‘विवेकवाहिनी’चा
विस्तार वाढतो आहे
दाभोलकर, विवेकवाहिनी, तरुण पिढी, विद्यापीठांशी संपर्क
विवेकवाहिनी सुरू करण्याची इच्छा आहे का? असे पत्र शिवाजी, पुणे, मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांना पाठवले.
सुमारे ७० जणांची होकारार्थी उत्तरे आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मी व अविनाश पाटील जाऊन
आलो. सोबत प्रा. विलास चव्हाण होते. या विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना उत्तमपणे
सांभाळलेले ते कर्तृत्ववान प्राध्यापक आहेत. ‘विवेकवाहिनी’चे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे निमंत्रक आहेत. दौऱ्यातील एक
दिवस राखीपौर्णिमेचा होता. कॉलेजला सुट्टी होती. नंदुरबारमध्ये पाच महाविद्यालयातील
प्राध्यापक होते. धुळ्यातही तेवढ्याच महाविद्यालयाचे होते. आलेले प्राध्यापक प्रामाणिक
व उत्साही होते. पुन्हा एकदा नीट संपर्क करून धुळे व नंदुरबारच्या बैठका प्रा. विलास
चव्हाण घेणार आहेत. जळगावची बैठक १३ ऑगस्टला झाली. अकरा महाविद्यालयांतील प्राध्यापक
आले होते. या तीनही जिल्ह्यात ‘विवेकवाहिनी’चे एक दिवसाचे शिबीर दिवाळीपूर्वी घेण्यात येईल. नाशिक जिल्हा बैठकीला
दहा महाविद्यालयांचे प्रतिनिधी होते. प्रा. बैसाणे व प्रा. डॉ. वाघ हे अनुभवी व उत्साही
आहेत. त्यांच्या सहभागातून नाशिक जिल्ह्यात ‘विवेकवाहिनी’ चांगल्या प्रकारे उभी राहील, अशी उमेद आहे.
मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठे व विदर्भातील दोन्ही विद्यापीठे
यांच्याशी संपर्क सुरू आहे. या महिन्यात चित्र स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातील महाविद्यालयातील
‘विवेकवाहिनी’चे प्रतिनिधी यांचे एक शिबीर ता. २३, २४ ऑगस्ट रोजी श्रीरामपूरला होईल. ‘रयत सेवक मंच’ या नगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेतील
कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांच्या संघटनेने
आपल्या विचार मंचाचा एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील ‘रयत’च्या शाळांत ‘विवेकवाहिनी’ चालू करण्याचे ठरवले आहे. सुमारे पन्नास
शाळांत ती चालू होईल. हा एक नवीन प्रयोग ठरेल. शिबिराचे उद्घाटन प्रा. एन. डी. पाटील
सर करणार आहेत.
‘विवेकवाहिनी’साठी साहित्यनिर्मितीचे कार्य करण्याची व
संघटनात्मक बाबींसाठी फिरण्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा