तरुण पिढी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तरुण पिढी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३ जानेवारी, २०१८

‘विवेकवाहिनी’चा विस्तार वाढतो आहे




‘विवेकवाहिनी’चा विस्तार वाढतो आहे
दाभोलकर, विवेकवाहिनी, तरुण पिढी, विद्यापीठांशी संपर्क
विवेकवाहिनी सुरू करण्याची इच्छा आहे का?  असे पत्र शिवाजी, पुणे, मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांना पाठवले. सुमारे ७० जणांची होकारार्थी उत्तरे आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मी व अविनाश पाटील जाऊन आलो. सोबत प्रा. विलास चव्हाण होते. या विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना उत्तमपणे सांभाळलेले ते कर्तृत्ववान प्राध्यापक आहेत. विवेकवाहिनीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे निमंत्रक आहेत. दौऱ्यातील एक दिवस राखीपौर्णिमेचा होता. कॉलेजला सुट्टी होती. नंदुरबारमध्ये पाच महाविद्यालयातील प्राध्यापक होते. धुळ्यातही तेवढ्याच महाविद्यालयाचे होते. आलेले प्राध्यापक प्रामाणिक व उत्साही होते. पुन्हा एकदा नीट संपर्क करून धुळे व नंदुरबारच्या बैठका प्रा. विलास चव्हाण घेणार आहेत. जळगावची बैठक १३ ऑगस्टला झाली. अकरा महाविद्यालयांतील प्राध्यापक आले होते. या तीनही जिल्ह्यात विवेकवाहिनीचे एक दिवसाचे शिबीर दिवाळीपूर्वी घेण्यात येईल. नाशिक जिल्हा बैठकीला दहा महाविद्यालयांचे प्रतिनिधी होते. प्रा. बैसाणे व प्रा. डॉ. वाघ हे अनुभवी व उत्साही आहेत. त्यांच्या सहभागातून नाशिक जिल्ह्यात विवेकवाहिनी चांगल्या प्रकारे उभी राहील, अशी उमेद आहे.

मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठे व विदर्भातील दोन्ही विद्यापीठे यांच्याशी संपर्क सुरू आहे. या महिन्यात चित्र स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातील महाविद्यालयातील विवेकवाहिनीचे प्रतिनिधी यांचे एक शिबीर ता. २३, २४ ऑगस्ट रोजी श्रीरामपूरला होईल. रयत सेवक मंच या नगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेतील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांच्या संघटनेने आपल्या विचार मंचाचा एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील रयतच्या शाळांत विवेकवाहिनी चालू करण्याचे ठरवले आहे. सुमारे पन्नास शाळांत ती चालू होईल. हा एक नवीन प्रयोग ठरेल. शिबिराचे उद्घाटन प्रा. एन. डी. पाटील सर करणार आहेत.
विवेकवाहिनीसाठी साहित्यनिर्मितीचे कार्य करण्याची व संघटनात्मक बाबींसाठी फिरण्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे.       
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर २००३)




मंगळवार, २ जानेवारी, २०१८

संघटनेत तरुणांचा सहभाग हवाच




संघटनेत तरुणांचा सहभाग हवाच
दाभोलकर, तरुण पिढी, कृती कार्यक्रम, विद्यार्थीसंवाद
मनात सदराच्या मजकुराची जुळवाजुळव चालू होती आणि क्षणभर विचार चमकून गेला. संघटनेच्या आघाडीवर की संघटनेच्या पिछाडीवर? ‘पिछाडी’ हा शब्द कोणाला आवडतो? मलाही आवडत नाही. संघटनेच्या बाबतीत तर नाहीच नाही. परंतु तरीही माझ्या मनात तो का बरे डोकावला? विशेषत: अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या कायद्याची लढाई एका टप्प्यापर्यंत यशस्वी झाल्यामुळे संघटनेची हिंमत व नाव वाढलेले असताना?

कारण सरळ आहे. माझे मत वास्तवावर आधारलेले आहे. गेल्या महिन्याभरात मी महाराष्ट्रात जे हिंडलो, कार्यकर्त्यांशी बोललो, शाखांची स्थिती पाहिली वा समजली, त्या प्रत्यक्ष अनुभवावर माझे मत बनलेले आहे. हे वास्तव काय आहे? ते परखड सत्य असे आहे की, आपल्या काही महत्त्वाच्या शाखांत तरुणांची आवक थांबली आहे. कारणे अनेक असू शकतात. त्याची चर्चा हवी तर करावीही; परंतु त्यामुळे फार तर परिस्थितीचे आकलन अधिक पक्के बनेल. परिस्थितीचे आव्हान तर स्वीकारावेच लागेल. तरुण मोठ्या संख्येने यावयास हवेत. नोकरीसाठी, पोटासाठी ते इतस्तत: जातातच. हे लक्षात घेऊन प्रत्येकी दोन-तीन वर्षांनी नव्या तरुणांचा राबता वाढता राहावयास हवा. त्याच्यामुळे चळवळीत सळसळता उत्साह राहतो. केवळ तेवढ्याने भागत नाही. कामाची चौकट नीटपणे सांभाळणारे प्रौढ कार्यकर्तेही लागतातच. असे कार्यकर्ते मिळणेही तसे अवघड असते; पण ते मिळाले की, ते दीर्घकाळ काम करतात. वय आणि अनुभव यामुळे आलेली पक्वता त्यांच्यात असते. त्यामुळे काम टिकून राहावयास मदत होते. पण चळवळ म्हणजे केवळ टिकून राहणे नव्हे, तर तारुण्याच्या ताजेपणाचा स्पर्श हाच खरा संजीवक असतो.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल तरुणांच्यात एक स्वाभाविक उत्सुकता असते. त्यामुळे त्यांना जोडणे हे तुलनेने अधिक सोपे; परंतु त्याबद्दलचे प्रयत्न जास्त चिकाटीने व कर्तृत्वाने करावयास हवेत. सांगली, जळगावसारख्या महत्त्वाच्या शहरात आज चळवळीचे संघटनात्मक काम थंडावले आहे. पुणे, औरंगाबाद, धुळे, सोलापूर अशा मोठ्या शहरात कार्य चांगले वा बरे चालू आहे. परंतु तरुण जवळपास नाहीतच. या सर्व ठिकाणी संघटनेत चैतन्य ओतण्यासाठी तरुणांना भिडावयास हवे.

हे कसे करता येईल?
एक थेट सोपा उपाय म्हणजे गावातील महाविद्यालयात व्याख्याने लावून द्यावयाची. व्याख्याने शक्यतो एफ.वाय.च्या वर्गावर द्यावीत. त्यामुळे हाताशी लागणारे विद्यार्थी पुढे तीन वर्षे लाभण्याची शक्यता अधिक. सलग एक आठवडा व्याख्याने घ्यावीत. वेगवेगळ्या कॉलेजात, एकाच कॉलेजच्या वेगवेगळ्या विद्याशाखांत अथवा वर्गातही. कार्यक्रम संपला की, काही मुलांना उत्सुकता तयार होतेच (ती तर वक्त्याच्या यशस्वितेची कसोटी) त्यांना त्या आठवड्यातील बैठकीची आधीच ठरवलेली तारीख, जागा, वेळ सांगावी. संपर्काच्या दृष्टीने फॉर्म भरून घेता आल्यास अधिक चांगले. पाच दिवस अशी मोहीम चालली तर त्या सर्व व्याख्यानांच्या प्रभावातून नक्कीच काहीजण बैठकीस येतील. त्यापैकी काही गळतील, थांबतील. कमी-जास्त काम करतील, हे सर्व गृहीत धरावयास हवे. तरीही नवी भरती नक्की होईल. विद्यार्थी वसतिगृहातूनही याच प्रकारे विद्यार्थी मिळू शकतील. अतिशय साध्या-सोप्या बिनखर्चिक असणाऱ्या या उपायाची अंमलबजावणी काही महाविद्यालये असणाऱ्या मोठ्या शहरात का केली जात नाही, हे मला कोडेच आहे. खरे तर मुलांना आवडेल, रूचेल, पचेल अशा भाषेत चांगले बोलू शकणारे वक्ते जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मग तरुण विद्यार्थ्यांना थेट भिडण्याच्या कार्यक्रमाचे, मोहिमेचे नियोजन का बरे होत नाही? प्रा. संजय बनसोडे हे आपले सांगली जिल्हा अंनिसचे कार्याध्यक्ष. त्यांनी एक दिवसाचे ‘अंनिस’चे प्रशिक्षण शिबीर घेतले, कॉलेज युवकांसाठी. वर्गावर्गात जाऊन पाच-पाच मिनिटे आवाहन केले. चाळीस जणांची अपेक्षा, तेथे एकशे चाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनी आले. इतरत्रही याचे अनुकरण व्हावयास हवे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००३)






मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

तरुणांनी टिकायला हवे




तरुणांनी टिकायला हवे
दाभोलकर, तरुण पिढी, व्यापक परिवर्तन, व्यक्तिमत्त्व विकास 
अलिकडेच दोन अनुभव आले. ते असे, परिवर्तनवादी चळवळीतील एका मोठ्या कार्यक्रमासाठी जाण्याचा प्रसंग आला. कार्यक्रम तसा महत्त्वाचा होता. लोक आपुलकीच्या, बांधिलकीच्या भावनेतून आवर्जून आले होते. परंतु बहुतेक श्रोतृसमुदाय साठीच्या पुढील होता. ४० ते ६० या वयोगटातील तुरळक होते आणि चाळिशीखालील तर अपवादात्मकच. दुसऱ्या अशाच एका प्रसंगी शिवसेनेच्या एका नेत्याला भेटायला जावयाचा योग आला. गर्दी होती. बहुसंख्य २० ते ३० वयोगटातील तरुण होते. त्या जिल्ह्यात काम करत असूनही त्यांचे चेहरे मला अपरिचित होते.

तरुणांचे जथ्थे पुरोगामी परिवर्तनाकडे का वळत नाहीत, हा शोध, हा प्रश्न आणि त्यांची चिंता तशी नवीन नाही. याची काही कारणे जाहीरही आहेत. तरुणांना भडकवणारी आक्रमक विद्वेषी भाषा; साध्य, साधनशूचिता यांचा घोळ न घालणारी कामाची बिनधास्त पद्धत; नंबर दोनच्या धंद्याला सहजपणे मान्यता देणे याबरोबरच उत्साही उपक्रमशीलता व तरुणांना दिली जाणारी विशेष संधी वगैरे. पुरोगामी चळवळीत तरुण न येण्याच्या कारणांमध्ये युवक नेतृत्वाचा अभाव, संघर्षाची किंमत द्यावी लागण्याची भीती, अशा अनेक बाबी आहेत. हाच प्रश्न अधिक नेमकेपणाने एप्रिलमधील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चेला आला. आज समितीच्या कुठल्याही शाखेत आणि राज्य पातळीवरही डोक्यावर काळे केस असलेल्यांचीच गर्दी आहे. परंतु हे चित्र कायम टिकावयास हवे असेल तर समितीमध्ये तरुणांचा ओघ अखंड राहावयास हवा. ही गोष्ट जाणीवपूर्वकच घडवावी लागते. तसे झाले नाही तर आज रॅशनॅलिस्ट संघटनांची आणि काही प्रमाणात कम्युनिस्टांची स्थिती आहे तशी समितीची होईल. याचा अर्थ तरुण कार्यकर्ता समितीमध्ये येईल, टिकेल व वाढेल, अशी व्यवस्था हवी. ती कोणती याबद्दल चर्चा झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आकर्षणाने येणारा तरुण तेवढ्यामुळेच टिकून राहत नाही आणि टिकून राहिला नाही तर त्याच्यातील कार्यकर्ता घडणार कसा? यासाठी त्या तरुणाला हवेहवेसे वाटणारे विचार देण्याची व उपक्रम करण्याची यंत्रणा हवी. संमोहन, लैंगिकता प्रशिक्षण, व्यसनमुक्ती, आकाशदर्शन, गिरीभ्रमण असे अनेकविध विषय त्याला हवेसे वाटणे स्वाभाविक आहे. ते आकर्षकपणे त्याच्या भाषेत त्याला मिळाले तर तो संघटनेत टिकून राहील. याबरोबरच त्याच्यावर काही जबाबदाऱ्या द्यावयास हव्यात आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये यावी, यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे व नेतृत्वगुण वाढविण्याचे प्रशिक्षण त्याला द्यावयास हवे. संघटनेतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवर्जून त्याच्या संपर्कात राहावयास हवे आणि वय वाढलेल्या कार्यकर्त्याने संघटनेच्या हितासाठी पदाचा त्याग करून (कामाचा नव्हे) तरुणांसाठी स्वत:हून वाट मोकळी करावयास हवी. या साऱ्याचा परिणाम एका वाक्यात सांगावयाचा तर असा दिसावयास हवा की, संघटनेचे सरासरी वय सदैव तीसच राहावयास हवे. याबाबत शिवसेनेचे यश लक्षणीय आहे. शिवसेना स्थापन होऊन ३० वर्षे झाली. स्थापनेच्या वेळेस तो तरुणांचा समूह होता. म्हणजे खरे तर आजचा शिवसैनिक पन्नाशीच्या पुढे पोचावयास हवा होता. परंतु आजही शिवसेनेत डोळ्यात भरणारी संख्या दिसते ती तरुणांचीच. अर्थात तरुण हवा म्हणूनच केवळ तरुण कार्यकर्ता निवडणे, असा याचा अर्थ नव्हेच. ध्येयवाद, वैचारिक बांधिलकी यांचा महत्त्वाचा संबंध आहेच. पण तरुण संघटनेकडे आकृष्ट कसे होतील, याची आखणी, मांडणी करणे, त्याप्रमाणे कृती करणे, त्या प्रयत्नाचे मूल्यमापन करणे आणि त्याआधारे सुधारित कृती करणे हे सतत घडत राहावयास हवे. याबद्दल कार्यकर्त्यांना आणि वाचकांना काय सुचते? काय वाटते, हे समजून घ्यायला मी उत्सुक आहे.

विस्तारणारी क्षितिजे हे सदर जवळजवळ वर्षभर चालले. या अंकापासून हे सदर आपला निरोप घेत आहे. वर्ष संपले हे त्याचे एक कारण. दुसरे कारण असे की, या सदरातील मांडणी प्रामुख्याने चळवळ व कार्यकर्ता यांच्यासाठी होती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता समितीच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बुलेटीन चालू होत आहे. त्यामुळे या स्वरुपाच्या चर्चा आता तेथे होतील आणि वार्तापत्राचे हे एक पान सर्व वाचकांना आवडणाऱ्या मजकुरासाठी मोकळे होईल. हे सदर चालवण्याचे आणखी एक उद्दिष्ट होते, ते म्हणजे चळवळीत आणि संघटनेत ज्याला तोंड द्यावे लागते, अशा काही प्रमुख मुद्द्यांबाबत मांडणी व्हावी आणि वाचकांकडून आलेल्या प्रतिसादातून त्याबाबत अधिक चर्चा व्हावी. वस्तुस्थितीत हे मात्र फारसे घडून आले नाही. चळवळीची क्षितिजे विस्तारत आहेत, असे मला स्पष्टपणे जाणवते. मात्र अल्प प्रतिसाद हा परस्परसंवादाबद्दल आळस आहे की, अभाव याचे मलाही आकलन झाले नाही. कदाचित माझ्या मांडणीची परिणाकारकता ही कमी पडली असेल. असो.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र                             
 (मे १९९८)




सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

नव्या कार्यकर्त्यासाठी आखणी हवी




नव्या कार्यकर्त्यासाठी आखणी हवी
दाभोलकर, तरुण पिढी, कार्यकर्ता, बैठका
विस्तारणाऱ्या क्षितिजांची दोन टोके दाखविणाऱ्या घटना याच महिन्यात घडल्या. २१, २२ मार्चला हैदराबाद येथे भारतातील रॅशनॅलिस्ट संघटनांचे अधिवेशन आहे. समविचारी संघटनांना भेटण्याची, विचारांचे आदान-प्रदान करण्याची सुसंधीच. त्यांचे आवर्जून निमंत्रण आले आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी जागतिक पातळीवर याच स्वरुपात भरणाऱ्या अधिवेशनाची सूचना आली. हे अधिवेशन इंदूमती पारीख यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी १९९९ मध्ये होणार आहे. त्याला मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन तब्बल एक वर्ष आधीच मिळाले. यासंदर्भात विस्तारणारी क्षितिजे लिहिणार आहेच. परंतु आता पुढे कधीतरी हे घडायचे कारण झाले, ते असे -

सातारा शाखेतील दोन तरुण उत्साही, तळमळीचे कार्यकर्ते माझ्याकडे आले. वय विसाच्या आतील. संघटनेत येऊन दीड-दोन वर्षे झालेली. सातारला माझा असणारा कमी मुक्काम आणि असेल त्यावेळेची धावपळ; त्यामुळे या दोघांची भेट बैठकीतच होत असे. सर्वांच्या बरोबर झालेल्या त्या बैठकीतील भेटीचे स्वरूप मर्यादितच असे. मात्र ते घरी आले त्या दिवशी बऱ्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यांच्या बोलण्यात नाराजी नव्हती, तर संघटनेच्या कामात सुधारणा व्हावी, संधी मिळावी ही तळमळ होती. त्यासाठी स्वत: अधिक चांगली धडपड करण्याची प्रामाणिक इच्छा होती. त्यांचे सगळे ऐकून घेत असताना सातारा शाखेच्या एका तपाचा इतिहास तरळला.

१९८५ ऑक्टोबरमध्ये वाईला अंधश्रद्धा निर्मूलन सखोल प्रशिक्षण शिबीर झाले. त्यानंतर सातारा येथे समितीच्या बैठका सुरू झाल्या, त्या आजतागायत. बैठकांना अगदी सुरुवातीपासून येणारे कार्यकर्ते आजही साताऱ्यात आहेत. आजही चळवळीशी संबंधित आहेत. परंतु एखादा अपवाद वगळता त्यांचे बैठकीला येणे खूप कमी झाले आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी उत्साहाने आलेली काही मंडळी तगून आहेत, तर काही हळूहळू अनियमित बनत आहेत. बैठकीला नियमितपणे येणारे जुने-जाणते कार्यकर्ते यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण स्नेहभाव आहे. स्वत:च्या व्यवसायात कौटुंबिक जबाबदारीचा वा अन्य प्राधान्याच्या कामात त्यांना बैठकीस येणे जमत नसावे, असेच मी गृहीत धरतो. मग काय घडते? आज सातारच्या शाखेत अशा अगदी नव्या उत्सुक सात-आठ तरुण कार्यकर्त्यांचा जो गट आहे, त्याला काय अनुभव येतो? आपण वेळेवर बैठकीस आलो तर बैठक वेळेवर चालू होतेच, असे नाही. बैठकीच्या कामकाजात वैचारिक चर्चा पुरेशी गांभीर्याने व नियमितपणे होत नाही. मागील आठवड्यातील कामाचे जुजबी रिपोर्टिंग झाले की, मग बरचसा वेळ असा तसाच जातो. नवीन येणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने ते ज्यांना घेऊन येतात ते त्यांचे मित्र या दर्शनाने नाउमेद होतात. बैठकीत जे ठरत नाही वा घडत नाही, ते नंतर घडणे अवघडच असते. विचारांची ओढ, कामाची हौस, नाविन्य व कुतूहल, संघटनेत व्यक्तिमत्त्व विकासाची मिळणारी संधी, अशा अनेक उद्देशाने तो कार्यकर्ता समितीकडे खेचला गेलेला असतो. त्याला घडविणे, संधी देणे, टिकविणे ही गोष्ट कष्टपूर्वक करायची असते. माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांची व्यथा (खरे तर उत्कट इच्छा) अशी होती की, त्यांना चमत्कारांचे चांगले सादरीकरण शिकायचे होते, भाषणे द्यायची होती; त्याचबरोबर मनात भीतीही होती. समितीचे सभासद झाल्यापासून त्यांना लोक आडवे-तिडवे प्रश्न विचारत होते. त्याची समर्पक उत्तरे देताना त्यांची तारांबळ उडत होती. त्याचे परीक्षण त्यांना हवे होते. ज्या समविचारी कॉलेजमित्रांना ते संघटनेत खेचू पाहत होते, त्यांना काहीजणांना संमोहनात, तर काही जणांना आकाश निरीक्षणात रस होता. समितीच्या माध्यमातून हे थोडेसे घडून यावे, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्याकडे मोकळा वेळ होता; पण समितीच्या कामासाठी तो कसा वापरावा, हे त्यांना कळत नव्हते. कोणी समजून देत नव्हते. या सर्वांतून आलेली अस्वस्थता त्यांनी माझ्याकडे मोकळी केली. मलाही खूप बरे वाटले. चळवळीत असलेल्या सर्वांत तरुण घटकाशी सुसंवाद असणे, हे मी खूप मोलाचे मानतो. उद्याची संघटना ज्यांच्या खांद्यावर उभी असते, त्यांची जडणघडण सर्वांत महत्त्वाची.

चार वर्षांपूर्वी आपण समितीचे एक परिचयपत्रक छापले आहे. त्यामध्ये संघटनात्मक कार्यामध्ये पुढील सूचनांची कार्यवाही अपेक्षित आहे. या शीर्षकाखाली- नवे कार्यकर्ते आकृष्ट करण्यासाठी काय करावे, याचे चिंतन व कृती सतत चालू ठेवावी, हा मुद्दा आहे. नवे कार्यकर्ते बनविणे म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांनी काही जबाबदारी उचलणे आलेच. संघटनेच्या बैठकीसाठी खरे तर तास-दीड तास काढायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दशकानुदशके साप्ताहिक शाखेसाठी असे जाताना मी पाहिले आहेत. कोणत्याही कारणाने हा नियमितपणा शक्य नसल्यास येणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांशी तरी एखाद्या विशिष्ट कामाच्या माध्यमातून थेट नाळ जोडून घेण्याची आखणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी करावयास हवी. याबरोबर प्रत्येक पाच-सहा वर्षांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची यंत्रणाही संघटनेत उभारावयास हवी. कोणतीही संघटना कायमच्या समर्पित कार्यकर्त्यांवर उभी राहू शकत नाही. त्याबरोबर सतत ताज्या, नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा सतत पुरवठा लागतो आणि समर्पित कार्यकर्ता होण्याच्या दृष्टीने त्याची आखणी लागते.
विस्तारणाऱ्या क्षितिजाचे एक टोक विश्वातील विवेकवादी चळवळीशी जोडले जात असताना दुसरीकडे आपल्या संघटनेच्या प्रत्येक शाखेतील प्रत्येक नव्या छोट्या कार्यकर्त्यांशी देखील थेटपणे जोडले जावयास हवे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (एप्रिल १९९८)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...