शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

विवेकी चैतन्य लोपले



विवेकी चैतन्य लोपले
दाभोलकर, आर. ए. जागीरदार, मृत्युलेख, अनुभव, रॅशनॅलिस्ट फौंडेशन, रीझन

एखाद्या व्यक्तीचे जगणे हाच एक उत्सव असतो. त्याच्यासाठी नव्हे, तर त्याच्या सहवासात येणाऱ्या सर्वांसाठी. न्या. राघवेंद्र जागीरदार हा असा एक उत्सव होता. यावर्षीच्या २३ फेब्रुवारीला तो संपला.

जहागिरदार अंतर्बाह्य निखळ होते. एका बाजूला विचारशीलता, तत्त्वनिष्ठा होती. दुसऱ्या बाजूला शिस्तबद्ध नीटनेटके जीवन, सौंदर्यदृष्टी, जीवन जगण्याची हौस या बाबी होत्या. या दोन्हींचा मेळ घालता-घालता भल्याभल्यांची दमछाक होते. राघवेंद्र जहागिरदारांना ते सहज साधले होते. तुका म्हणे झरा। आहे मूळचाचि खरा।। याची मूर्तिमंत प्रचिती म्हणजे त्यांचे जगणे होते.

१५ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिन. तो भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणूनच ओळखला जातो. स्वातंत्र्य हेच सर्वोच्च मूल्य मानणाऱ्या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाच्या पाईकाला हाच जन्मदिवस लाभावा, हे किती अन्वयार्थक आहे. न्या. जहागिरदारांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी रॉय यांनाही (रॉय यांच्या इतर काही अनुयायांप्रमाणे) आंधळेपणाने अजिबात अनुसरले नाही. रॉय यांच्या २२ मुद्द्यां’च्या सुप्रसिद्ध प्रबोधनाबाबतही त्यांनी आपली चिकित्सक बुद्धी वापरून काही प्रश्न उपस्थित केले होते.

न्या. जहागिरदार विवेकवादी होते. देव कल्पनेला स्पष्टपणे नकार देणारे होते आणि तरीही त्यांचा पिंड हा मानवतावादी विचारांचा अधिक होता. देव आणि धर्माबाबत आम्ही तटस्थ आहोत, ही महाराष्ट्र अंनिसची भूमिका त्यांना अधिक योग्य वाटत होती. न्यायमूर्ती म्हणून निर्णय देतानाही त्यांनी कायद्याच्या कक्षेत माणुसकीच्या बाजूने झुकते माप दिले. त्यांच्यासमोर आलेल्या एका केसमध्ये बाईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:बरोबर स्वत:च्या मुलालाही घेतले, असा आरोप होता. आरोपीच्या वकिलांनी आरोपी विहिरीत पडल्यानंतर मदतीसाठी ओरडत होता (म्हणजेच त्याचा आत्महत्येचा हेतू नव्हता), असा बचाव घेतला. तो न्यायमूर्तींनी मान्य केला. त्यांचे मत असे होते की, त्या बाईला शिक्षा ठोठावणे म्हणजे तिच्या मुलाचे जगणेच पूर्ण उद्ध्वस्त करण्यासारखे होते, जे टाळणे त्यांना इष्ट वाटले.

न्या. जहागिरदारांच्या पिढीचा कालखंड हा मार्क्सवादी, समाजवाद, गांधीवाद अशा एखाद्या विचारधारेच्या आधारे जीवनातील सर्व प्रश्नांना उत्तरे मिळू शकतात, असे मांडण्याचा होता. या सर्वांपलिकडे विवेक हे तत्त्व न्यायमूर्ती महोदयांना महत्त्वाचे वाटत होते. जीवन असंवेदनशील नसावे, हाव कमी व्हावी, अंधश्रद्धांना थारा देऊ नये, विचारात कर्मठपणा नसावा, या बाबींना त्यांच्या लेखी अधिक मूल्य होते. या मूल्यांचा पाठपुरावा त्यांनी कृतिशीलपणे केला. विचारांच्या प्रसाराचे काम मनापासून केले. १९३१ ते १९४२ पर्यंतचे रीझन या मासिकाचे अंक विचारप्रचारार्थ स्कॅन करून सी.डी.च्या रूपाने लोकांना उपलब्ध करून दिले. अनेक लेख लिहिले, भाषणे दिली. विवेकवादी विचारांच्या कार्यक्रमात स्वत:हून हजेरी लावली. त्यांचे लिहिणे, बोलणे इंग्रजीत असे. खरे तर ही बाब भारदस्तपणा प्राप्त करून देणारी. पण न्यायमूर्तींनी मात्र आपणास मराठीत लिहिणे, बोलणे चांगले जमले असते, तर लोकांच्या अधिक जवळ जाता आले असते, याची खंत बाळगली. मला त्यांनी ती अनेकदा बोलून दाखवली.

लोकांत जाऊन विवेकवादाची चळवळ चालवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल त्यांना मनापासून आस्था होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला त्यांनी अंत:करणपूर्वक व सर्व प्रकारे मदत केली. समितीच्या दिवाळी अंकातील परिसंवाद प्रायोजित केले. पुस्तके प्रकाशित करण्यासाठी अर्थसहाय्य दिले. वास्तुशास्त्राच्या विरोधात दादर येथे घेतलेल्या व गाजलेल्या परिसंवादाचे अध्यक्षपद स्वीकारले. माझी महत्त्वाची एक आठवण आहे. निर्मलामातेच्या भक्तांनी समितीवर खोटा खटला दाखल केला. सातारा येथील जिल्हा न्यायालयात त्याचा निर्णय समितीच्या बाजूने लागला. हायकोर्टमध्ये अपील झाले. हायकोर्टात कोण वकील द्यावयाचा, हे आम्हाला माहीत नव्हते, परवडणारेही नव्हते. त्यावेळी वकील झालेले न्या. जहागिरदार त्यांच्या गाडीतून एका नामवंत वकिलाकडे आम्हाला घेऊन गेले. स्वाभाविकच आमचे पुढचे सर्व प्रश्न चुटकीसारखे सोपे झाले. ती केस आम्ही हायकोर्टात जिंकली.

आपण ज्या संघटनेचे भाग आहोत, त्यामध्ये तरुण नाहीत, याची खंत त्यांना सतत जाणवत असे. त्याबाबतचे एक वाक्य ते मला विनोदाने सतत ऐकवत. ते म्हणत, ‘मी अवघा ६८ वर्षांचा आहे आणि माझ्या संघटनेतला सर्वांत तरुण आहे. अखेरपर्यंत या ब्लॅक ह्यूमरमधील स्वत:ची वयोमर्यादा वाढत गेली, एवढेच. काम पुढे नेण्यासाठी स्वत:च्या उत्पन्नातूनच काही लाख रुपये बाजूला काढून त्यांनी रॅशनॅलिस्ट फौंडेशनची स्थापना केली. आपल्या हयातीत प्रामुख्याने तरुणांच्याकडे त्याची जबाबदारी सोपवली. अंनिसशी संबंधित ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी आता त्या न्यासाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. त्यामार्फत न्या. जहागिरदारांच्या लेखनाचे दोन इंग्लिश खंड देखणेपणे प्रकाशित होऊन महाराष्ट्रातील महाविद्यालयांना पोचले आहेत.
न्या. जहागिरदारांची अखेरची काही वर्षे आजारपणात गेली. तीव्र दुखण्याच्या तडाख्यातून ते वाचले. त्यांना ओळखणाऱ्यांनी गमतीने हा उपकारकर्ता हात देवाचा आहे असे सांगितले. न्या. जहागिरदारांनी मात्र यथार्थतेने याचे सारे श्रेय आपल्या नामवंत डॉक्टर पत्नी शरद जहागिरदार यांना दिले. ते सर्वार्थाने खरेही होते. त्यांच्या अखेरच्या आजारपणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संभाव्य वास्तूसाठी फार मोठी देणगीही त्यांच्यावतीने श्रीमती जहागिरदार यांच्यामार्फत मिळाली. वास्तू होईल त्यावेळी त्याच्या सभागृहास न्या. राघवेंद्र जहागिरदार यांचे नाव सन्मानपूर्वक देण्यात येईलच; पण न्यायमूर्तींच्या अस्तित्वाअभावी निर्माण होणारी पोकळी मात्र भरून निघणे कठीण. त्यांच्या स्मृतीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परिवाराचे विनम्र अभिवादन!

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल २०११)

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

कृतार्थ साधक



कृतार्थ साधक
दाभोलकर, ग. प्र. प्रधान, मृत्युलेख, अनुभव, चरित्र

अनेक वेळा प्रधान मास्तरांचा हात हातात घेऊन साने गुरुजी रुग्णालयातील त्यांच्या खोलीत त्यांच्या बाजूला मी बसत असे. अस्थिपंजर उरले होते. गात्रे पार थकली होती. अंधुक दृष्टी, चालणे अशक्य. ऐकू येणे तर कधीचेच थांबलेले. निसर्ग आपले आक्रमण करीत होता. प्रधान मास्तर अस्वस्थ, असहाय्य होते. मास्तरांना संजीवनी कशी मिळेल? एका क्षणी मनात विचार चमकला - तुमच्या अस्थीपासून वज्र बनवले तर लोकशाही समाजवादाची लढाई जिंकता येईल. असे सांगितले तर हा जराजर्जर म्हातारा ताडकन् उठून म्हणेल, ‘अजिबात वेळ लावू नका. तसे म्हणण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता. कारण जन्मभर देण्यासाठीच ती हाडे झिजत आली होती.

फकिरी मस्ती
१८ वर्षांची आमदारकीची अत्यंत यशस्वी कारकीर्द सरांनी पूर्ण केली. पुन्हा चौथ्या वेळी उभे राहिले असते तर निश्चितपणे निवडून आले असते; पण साने गुरुजींच्या साधनात काम करण्याच्या अनिवार इच्छेमुळे ते साधनात दाखल झाले. त्यांच्यामुळे साधना स्थिरावण्यास,साधना’चे रूप पालटण्यास मोठीच मदत झाली. जाणीवपूर्वक अकांचनता स्वीकारण्याची ही फकिरी मस्ती आणि स्वत:ला भिरकावून देणे, याची एक वेगळी ओढ मास्तरांना असावी. पाच वर्षांपूर्वी स्वत:चे घर सोडून ते कायमच्या मुक्कामासाठी साने गुरुजी रुग्णालयात गेले. त्यावेळी त्यांनी मृत्युपत्र करून माझ्याकडे दिले. त्यात मृत्यूनंतर स्वत:च्या खात्यावरचे साडेतीन लाख रुपये सात संस्थांना वाटण्याचा उल्लेख होता. १५ दिवसांनी माझ्याकडून मृत्युपत्र घेऊन ते फाडून टाकले. म्हणाले, ‘चांगल्या कामाला उशीर कशाला? ते पैसे संबंधित संस्थांना रवाना केले. त्यांचा चेहरा कृतार्थतेने भरून आला. याचे टोक म्हणजे आजच्या बाजारभावाने सुमारे एक कोटी रुपये किमतीचे घर सरांनी साधना ट्रस्टच्या झोळीत टाकले. मृत्यूनंतर हस्तांतर करण्याचा स्वत:चा आधीचा निर्णय त्यांनी बदलला आणि दोन वर्षांपूर्वीच घराचे उदक साधना ट्रस्टच्या हातावर सोडून ते तृप्त झाले.

लेखक मास्तर
लिहिणे, बोलणे, प्राध्यापकीचा व्यवसाय, संपादकत्व या क्षेत्रातील व्यक्तीच्या मागे विचारवंत ही पदवी सहज चिकटवली जाते. प्रधान सरांना तशी ती चिकटली होतीच; मात्र खरा विचारवंत कसा असतो आणि आपण विचारवंत कसे नाही, याची प्रधानसरांना नीट कल्पना होती आणि त्याबाबत ते अनेकदा मोकळेपणाने बोलतही असत. आणखी एक बाब त्यांना लख्खपणे माहीत होती, ‘मी भोळाभाबडा; प्रसंगी काहीसा बावळट आहे, असे लोकांना वाटते. हा त्यांचा समज कायम ठेवण्याचा फायदा समजलेला मी धूर्त माणूस आहे असे ते हसतच सांगत. आंबेडकरांवरील पुस्तक लिहून झाल्यावर त्यांनी मला मुद्दामहून बोलावले. आम्ही त्यांच्या टेबलासमोर उभे होतो. टेबलावर दोनच फोटो - एक महात्मा फुलेंचा, दुसरा महात्मा गांधींचा. पुस्तकेही दोनच - एक तुकारामगाथा व समग्र शेक्सपिअर. मला म्हणाले, आता इच्छा उरली नाही. मन तृप्त आहे. इस्टेट एवढीच आहे. वळकटी बांधून मी तयार आहे. आणि गर्रकन् मागे वळून हातातली काठी टेकत खोलीच्या बाहेर पडले. मला वाटते, साहित्य हाच प्रधानसरांचा खरा प्रांत होता. पण त्यांच्यातील कार्यकर्त्याने, त्यांच्यातील साहित्यिकावर मात केली.

...आहे मूळचाचि खरा।
      प्रापंचिक आसक्ती तोडण्याची भूमिका त्यांनी कठोरपणे स्वीकारली आणि निभावली. २००३ साली त्यांना पुणे येथे महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यात त्यांनी जाहीर केले, ‘यापुढे मी कोणत्याही समारंभात भाषण करणार नाही आणि कसलाही पुरस्कार स्वीकारणार नाही.’ लोकांची प्रचंड मागणी, प्रामाणिक इच्छा असूनही सर्व जाहीर कार्यक्रम पुढील आयुष्यात त्यांनी नाकारले. सदाशिव पेठेतील घर सोडून साने गुरुजी रुग्णालयात हडपसरला कायम मुक्कामी जाताना सर्व पुरस्कार तेथे अडगळीच्या खोलीत टाकले. मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित एक लाख रुपयांचा पुरस्कार मास्तरांनी घ्यावा, असा निवड समितीचा आग्रह होता. निवड समिती मास्तरांकडे थडकली. मास्तरांनी मोजून तीन वाक्ये उच्चारली. निर्णयाबद्दल धन्यवाद! पुरस्कार स्वीकारू शकत नाही. क्षमस्व! येण्याची उगीच तसदी घेतलीत.
      तुका म्हणे झरा। आहे मूळचाचि खरा।। या कोटीचे मास्तरांचे निखळपण होते.

मानवसन्मुख करुणा
भगवी वस्त्रे न घालता संन्यासी बनण्याचा अट्टाहास मास्तरांनी बाळगला होता. तो त्यांनी यशस्वीपणे पुरा केला. अध्यात्माचा एक पारंपरिक अर्थ आहे. आत्म्याचे अस्तित्व न मानवणाऱ्या मास्तरांचे या अध्यात्म्याशी अर्थातच काही देणे-घेणे नव्हते. मास्तरांचे अध्यात्म म्हणायचेच असेल तर वेगळे होते. लौकिक सुखापलिकडे जीवनाचे एक श्रेयस आहे आणि त्या सुखांच्या पेक्षा ते अनंतपटींनी मोलाचे आहे, याची नोनी जाण मास्तरांना झाली होती. या जीवनदृष्टीमुळे जीवनात संयम, साधेपणा, सदाचार अपरिग्रह येतो. तो त्यांना प्राप्त झाला होता. करुणेने मानवसन्मुख कृती घडते. जीवनात साक्षात् शूचिता व पावित्र्य प्रकटते, हे त्यांच्या रूपाने हाराष्ट्राने पाहिले. साने गुरुजींच्या मानसपुत्राने त्यांच्यापासून घेतलेल्या अस्तिक्य बुद्धीतून जीवनाचा हा अर्थ लावला होता. या जाणिवेतून मुक्तिपथावरील या कृतार्थ साधकाचा प्रवास झाला.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जुलै २०१०)

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

निळूभाऊ फुले : मोठा कलावंत, महान माणूस



निळूभाऊ फुले : मोठा कलावंत, महान माणूस
दाभोलकर, निळू फुले, मृत्युलेख, अनुभव

निळूभाऊंचा आणि माझा पहिला संपर्क आला तो प्रसंग मला लख्खपणे आठवतो. १९८१ साली लक्ष्मण मानेंच्या उपरा या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यावेळी मानेंचा सत्कार सातारा येथे गांधी मैदानावर जाहीरपणे करण्याचे आम्ही मित्रांनी ठरवले. एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे प्रमुख पाहुणा तसाच तोलामोलाचा हवा. मी पुण्याला येऊन अनिल अवचट यांच्याबरोबर निळूभाऊंच्या घरी गेलो. ती त्यांची व माझी पहिलीच भेट. प्रचंड जनसमुदायाला संबोधित करत असलेले डॉ. राममनोहर लोहिया यांचा फोटो त्यांच्या दिवाणखान्यात ठळकपणे लावला होता. तो मला आजही स्पष्टपणे आठवतो. कसलेही आढेवेढे न घेता निळूभाऊ येतो म्हणाले आणि ठरलेल्या वेळी माझ्या घरी दाखल झाले. कार्यक्रमाची वेळ होत आली होती. एवढ्यात पोलीस अधिकाऱ्यांचा निरोप आला. कसेही करा; पण लवकर निघा. काय झालं? मी विचारले. त्याने उत्तर दिले, ‘गर्दी फार झाली आहे. काबूत ठेवणे अशक्य झाले आहे. निळूभाऊंना घेऊन घरातून खाली उतरलो, तर घराला निळूभाऊंच्या चाहत्यांचा वेढा पडला होता. तेथून वाट काढत आम्ही मैदानावर पोचलो. मैदान तुडुंब भरले होते. प्रास्ताविक कसेबसे उरकले. प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ पत्रकार मुणगेकर. ते बोलायला उभे राहिले असता श्रोतृवर्ग त्यांचा एकही शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हता. निळूभाऊंच्या नावाचा जयघोष अखंड सुरू होता. मुणगेकरांची स्थिती अवघडल्यासारखी झाली होती. आम्हालाही काय करावे कळेना. निळूभाऊ उठले, ध्वनिक्षेपकाकडे गेले. आपल्या खास आवाजात आर्जवी; पण ठाम शब्दांत त्यांनी जनसमुदायाला बजावले, तुम्हाला मुणगेकरसाहेबांचे भाषण शांतपणे ऐकून घ्यावेच लागेल. निळूभाऊंची ती मात्रा लागू पडली. समुदाय शांत झाला आणि कार्यक्रम उत्तमपणे पार पडला.

