फॅसिस्टांचा
पराभव होत आहे
दाभोलकर, विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता
शुक्रवार, ता. ४ जानेवारी २००८ रोजी माझे व्याख्यान
जळगाव रोटरीने ठेवले होते. जाहीर सभा होती. त्याची तयारी उत्तम होती. त्याला जोडून
आणखी तीन महाविद्यालयांनी भाषणे ठेवली होती. मी रात्री साडेनऊ वाजता जळगावसाठी रेल्वेने
निघण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात जळगावहून फोन खणखणले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी
माझ्या भाषणावर बंदी घातली होती. भाषण घेतल्यास कारवाई करण्याची धमकी संयोजकांना दिली
होती. थोडक्यात घडले होते, ते असे : माझे भाषण जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे
काही हिंदुत्ववादी संघटना पोलीस स्टेशनला गेल्या. मी हिंदू देवतांवर टीका करणारे बोलतो, यासाठी माझ्या भाषणावर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली. दाभोलकरांच्या
भाषणात देव-देवतांवर टीका झाल्यास तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल, या संयोजकांना नेहमी दिल्या जाणाऱ्या धमकीऐवजी एक पाऊल पुढे टाकून
थेट भाषणच रद्द करण्यात आले. रोटरी क्लबची मनःपूर्वक इच्छा होती. त्यांनी सर्व ते प्रयत्न
केले. रोटरी क्लब पदाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांच्या समान मित्राकडूनही बोलणी
झाली. पण नन्नाचा पाढा कायम राहिला. शेवटी त्यांनी हे मला कळविले.
मी दोन फोन नंबर समोर ठेवले. एक गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा
व दुसरा जळगाव जिल्हा पोलीसप्रमुखांचा. मी ते आळीपाळीने लावत होतो. त्यापैकी पहिल्यांदा
जिल्हा पोलीस अधीक्षकांचा लागला. मी त्यांच्याशी जे बोललो त्याला मराठी भाषेत कानउघाडणी
म्हणतात. मी सुनावलेले मुद्दे असे :
·
पोलीस
खाते भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मला भारतीय
संविधानाने दिला आहे.
तो बजावण्यासाठी मला कोणी अडथळा आणत असल्यास त्यांचा बंदोबस्त करणे हे पोलिसांचे काम
आहे. मात्र माझ्या भाषणाबाबत पोलीस खाते नेमके उलटे वागत आहे. ही गंभीर चूक त्यांनी
सुधारावी.
·
मी
गेली तीस वर्षांत हजारो व्याख्याने दिली. शेकडो लेख लिहिले. डझनभर पुस्तके लिहिली.
त्यांना शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले. या सर्वांत मी उच्चारलेल्या वा लिहिलेल्या
एकाही शब्दाबाबत आतापर्यंत माझ्यावर एकदाही गुन्हा दाखल झालेला नाही.
·
मी
सतत भारतीय घटनेमध्ये लिहिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा
पाठपुरावा करतो आहे. माझ्या भाषणावर आक्षेप घेणारी मंडळी सतत हिंदू राष्ट्र निर्माण
करण्याची घटनाविरोधी भाषा करीत असतात.
·
तुम्ही
माझे भाषण रद्द करूच शकत नाही. मी उद्या येणार. भाषण देणार. माझ्या संघटनेची जळगाव
शाखा ते आयोजित करेल. आपण खटला भरावाच. मी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे धरून बसेन.
तुम्हाला निश्चितपणे माघार घ्यावी लागेल. तुमचा फोन आधी लागला. त्या आधी गृहमंत्र्यांचा
लागला असता तर तुम्हाला तुमच्या साहेबांच्याकडून भाषणाला परवानगी देण्याचा आदेश ऐकायला
लावला असता. साधारण दहा मिनिटे माझे सुनावणे अखंड चालू होते. पोलीस अधीक्षकांना असे
ऐकून घेण्याची सवय थोडीच असते? पण तरीही त्या दिवशी त्यांना ते ऐकावे लागलेच.
दहा मिनिटांनंतर ते मला म्हणाले, ‘डॉक्टर, एवढेच सांगा, तुमचा विषय काय आहे?’ मी उत्तरलो, ‘तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे’. ‘डॉक्टर मित्रत्वाच्या भावनेने ’- एस.पी. ‘माझा विषय ‘माझे अध्यत्मिक आकलन’ त्यात हिंदू देवदेवतांचा प्रश्न कुठे येतो?’ मी. ‘परवानगी दिली, बंदोबस्त लावतो. काहीही घडणार नाही.’ -एस. पी. - ‘धन्यवाद’.
फोनची चक्रे पुन्हा भराभरा फिरली. वृत्तपत्रात गेलेली ‘दाभोलकरांचे भाषण रद्द’ ही नोंद ‘दाभोलकरांच्या भाषणाला अखेर परवानगी’ अशी पहिल्या पानावरची बातमी बनली. महाविद्यालयातील जळगाव, भुसावळमधील सर्व व्याख्याने उत्तम झाली. सायंकाळच्या जाहीर व्याख्यानालाही
श्रोतृसमुदाय चांगला होता. भाषण पूर्ण शांततेत झाले. पुस्तकविक्री उत्तम झाली. सोलापूरच्या
भाषणानंतर या मंडळींना मिळालेला हा दुसरा धडा होता. अर्थात, त्यामुळे ते शहाणे बनतील, अशी आशा बाळगावयास नको. त्यांच्या सनातन वृत्तीत ‘शहाण’पणाची प्रभात
होणे म्हणजे सूर्याने पश्चिमेलाच उगवणे ठरावे.
माझ्या वरील उक्तीचा प्रत्यय मला माझे भाषण झाल्यावर तासाभरातच
आला. नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई) हा राज्य कार्यकारिणीचा पदाधिकारी. त्याचा फोन आला.
अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनवरून तो बोलत होता. घडले होते ते असे - आपला तरुण कार्यकर्ता
स्वप्नील तावरे हा कुर्ला रेल्वे स्टेशनवर समितीची पुस्तके व दिवाळी अंक विकणे, संपर्क नोंदविणे, याचे कार्य करत होता.
एकटाच होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागरण समिती या संघटनांचे नाव सांगणारे ४०-५० जण तेथे अचानक
गेले. पुस्तके फेकली गेली. बॅनर फाडला गेला. स्वप्नीलला धक्काबुक्की झाली. त्यालाच
धरून रिक्षात बसवण्यात आले. त्याला अंधेरी लोहमार्ग पोलीस स्टेशनला आणण्यात आले. ‘अंधश्रध्देची दुनिया, चमत्काराची किमया’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर त्रिशूलाचे
चित्र आहे. त्यावर लिंबू खोचलेले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या
आहेत, याखाली स्वप्नीलवर गुन्हा दाखल करून त्याला
ताबडतोब अटक करा, असा दबाब ते आणत होते. चोराच्या उलट्या बोंबा
म्हणतात त्या याच!
मी एन. डी. पाटील यांना फोन केला. त्यांनी तेथील पोलीस इन्स्पेक्टरला फोनवरून सुनावले
: ‘समिती जी मासिके विकत आहे, ती काही सरकारने बंदी घातलेली प्रकाशने नाहीत. तेव्हा संघटनेची
पुस्तके विकताना झालेला हस्तक्षेप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. अशा बाबतीत
तुम्ही गुन्हा दाखल केल्यास तुम्हीच अडचणीत याल.’ पोलीस उपनिरीक्षकाने
प्रक्रिया थांबवली. एफ. आय. आर. दाखल करून घेण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी
बोलवले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते. तोपर्यंत गृहमंत्र्यांच्या सचिवाशी
मी बोललो होतो. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता. वातावरण पूर्ण बदलले होते. वागणूक
चांगली मिळाली, चहा मिळाला. रात्री गोंधळ घालणाऱ्यांच्यापैकी
फक्त एकच जण सकाळी उगवला होता. त्याला पोलिसांनी स्पष्ट सुनावले की, ते खटला दाखल करणार नाहीत. त्यांना पाहिजे असल्यास व्यक्तिगत पातळीवर
काय ते करावे. संबंधिताला निमूटपणे बाहेर जावे लागले. समितीच्या पुस्तकाच्या विक्री
वेळेस आवश्यक तर पोलीस देण्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र संबंधितांच्यावर गुन्हा
दाखल करणे पोलिसांनी टाळले, ही उणीव राहिली. मात्र ज्या हिमतीने स्वप्नील
तावरे वागला आणि त्याला नंदकिशोर तळाशीलकर व राजू निरभवणे यांनी साथ दिली, त्याला दाद द्यावयासच हवी.
बोध
काय द्यावयाचा..?
आपली भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपली संघटना भारतीय घटनेतील वैज्ञानिक
दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता लोकशाही या तत्त्वाशी बांधलेली
आहे. आपण लोकांच्या धर्म व देव भावनांचा आदर करतो. कारण ही भूमिका भारतीय घटनेचीच आहे.
जे या संदर्भात आपणाला विरोध करतात,
ते हिंदू राष्ट्रधर्मनिर्मितीचे
जाहीर पुरस्कर्ते आहेत. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अजिबात मान्य नाही. लोकशाही, खुली चर्चा,
अहिंसक मार्ग याऐवजी हिंसा, ठोकशाही, कटकारस्थाने, खोटे खटले यातच त्यांना रस आहे. ही फॅसिस्ट मंडळी आहेत. ती सुधारतील, ही आशा व्यर्थ आहे. आपणच सावध, सतर्क, सजग व समर्थ राहावयास हवे. या मंडळींच्या उचापती आपल्या सहज लक्षात
येतात. त्या दृष्टीने आधीच तयारीत असावे. परस्पर संपर्क, शाखा संघटन भक्कम असावे. भूमिका आग्रही घ्यावी; पण शब्द जपून वापरावेत. प्रत्येक शाखेने एका वकिलाशी चांगला संपर्क
ठेवावा. कधीही हक्काने त्यांची मदत मिळावयास हवी. अशा गोष्टींनी आपण दुप्पट उत्साहाने
व ताकदीने कामाला लागावयास हवे. आपल्या विरोधकांच्या या उचापतीमधून समितीचा फायदाच
होतो आहे, हे त्यांच्या लक्षात येईल आणि मग आपोआपच
त्यांचे ताबूत थंडे होतील.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी २००८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा