मानवीयता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानवीयता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 3/3)




धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 3/3)
दाभोलकर, धर्मचिकित्सा, यातुधर्म, नैतिकता, मानवीयता, कर्मकांड, विवेकवाद, मनुस्मृती  
धर्म या विषयाबाबत मांडणी करताना जे-जे आक्षेप घेतले जातात, त्या-त्या बाबतीत एक युक्तिवाद नेहमी केला जातो. तो असा की, हे आक्षेप खऱ्या धर्माविषयी नाहीतच. खरा धर्म माणसामाणसांत भेदभाव करत नाही. शोषणाला, हिंसेला खऱ्या धर्माची मान्यता कधीच नसते. धर्माच्या नावाखाली इतिहासात जो दुष्टपणा घडला तो वस्तुत: धर्माची विकृती होती. जे चांगले घडते ते खऱ्याखुऱ्या धर्मामुळे घडले. मग प्रामाणिकपणे खऱ्या धर्माची व्याख्या करावी लागेल. या व्याख्येत एक बाब समान असते, ती अशी की, त्या-त्या धर्माचे जे धर्मग्रंथ असतात त्यातील शब्द हाच प्रमाण मानणारा धर्म तो खरा धर्म. परंतु धर्मग्रंथातील या शब्दाचे देखील विविध अर्थ सांगितले जातात. मग खरा धर्म कोणता? सर्व धर्मांमध्ये एक संकल्पना समान आढळते, ती म्हणजे खरा धर्म म्हणजे पावित्र्याची भावना. पावित्र्य अंगी असणाऱ्या, अपवित्र असलेल्या आणि लौकिक अशा प्रकारचा भेद करणे हे धर्माचे मूळ आहे. व्यक्ती अद्वैती असो वा द्वैती, ख्रिस्ती असो वा मुस्लिम; भेद करण्याची ही दृष्टी सर्व धर्मांना समान आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणसे ख्रिस्तापेक्षा वा बुद्धापेक्षा वा इतर धर्मगुरूपेक्षा वेगळी असतात; तसेच पावित्र्याच्या मुळे लाभलेले हे भिन्नत्व धर्मात मानलेले असते. एखादी व्यक्ती एवढेच नव्हे, तर पशू व वृक्ष देखील पवित्र मानले जातात. त्यांच्या ठायी पावित्र्य, शिवत्व मानले जाते. याच विचारातून पुढचा टप्पा असा की, सामान्य लौकिक अथवा अपवित्र वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टीकडून नियत केला जातो. हे कळल्याखेरीज अस्पृश्यतेचा प्रश्न समजणे अशक्यच आहे. जातिसंस्था ही श्रमविभागणी आहेच; परंतु तिचे कार्य हे पावित्र्याच्या संकल्पनेच्या आधारे संघटित केलेले आहे. ब्राह्मण सर्वाधिक पवित्र. ही पावित्र्याची मात्रा कमी-कमी होत जाते आणि शेवटी अस्पृश्यामध्ये पावित्र्याचा अंशही नसतो; उलट ते अपवित्र असतात, आणि या सर्वाला धर्मग्रंथाचा आधार असतो म्हणून कोणीही ज्याला खरा धर्म म्हणावा त्याला सर्व बाबींचे पवित्र, अपवित्र व लौकिक अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण करावे लागते. उदा. धर्मग्रंथ, पुरोहित, मंदिर, गायीसारखे प्राणी यांना पवित्र मानले जाते. प्रेत, तथाकथित शूद्र, रजस्वला स्त्री इ.ना अपवित्र मानले जाते. दैनंदिन वापरातील वस्त्रे, भाजीपाला, कागद पेन्सिल इ.ना लौकिक वस्तू म्हणता येईल. स्थळ, काळ, सजीव प्राणी, निर्जीव वस्तू इ. सर्व प्रकारच्या पदार्थांची वरीलप्रमाणे तीन गटात विभागणी केली जाते. पवित्र व अपवित्र, वस्तूंचे एक अलौकिक विश्व, तर व्यावहारिक वस्तूंचे दुसरे लौकिक विश्व मानले जाते. पवित्र व अपवित्र वस्तूंमध्ये स्वभावत:च काहीतरी अलौकिक सामर्थ्य असल्याची समजूत असते. म्हणूनच त्या वस्तूंच्या बाबतीत विविध प्रकारचे विधिनिषेध मानले जातात. पवित्र वस्तूविषयी आदरयुक्त भीती, तर अपवित्र वस्तूविषयी तिरस्कारयुक्त भीती वाटते. या सर्व विवेचनाचा अर्थ असा की, ज्याला खरा धर्म मानले जाते, त्यामध्ये अपरिहार्यपणे अस्तित्वात असलेल्या पावित्र्याच्या संकल्पनेमुळे वस्तूंच्या बाबतीत अंधश्रद्धेवर आधारलेली एक विषमता तयार होते. येथे हे समजून घ्यावयास हवे की, सर्व वस्तू लौकिक पातळीवरीलच मानल्या, तरी त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार होणारा भेद शिल्लक राहीलच; परंतु पावित्र्याच्या संकल्पनेमुळे निर्माण होणारी विषमता आणि या प्रकारची विषमता या दोन्ही एक नव्हेत. पहिल्या प्रकारची विषमता लहरीपणा, परंपरा, रूढी, धर्मग्रंथांची मान्यता यावर आधारलेली आहे. तिच्या मुळाशी कोणताही वस्तुनिष्ठ निकष नाही. दुसऱ्या प्रकारची विषमता मात्र वस्तुनिष्ठ अशा निकषावर आधारलेली असते. उदा. जगातील वस्तूंचे विभाजन करणे, यात चूक नाही; मात्र ते वर्गीकरण उपयोगी-निरुपयोगी, हितकारक-अहितकारक, स्वच्छ-अस्वच्छ अशा प्रकारे असेल. स्वच्छ व आरोग्याला हितकारक पाणी प्यावे. अस्वच्छ व अपायकारक पाणी पिऊ नये, अशा वस्तुनिष्ठ मुद्द्यांवर हे विभाजन करावे लागेल. ऋग्वेद, बालकवींची कविता आणि विज्ञानाचे पुस्तक याचे उदाहरण घेतले, तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. पावित्र्याची संकल्पना मान्य करणारी धार्मिक व्यक्ती कसलाही विचार न करता ऋग्वेदाला पवित्र मानेल. बालकवींची कविता व विज्ञानाचे पुस्तक यांना ती लौकिक मानेल व ऋग्वेदापेक्षा त्यांचे स्थान नि:संशयपणे हलके आहे, असे मानेल. याउलट पावित्र्याची संकल्पना नाकारणाऱ्या इहवादी माणसाच्या दृष्टीने तिन्ही पुस्तके लौकिक पातळीवरची मानली जातील. ज्या व्यक्तीला काव्याची अधिक आवड असेल, त्याच्या दृष्टीने बालकवीच्या कवितेला अधिक महत्त्व प्राप्त होईल. त्याला विज्ञान अधिक प्रिय असेल तर तो विज्ञानाच्या पुस्तकाला अधिक प्राधान्य देईल. त्याला मानवजातीचा इतिहास, संस्कृत भाषा इ. अधिक अभ्यासनीय वाटत असतील तर तो ऋग्वेदाला अधिक महत्त्व देईल.

वरील बाबीवरही असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की, नीतीची निर्मिती पावित्र्याच्या कल्पनेतून झालेली असते आणि ती कल्पनाच नाकारली तर नीती म्हणजेच खरा धर्म, म्हणजेच सुरळीत समाजजीवन कोसळून पडेल. याबाबतही स्पष्ट कल्पना बाळगावयास हवी. ती अशी की, पावित्र्याची संकल्पना व नीतिमूल्ये यांच्यामध्ये अंतर असते. समाजधारणेसाठी पावित्र्याच्या संकल्पनेची आवश्यकता नाही. नीतिमूल्ये मात्र समाजधारणेला आवश्यक असतात. अर्थात, त्याचे स्वरूप देश, कालसापेक्ष, परिवर्तनशील व न्याय आणि विवेकावर आधारलेले असे असते. समाजातील नीतिमूल्ये जर कोणाचे अन्यायी हितसंबंध जपत असतील कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवत असतील, तर ती नीतिमूल्ये ही त्याज्यच मानावी लागतील. थोडक्यात, कोणताही खरा धर्म पावित्र्याच्या संकल्पनेच्या नावाने विषमतेचे समर्थन करणारी मूल्ये स्वीकारावयास सांगू शकत नाही.

गूढ अलौकिकाने युक्त अशा पावित्र्याची संकल्पना नाकारली तरी व्यावहारिक जीवनात पावित्र्याची एक लौकिक संकल्पना स्वीकारता येते. उदा. भगतसिंगांसारख्या हुतात्म्याची स्मृती अथवा त्याचे चरित्र किंवा स्वत:च्या आईचे वात्सल्य हे पवित्र आहे, असे म्हणता येईल. मात्र या दोन उदाहरणांमध्ये निर्देश केलेले पावित्र्य हे लौकिक स्वरुपाचे आहे. हे पावित्र्य असलेल्या भगतसिंग, आई वगैरे व्यक्तींच्याबद्दल आपल्याला आदर असतो; परंतु त्यांच्या ठिकाणच्या पावित्र्यामध्ये अतिमानवी स्वरुपाचे काही अलौकिक स्वरुपाचे सामर्थ्य असते, असे मानले जात नाही आणि त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून त्यांच्या कृतीची कोणतीही चिकित्सा न करता त्याला संमती देण्याचीही गरज नसते.

वरील सर्व बाबी काहीशा विस्ताराने सांगण्याचे कारण असे की, ज्याला खरा धर्म मानला जातो, जो नैतिकतेवर आधारित आहे असा ठाम दावा केला जातो तो धर्म मानवीच नव्हे, तर संपूर्ण अस्तित्वाचीच दोन कोटीमध्ये विभागणी करतो. एकीकडे जे पवित्र आहे, नित्य आहे, ते असते आणि दुसरीकडे सामान्य माणसे ज्या प्रकारे जगत असतात, तो संसार अथवा माया असते. सामान्य वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टींकडून म्हणजेच खऱ्या धर्माकडून नियंत्रित केला जात असतो. या मांडणीबाबत पर्यायी विचार करण्याची एक वेगळी पद्धती अंधश्रद्धा निर्मूलन समिती देऊ इच्छिते. ती थोडक्यात अशी -

इतिहासात असे घडलेले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार करण्याची रीत सर्वप्रभावी बनली. इतिहासात सामान्य माणसे पोट भरण्यासाठी कष्ट करीत होती, कलावंत कला निर्मिती करत होते, सत्ताधारी राज्यशकट हाकत होते. हे सर्व घडत असतानाच या सर्वांच्या पलिकडे एक सर्वोच्च मूल्य होते ते म्हणजे धर्म. प्रश्न असा आहे की, इतर सर्व मूल्ये ज्यापुढे गौण आहेत व ज्याकडे जाण्याची केवळ साधने आहेत, अशा सर्वात प्रथम असलेल्या (खऱ्या) धार्मिक मूल्याला आपण मानायचे की नाही. याबाबत ‘अंनिस’चे मत असे आहे की, सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सौंदर्यविषयक मूल्ये, न्याय, कर्तव्य, बंधुभाव या संकल्पना धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही व त्या मूल्यांच्यावर धर्माचे प्रभुत्व चालावे, अशीही गरज नाही. ही मूल्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकतात. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. काही शतकांपूर्वी राजा नसलेली समाजव्यवस्था ही कल्पना अशक्य वाटली असती. आज लोकशाही पद्धतीनेच समाजजीवन अधिक चांगले चालू शकते, ही बाब सर्वमान्य झाली आहे. याचाच अर्थ असा सर्व माणसे (धार्मिक माणसे देखील) जी मानवी मूल्ये मनोमनी मानतात, त्यांच्याकडे केवळ मानवी मूल्य म्हणून बघता येणार नाही का? एका सर्वोच्च अशा धार्मिक मूल्याची मांडलिक मूल्ये म्हणून ती अस्तित्वात असणे आवश्यक नाही. प्रत्यक्ष अनुभव व्यक्तीला असे सांगतो की, मानवी जीवनात प्रत्येक क्षणी अधिकाधिक सुधारणा करता येतात. स्वत:च्या मर्यादा ओलांडून माणूस म्हणून अधिक चांगल्या तऱ्हेने जगणे या प्रयत्नात गूढ असे काहीही नाही. स्वत:ची मर्यादा जाणणे आणि ती उल्लंघण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हे धर्म न मानताही कोणीही करू शकतो.

समिती असे मानते की, व्यक्तीने आपला आळशीपणा, आपली सान्तता आणि त्याचबरोबर मानवी मूल्यांसाठी झगडण्याची स्वत:मधील क्षमता नीट ओळखली पाहिजे. माणूस म्हणून माणसात अफाट क्षमता आहेत. त्याबरोबरच त्याच्या त्रुटीदेखील ओळखून मान्य करावयास हव्यात. त्यातील पहिली बाब म्हणजे त्याचा आळशीपणा. माणूस स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक उन्नत बनण्याचा प्रयत्न करतो, तसाच स्वत:च्या मर्यादित कक्षामध्ये आळशीपणाने समाधानाने पडूनही राहतो. मानवी बुद्धी, मन, जाणीव, कर्तृत्व यांच्या मर्यादांची समज म्हणजेच मानवाचे सान्तत्व. विश्वाची नियमबद्धता काही मर्यादित प्रमाणात आपल्याला समजते आणि त्याचा विस्मयकारी अफाटपणा लक्षात घेतला तर ती गूढही वाटते. मानवाला अशा प्रकारे स्वसामर्थ्य आणि मर्यादा, यांचा प्रत्यय येतो. त्यासाठी धर्माची गरज नाही. ज्या मानवी मूल्यांच्यासाठी झगडावयाचे, त्यासाठी धर्माची गूढ गहन जाणीव असण्याची गरज नाही.
     
समिती असे मानते की, एक अरिष्ट आज जगभर मानवी समाजाला ग्रासते आहे. या स्फोटक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वशक्तीमान ईश्वराबद्दल वा लौकिक विश्वाच्या पलिकडच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करणे जरा थांबवले तरी चालेल. अंतिम सत्य शोधण्यासाठी बाहेर पडण्याची काही गरज नाही. एक साधा प्रश्न प्रत्येकजण स्वत:ला विचारू शकतो. तो म्हणजे, आजच्या संकटाच्या काळात माझे मानवतावादी कर्तव्य कोणते आहे? मानवी जीवन अर्थपूर्ण व सुखकारक करणारी मूल्ये कोणती आहेत? उदा. न्याय हे मानवी मूल्य आहे ना? पदोपदी त्याची पायमल्ली होताना मी पाहतो ना, मग त्यासाठी मी लढले पाहिजे. या ठिकाणी एक बाब फार महत्त्वाची आहे ती अशी की, आपण माणसे असल्याने मानवी मूल्ये आपल्या दृष्टीने रहस्यमय असूच शकत नाहीत. आपल्याला ती मनोमनी जाणवतात आणि सगळ्यांनाच स्पष्टपणे ठाऊक असतात. ज्यांना मानवी मूल्यांसाठी झगडायचे नाही, तीच मंडळी मानवी मूल्ये म्हणजे काहीतरी गहन गंभीर कूट प्रश्न आहे, अशी बकवास करत असतात आणि या मूल्यांचे घाऊक ठेकेदार असलेले धर्म, धार्मिक संस्था व धार्मिक नेते मानवी मूल्याकरिता करावयाच्या निकडीच्या लढाईकडे पाठ फिरवत असतात. मानवी मूल्ये ही काहीतरी गूढ बनवण्याची गरज नाही. साध्या खेड्यातल्या मुलांनाही शाळेत जाऊ लागल्यावर स्वच्छता म्हणजे काय, चांगले अन्न म्हणजे काय आणि समूहात माणुसकीने कसे वागावे, हे कळायला लागते. म्हणूनच स्वत:च्या विवेकाच्या आधारे मानवी मूल्यासाठी करावयाच्या संघर्षामध्ये आपण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, ती अशी की, या मानवी मूल्यांना दुसरीकडे कोठेही आधार नाही. धर्म, परमतत्त्व, निसर्ग, विज्ञान यांच्यात त्यांना अधिष्ठान नाही. मानवी मूल्यांना फक्त एकच एक परिमाण असते ते म्हणजे मानव आणि या अर्थाने धर्माला असेलच तर एकचि अर्थ असतो तो म्हणजे साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
     
एक साधा अनुभव लक्षात घ्या. एखादा छोटा असहाय्य मुलगा वा वृद्ध रस्ता ओलांडण्यासाठी उभा असतो. त्यांना मदत हवी असते. त्या रस्त्यावरून जाणारा दुसरा धट्टाकट्टा सक्षम माणूस काळजीपूर्वक हात देऊन सुखरूपपणे त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोचवितो. ही एक साधी घटना. एका समाजघटकाला गरज आहे माणुसकी म्हणून दुसऱ्या संवेदनशील समाजघटकाने त्याला मदत केली. आता तो मुलगा अथवा वृद्ध त्यांच्यावरील पारंपरिक संस्कारामुळे असे म्हणू शकतात की, ‘आम्ही देवाची प्रार्थना केली, देवा मला मदत कर आणि देवाने त्या गृहस्थाच्या रूपाने येऊन आम्हाला मदत केली. हे स्पष्टीकरण नाकारावयास हवे. कारण रस्ता ओलांडण्याची गरज ही मानवी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला मानवानेच मानवतेच्या भूमिकेतून उत्तर दिले, हेच वास्तव आहे.

याचा अर्थ असा की, समाज योग्य दिशेने बदलण्याचा जो प्रयत्न करावयाचा, त्यासाठी कुठल्या तरी अतिमानवी शक्तीकडून मदत मिळण्याची शक्यता नाही. परंतु तरीही परिवर्तनासाठी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत उभे राहण्याची हिंमत देव आणि धर्मभावनेशिवाय कुठून येते? माणसाला असाध्य असलेल्या; पण श्रेयस्कर वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या मागे तो लागतो (आणि जे श्रेयस्कर आहे त्यालाच आपण मूल्य म्हणतो) स्वत:च्या शक्तीपलिकडे असणाऱ्या एखाद्या मूल्यांसाठी धडपडतो. तेव्हा इतर माणसे त्याच्या बरोबर सहकार्य करतील किंवा त्याला मदत करतील व त्याद्वारे त्याला इष्ट वाटणाऱ्या मूल्यांच्या समीप कोणत्याही देवाचा वा धर्माचा आधार न घेता जाऊ शकेल, यावर त्यांचा आशावाद आधारलेला असतो. कोणत्याही अतिनैसर्गिक शक्तीवर; मग त्या शक्तीला धार्मिकतेचे नाव असो वा पावित्र्याचे, अवलंबून राहणे ही कल्पनाच मुळात माणसाचा तेजोभंग करून त्यांना खच्ची करते. मानवी मूल्यांच्या साधनेसाठी कोणत्याही खोट्या वा खऱ्या धर्मावर अवलंबून राहण्याच्या कल्पनेची तरफदारी आवश्यक नाही. धर्माच्या काही हजार वर्षांच्या प्रदीर्घ काळात मूल्यनिर्मितीसाठी माणूस त्यावर अवलंबून होता. मात्र ही मूल्ये प्रत्यक्षात अवतरू शकली नाहीत. तशी वाटचाल थोडी फार झाली असे कोणाला वाटत असेल, तरी माणसाने स्वत:च्या पायावरच उभे राहून ही वाटचाल करावी, हेच सर्वार्थाने श्रेयस्कर आहे, असे समिती मानते. सर्वांनी मनापासून हे केले तरच मानवजातीला भवितव्य आहे, ही बाब इतकी महत्त्वाची आहे की, स्वत: धार्मिक अंगाने न जाणाऱ्यांनी देखील धर्माच्या आधारे मूल्ये प्रस्थापित करणाऱ्यांचा हात हातात घ्यावयास हवा. माणसाला मदत फक्त माणसाकडूनच मिळू शकते, हे लक्षात घ्यावयास हवे.

धर्माबाबतच्या आणखी एका आयामाची दखल आवर्जून घ्यावयास हवी. धर्माच्या उदयाच्या काळात त्याचे काम समाजाला नीतिनियम आणि कायदे देण्याचे होते. माणसाच्या समाजाच्या बाह्यांगाला, भौतिक जीवनाला आकार देण्याचे होते; परंतु कालौघात माणूस बनल्यानंतर माणसाच्या म्हणून काही गरजा निर्माण झाल्या. भौतिक ठरणाऱ्या परिपूर्तीसाठी बाह्यविश्वात प्रवास करणाऱ्या माणसाला एक माणूस म्हणून अंत:प्रवासाचीही गरज वाटू लागली. माणूस दारिद्र्य आणि विषमतेमुळे असहाय्य बनतोच; त्याबरोबरच मृत्यूच्या निश्चिततेची अंतर्यामी झालेली जाणीवही त्याला एकाकी, असहाय्य बनवते. स्वत:च्या वासनांचे मनातील तांडव त्याला भयचकित करते आणि दया, क्षमा, प्रेम, करुणा या सद्गुणांनी मन मोहरून निघावे ही कल्पना त्याला भुरळ घालते. अलौकिक शक्तीचे अस्तित्व कल्पिणे, दु:खमुक्तीसाठी, वासना विकारावर मात करण्यासाठी सद्गुणांच्या विकासासाठी त्या कल्पित अलौकिक शक्तीला श्रद्धेने अनन्यभावे शरण जाणे हा एक मार्ग मानवाने निवडला; परंतु ईश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध बंडाचा मानवी इतिहासही कमी नाही. अशा वेळी स्वत:ला घडविण्याच्या प्रक्रियेत माणूस आतून एक शक्ती अर्जित करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वत:च स्वत:चा आधार बनतो. दु:खमुक्तीसाठी त्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीस शरण जाण्याची गरज उरत नाही. हा त्याचा अर्जित करण्याचा प्रयत्न त्याला एकट्याला एकाकीपणे करावा लागतो. याला अनेकांनी मअंतर्प्रवासफ असे नाव दिले आहे. ही शक्ती प्राप्त होणे म्हणजेच जगाकडे, निसर्ग, समाज व स्वत:कडे बघण्याची एक स्वतंत्र सम्यकदृष्टी प्राप्त करणे. या दृष्टीमुळे माणसाचे अस्तित्व समाज, निसर्ग आणि स्वत:शी नवे उच्च दर्जाचे नाते जोडतो. मानवी वाटचालीची ही शोकांतिका आहे की, मानवी दु:खमुक्तीसाठी वासनाविकारावरील विजयासाठी नैतिक उन्नयनासाठी जे मार्ग माणसांनी आपापल्या प्रकृतीप्रमाणे शोधले, विकसित केले त्या सर्वांना विशिष्ट धर्मसंप्रदायांनी आपलाच एक भाग मानले. त्याच्यात कर्मकांड घुसवून शोषणाची व्यवस्था अबाधित ठेवली. आपापल्या धर्मसंस्था श्रीमंत अन् दिमाखी बनविल्या. माणसांना मुक्त, शक्तिशाली बनवण्याऐवजी त्यांना अंधश्रद्ध व शरणागत बनविले. माणसांनी कधी आव्हानापोटी, तर कधी स्वार्थी हेतूने धर्ममार्तंडांना प्रतिसाद दिला.
     
सत्याचा शोध हा परिवर्तनासाठी परवलीचा शब्द असतो. या सत्याच्या भावासाठी बाह्यविश्वात धर्माने सांगितलेला सत्याचा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाने माणसाने घेतला. धर्माला त्या क्षेत्रातून माघार घ्यावी लागली. गॅलिलिओला शिक्षा सुनावणाऱ्या पोपला चारशे वर्षांनी का होईना; पण स्वत:ची चूक जाहीरपणे मान्य करावी लागली. मात्र बाह्यविश्वाच्या या चिकित्सेबरोबरच अंतर्विश्वासंबंधी सांगितल्या गेलेल्या अज्ञानमूलक व अंधश्रद्धेवर आधारित बाबींचा त्यागही करावा लागेल. हाच माणसासंबंधी नव्या चिंतनाचा पाया ठरेल. तो कोणत्याही प्रस्थापित धर्माचा भाग असणार नाही किंवा तो स्वत:ला प्रस्थापित धर्मात परिवर्तित करून घेणाराही नसेल. हे नवे चिंतन संपूर्ण मानवजातीला कवेत घेणारे असेल. त्याला जात, वंश, राष्ट्र, धर्म याच्या मर्यादा नसतील, या नव्या चिंतनाला जुन्या धर्माची चिकित्सा आणि विविध ज्ञानशाखांनी मिळवलेली माहिती पोषक ठरेल. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, जीवशास्त्र व समाजशास्त्र यांच्या आधारे हा अंतर्प्रवास पुढे जाईल. माणूस म्हणून माणसाच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत, याचे भान आले की, त्याच्या पूर्ततेसाठी होणारे प्रयत्न ओझे न वाटता आनंददायी कृती वाटेल. हे नवे चिंतन प्रस्थापित धर्मांना एका पातळीवर पर्याय देईल. त्याच्या अभावी माणसे अधिकाधिक अंधश्रद्ध बनतील वा टोकाची भोगवादी बनतील. या दोन्ही गोष्टी मानवी जीवन सार्थ बनवणाऱ्या नाहीत. या नव्या चिंतनाला कोणते नाव द्यावयाचे हा एक प्रश्न आहे. त्याच्यासाठी अद्याप तरी कोणत्याही भाषेत नवा शब्द निर्माण झालेला दिसत नाही. जो शब्द शोधला जाईल तो निश्चितपणे धर्म असा नसेल. धार्मिक भावनांचा, धर्माचा पूर्ण आदर करूनही वरील सर्व मांडणी धर्मभावनेच्या पलिकडे जाणारी, कृतिशील मानवतावादी व नैतिकदृष्ट्या उत्क्रांतीवादी आहे. तोच समितीच्या विचारांचा रस्ता आहे.                    
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००८)




मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 2/3)




धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 2/3)
दाभोलकर, धर्मचिकित्सा, यातुधर्म, नैतिकता, मानवीयता, कर्मकांड, विवेकवाद, मनुस्मृती  
धर्माचे भाग
व्यवहारात जी धार्मिकता येते, त्यामध्ये प्रथा, रूढी, चाली-रीती असतात. उपासनापद्धती असते, पुरोहितशाही व कर्मकांडे असतात, समाजव्यवस्था व नियमन असते आणि अहिंसा, सत्यपरिग्रह अशी उच्च नैतिक मूल्येही असतात. या सर्वांच्या मिलाफातूनच धर्म साकार होतो आणि धर्मपण व्यक्ती मानसात, समाजमानसात एकवट मुरलेले असते.
     
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना किंवा धर्मनिरपेक्ष पद्धतीने समाजजीवन घडवताना याचा विचार सारासार विवेकाने करावयास हवा. धर्माच्याच नावाने बळकट झालेल्या रूढी, परंपरा सर्वच धर्मांत प्रगतीचे अडथळे ठरत असतात. चुकीच्या मार्गाने समाजाला नेत असतात. उदाहरणे नेहमीची आहेत; पण त्याबाबत प्रश्न विचारणेच लोकांना आक्षेपार्ह वाटते. मुलगी ही दानपात्र वस्तू समजून मोठ्या हौसेने कन्यादान केले जाते. स्वत:चा कोणताही अपराध नसताना विधवा बनलेल्या स्त्रीला हळदी-कुंकवात अघोषित मज्जाव असतो. शुभकार्यात तिचे पांढरे पाऊल न पडेल, याची दक्षता घेतली जाते. कन्यादान होत असताना स्वत:च्या पोटात जिने मुलीला वाढविले, तिला तो हक्क वैधव्यामुळे नाकारला जातो. कन्यादानाची प्रथा चूकच आणि त्यामध्ये विधवा झाली, या कारणासाठी आईला दूर ठेवणे ही तर महाचूक. वेळेचे अपरंपार महत्त्व असलेल्या आजच्या गतिमान समाजात प्रत्येक पिंडदानाच्या कार्यक्रमावेळी स्मशानात शेकडो लोक पिंडाला कावळा कधी शिवतो, याची वाट पाहत हजारो तास वाया घालवतात. एका विवाहाला ५ ते १० किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात आणि महाराष्ट्रात दरवर्षी तीन लाख लग्ने होतात. याचा अर्थटंचाई असलेला सुमारे ३० लाख किलो तांदूळ रंगवून म्हणजे खाण्याला निरुपयोगी बनवून अक्षता टाकणे, या रुढीपायी उधळला जातो व शब्दश: पायदळी तुडवला जातो. मुसलमान समाजात तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द तोंडी उच्चारला तर केवढेही दीर्घ विवाहबंधन संपुष्टात येते. लग्न हा करार असल्याने तलाकपीडित पत्नीला पोटगी देण्याचीही गरज उरत नाही. मूल होण्याची अजिबात शक्यता नसली तरी जोडप्याला मूल दत्तक घेता येत नाही. या रुढींना धर्माचे प्रामाण्य द्यावयाचे का, हे पदोपदी प्रश्नचिन्हांकित करावयास हवे.

आपापल्या दैवताची उपासना कशी करावी? आपले पारलौकिक कल्याण कसे साधावे? हा खरे तर ज्या-त्या व्यक्तीचा प्रश्न आहे आणि त्याचा अधिकारही. पण त्यासाठी जे केले जाते त्यामध्ये फक्त आंधळेपणाच असेल, तर व्यक्तिगत धार्मिक उपासना म्हणून त्याचा आदर करावयाचा की सारासार माणूसपण गहाण पडते म्हणून त्याचा अव्हेर करायचा! महाराष्ट्रातल्या जत्रा-यात्रांत पावलोपावली हा प्रश्न पडतो. देवाला केलेला नवस फेडण्यासाठी पळत येऊन मंदिराच्या दगडी भिंतीवर टक्कर देऊन डोके फोडून घेणे, पाठीच्या कातडीतून धारदार गळ आरपार घालून घेणे, बैलगाडीवर ठेवलेल्या काठीच्या बगाडाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत टांगून ठेवून ती बैलगाडी पळवत नेणे, नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने देवापुढे बोकड मारून रक्तमांसाचा चिखल करणे, धुळीत लोटांगणे घालत देवळाला प्रदक्षिणा घालणे अशा सर्व बाबी त्या-त्या व्यक्ती वा संप्रदाय यांच्या लेखी उपासनापद्धतीच असतात. आरती किती वेळा करावी? नमाज किती वेळा पढावा? गायत्री मंत्राचे पठण किती वेळा करावे? रूद्राक्षाची माळ कितीदा ओढावी? रोजे किती कडक पाळावेत? मांसाहार पूर्णपणे सोडावा, सूर्यास्तापूर्वी भोजन उरकून घ्यावे, अग्निहोत्राने स्वत:ची अध्यात्मिक चलती साधावी, अशा उपासनेच्या प्रत्येकाला इष्ट वाटणाऱ्या आणि फलदायी ठरणाऱ्या या पद्धती या इतर कोणाला अर्थहीन आणि अनावश्यक वाटल्या, तरी त्याचे आचरण करण्याचा व आपले लौकिक व पारलौकिक कल्याण साधण्याचा व्यक्तीचा अधिकार मान्यच आहे. परंतु डोळसपणे त्याची कालयोग्य चिकित्सा करण्याचा अधिकारही मान्य व्हावयास हवा की नको? दगडूशेठ हलवाई गणपतीपुढे काही वर्षांपूर्वी अग्नीत लक्ष मोदकांची आहुती दिली. ते उपासना स्वातंत्र्य म्हणून मान्य करावे काय? वैराग्याची मूर्ती असणाऱ्या बाहुबलीच्या मस्तकावर शेकडो लिटर दही, दूध, तूप, मध यांचा वर्षाव धर्मउपासनेची सुसंगत की विसंगत? कालबाह्य धार्मिक व्रते ही धार्मिक उपासनेचा भाग केल्याने कोणते धर्माचरण साधते, याचा विचार सूज्ञपणे करावयास हवा, असे समितीला वाटते.

धर्माचा विषय खरे तर ईश्वर आणि मनुष्य यांचा संबंध हा आहे. परंतु संपूर्ण मानवी जीवनाला गवसणी घालण्याच्या धर्माच्या प्रवृत्तीमुळे धर्म आणि नीती ही एकमेकांशी कायमची जोडली गेली आहे; किंबहुना धर्माशिवाय नीती असून शकते, अशी कल्पना करणेसुद्धा माणसाला जड जाते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत सुसंवाद असावा, सहकार्याची भावना नांदावी, सर्व माणसांच्या मूलभूत गरजांची परिपूर्ती आणि व्यक्तित्त्वाचा विकास सामूहिक प्रयत्नातून व्हावा, यासाठी नीतिमूल्ये व नीतिनियम यांची आवश्यकता असते. नीतीच्या या कार्याचा तसा धर्माशी काही साक्षात् संबंध नाही. तेव्हा धर्माशिवाय नीती संभवतच नाही, ही कल्पना चुकीची आहे. वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली आजतगायत जवळपास सर्व धर्मांत अनीतीची व क्रूरपणाची कृत्ये घडली आहेत. जगाच्या इतिहासात धर्माच्या प्रेरणेनुसार अटीतटीचे झगडे झाले आहेत. रक्तपात व कत्तली झाल्या आहेत. सर्वांत भयावह म्हणजे या अमानुष नरसंहाराचा अभिमानच बाळगला गेला आहे. कारण ही सर्व कृत्ये धर्मासाठी केलेली असल्यामुळे धर्मकृत्ये होती. त्यामुळे ती नैतिकच आहेत, असे मानले गेले. सत्य, अहिंसा, समता, दया, क्षमा, सहिष्णुता इत्यादी सर्वमान्य मूर्त नीतितत्त्वे आणि सामाजिक जीवनातील त्याचा व्यवहार यात फरक असतो, रीती म्हणून उच्च तत्त्वाचा उद्घोष करणे सोपे असते; परंतु माणसाचा नैतिक व्यवहारही समाजव्यवस्थेच्या एका चौकटीतच होत असतो. त्या व्यवस्थेचे स्वरूपच व्यावहारिक नीतीला जन्म देते. त्या व्यवस्थांमध्ये परिवर्तनाचा विचारही केला जात नाही. अमूर्त नीतितत्त्वाचा जयजयकार आणि व्यवहारात संस्थाअंतर्गत अनीतीला धर्ममान्यता असा अंतर्विरोध धर्मात आणि हिंदू धर्मात तर फारच ठळकपणे दिसून येतो. हिंदू धर्मातील तत्त्वचिंतकांना, साधू-संतांना अस्पृश्यता, स्त्रीदास्य, शूद्रांचे सर्व प्रकारचे शोषण या गोष्टी गंभीरपणे अनीतिमूलक आहेत, अशी शंकासुद्धा आली नाही. जमीनदार, सावकार, पुरोहित, राजा, शासनसंस्था यांच्याद्वारे कित्येक शतके कष्टकरी लोकांचे जे राजरोस शोषण चालू होते, त्यात पुरेपूर अनीतीच आहे, असे त्या-त्या काळातील जाणत्या जबाबदार व अत्यंत धार्मिक लोकांनाही कधी वाटले नाही. समग्र समाजजीवनच अंतर्विरोधाने भरलेले होते. अजूनही ते तसेच आहे. त्यामुळे धर्माच्या आधारे नीतिमान समाजाची निर्मिती करण्याचा पुकारा करणाऱ्या शक्तींची चिकित्सा करण्याची गरज आहे. धर्म आणि नीती यांच्या या स्वरुपामुळे हिंदू माणसाच्या मनावर एका विशिष्ट प्रकारचे संस्कार झाले आहेत. व्यक्तिगत जीवनातील नीतिनियम तो पाळतो; पण सामाजिक नीतीबाबत उदासीन असतो. स्वत:चे शरीर, घर कटाक्षाने स्वच्छ ठेवले जाते; पण रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले असले तरी त्याबद्दल काही वाटत नाही. उलट सहजपणे त्या ढिगात स्वत:च्या घरातील कचरा नेऊन टाकला जातो.
     