१९९० च्या दरम्यान मी निळूभाऊंना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होण्याची विनंती केली. पदे स्वीकारणे हा निळूभाऊंचा पिंड नव्हे. त्यांनी नकार दिला; मात्र त्याचवेळी शब्द दिला की, ‘‘मी तुला दर महिन्यातील दोन दिवस देईन.’’ हा शब्द निळूभाऊंनी फार कसोशीने पाळला. प्रमुख पाहुणे निळूभाऊ आहेत, असे जाहीर झाल्यानंतर त्या कार्यक्रमाला गर्दी जमणे हा प्रश्नच राहत नसे. निळूभाऊंना चळवळीबद्दल मन:पूर्वक आस्था होती. त्यामुळे त्यांनी कधीही मानधन घेतले नाहीच; परंतु कार्यक्रमाच्या वेळी स्वत:ची निवास, प्रवास, भोजनव्यवस्था कशी असावी, याबद्दल कधीही आग्रह धरला नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीला जी मान्यता व लोकप्रियता लाभली, त्यामध्ये निळूभाऊंचा मोठा वाटा आहे. चळवळीचा कोणताही उपक्रम असला की, त्याला निळूभाऊंनी कधीही नकार दिला नाही. बुवाबाजीविरोधाचा लढा असो, देवदासीची जट सोडवणे असो, मुख्यमंत्र्यांना भेटणे असो किंवा कोकणातील शोध भुताचा : शोध मनाचा चळवळ असो, निळूभाऊ कार्यकर्त्यांसारखे वेळेवर येत असत. कोकण दौऱ्यात दापोलीला झालेली निळूभाऊंची सभाही पोलिसांच्या मते शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेपेक्षा मोठी होती. अनेक सभांमध्ये ते अभिमानाने उल्लेख करत की, मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा ढोलकीवाला आहे. रस्त्यावर खेळ सुरू करण्यापूर्वी ढोलकी वाजवली जाते. त्याचा उद्देश एवढाच असतो की, कुतुहलाने लोक जमा व्हावेत. माझ्या चेहऱ्याचा उपयोग या चळवळीचे विचार ऐकण्यासाठी लोक गोळा करायला होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. निळूभाऊ कधीही पाच ते सात मिनिटांच्यावर भाषण करत नसत. तेवढ्या वेळातही एखादा वैचारिक मुद्दा जनसमुदायापर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्याकडे तयार असे. त्यांचे वाचन उत्तम होते. सामाजिक बदल आणि राजकारण यांचे अवलोकन प्रगल्भ होते. उक्ती आणि कृती यामध्ये सुसंगती होती. त्यामुळे त्यांच्या भाषणात मुद्दा असे आणि ते श्रोत्यांना अंतर्मुखही करीत असत; मात्र ते कधीही जास्त बोलत नसत. एकच अपवाद. बार्शीला टोलेजंग सभा भरली होती. आधी माझे भाषण झाले. त्यानंतर ध्वनिक्षेपक व्यवस्था पूर्णत: कोलमडून गेली. श्रोत्यांना भाषण ऐकू गेले नाही. ध्वनिक्षेपक बदलण्यात आले. नंतर रामभाऊ नगरकर बोलले. एकपात्री नाटक सादर करणारे दमदार गडी; पण ध्वनिक्षेपकाने पुन्हा दगा दिला. समुदाय अस्वस्थ होता. निळूभाऊ बोलायला उठले. आमच्या दोघांच्या भाषणाची कसर त्या दिवशी २५ ते ३० मिनिटे बोलत त्यांनी भरून काढली. निळूभाऊंचे मी ऐकलेले ते सर्वांत मोठे भाषण होते.

निळूभाऊ महान कलाकार होते, हे सर्वज्ञात आहे. दिलीप कुमार, नसिरूद्दिन शहा यांना त्यांच्या अभिनयाचे कौतुक होते. डॉ. लागू जगातील उत्तम नटांमध्ये निळूभाऊंची गणना करीत. निळूभाऊंचा चाहता वर्ग महाराष्ट्रात अफाट पसरलेला होता. त्यामुळे काही वेळा त्यांची अवहेलना होईल, असे घडत असे; पण तेही स्थितप्रज्ञ वृत्तीने निळूभाऊ एक शब्दही न उच्चारता सहन करीत असत. एकदा अत्यंत धावपळीचा दौरा असताना रेल्वेत रात्रीच्या वेळी वातानुकूलित दुसऱ्या वर्गाचे आरक्षण मिळाले नाही. साध्या दुसऱ्या वर्गातील एका गैरसोयीचा साईड बर्थ मिळाला. त्या गर्दीच्या डब्यात निळूभाऊंना आम्ही बसवले. तेथील माणसांना वाटले की, हे चित्रपटातील शूटिंग आहे. शांतपणे बर्थवर चढले आणि निद्राधीन झाले. हे फक्त निळूभाऊच करू शकले. निळूभाऊंना व्यवहार पक्का कळत असे. माणसाची उत्तम जाण होती. खरे-खोटे समजत असे. परंतु त्यांच्यातील ऋजुता भिडस्तपणा धारण करीत असे. त्यामुळे अनेकदा निळूभाऊंना वैताग येत असे. हे सर्व ते हसत-हसत सांगत असत. कलाकारांचा आवडता चौथा अंक हा निळूभाऊंनाही प्रिय होता. दौऱ्यावर एकत्र अनेकदा असल्याने थेंबभरही घेत नसून त्या अंकाच्या वेळी मी त्यांच्याबरोबर असे. अशा वेळी निळूभाऊंच्यामध्ये राजकीय कार्यकर्ता आणि कडवा लोहियावादी उफाळून येत असे. पण महत्त्वाचे हे की चौथ्या अंकात एका शब्दानेही त्यांच्या तोंडून स्वत:ची कधी आत्मप्रौढी मी ऐकली नाही. इतर कलाकारांच्या वागण्या-बोलण्याबद्दल त्यांनी कधी ब्र उच्चारला नाही. लाखो रुपये स्वकमाईतून निळूभाऊंनी कार्यकर्त्यांना वाटले; पण त्याचा उच्चार कधी कोणाकडे केला नाही. व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची पक्की जडणघडण असल्याशिवाय हे करणे अशक्य आहे.

