परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परिषद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद




वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी, संघटन
आज समाजात वैचारिक चर्चा करण्यात कोणाला रस राहिलेला नाही; कृती तर दूरच. सर्वत्र मरगळ आली आहे. या दृढ होत चाललेल्या नेहमीच्या समजांना महाराष्ट्रातल्या शिक्षणक्षेत्राच्या वैज्ञानिक जाणिवा कृती परिषदेने जोरदार धक्का दिला. ३० जून आणि १ जुलैला लातूरला ही परिषद संपन्न झाली. महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले व्यापक प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, कार्यकर्ते यांची ओसंडून वाहणारी संख्या; या सर्वांत प्रामुख्याने वयाने तरुण असलेल्यांचा सहभाग, उदंड उत्साह, चोख व्यवस्था व शिस्त आणि कृतीचा निर्धार या सर्वच बाबी मनाची उमेद वाढविणाऱ्या होत्या.

अंधश्रद्धा निर्मूलन पुढच्या टप्प्यावर
गेले एक तपाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काहीसे यश लाभले, तशाच मर्यादाही जाणवू लागल्या. चळवळीमधील सामर्थ्य कायम ठेवून मर्यादा ओलांडण्याचा लक्षणीय प्रयत्न म्हणजे ही परिषद. विज्ञानाची करणी हरघडी वापरताना विज्ञानाची विचारसरणी मात्र दूर ठेवण्याच्या प्रवृत्तीला या परिषदेने धक्का दिला. याची सुरुवात शिक्षण क्षेत्रातून होणेही उचितच होते. खरे तर भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे सर्व नागरिकांचेच कर्तव्य सांगितले आहे. पण शिक्षण क्षेत्रात त्याचे महत्त्व अधिक. कारण शिक्षणाचा गाभाघटकातील महत्त्वाचा घटक आहे, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती. शिक्षण म्हणजे जर वर्तनबदल असेल तर त्याबाबत शिक्षण क्षेत्राने विचार देणे व कृतीचा संस्कार करणे, दोन्ही मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारांचा पैलू देखील याला पूरकच आहे. व्यवहारात मात्र आज माणसे, युवक डोळस विचारांच्या आधारे कृती करून समाजजीवन अनुकूल पद्धतीने बदलता येते, हा वैज्ञानिक दृष्टिकोनातील आत्मविश्वास गमावताना आढळतात. फलज्योतिषाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, पंतप्रधानांना आराम पडण्यासाठीचा यज्ञ, समाजधुरिणांचे चमत्कार करणाऱ्या बाबापुढचे लोटांगण, ही त्याची एक बाजू वाढता दैववाद, छद्मविज्ञानाचा प्रभाव, प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात दीर्घदृष्टीचा अभाव व विवेकहिनता ही त्याची दुसरी बाजू. देशाचे वैज्ञानिक धोरण मांडताना पंडित नेहरू यांनी Scientific temperament is spirit of a free man असे उद्गार काढले होते. ते पुन्हा कसे आणावयाचे, हा खरा प्रश्न होता. याची सुरुवात केवळ विचारमंथनातून नव्हे, तर स्वत:च्या जीवनात आग्रहाने व निर्धाराने बदलण्यापासून व्हावी. हा संकल्प सामूहिक स्वरुपात व्यक्त व्हावा, ही कल्पना शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद संयोजनामागे होती.

विचारमंथन - वैज्ञानिक दृष्टिकोन
हेमू अधिकारी, ना. य. डोळे, विकास आमटे व दत्ता देसाई यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर सखोल चर्चा घडवून आणली. त्यातील सकारात्मक भाग पुढे आणला. ही विचारपद्धती मानवाच्या अंगभूत समतेचा विचार करून उत्तरे शोधता येतात, याकडे लक्ष वेधले गेले. राखीव जागांनी शिक्षणाचा दर्जा घसरला, मुसलमानांची संख्या या देशात एकदा हिंदूंना मागे टाकेल, मोठी धरणे हेच पाणी नियोजनाचे प्रभावी उत्तर आहे, या सर्व (गैर) समजाची चिकित्सा करतानाही वैज्ञानिक विचारपद्धती वापरता येते. मात्र यासाठी खुली चर्चा व चूक स्वीकारण्याची प्रवृत्ती आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नीतीसाठी काहीच उपयोग नाही, हेही खरे नाही. मूल्यनिर्मितीसाठीही त्याचा वापर करता येतो. देवावरची श्रद्धा ही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत; पण हा दृष्टिकोन रोज प्रश्न विचारावयास शिकवते, ही प्रवृत्ती केवळ निसर्गविज्ञानात नाही, तर मानवी दैनंदिन जीवनात वाढीला लावावयास हवी. विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेला, अनुयायांनी नेत्याला, सज्जनांनी गुंडाला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावयास हवी. ही मनोवृत्ती वाढीस लागली, तरच आपण ही अवघड लढाई हरतो आहोत, असे वाटते. तिचे विजयात रूपांतर होऊ शकेल, असा प्रतिपादनाचा सूर होता.

धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, धर्मचिकित्सा
गोविंद पानसरे, पुष्पाताई भावे, डॉ. आ. ह. साळुंखे व रावसाहेब कसबे यांच्या सहभागाने रंगलेले हे चर्चासत्र परिषदेचे परमोच्च बिंदू ठरावे. माणसाने चांगला माणूस होण्यासाठी स्वत:च्या गरजा निर्माण केल्या, त्यात धर्म आहे. जगात सर्व लोकसमूह धर्म मानणारे. त्यात एक असले तरी धर्माचा विनियोग तपासावयास हवा. माणुसकीचे वर्तन करणारा धर्म मान्य करावयास हवा. शोषण करणारा धर्म नाकारावयास हवा. यासाठीच चिकित्सा हवी. धर्माचे विलक्षण सामर्थ्य हे की, त्याच्यामुळे ज्यांचे शोषण वाढते, तेच त्याच्यासाठी रक्त सांडतात. ही माणसे सश्रद्ध व अगतिक फसवली गेलेली आहेत त्यांच्याबद्दल कणवच हवी. त्यांना योग्य बाजूने आणण्यासाठी केवळ शुष्क युक्तिवाद नाही, तर हृदय त्यांच्याशी जोडावे लागेल. जे चूक असेल ते निर्भयपणे नाकारावे लागेल. याचबरोबर धर्मग्रंथ, कर्मकांड, व्रतवैकल्य या सर्वांची चिकित्सा करावी लागेल. जनसमुदायाला असेच अंधश्रद्ध ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, ते या चिकित्सेवर हिंसक हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्याचा मुकाबला शक्तीने करावा लागेल आणि भौतिक वास्तव सामान्यांना सुखकर करणाऱ्या लढ्याशी त्यासाठी जोडून घ्यावे लागेल.

उद्घाटन-समारोप
परमेश्वर नाकारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन अशक्य, ही आपली नेहमीची भूमिका उद्घाटनाच्या सत्रात डॉ. श्रीराम लागू यांनी रोखठोक मांडली. मात्र पुढच्या काही सत्रात दत्ता देसाई व पुष्पाताई भावे यांनी त्याचा समर्थ प्रतिवाद केला. धर्म, विज्ञान व समाज यातील गुंतागुंत प्रा. य. दि. फडके यांनी समर्थपणे मांडली. शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले. समारोपाच्या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा विचार अजून शिक्षण क्षेत्राच्या बाहेर अडकलेल्या लक्षावधी तरुणांपर्यंत पोचविण्याचा सल्ला प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. अतिशय छोटे; पण आशयसंपन्न बोलताना निळूभाऊ फुले यांनी वैज्ञानिक जाणिवा रूजवण्यासाठी स्वत:च्या पातळीवर यासंदर्भातील कथनी आणि करणी यातील फरक नष्ट करावा, असे आवाहन केले. निर्धाराने केलेल्या कृती कार्यक्रमाने काय घडू शकते, याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रातील विविध पुरोगामी प्रवाह या परिषदेनिमित्त एकत्र आले, याचा आनंद आवर्जून व्यक्त केला आणि हे शहाणपण पुढेही चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कृती कार्यक्रम
सर्व प्रतिनिधींना विवेकजागर ही पुस्तिका नोंदणी करताना देण्यात आली होती. त्यामध्ये पंचवीस कृती कार्यक्रम देण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा त्याला आधार होता. यापैकी काही कार्यक्रमांबाबतचे अनुभवकथनही एका सत्रात झाले. वटसावित्रीच्या व्रताचे केलेले व्यापक सर्वेक्षण, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, भानामती निर्मूलनाची धडक मोहीम, पंधरा हजारांहून अधिक गणपती दान मिळवणारी विसर्जित गणपती दान करा ही मोहीम, फलज्योतिषाला आव्हान देण्याची शास्त्रीय पद्धती, याबाबतची माहिती प्रतिनिधींना उद्बोधक वाटली. खरे तर इतर उपक्रमही अनेक आहेत. प्रश्न आहे ते निर्धाराने अमलात आणण्याचा. याबाबतही ठोस निर्णय झाले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत दीडशे महाविद्यालयांत याबाबत व्याख्याने, चर्चा घडविल्या जातील. जे विद्यार्थी, प्राध्यापक यासाठी स्वत:हून पुढे येतील त्यांचे गट करण्यात येतील, त्यांना विवेकवाहिनी समर्पक नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मान्यतेने व त्यांच्यामार्फतच चालविली जातील. त्यांना मदत, मार्गदर्शन, प्रशिक्षित करण्याचे कार्य परिषद संयोजन समिती करेल. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वैज्ञानिक जाणिवा कृतिशील करण्याच्या निर्धाराने केलेला उठाव, असे त्याचे स्वरूप असेल. याचा प्रभाव त्या-त्या महाविद्यालयातील युवकांवर व सर्वांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर पडावा, अशी अपेक्षा आहे. हा प्रभाव समाजजीवनाला डोळसपणे, विवेकाने स्वत:चे आत्मभान जागृत करून अधिक समर्थ बनवेल, कृतिशील करेल, असा विश्वास परिषदेने निर्माण केला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लातूर जिल्हा शिक्षणसंस्था चालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, लातूर.
ठराव
समाजात आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. त्यामुळे समाजापुढील खरे प्रश्न बेकारी, दारिद्र्य, विषमता, जाती निर्मूलन, धर्मांधता यांचा डोळसपणे विचार करून उपाय शोधण्यास समाज अपुरा पडत आहे. मूल्याधिष्ठित वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अंग आहे, याचा जाणीवपूर्वक उल्लेख आम्ही करत आहोत. यामुळे सामाजिक मूल्यनिर्मितीसाठीही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे आम्हाला वाटते. या विचाराचा उठाव महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात व्हावयास हवा. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने जनमानसात प्रभावी व कृतिशील बनण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही परिषद करीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)




शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद




शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ हे संयुक्तपणे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद घेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वाटचालीतील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे जाण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमास व्यापक स्वरुपात कृतीचा पाया लाभण्यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे. अशा महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती ही प्रत्यक्ष कार्यक्रमातून हल्ली महाराष्ट्रातील लोकांपर्यंत कमी पोचते. कारण हल्ली वृत्तपत्रांना जिल्हा अथवा विभागाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रव्यापी परिषदेसारखी महत्त्वाची घटनाही योग्य प्रकारे महाराष्ट्रातील वृत्तपत्रीय प्रसारमाध्यमात नोंदवली जाईलच, असे नाही.

दुसरे असेही आहे की, अशा परिषदेच्या निमित्ताने आपला विचार सर्वदूर पोचवणे व त्यासाठी त्या विचाराच्या पैलूबाबत छोट्या-मोठ्या स्वरुपात लेखन करणे ही बाबदेखील महत्त्वाची असते. असे लेखन स्वत: करणे किंवा ज्यांना लेखनक्षमता आहे, अशा समविचारी मित्रांच्याकडून किंवा पत्रकारांकडून करवून घेणे. लेखन प्रकाशित होईल, याची काळजी घेणे हे कार्य ‘अंनिस’चे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याकडून अपेक्षित आहे. या लेखनात कोणते मुद्दे यावेत, यासाठी पुढे विस्तृत नोंदी दिल्या आहेत. त्यापैकी काही मुद्द्यांचा वापर करून स्थानिक पातळीवरील छोटी-मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके यामध्ये छोटे-मोठे लेख द्यावेत. आधी संपादकांशी बोलून त्यांना अपेक्षित शब्दसंख्या विचारून घ्यावी. त्याबरोबरच लेखात त्यांना कोणत्या मुद्द्यांच्या चर्चा अधिक आवडेल, हेही विचारावे. लेख २१ अथवा २८ सप्टेंबर या दरम्यान प्रसिद्ध होण्यासाठी त्याआधी १० दिवस संपादकांना पोचावे लागतात. यासाठी माझ्या टिपणाचे वाचन होताच त्वरित कार्यवाही करावी. तसेच प्रसिद्धीला दिलेल्या लिखाणाची एक प्रत (ते कोठे प्रसिद्धीला दिले, या वृत्तपत्राच्या नावासह) माझ्याकडे पाठवावी.

लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या शैक्षणिक जाहीरनाम्यावरील लेखनासाठी महत्त्वाचे मुद्दे.

१) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभी राहिली. या टप्प्यापासून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत समितीच्या वैचारिकतेचा झालेला कृतिशील विकास समितीची प्रगल्भता स्पष्ट करते. हे टप्पे थोडक्यात पुढीलप्रमाणे.
अ) जादूटोणा, भूत, भानामती, डाकीण प्रथा, चमत्कार या सर्वांच्या विरोधात संघर्ष करणे हे समितीचे एक प्रमुख कार्य आहे. याबाबत समिती सतत संघर्षशील आहेच. जादूटोणाविरोधी कायद्याची निर्मिती व अंधश्रद्धेला प्राधान्याने बळी पडणाऱ्या महिला व अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत राज्यव्यापी परिषद व जाहीरनामा या महत्त्वाच्या बाबी आहेत.
ब) वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी समितीने अथक प्रयत्न केले आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण, त्यामार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे, सुसज्ज वाहनातून विज्ञानबोध वाहिनी आणि फिरते नभांगण यासाठीचे प्रकल्प, सर्प, पर्यावरण व वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबतची राज्यव्यापी परिषद शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद ही सर्व या वाटचालीची उदाहरणे आहेत.
क) अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पुढच्या टप्प्यावर विवेकवादाकडे वाटचाल केली. शासनाने व्यसनविरोधी समग्रनीती स्वीकारावी, यासाठी; तसेच एच.आय.व्ही.बाधित नसल्याची विवाहपूर्व चाचणी करावी, यासाठी एक लाख सह्यांचे निवेदन शासनाला दिले व राज्यव्यापी परिषद घेतली. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी राज्यव्यापी केंद्र सुरू केले व त्यामार्फत सुमारे २०० विवाह संपन्न झाले. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह समर्थन व संघटन परिषद घेतली.
ड) शिक्षण क्षेत्रात मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद चालू व्हावा म्हणून सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता याची शैक्षणिक सनद तयार केली.
इ) वरील सर्व वाटचालीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा ता. २३ व २४ फेबु्रवारीला राज्यव्यापी चर्चासत्रात तयार करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ यांच्या सहकार्याने हा जाहीरनामा स्वीकृती परिषद ता. २७, २८ सप्टेंबर रोजी जळगावला होते आहे. या स्वरुपाचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील हा पहिला प्रयत्न आहे.

२) संघटनात्मक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मांडणी कालसुसंगत व समाजाला पुढे नेणारी आहे. याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्राचे शिक्षण खाते, वनखाते, सामाजिक वनीकरण संचालनालय, पर्यावरण खाते अशा अनेक शासकीय यंत्रणांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर आनंदाने सहयोग केला. ही बाब देखील समिती मांडत असलेल्या विचाराला मान्यता दाखवते.
३) हा जाहीरनामा ज्या गृहितकावर तयार केला आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूल्यांना व्यापक प्रमाणावर अधिमान्यता आहे. ती खालीलप्रमाणे-
अ) भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी व मानवतावाद यांची जोपासना करणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे.
ब) शिक्षणाच्या गाभाघटकात महत्त्वाचा गाभाघटक म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश आहे. याबरोबरच मूल्यशिक्षणातही त्याचा अंतर्भाव आहे.
क) महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी हाच विचार प्रभावीपणे मांडला आहे, व्यक्तिगत जीवनात आचरला आहे व सामाजिक जीवनात पुरस्कारला आहे.
ड) महाराष्ट्रातील बहुसंख्य शिक्षण संस्था आज महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवतात. महाराष्ट्रातील विद्यापीठांना संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांची नावे देण्यात आली आहेत, हे लक्षणीय आहे आणि या दोन्ही संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.

४) भारतीय घटनेने व्यक्तीला धर्मपालनाचे व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. या मूलभूत स्वातंत्र्याचा पूर्ण आदर करून वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याचा विचार पसरवता येतो. याबरोबरच हेही लक्षात घ्यावयास हवे की, सामाजिक हितासाठी धर्मचिकित्सा करणे हे देखील संविधानास अभिप्रेत आहे. अशी धर्मचिकित्सा समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख करते, परमेश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री करते. त्यामधून धर्मनिरपेक्षतेचा विचार अधिक प्रगल्भ बनतो. यामुळे जाहीरनाम्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा गाभा रूजवला जाईल.

जाहीरनामा अंमलबजावणीत अपेक्षित असलेल्या बाबी
१) शाळेचे प्रार्थना, परिपाठ यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, अंधश्रद्धा निर्मूलन यांचा संदेश देणाऱ्या गीतांचा, वचनांचा समावेश करावा.

२) आजही ग्रामीण महाराष्ट्रात जादूटोणा, भूत, भानामती, मंत्र-तंत्र, मूठ मारणे, चेटूक या स्वरूपाच्या अनेक अनिष्ट व अघोरी बाबी सुरू असतात. त्याबाबत विद्यार्थीमनात एक गूढता व संदिग्धता आढळते. अशा सर्व बाबी स्पष्टपणे व धैर्याने नाकारण्याचे विद्यार्थीमानस घडवावयास हवे. आजची पिढी अशी घडल्यास उद्याच्या समाजातील अंधश्रद्धा कमी होतील. महाराष्ट्र शासनाच्या संकल्पित जादूटोणाविरोधी कायदा हे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे या कार्याला थोडी अनुकुलताही प्राप्त झाली आहे.

३) समाजात सर्व प्रकारची धार्मिक कर्मकांडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, वाढवली जात आहेत. समाजाच्या धार्मिक मानसिकतेला नैतिकतेकडे नेण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. याउलट सध्या सर्वच धर्मवादी शक्ती ही धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा खटाटोप राजकारणासाठी करत आहेत. अशा वेळी कालबाह्य रूढी, परंपरा याबाबतीत विधायक पर्याय देण्याची गरज आहे. असे प्रयत्न काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रात आज चालू आहेत. त्याला व्यापक पाठबळ जाहीरनामा व त्याची अंमलबजावणी यामुळे लाभेल. महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण करतात. याला पर्याय म्हणून मातीच्या अथवा कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार करून त्या वनस्पती रंगाने रंगवल्या व विसर्जन घरोघरी केले तर संपूर्ण परिस्थिती बदलते. लाकूड जाळणाऱ्या होळीला दुर्गुणांच्या होळीचा अभिनव पर्याय देता येतो.

४) केवळ विज्ञान विषयच नव्हे, तर शिक्षणातील सर्व विषय यामधून वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी पद्धतीने देता येतो, कृतिशील करता येतो. शिक्षकांचे सक्षमीकरण त्यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून मिळवून हे करता येते. याचे प्रयोग भारत ज्ञान-विज्ञान समुदायाने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत सिद्ध केले आहेत. शाळेत आलेले सुतार, सायकल दुरुस्तीवाले, शेतकरी या व्यवसायातले पालकही एक कृतिशील वैज्ञानिक दृष्टिकोन देतात व तो उपयुक्त ठरतो. या प्रयोगांचे अनुकरण व सार्वत्रिकीकरण व्हावयास हवे.

५) अवैज्ञानिक आत्मघातकी जीवनशैली आज विद्यार्थ्यांना सतत खुणावते व बाजारी व्यवस्थेने त्यांच्यावर लादलीही जाते. व्यसनाची ओढ, फास्टफूडचे सेवन, व्यायाम व वाचनाचा अभाव, यामुळे संपूर्ण जीवनशैलीच अशास्त्रीय बनते व आजारी पडते. दुसरीकडे ग्रीन हाऊस परिणामासारख्या बाबी पृथ्वीची मृत्युघंटा वाजवत आहेत. ही बाब शास्त्रीयपणे सर्वमान्य झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला संपूर्णपणे मानव जबाबदार आहे. २०३६ पर्यंत ग्रीन हाऊस वायूचे प्रमाण इतके वाढेल की, त्यामुळे संपूर्ण जगाचे भीषण व अपरिवर्तनीय नुकसान होईल, असे मानले जात आहे. काही मान्यवर तज्ज्ञ हे साल २०१२ असेच सांगतात. हा आघात सोसावा लागू नये म्हणून अनेकविध उपाययोजना व यंत्रणा आज कार्यरत आहेत. परंतु गाभ्याचा मुद्दा असा आहे की, वाढलेल्या ग्रीन हाऊस वायूचा संबंध सरळसरळ आजच्या चंगळवादी जीवनशैलीशी आहे. वातानुकूलित व्यवस्था, दिव्यांचा झगमगाट, असंख्य मोटारी, गगनचुंबी इमारती व जीवनशैलीला प्रगती मानणारा आणि त्या चंगळवादात बुडालेला वर्ग आज समाजनियंत्रण करतो आहे. हा वर्ग प्रभावी व संघटित आहे आणि या चंगळवादी जीवनशैलीचे गारूड त्याने भारतातील नव्हे, तर जगातील फार मोठ्या वंचित समूहावर घातले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने म्हणजेच विवेकवादाने जगत असताना पर्यायी जीवनशैलीची सामाजिक गरज निर्माण करणारी मानसिकताही तयार करावी लागेल. जसे खाजगी मोटारीऐवजी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अत्यावश्यकतेशिवाय वातानुकूलित व्यवस्थेला नकार इत्यादी. हा विचार एक संस्कार म्हणून शिक्षणात रूजवला जावयास हवा.

६) भारतीय संदर्भात एका विशिष्ट महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख अपरिहार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार केला तर जन्मजात लाभणाऱ्या जातीप्रमाणे व्यक्तीला उच्च-नीच मानले जाते व त्याप्रमाणे व्यवहार करणे, ही निखालस अंधश्रद्धाच आहे. सर्व व्यक्तींची जन्मजात प्रतिष्ठा सारखी आहे हा संस्कार करावयास हवा. अर्थात, भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाची जी कल्पना आहे, तिला पाठिंबा देणे व जातीला अंधश्रद्धा मानणे या परस्परपूरक बाबी आहेत, याचे भान हवे.

शैक्षणिक जाहीरनामा अंमलबजावणी
वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन याच्या शैक्षणिक जाहीरनाम्याचा वरील विस्तृत आशय पाहता हे कार्य संस्थांच्याकडून कसे पार पडेल, अशी एक आशंका येऊ शकते. त्याबाबत पुढील वस्तुस्थिती ध्यानात घ्यावयास हवी.

१) नव्या मूल्यजाणिवा रूजविण्याचे कार्य हे कोणत्याही देशात नेहमीच शिक्षण क्षेत्राचे मानले जाते. यामुळे ते स्वीकारणे हे शिक्षण व्यवस्थेने स्वत:चे कर्तव्य मानावयास हवे. भारतीय संविधानाची; तसेच शैक्षणिक धोरणाची शिक्षण क्षेत्राकडून हीच अपेक्षा आहे.

२) संपूर्ण शिक्षण क्षेत्राने या स्वरुपाचा निर्णय घेणे व राबवणे हे शासनावर अवलंबून असेल; परंतु महाराष्ट्रातील ज्या शिक्षण संस्था मनापासून शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हा वारसा मानतात, त्यांनी स्वत:च्या शिक्षण संस्थेच्या पातळीवर या जाहीरनाम्याची अंमलबजावणी आग्रहपूर्वक करावी, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे १५० शिक्षण संस्थांनी या जाहीरनाम्यास लेखी मान्यता कळवली आहे. या शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालये यांची संख्या याहीपेक्षा बरीच जास्त आहे. या सर्व शाळा, महाविद्यालयात जाहीरनाम्याची अंमलबजावणी सुरू झाल्यास ते इतर संस्थांना नक्कीच पथदर्शक ठरू शकेल.

३) हा जाहीरनामा स्वीकारणाऱ्या संस्थांमधील अंमलबजावणी दोन टप्प्यात असेल -
अ) याबाबतच्या जाणीवजागृतीत मनापासून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांचे प्रशिक्षण घेतले जाईल.
ब) त्यांच्या मार्फत प्रामुख्याने विद्यार्थ्यांत; तसेच सहकारी प्राध्यापकांत हा विचार रुजवणारे प्रबोधन व कृती कार्यक्रम घेतले जातील. याचा आराखडा गेल्या २० वर्षांच्या वाटचालीतून समितीकडे आहे.

४) शिक्षकाने हे कार्य कोणतेही जादा काम या भावनेने करू नये आणि तसे ते त्याला करावे लागणारही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने स्वत: अधिक आधुनिक, यशस्वी व नैतिक व्यक्ती बनण्याचा आनंददायी प्रयत्न व त्याला सामूहिक रूप देणे, असे या कामाचे स्वरूप आहे.

५) शाळा अथवा महाविद्यालयात विचार प्रसार करणारे हे गट विवेकवाहिनी या नावाने कार्यरत होऊ शकतील. विवेकी स्वयंविकासाची ही प्रक्रिया विवेकवाहिनी या नावाने चालवण्यात महाराष्ट्राच्या उच्चशिक्षण संचालनालयाची मान्यता आहे. शालेय पातळीवर ती मिळू शकेल व त्यामुळे एक अधिकृतता लाभू शकेल.

६) जाहीरनामा अंमलबजावणी करताना प्रधान कार्य योग्य विचार करावयास शिकवणे आणि त्या विचाराचा जाहीर प्रसार करणे, हे राहील. शक्य तेवढा आचार करावा हे अभिप्रेत आहेच; परंतु प्रत्यक्ष संघर्ष हा अभिप्रेत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१२)




शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

सांस्कृतिक वर्चस्वाचे हत्यार



सांस्कृतिक वर्चस्वाचे हत्यार

दाभोलकर, गंगाखेड, यज्ञसंस्कृती, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. लागू, परिषद
गंगाखेड (जि. परभणी) येथे यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषद घेण्याचे समितीने ठरवले. त्याचवेळी लक्षात आले होते की, आपण कितीही समंजस भूमिका घेतली, तरी प्रक्षोभकता निर्माण केली जाणार आहे. अर्थातच चोखपणे; पण शांततेने त्याला उत्तर देण्याचे ठरवूनच परिषद जाहीर झाली. परिषदेला सुरुवातीपासून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे परिषदेच्या पहिल्या निवेदनापासून परिषदेचा हेतू स्वच्छपणे लोकांच्यासमोर आला. याबाबतचे ते निवेदन पुढीलप्रमाणे होते.
यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषद
महाराष्ट्रात अलिकडील काळात यज्ञसंस्कृती वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटते. चार महिन्यांपूर्वी नागपूरला मोठा अग्निस्तोम वाजपेय यज्ञ झाला. अलिकडेच नांदेडला अश्वमेघ थाटात पार पडला. गंगाखेड (जि. परभणी) येथे तर सध्या सोमयाग महायज्ञ २८ मार्च १९९९ ते २८ मार्च २००० पर्यंत असा ३६६ दिवस चालणार आहे. अशा प्रकारचा महायज्ञ महाभारत काळानंतर प्रथमच होत असल्याचा संयोजकांचा दावा आहे. या सर्वांमागे एका बाजूला उच्चविद्याविभूषित समाज आहे, तर दुसरीकडे कष्टकरी बहुजनांनादेखील त्याची भुरळ पडू लागली आहे. यामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराची व कार्याची पीछेहाट होईल, असे समितीला वाटते.
या संदर्भात जनजागृतीसाठी महाराष्ट्र पातळीवर यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषद ८ जुलै रोजी गंगाखेड येथे समितीने आयोजित केली आहे. यज्ञ हे धर्माचे प्राथमिक अवस्थेतील रूप आहे. यातू कल्पनांवर आधारित असे कर्मकांड आहे; नैतिकतेवर आधारलेल्या उन्नत धर्माचे हे रूप नाही. त्यामुळे यज्ञयागाच्या वातावरणातून समाजाचे पाऊल पुढे पडण्याच्या दृष्टीने वाटचाल होत नाही, असे समितीचे मत आहे.
घटनेत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी यज्ञाचे स्वरूप विसंगत आहे. यज्ञामुळे पर्जन्यवृष्टी होते, संतती प्राप्त होते, पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यावर मुलगाच होतो, हे सर्व अशास्त्रीय आहे. यज्ञात होणारी अन्नधान्याची नासाडी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. देशातील चाळीस टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जगत असताना, असेलच तर त्या गोरगरिबांना अन्न देणे हाच श्रेष्ठ अन्नयज्ञ ठरेल. नांदेड येथील अश्वमेघ यज्ञास १४ हजार किलो तूप, ८० क्विंटल तेल, ८० क्विंटल साखर, १० क्विंटल तांदूळ, ५० किलो मध यांची आहुती देण्यात आली.

शोषणव्यवस्थेच्या प्रतीकांना आपल्या देशातील विषम व्यवस्थेने पावित्र्य बहाल केले आहे, त्यामुळे शोषणव्यवस्थेचे वर्चस्व टिकवण्यास मदत होते. प्रतीकात शोषण नसले, तरी ती व्यवस्था त्या प्रतीकातून जपली जाते. स्त्रियांना, शूद्रांना यज्ञ कर्मकांडात समान अधिकार नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
भारतात प्रस्थापितांच्या विरोधात ज्या चळवळी झाल्या, त्या सर्वांनी यज्ञसंस्कृती नाकारली. उपनिषदांनी यज्ञाला फुटक्या नावा म्हटले आहे. महावीर, गौतम बुद्ध यांनी यज्ञ कटाक्षाने नाकारले. बौद्ध धर्माची पीछेहाट भारतातच झाल्यावर त्या यज्ञसंस्कृतीने पुन्हा उचल खाल्ली, हा इतिहास आहे. संतांचा भक्तिमार्ग हा यज्ञ-यागातील बंदिस्त चाकोरी नाकारण्यासाठी दिलेला पर्याय आहे. विठ्ठलाचे नाव हाच जपयज्ञ मानण्यात आला. नाव यज्ञाचे ठेवले; पण आशय बदलला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असे वाटते की, माणसाने विवेकाने, निर्भयतेने जगावे. त्यासाठी ही परिषद आहे. परिषदेस ज्येष्ठ विचारवंत व संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे, सातारा व डॉ. रुपा कुलकर्णी, नागपूर यांच्यासह डॉ. श्रीराम लागू उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने श्री. साळुंखे यांचे या विषयावरील लेखनही प्रसिद्ध होणार आहे. परिषदेनंतर त्याच दिवशी रात्री नांदेड येथेही याच विषयावर जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या स्वरुपाच्या परिषदा यानंतर कोल्हापूर व नागपूर येथे घेण्यात येतील.
परभणी जिल्ह्यात समितीचे काम चालू झाले, त्याला वर्षच झाले. उत्साह व उपक्रम यांचे प्रमाण चांगले असले तरी संघटन नवीन आहे. त्यामुळे मोठी परिषद कशी यशस्वी होईल, याबद्दल मी काहीसा साशंक होतो. परंतु आनंदाची व अभिमानाची गोष्ट ही की, गंगाखेड शाखेने अतिशय मेहनतीने परिषद यशस्वी केली. तेथील शाखेचे अध्यक्ष श्री. विलास जंगले यांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. खर्च तर त्यांनी एकहाती केला. संयोजनासाठी २०-२५ तरुण कार्यकर्ते राबत होते आणि जंगले यांचे घरच परिषदेचे कार्यालय झाले होते. घरच्या सर्व कुटुंबीय मंडळींचा सहभागही वाखाणण्यासारखा होता. या सर्व धडपडीला परभणीहून डॉ. मावळगे, प्रा. मोडक, पुण्याहून अशोक एंगडे, लातूरहून माधव बावगे यांची सतत मदत होते. परस्पर विचारविनिमयातून एकत्रितपणे होणारा हा कामाचा उठाव संघटना व चळवळीला नेहमीच पुढे नेणारा ठरतो.
परिषदेचे उद्घाटन
८ जुलैला सकाळी ११.३० वाजता आम्ही गंगाखेडमधील परिषदस्थळी गेलो. गावातील तो एकमेव बंदिस्त मोठा हॉल आहे. स्टेज उत्तम प्रकारे सजवलेले होते. हॉल संपूर्णपणे खचाखच भरलेला होता. हॉलच्या वरील बाल्कनीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विलास जंगले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर उद्घाटक डॉ. आ. ह. साळुंखे व्याख्यानाला उठले. त्यांचे भाषण सुरू होत असताना काही लोक क्रमाक्रमाने उठून परिषदस्थळातून बाहेर पडले. त्यांची संख्या फार नव्हती; परंतु त्यामुळे थोडी गैरशिस्त निर्माण झाली. नंतर आम्हाला समजले की, काही यज्ञसमर्थक मंडळी याच हेतूने येऊन सुरुवातीपासून जागा अडवून बसली होती. आणखी एक अडचण निर्माण झाली. प्रेक्षकांच्यात सारखी कुजबूज ऐकू येत होती. साळुंखेंच्यासारख्या कसलेल्या वक्त्यालाही त्यामुळे सभेवर पकड घेणे अडचणीचे जात होते. याचे कारण थोड्या वेळाने स्पष्ट झाले. एका श्रोत्याने उभे राहून ऐकू येत नसल्याची तक्रार केली. दुसऱ्या श्रोत्याने त्याला दुजोरा देताना असे सांगितले की, आवाज ऐकू येत आहे. परंतु अर्थबोध न होणाऱ्या स्वरुपात तो ध्वनी पोचत आहे. परिषदेच्या हॉलमध्ये हा दोष आहे, याची कल्पना संयोजकांना होती. त्यांनी तो दोष काढण्याचा परिश्रमपूर्वक प्रयत्नही केला होता. तरीही काही प्रमाणात दोष राहिला असावा. पुन्हा थोडी धावाधाव झाली. ध्वनिक्षेपकांच्या, कर्ण्यांच्या दिशा बदलण्यात आल्या आणि मग मात्र आवाज नीट पोचू लागला. त्यानंतरचे डॉ. साळुंखेंचे भाषण अत्यंत व्यवस्थितपणे लोकांना पोचले व पटलेदेखील.
डॉ. साळुंखे यांनी केलेले प्रतिपादन थोडक्यात असे - यज्ञ हे वैदिक संस्कृतीचे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक कर्मकांड आहे. ते सकामच असते व त्यामध्ये तूप-मांस अग्नीमध्ये समंत्र अर्पण करावे लागतात. अवैदिकांची पूजा ही यापेक्षा पूर्णपणे वेगळी व अत्यंत सोपी आहे. भारतीय समाजावर यज्ञसंस्थेने फार मोठा प्रभाव गाजवला, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सामाजिक इतिहास समजण्यासाठी यज्ञसंस्थेचा अभ्यास आवश्यक आहे; परंतु त्याचे पुनरुज्जीवन अत्यंत चूक आहे. कारण काळाच्या ओघात यज्ञ हे प्रस्थापितांच्या स्वार्थी हितसंबंधांचे रक्षण व पोषण करण्याचे साधन बनवले गेले. त्यामुळे भारतीय समाजासमोर आजच्या परिस्थितीत दोन वाटा आहेत. एक तर यज्ञयाग करणे आणि दुसरा दु:खी, कष्टी लोकांना जवळ करून त्यांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करणे. यज्ञाच्या विरोधात उपनिषदांत असलेल्या टीकेचा साळुंखे यांनी तपशीलवार परामर्ष घेतला. गीता, ज्ञानेश्वर, तुकाराम या सर्वांनी सकाम कर्म; तसेच यज्ञयागाच्या बाबत काय लिहिले आहे ते सांगितले. यज्ञाच्या विरोधातील कारणेही त्यांनी स्पष्ट केली. एकेकाळी यज्ञात प्रचंड हिंसा केली जात असे. यज्ञ हे अत्यंत गुंतागुंतीचे, किचकट, खर्चिक आणि अगदी मोजक्या लोकांची मक्तेदारी बनलेले कर्मकांड आहे, असे सांगून यज्ञकर्मात शूद्रांना व स्त्रियांना कसे दुय्यमत्व दिले आहे, याचा परामर्ष साळुंखे यांनी घेतला. यज्ञातील अवैज्ञानिकता स्पष्ट करून यज्ञ हे सांस्कृतिक वर्चस्वाचे हत्यार म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट केले. खरा धर्म शुद्ध आचारात, निष्कपट भावनेत व सर्वांना प्रेमाने जवळ करण्यात असतो, हे आवर्जून सांगितले.

त्यानंतर मी बोललो. यज्ञ ही यातुक्रिया असल्याचे मी सोदाहरण सांगितले. समाजात कर्मकांड वाढवण्याचा सतत व जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे, त्याचा तपशीलवार आढावा घेतला. यामागील राजकारण लक्षात घेण्याची गरज प्रतिपादन केली. श्रद्धांचे जाणीवपूर्वक व्यापारीकरण, विकृतीकरण केले जात आहे, असे सांगून त्याची मांडणी केली.
प्रस्ताव व त्यावरील भाषणे
डॉ. साळुंखे व दाभोलकर यांच्या भाषणानंतर परिषदेसमोर प्रस्ताव मांडण्यात आला. तो पुढीलप्रमाणे -
यज्ञसंस्कृती व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषदेचा प्रस्ताव
यज्ञ कालबाह्य झाले, असे वाटत असतानाच अलिकडच्या काळात यज्ञ-संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. यज्ञ ज्या संस्कृतीचा पुरस्कार करतो, ती अनेक अंगांनी विषमतावादी आहे. समाजाच्या सर्व घटकांना समतेचा अधिकार देऊन बरोबर घेऊन जाणारी नाही, अशा संकुचित परंपरेची प्रतीके नाकारली तर पाहिजेतच; परंतु त्यांचा जाणीवपूर्वक उदो-उदो करण्यामागे कोणत्या सामाजिक शक्ती आहेत, याचाही विचार करावयास हवा. भारतीय इतिहासात यज्ञ-यागासारख्या कर्मकांडाचे जेव्हा-जेव्हा पुनरुज्जीवन करण्यात आले, तेव्हा-तेव्हा सर्वसामान्य लोकांचे शोषण वाढले आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.
यज्ञ अवैज्ञानिक आहेत. अन्नधान्यांची प्रचंड नासाडी करणारे आहेत, हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. या सर्वांमुळेच चार्वाक, जैन, बौद्ध, गीता, संत यांनी यज्ञयाग नाकारले आहेत. सर्वांनी याचा गंभीर विचार करावा आणि धर्माच्या कर्मकांडात न अडकता विवेकाचा, माणुसकीचा वसा घ्यावा, असे कळकळीचे आवाहनही परिषद करीत आहे.
यज्ञ या ठरावावर भाषणे झाली. त्यामध्ये गंगाखेडच्या प्रा. कीर्तिकुमार मोरे यांनी यज्ञ ही मागासलेल्या समाजाची संस्कृती आहे, अशी मांडणी केली. डॉ. मोहन मावळगे हे परभणी शाखेचे अध्यक्ष आहेत. यज्ञ सुरू झाल्यावर ते संयोजकांना भेटले होते. त्यावेळी संयोजकांनी या यज्ञामुळे विश्वशांती होईल. गंगाखेड भागातील लोकांचे आरोग्य सुधारेल, गुन्हेगारी कमी होईल, ही यज्ञाची फलिते असल्याचे सांगितले. यापैकी प्रत्येक बाबीला वस्तुस्थितीच्या आधारे त्यांनी सडेतोड आक्षेप घेतले. प्रा. अनिलकुमार शिंगारे यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून बहुजनाला न्याय मिळण्याची शक्यता आली आहे. ती जागृती दडपण्यासाठी कर्मकांडप्रधान संस्कृती आणली जात आहे, असा आक्षेप घेतला. समाजात पुरोहिताला प्रतिष्ठा आहे; श्रमाला नाही, हे नजरेला आणून दिले.
डॉ. लागूंचे विवेचन
डॉ. लागू यांनी यज्ञसंस्कृतीला गेली काही हजार वर्षे धक्के बसूनही ती का गेली नाही, याचा विचार करण्याचे आवाहन केले. मानवी संस्कृतीच्या विकासक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. निसर्गातील घटना न समजणाऱ्या, कळप करून राहणाऱ्या, संस्कृतीचा गंध नसलेल्या माणसाला अग्नीचा शोध लागला. त्यामुळे हिंस्त्र श्वापदे दूर गेली. त्यातून अग्नी सतत प्रज्वलित ठेवला तर स्वत:चे रक्षण होईल, असे त्याला वाटले. अन्न शिजवून मिळणे हा अग्नीचा उपयोग समजला आणि यज्ञसंस्कृतीचा उदय झाला. आरंभीच्या ऋग्वेदाच्या काळात यज्ञ समाजाच्या मागणीसाठी होते. समाजाला आरोग्य, धन मागितले जात होते; पण यजुर्वेदाच्या काळात यजमान निर्माण झाला. नंतर पुरोहितशाही आली आणि त्यांनी फक्त यजमानासाठी मागण्या सुरू केल्या. म्हणून यज्ञ नाकारण्यासाठी परमेश्वराधिष्ठित धर्म ही कल्पनाच नाकारावयास नको का, असा सवाल डॉ. लागू यांनी केला. सर्व धर्म विज्ञानपूर्व म्हणून ते रद्द करावयास हवेतच व संपूर्ण मानवजातीला कवेत घेणाऱ्या एका नव्या मानवधर्माची निर्मिती करावयास हवी, तरच यज्ञसंस्कृती खऱ्या अर्थाने दूर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांचे आक्षेप
परिषद चालू असताना परिषदेच्या विरोधात गावात एक मोर्चा निघाला. वारकरी आषाढी वारीसाठी निघालेले होते. त्यातील ज्या दिंड्यांचा मुक्काम त्या दिवशी गंगाखेड येथे होता, त्यांना हाताशी धरून मोर्चाची संख्याही वाढवण्यात आली. त्यानिमित्ताने दोन पत्रके वाटण्यात आली. त्यातील सारांश या लेखात इतरत्र छापला आहे.
परिषद संपवून आम्ही विलास जंगले यांच्याकडे आलो तर पत्रकार वाटच पाहत होते. डॉ. साळुंखे, मी व पत्रकार यांची बरीच चर्चा झाली. त्यामध्ये आलेले मुद्दे थोडक्यात असे - यज्ञाबाबत तो करणाऱ्यांनी दुसरी बाजू समाजासमोर आणल्यास आम्ही त्याचे स्वागत करतो. सत्याचा शोध जरूर घ्यावा. परंतु तो वस्तुनिष्ठ असावा; व्यक्तिनिष्ठ नको.
एका यज्ञाने काय बिघडते? चातुर्वर्ण्य लगेच परत येतो का? हा प्रश्न गैरलागू आहे. कारण मग एका परिषदेने तरी काय बिघडते, असा प्रतिप्रश्न करता येऊ शकतो. यज्ञ हे शोषकांना गुलामगिरीत ठेवणाऱ्या संस्कृतीच्या शोषणाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याबाबत लोकांना सावध करणे आवश्यक आहे.
यज्ञात वारकरी व बहुजन समाज सहभागी होतो, हे खरे; पण मग तो यज्ञ यज्ञच ठरत नाही. कारण शूद्रांना यज्ञाचा अधिकार नाही व सध्याच्या कलियुगात सर्व ब्राह्मणेतर शूद्र आहेत. यावर कोणी असे म्हणेल की, आम्ही यज्ञधर्म परिष्कृत करून घेतला आहे. मात्र यज्ञ धर्मशास्त्राला हे अजिबात मान्य नाही आणि तसे परिष्करण करावयाचेच असल्यास मग पूर्ण मूल्यांकनच का करू नये?

