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की, धर्मचिकित्सेची चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगे महाराजांच्या नंतर महाराष्ट्रात जवळपास थांबलेलीच आढळते. धर्म हा अनेकदा विषमता व शोषण याचा पाया असतो, याचा विसरच त्यामुळे पडत आहे. उलट धर्माभिमानी म्हणवत, धर्माला कुरवाळत त्या आधारे धर्मा-धर्मात विद्वेषाचे विखार पेरण्याचे कार्य महाराष्ट्रात पद्धतशीरपणे चालू आहे. त्या आधारे राजकारण खेळले जात आहे. अनेक कारणांनी अगतिक झालेला सामान्य माणूस या भूलथापांना बळी पडत आहे. एवढेच नव्हे, तर त्यामुळे भांबवलेल्या पुरोगामी शक्तींनाही या धर्मभावनांना आपणही फार कुरवाळू नये, असा संभ्रम पडत आहे. धर्माचा नैतिक आशय तर या सगळ्या राजकीय खेळीत कधीच लुप्त झाला आहे. यासाठी धर्मचिकित्सेचे आंदोलन महाराष्ट्रात पुन्हा उभारण्याची गरज आहे. विवेकजागराच्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यामधून धर्माबद्दल माणसे डोळस बनण्यास होणारी सुरुवात ही ज्यांचे समाजकारण, राजकारण, धर्मद्वेष आणि धर्मआंधळेपणा यावर अवलंबून आहे, त्यांना कसे रूचणार? ही मीमांसा जर सत्य असेल तर मग याचा अर्थ काय? तो असा की, दहा वर्षांच्या अखंड प्रयत्नांमधून आपली चळवळ ही आता एका योग्य आणि पुढच्या टप्प्यावर पोचली आहे. तो आहे विधायक धर्मचिकित्सा करण्याचा आणि त्या विचाराला कृतिशील बनवण्याचा पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या औरंगाबादमधील संघटना, डावे पक्ष यांच्या बैठकीत मी हा विचार मांडला आणि त्या सर्वांनी तो एकमुखाने उचलून धरला, याचे विशेष समाधान वाटते.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९६)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...