निळूभाऊंना आपण जीवनात काय करायचे आहे, हे नीटपणे कळले होते. त्यांनी ते जाणले असल्याने मोहात पडणारी कितीतरी निमंत्रणे आली असता त्यांनी त्याकडे सहजपणे पाठ फिरवली. आयुष्यभर समतावादी विचारांशी संगत करत ते जगत राहिले. मस्तीत राहिले, मजेत राहिले. जीवन त्यांना कळले हो या बोरकरांच्या ओळीची सार्थकता म्हणून निळूभाऊंच्या जीवनाकडे बोट दाखविता येईल. निळूभाऊ मोठे कलाकार होतेच; परंतु त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे एक महान माणूस होते.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २००९)

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

एक प्रेरणादायी वाट


एक प्रेरणादायी वाट
दाभोलकर, निधी संकलन, संघटन

यावेळी जे लिहिणार आहे, ते लिहू की लिहू नको, याबद्दल मनात वाद झालेलाच आहे. असे लिहिणे संबंधित व्यक्तीला आवडणारे नाही, याची कल्पना आहे. त्या नाराज होणार नाहीत; पण त्यांना अवघडल्यासारखे नक्की वाटेल. उगीचच लिहिले असे त्या मनातल्या मनात म्हणतील. हे सारे माहीत असूनही आणि गृहीत धरूनही मी हे लिहीत आहे. घटना अशी आहे की, दि. २६, २७, २८ जूनला चाळीसगाव येथील विभागीय संघटनात्मक शिबीर आटोपले. तीन दिवस शिबीर वगळता माझा मुक्काम सामंतांच्या घरीच होता. त्यांची पत्नी, कन्या, जावई यांच्याबरोबर बऱ्याच गप्पाही झाल्या. श्रीमती नीता सामंत शिबिरातही सहभागी होत्या. शिबीर संपवून मी मंगळवारी सातारला पोचलो. बुधवारी नीताताईंचे पत्र पोचले. सोबत एक लाखाचा चेक होता. नम्रपणे या देणगीचा उल्लेख ‘अल्पशी भेट’ असा होता. समितीचे कार्यविचार व संघटना या दृष्टीने तीन दिवस पाहावयास मिळाले व आवडले, याची नोंद होती. स्वत:ला शक्य असेल तर काही काम करणे आवडेल, असेही कळवले होते. नागेशची आठवण होते. या साऱ्याने मला गलबलून आल्यासारखे झाले.