बहुजन समाजाला या गोष्टी हिताच्या नाहीत; पण चुकीच्या भुलभुलैय्यातून ते यामध्ये अडकतात. बहुजनांची ताकद अफाट आहे; परंतु त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी साधनसामग्री फारच तोकडी आहे.
गंगाखेड येथील यज्ञात वर्षभरात जो अमाप खर्च होणार आहे, तेवढ्या रकमेत गंगाखेड येथे आरोग्य, वाचन, स्वच्छता याबाबत केवढे तरी कार्य घडू शकेल. त्यालाच यज्ञ समजणे हिताचे आहे.
परिषद संपली. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून समितीच्या विरोधात ध्वनिक्षेपकासह रिक्षा फिरवून सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये वर पत्रकाद्वारे व्यक्त केलेल्या विचारांची उजळणी झालीच. त्याबरोबरच समितीच्या विरोधात आणखी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. प्राचीन गोष्टींच्या जतनासाठी आधुनिक विज्ञानाला कसे वेठीला धरले जाते, त्याचा तो चांगला नमुना आहे. तो पुढीलप्रमाणे -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रचार... म्हणजे कावळ्यांची कावकाव!
देव, धर्मशास्त्र, आत्मा, पुनर्जन्म, परलोक, यमलोक, स्वर्ग-नरक, मंत्रफळ, पापपुण्य आदी अतींद्रिय गोष्टींवर विश्वास असणे ही अंधश्रद्धा होय. ती बाळगणे हे अवैज्ञानिक आहे. ती बाळगली तर या जगाचे वाटोळे होईल, या चिंतेने अहोरात्र अस्वस्थ होऊन.... ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती.... त्या विरुद्ध प्रचाराचे विधायक सत्कार्य (?) करीत आहे. हे सत्कार्य ऐकायला, पाहायला जनता हजारोंच्या संख्येंने जमावी म्हणून ही समिती तोंडाला रंग फासून जन्मभर करमणुकीचा व्यवसाय करणाऱ्या नाच्यांचा उपयोग करून घेऊन अत्याधुनिक प्रचारतंत्राने प्रचारकार्य करीत आहे. थोड्याच कालावधीत ही अंधश्रद्धा समूळ निर्मूलन होईल आणि आजचे वाटोळे जग सरळ आणि सपाट होईल. या जगाचे, तुमचे, आमचे, सर्वांचे कल्याण होईल! पण.... लोकहो.... पऽऽऽण!
विज्ञानाच्या कक्षा आता फार मोठ्या झाल्या आहेत. मानसशास्त्र, परामानसशास्त्र, विचारसंक्रमण, इंगितज्ञान, मनाची कारकशक्ती, अतींद्रिय वस्तुस्पर्श, अतींद्रिय वस्तुज्ञान, दूरदर्शन आत्मा, पुनर्जन्म, परलोकास्तित्व, पिशाच्चास्तित्व, मृत्यूनंतरचे जीवाचे अस्तित्व इ. विषय १८८२ पासून वैज्ञानिकांच्या प्रयोगशाळेत अभ्यासले जात आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया, जर्मनी, जपान आणि भारत आदी देशातील विद्यापीठे अध्ययन करीत आहेत. इतकेच नव्हे, तर त्या विषयावरील संशोधनांना डॉक्टरेटच्या पदव्याही देत आहेत.
सत्य झाकून ठेवणे किंवा सत्याला असत्य ठरविणे शक्य होणार नाही.
पुन्हा चार दिवसांनी ग. वा. कोपरकर (पुणे) यांनी संयोजकांच्यासोबत गंगाखेड येथे पत्रकार परिषद घेऊन मला एकाच व्यासपीठावर जाहीर वादविवादासाठी आव्हान दिले. त्याला समितीने दिलेले उत्तर थोडक्यात पुढीलप्रमाणे -
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वैचारिक वादसंवादासाठी नेहमीच तयारी आहे. याबाबत समितीने अधिवेशनाच्यावेळी या विषयाचे तज्ज्ञ डॉ. आ. ह. साळुंखे यांची पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्या पद्धतीने त्याला उत्तर देणारी व आपली वैचारिक बाजू मांडणारी यज्ञसमर्थकांची पुस्तिका आल्यास त्याचे ‘अंनिस’ स्वागतच करेल. या समर्थकांनी याबाबत आतापर्यंत जी पत्रके काढली त्यावर प्रकाशक व मुद्रक यांचे नावही नाही. त्यामुळे यज्ञ संयोजक आपली भूमिका अधिकृतपणे प्रकाशित करत असल्यास त्यांनी ते जरूर करावे. दोन्ही बाजूंनी अशी प्राथमिक मांडणी पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षातील चर्चेचा तपशील जरूर ठरविता येईल. अशी चर्चा मर्यादित उपस्थितीत व्हावी आणि त्याच्या व्हिडीओ चित्रीकरणाद्वारा ती केबलद्वारा सर्वत्र दाखवण्यात यावी. ही बाब विचारमंथनासाठी समितीला स्वागतार्ह वाटते. मात्र यासाठी समितीच्या पुस्तिकेप्रमाणेच स्वत:ची भूमिका नेमकेपणाने मांडणारी पुस्तिका यज्ञ संयोजकांनी प्रसिद्ध करणे ही पूर्वअट आहे. याचे पालन यज्ञ संयोजक करतील, असा समितीचा विश्वास आहे. लोकशाही पद्धतीने व्यक्त होणाऱ्या सर्व मतभिन्नतांचे स्वागत समिती करते. त्याबरोबरच धर्मचिकित्सा करण्याचा समितीला आग्रहही कायम आहे, असे पत्रक स्थानिक संयोजन समिती, परिषदेचे निमंत्रक विलास जंगले व कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रसृत केले आहे.
यज्ञकुंडातील अग्नी आतापर्यंत एवढा प्रज्वलित झाला आहे, पुढे काय घडते ते सर्वांना समजावे, अशीच समितीची इच्छा आहे.
गवामयन सत्र सोमयाग, गंगाखेड
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा गंगाखेडच्या यज्ञसंस्था व सद्य:स्थिती : प्रबोधन परिषदेच्या मुद्रित मजकुरासंबंधी त्यांच्या आक्षेपांना उत्तर अर्थात अंधश्रद्धा निर्मूलनवादींच्या भ्रमजाळास चोख उत्तर! गंगाखेड येथे होत असलेल्या गवामयन सत्र सोमयागासंबंधी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नसताना यज्ञात जीवहत्या होते. मौल्यवान वस्तूंची आहुती दिली जाते. धान्यसामग्री जाळली जाते इत्यादी धादांत खोटी विधाने केली आहेत, यज्ञ धर्माचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न पाहता केवळ कुत्सित भावनेने, द्वेषभावनेने बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले. त्याचप्रमाणे आशा-आकांक्षा तृप्त होतात, पर्जन्यवृष्टी होते. पुत्रप्राप्ती होते, देवाच्या जवळचे स्थान मिळते, असे त्यांनी लिहिले आहे. परंतु गंगाखेड येथे होत असलेल्या यज्ञामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे भ्रामक मायाजाल नसून शुद्ध वैदिक स्वरुपाच्या विज्ञाननिष्ठ अशा प्रक्रियांचा आविष्कार होत आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या सुप्तगुणाचा परिचय करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही लोकांच्या श्रद्धा व धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत नसून मानवाचा खरा धर्म काय आहे, याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. खऱ्या यज्ञधर्माचा कोणत्याही सत्पुरुषाने धिक्कार केला नाही व विरोधही केला नाही.

मात्र वेदांचा, शतपथ ब्राह्मण ग्रंथाचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता यज्ञासंबंधीची दुसरी बाजू (यज्ञविरोधी) लोकांसमोर पत्रक काढून जाहीरपणे प्रसारित करणे म्हणजे केवळ हास्यास्पद नसून वेश्येने पतिव्रता धर्माचा उपदेश करणे एवढ्या धाडसाचे आहे. दि. ९ जुलै ९९ रोजी यज्ञ व विश्वकल्याण परिषद यज्ञभूमीवर होणार आहे, तरी या कार्यक्रमास जनता बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येंने उपस्थित राहावे, असे आवाहन गवामयन सत्र सोमयाग यज्ञ सेवा मंडळींनी केले आहे.
गंगाखेडच्या सोमयाग यज्ञास जाण्याचा विचार महिलांनी रद्द केला!
अंनिस, अंबेजोगाई (जि. बीड) शाखेच्या वतीने सध्या महिला जागृतीचे कार्य हाती घेतले असून त्या अनुषंगाने भारज, नांदगाव, सुगाव व सायगाव या ग्रामीण भागात महिला मेळावे घेतले. उद्बोधन व्याख्यानांसोबत अनुराधा देशमुख यांची भस्म काढण्याची चित्रफीत दाखवण्यात आली.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. ११ जून ९९ रोजी अंबेजोगाई येथे रविवार पेठेत गजाननराव पेडगावकर यांच्या वाड्यात महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास त्या गल्लीतील २०० महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यात लग्नपत्रिका, भूतबाधा, करणी, चेटकी, यज्ञ आदीविषयी वाद-संवाद झाला. महिलांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे प्रा. डॉ. डी. एच. थोरात, संतराम कराड, बाबूराव तिडके, नीलकंठ जिरगे यांनी दिली. रामसिंग बेले यांनी चमत्कारांचे प्रयोग सादर केले. शेवटी अनुराधा देशमुख यांची व्हिडीओ कॅसेट दाखवण्यात आली.
कार्यक्रमाचा परिणाम एवढा झाला की, रविवार पेठेतील महिला मंडळाने गंगाखेड येथील सोमयाग यज्ञास जाण्याचा कार्यक्रम रद्द केला. जीप भाड्याने केली होती, त्याचा अ‍ॅडव्हान्स सोडून दिला.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट १९९९)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...