आपल्या सामाजिक जीवनात जिकडे-तिकडे स्वार्थीपणा व भ्रष्टाचार बोकाळला आहे. धर्मश्रद्धेचा लोप झाल्याचा हा परिणाम आहे, असे सनातनी लोक म्हणत असतात. धर्मबंधने सैल झाल्यामुळे नीती, अनीतीचा धरबंद राहिलेला नाही, हा कार्यकारणभाव पटण्याजोगा नाही. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लोक परंपरागत धर्मातील रूढ आचार पाळण्यात सर्वांत पुढे असतात, ही खेदजनक वस्तुस्थिती सर्वत्र व सर्व धर्मात दिसते. तीर्थयात्रा, दान-धर्म, व्रतवैकल्ये, जप-ज्याप्य हे सर्व काही व्यवस्थित चालू असते. खऱ्या विशुद्ध नैतिक धर्माशी त्यांचे काही देणे-घेणे नसते. म्हणून एका बाजूला धर्माचा उदंड उदो-उदो आणि त्याच वेळेला दुसरीकडे आकंठ भ्रष्टाचारात बुडालेला समाज, असे चित्र आज आपल्या देशात दिसते. भ्रष्टाचाराने स्वत:चा सर्व प्रकारचा अनैतिक स्वार्थ साधणाऱ्या सामान्य जनानांच नव्हे, तर त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कथित धार्मिक वृत्तीच्या नेत्यांना यामध्ये काही चूक आहे, असे वाटत नाही. म्हणूनच समाजातील अनेक अपप्रवृत्तींचा संबंध धर्मश्रद्धेच्या लोपाशी आहे, हे नाकारावे लागते. या अपप्रवृत्ती सध्याच्या अर्थरचनेने व एकंदर समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत व जोपासलेल्या मनोवृत्तीत आहेत. धर्माच्या आधारे व्यक्ती आणि समाज अधिक नीतिमान करणे हे ज्यांना करावयाचे असेल त्यांना तसे स्वातंत्र्य भारताच्या घटनेनेच दिले आहे; परंतु प्रत्यक्षातील आचरणाच्या कसोटीवरच त्याचे मूल्यमापन कठोरपणे करावयास हवे. नीतिमान समाजासाठी धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, मानवतावादी विचारसरणीचा व त्या मूल्यभावनांचा सर्वत्र प्रसार होऊन त्याला समाजाची मान्यता मिळणे, हीच आजच्या काळाची गरज आहे.
     
धर्मातील रूढी, परंपरा, कर्मकांडाद्वारे व्यक्त होतात. कर्मकांडे ही कोणत्याही मानवी संस्कृतीत आहेत आणि असणारच. ती माणसाच्या परस्परसंवादाची आणि उपजत कृतज्ञता बुद्धीची आविष्कार असतात. मात्र शोषणाला पूरक आणि मिथ्याकथनाचा आधार घेणाऱ्या कर्मकांडांना विरोध करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की, ‘खुळचट कर्मकांडांनी देश भिकेला लागला.’ व्यक्तीने कोणती कर्मकांडे करावीत? याचे वर्णन करणाऱ्या ‘राजतरंगिणी’ या प्राचीन ग्रंथात, वर्षभरात करावयाच्या एकूण ७०० कर्मकांडांचा उल्लेख आहे. याचा अर्थ व्यक्तीला त्यापलिकडे काही सवड शिल्लकच राहत नाही. केली कर्मकांडे तर बिघडले काय, असा प्रश्न सतत विचारला जातो. कर्मकांडांचे तोटे अनेक आहेत. एक तर कर्मकांडप्रधान व्यक्ती आणि समाज बौद्धिकदृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहारास दुय्यम स्थान देतात, त्यामुळे सामाजिक अवनती होते. उदा. संशोधन मागे पडते. दुसरे असे की, ज्या समाजात अशा कर्मकांडांचे स्तोम माजते, त्या समाजाची आर्थिक पीछेहाट होते. आर्थिक व्यवहारात लागणारा उत्साह व उपक्रमशीलता भजन-पूजनात जातो. श्रीमंतांनाच ते परवडते आणि कथित मोक्षाचे धनीही तेच होतात. तिसरे असे की, कर्मकांडे हा एक प्रकारचा बहिर्मुख निवृत्ती मार्ग आहे. व्यक्ती त्यामुळे आत्मकेंद्रित होते आणि परलोकाच्या कल्पनेत अडकते. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरोहित वर्गाचा स्वार्थ साधला जातो. ज्या परमेश्वराच्या उपासनेसाठी कर्मकांडे केली जातात, तो परमेश्वर मानणाऱ्या संतांनाही त्याची गरज लागत नाही. परमेश्वराचे नुसते नामस्मरणही त्याला पोचते, असा त्यांचा विश्वास असतो. खरा प्रश्न असतो, तो असा की, भावना परोपकाराची हवी, नीतीची हवी. ही भावना नसून कर्मकांडे असतील तर त्याचा उपयोग शून्य आणि ती असतील तर कर्मकांडांची गरजच नाही. ज्या कर्मकांडात नैतिक नियमांना प्राधान्य असते, त्यांना व्रते म्हणतात. उदा. सत्य भाषण. तेव्हा धर्मातील कर्मकांडाचा भाग साक्षेपाने विचारात घ्यावयास हवा.
     
धर्माचा आणखी एक भाग पुरोहितशाहीचा आहे. परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेली ही दलाल व्यवस्था आहे. परमेश्वराला जे-जे काही द्यावयाचे, ते-ते पुरोहितामार्फत देण्यात येते आणि व्यवहारात पुरोहित त्याचा उपभोग घेतो. बहुतेक धर्मात ही व्यवस्था दिसते. परमेश्वराकडे पोचण्याचे एक शास्त्र आहे आणि प्रत्येक कार्य जसे त्याला कार्याशी प्रशिक्षित तज्ज्ञाला दिले जाते, त्याच पद्धतीने देवाच्या पूजेचे कार्य हे प्रशिक्षित पुरोहित करतो, असा युक्तिवाद केला जातो. यात तथ्य नाही, असेच मानावयास हवे. देव आहे की नाही, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू; पण तो आहे, असे मानले तरी त्याची जी गुणवैशिष्ट्ये आणि थोरवी वर्णिली आहे. त्याच्याशी कोणत्याही स्वरुपातील मध्यस्थाची कल्पना ही अनावश्यक व विसंगत ठरते. प्रत्यक्षात एका बाजूला ती बहुसंख्य ठिकाणी एका जातीतच बंदिस्त झाली आहे. ज्याला पुरोहित अथवा पुजारी व्हावयाचे असेल, त्याचा अभ्यासक्रम तयार करावा व तो उत्तम प्रकारे उत्तीर्ण होणाऱ्या कोणाही स्त्री-पुरुष व्यक्तीस ते स्थान द्यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ सालीच केली होती.
     
नीती हा धर्मातील चौथा भाग आहे. मानवाच्या मनात नीतीची भावना धर्मामुळे येते. नीतीने वागले नाही तर भीती वाटते ती धर्माची आणि सगळे जग माझ्याविरोधी गेले तरी चालेल; पण मी नीतीनेच वागेन, अशी हिंमतही सामान्य माणूस धार्मिक नीतीच्या आधारेच बाळगतो, असे धर्माचे समर्थक सांगतात. संघटित धर्माचा उदय हा मानवी जीवनात नीतीची स्थापना करण्यासाठी झाला आणि तसा प्रयत्न धर्माने चुकत-माकत केलाही आहे. धर्माचा आधारच काढून घेतल्यास माणूस अनीतिमान होणार नाही का, समाज नीतिभ्रष्ट बनणार नाही का, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तरातील पहिला भाग असा की, कोणीही व्यक्ती जर असा दावा करत असेल की, ‘ती नैतिक जगते. याचे कारण तिला तिची धर्मभावना, नैतिक जगण्याची शक्ती देते,’ तर अशा व्यक्तीबद्दल समितीला आदर वाटतो. नीतीने जगणे ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे, असे समिती मानते. मात्र याबाबत एक अपेक्षा समिती बाळगते. चांगल्या आचरणाचे आदेश सर्व धर्म प्रवर्तकांनी दिले आहेत. सत्य बोलावे, हिंसा करू नये, दयाभाव बाळगावा, प्रेम करावे. या नियमांची आवश्यकता व उपयोगिता नाकारता येत नाही; पण परिस्थिती अनेकदा अनपेक्षित असते, वेगळी असते. नीतिनियमांना बाधा आणण्यावाचून गत्यंतरच उरत नाही. सत्य बोलावे हे ठीक; पण रोगी ज्यावेळी स्वत:च्या प्रकृतीबद्दल विचारतो, तेव्हा सर्व सत्य सांगणे अपायकारक ठरण्याची शक्यता असते. घरात विषारी नाग निघाला तर अहिंसेचे पालन योग्य ठरत नाही. यामुळे नीतिनियम व आचरण यांचा मेळ घालणे अवघड बनते. यासाठी या विसंगतीचा निचरा करून सगळ्या इष्ट नीतिकल्पनांना सामावून घेणारे व्यापक तत्त्व असणे आवश्यक आहे. वरील धार्मिक नीतिनियमांचे पालन करावे, असे म्हणण्यात हेतू असतो की, हे नियम चांगले आहेत. विशिष्ट परिस्थितीत सत्य बोलावे की बोलू नये, हिंसा करावी की करू नये, याबद्दल मतभेद असत नाहीत. कोणकोणते वागणे चांगले, याची मोजदाद शक्य नाही त्यापेक्षा चांगले या शब्दाने कोणता अर्थ सांगितला जातो, हे पाहणे उपयुक्त ठरेल. चांगले या संज्ञेचा हा अर्थ, म्हणजे विवेकवादाचे सर्वसमावेशक व्यापक तत्त्व होय. याचा अर्थ एवढाच की, धर्मांनी सांगितलेली नीती ही देखील विवेकवादाच्या आधारे तपासता येऊ शकते. धार्मिक नीतीचा दुसरा भाग असा की, जो संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोचवीत असत. त्यांच्या मते भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, अडाण्याला शिक्षण, बेघराला घर, आजाऱ्यांची शुश्रुषा, प्राण्यांना अभय, हाच धर्म होता. रूढ धार्मिक नीतीला या मानवधर्मी नीतीने प्रभावित केले गेले पाहिजे. धार्मिक नीतीबाबत तिसरा महत्त्वाचा लक्षात ठेवण्याचा भाग असा की, इतिहासात असे घडले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार करण्याची रीत सर्वांत प्रभावी बनली. सर्वांवरील सर्वोच्च मूल्य, असे धर्माला मानण्यात आले. याची आता गरज नाही. विविध धर्म आणि त्यातील धार्मिक माणसे जी मानवी मूल्ये मनोमन मानतात, त्या मूल्याकडे केवळ मानवी मूल्य म्हणून बघता येणे शक्य आहे. निकोप सामाजिकता, सौंदर्यविषयक मूल्य, न्याय, समता, बंधुभाव या कल्पना तर धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही. व्यक्ती धार्मिक असो वा नसो; प्रत्यक्ष अनुभवातून तिला असे वाटते की, मानवी जीवन सतत जास्तीत जास्त सुधारता येणे शक्य आहे. ही वाटचाल नैतिकतेची आहे. ती विवेकाच्या आधारे करता येते, असे समिती मानते. मात्र धार्मिक नीतीच्या आधारे प्रामाणिकपणे हे कोणी करू इच्छित असेल तर समिती त्याचे स्वागतच करते.
     
धर्माला समाजव्यवस्था-शास्त्र हा एक महत्त्वाचा अर्थ आहे. लोकमान्यांच्या गीता रहस्यातील पुढील उल्लेख पाहावा. धर्म हा शब्द नित्य व्यवहारात कित्येकदा निव्वळ पारलौकिक अर्थी वापरतात. आपण एखाद्यास तुझा धर्म कोणता?’ असा प्रश्न करतो, तेव्हा पारलौकिक कल्याणार्थ तू कोणत्या मार्गाने जातोस, वैदिक, बौद्ध, जैन, ख्रिस्ती की महम्मदी असे विचारण्याचा आपला हेतू असतो आणि तोही त्याप्रमाणे उत्तर देतो. ‘अथा तो धर्मजिज्ञासा’ या सूत्रालाही धर्माचा हाच अर्थ अभिप्रेत आहे. पण एवढाच अर्थ धर्म या शब्दाचा नाही. उदा. चतुर्विध पुरुषार्थाची गणना करताना धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे म्हणतात. यातील धर्म या शब्दातच मोक्ष (पारलौकिक धर्म) येत असेल तर शेवटी निराळा पुरुषार्थ सांगण्याची गरज नव्हती. धर्म या शब्दात तत्कालीन समाजव्यवस्था शास्त्र हाच अर्थ विवक्षित असतो.
     