नागेश सामंत हे चळवळीचे खंबीर आधार होते. सर्वार्थाने काही काळ समितीचे खजिनदारही होते. त्यांची मानसिकता ही आतून-बाहेरून चळवळीला जोडलेली होती. नीताताई त्याच मार्गाने जाऊ इच्छित आहेत, याचे लख्ख दर्शन त्या छोट्या पत्रातही होते. चळवळीसाठी पैसे लागतातच; विशेषत: ‘अंनिस’सारख्या संघटनेकडेही कोणतीच शासकीय ग्रँट अथवा देशी-विदेशी फंडिंग नसल्यामुळे ही गरज अधिकच तीव्र जाणवते. मी कार्यकर्त्यांना सतत हे सांगत असतो की, पैसे मागताना संकोच करणे; ही मध्यमवर्गीय चुकीच्या मानसिकतेची खूण आहे. पैसे लागतात म्हणून ते मागावयास हवेत. नाही मिळाले तरी मागावयास हवेतच. पैशावाचून अडतेच अडते आणि आवश्यक तेवढे पैसे मिळाले तर सुलभताही प्राप्त होते. मात्र माझे सांगणे एवढेच असते की, पैसे मिळतील का, या शंकेने चिंताग्रस्त होऊन कामाचे नियोजन आखडू नका. पैसे येतील, असा विश्वास बाळगा आणि झपाटून काम करा. माझा अनुभव सांगतो की, पैसे येतात आणि पुरेसे येतात; पण समजा नाहीच आले तर महात्मा गांधींच्या वाक्यावर विश्वास ठेवून कोणतेही चांगले काम कधीही पैशावाचून अडत नाही, याचाच अर्थ प्रयत्न करूनही पैसे मिळाले नाहीत, तर ते जे मिळवण्यासाठी जिवाचा आकांत करण्याऐवजी कामाची गुणवत्ता, नैतिकता वाढवण्याचा प्रयत्न करा. पैसे येतीलच. नीताताईंच्या भरघोस देणगीनंतर हे पुन्हा एकदा मनात आले; परंतु याबरोबरच आणखीही एक वेगळा विचार मनात आला.
समितीचे आजचे अर्थकारण तीन बाबींवर अवलंबून आहे. एक तर बहुतेक कार्यकर्ते स्थानिक कामासाठी जो प्रवास होतो, फोनबिल येते, ते स्वत: सोसतात. दुसरा मार्ग म्हणजे देणग्यांचा. बहुतेक वेळा त्या परिचित अथवा काही वेळा अपरिचित व्यक्तींकडून येतात. तिसरा मार्ग सर्वांत महत्त्वाचा तो म्हणजे वार्षिक अंकाच्या जाहिरातींचा. समितीच्या कार्यकर्त्यांच्यात एक वर्ग मर्यादित साधनसामग्रीवर संसार चालवणारा आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणावयाचे नाही. पण समितीमध्ये एक कार्यकर्त्यांचा वर्ग असा निश्चितपणे आहे की, ज्यांचे सर्व काही उत्तम चालू आहे. अशा व्यक्तींकडून समिती काय अपेक्षा करते? संघटनेच्या क्रियाशील कार्यकर्त्याने उत्पन्नाच्या अर्धा टक्का किंवा अडीचशे रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम संघटनेला द्यावयाची असते. बहुतेक शाखांत हे घडत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीही संघटनेला काही आर्थिक मदत बहुधा देत नाही. स्वत:च्या कुटुंबातील मंगलकार्य वा अन्य आनंदाच्या बाबी अशा प्रसंगी संघटनेला आवर्जून पैसे देणारे काहीजण आहेत; पण ते हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच. आर्थिक क्षमता असूनही मदत न करणाऱ्यांची भूमिका बहुधा अशी असावी की, संघटनेला वेळ देत आहोतच. स्थानिक प्रवास, फोन बिल हेही सोसत आहोत; मग आणखी वेगळे पैसे देण्याची गरज काय? हा विचार संघटनेच्या दृष्टीने चुकीचा व धोकादायक आहे. भारतात अनेक डाव्या व उजव्या संघटना अशा आहेत की, ज्यामधील कार्यकर्ते संघटनेने स्वत:वर सोपवलेले काम तर करतातच; परंतु शिवाय स्वत:च्या उत्पन्नातील ५ ते १० टक्क्यांपर्यंतचा भाग संघटनेला कोणताही गाजावाजा न करता देऊन टाकतात. संस्था उभ्या राहतात, त्या अशा समर्पित भावनेच्या आधारावरच. आपल्या संघटनेतील प्रत्येकाने याबाबत कळकळीने स्व-मूल्यांकन करावे, असे मला वाटते. तसे झाले तर अनेकांच्या लक्षात येईल की, मी चळवळीला दरमहा वा वार्षिक या पद्धतीने काही आर्थिक मदत देऊ शकतो. त्यामुळे बाहेरचे देणगीदार मिळवणे व दरवर्षी वाढत्या रकमेने जाहिराती मिळवणे, या ताणातून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. हे पैसे मध्यवर्तीला देण्याची अजिबातच गरज नाही. आपापल्या शाखेला, जिल्हा शाखेला वा मध्यवर्तीला जे सोयीचे त्याप्रमाणे हे पैसे देता येतील. आयकर माफीचा फायदाही मिळवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक प्रेरणादायी पाऊलवाट संघटनेत तयार होईल. नीताताईंच्या देणगीमुळे या सगळ्या विचाराला पुन्हा एकदा चालना मिळाली.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २००९)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...