तेव्हा धर्म म्हणजे रूढी, परंपरा, उपासनापद्धती, सज्जनपणा, सद्गुण एवढाच अर्थ नाही. आम्हाला धर्माचे राज्य स्थापन करायचे आहे, असा पुकारा या देशात अनेकजण करतात. त्यावेळी त्यांचे दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळे असतात. धर्म याचा अर्थ लोकांना सांगण्यासाठी नैतिक व सांस्कृतिक मूल्यांना असलेली एकूण निष्ठा हा असला तरी व्यवहारातील अभिलाषा, धर्माच्या आधारे समाज नियंत्रणाची असते. समाजव्यवस्थाशास्त्र हा गुलामगिरीच्या व सरंजामशाहीच्या काळात धर्माचा विषय होता. आधुनिक काळात समाजव्यवस्थाशास्त्र हा राजकारणाचा विषय आहे; धर्माचा नव्हे.
     
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातील भूमिका धर्माबाबत तटस्थपणाची आहे. याचा अर्थ भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेले देशउभारणीचे स्वरूप व तत्त्व मोडीत काढून ते विशिष्ट धर्माचे राष्ट्र म्हणून उद्घोषित करण्याचा काही मंडळींच्या उपद्व्यापाचा प्रतिवाद वा प्रतिकार करायचा नाही, असे मुळीच नव्हे. उलट या कारस्थानातील व्यापक धोके लोकांना समजावून सांगणे हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक आशयाशी अत्यंत सुसंगत आहे. देशातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण याचा आधार तथाकथित संत-महंताची धर्मसंसद नक्की करेल, अशा वल्गना या देशात सतत करणाऱ्या बलाढ्य संघटना आहेत. यामुळे हे कधी नव्हे एवढे आवश्यक झाले आहे.
     
धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व मोडीत काढणे हे पूर्णत: संविधानविरोधी आहे, अशी ग्वाही सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिली आहे. धर्माच्या आधारे मते मागितली आणि निवडून आले तरी निवडणूक रद्द होते. कारण एक माणूस, एक मत, एक मूल्य या पायाभूत कल्पनेलाच त्यामुळे सुरूंग लागतो. धर्माचा प्रभाव राजकारण, समाजकारण एवढेच नव्हे, तर जीवनाची सर्व अंगे यावर घट्ट पाडण्याचा ब्राह्मणी धर्माचा शेकडो वर्षांचा अनुभव असताना तर ही गरज अधिकच जाणवते. मनुस्मृतीमधले राजकारण राजाने दंडसत्तेचा वापर कसा करावा, याबद्दल आहे. त्यात भयानक वर्ण विषमता आहे. एक चोरी सोडून बाकीच्या सर्व गुन्ह्यांबद्दल ब्राह्मणांना सौम्य शिक्षा आहेत. इतर वर्णियांना चढत्या क्रमाने शिक्षा आहेत. शूद्रांकरिता क्रूर, अमानुष अशा शिक्षा सांगितल्या आहेत. राजाने दंडसत्तेचा वापर अप्रतिहत करावा, नाहीतर अराजक माजेल असा इशारा मनुस्मृती देते; पण मनूची अराजकाची व्याख्या काय आहे?
     
तर कावळे, कुत्रे यज्ञातील पायसादी हवन लांबवतील, शूद्र सामर्थ्यवान होतील. वर्णसंकर होईल. मनुस्मृतीच्या ९ व्या प्रकरणात मनूने स्त्रियांच्या स्वाभाविक प्रवृत्तीविषयी जे शेरे मारले आहेत, ते वाचताना आज कुठल्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाईल. अर्थात, बहुतेक सर्वच धर्मशास्त्रांमध्ये स्त्रिया, शूद्रातिशूद्र यांना धर्माच्या नावाने अमानुष वागणूक दिली आहे. बोहरा धर्मगुरू धर्माच्या आधारे त्यांच्या धर्मातील लोकांवर जी दंडेली आज राजरोसपणे करतात किंवा परदेशगमनासाठी वाहनांचा वापर केला म्हणून जैन साध्वींना धर्माचार्य धर्मबहिष्कृत करतात, त्यामध्ये धर्मदंडाच्या आधारे व्यक्ती, समाजव्यवस्था नियंत्रित करण्याचा दुराग्रह स्पष्ट दिसतो, या सर्वांचा प्रतिवाद आवश्यकच आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य ही सारासार बुद्धी वापरण्यास व्यक्तीला प्रवृत्त करणारी चळवळ आहे. हे राष्ट्र हिंदूंचे व्हावे म्हणून प्रचार करणारे हे सध्या सारासार बुद्धीने समजणाऱ्या सत्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत काय, अशी शंका येते. राष्ट्र हिंदूंचे झाले तर मुसलमानांचे करायचे काय? एकतर सर्व बारा कोटी मुसलमानांना देशाबाहेर काढावयास हवे, जे अशक्य आहे. त्यांना ठार मारून नष्ट करणे हे त्याहूनही अमानुष आणि अशक्य आहे. युद्ध करणे आणि त्यांना गुलाम करणे हे कदाचित ७० कोटी हिंदूंना वरपांगी शक्य होईलही; परंतु शस्त्रास्त्रे कोठूनही मिळणाऱ्या आजच्या जमान्यात हा उपाय म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:ची उद्ध्वस्ततेकडे आणि अराजकाकडे वाटचाल ठरेल. हे सारे स्वच्छपणे समजत असताना एकच गोष्ट उरते ती म्हणजे न्यायाचे, बंधुतेचे, प्रतिष्ठेचे सहजीवन जगण्याची. हे सर्व लक्षात घेता अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे मानते की धर्मातील नैतिक आशयांच्या आचरणाबाबत धार्मिक व्यक्तीसमवेत संवादी व कृतिशील भूमिका घ्यावी. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेच्या चोख अंमलबजावणीचा आग्रह धरावा आणि विवेकवादी जीवनदृष्टीने जगत असताना कोणत्याही धर्माला एक समग्र पर्याय देण्याचा प्रयत्नही करावा. धर्माच्या नावाने कुठल्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषणाची चिकित्सा करावयास हवी व शक्यतो प्रतिकारही करावयास हवा, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते. घटनेचीही या दृष्टिकोनास संमती आहे. कोणत्याही धर्माच्या आचाराशिवाय स्वत:च्या विवेकाच्या साह्याने नैतिकदृष्ट्या संपन्न जीवन जगता येते.
     
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००८)
क्रमशः




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...