अध्ययन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अध्ययन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

वाचेल तो वाचेल



वाचेल तो वाचेल
दाभोलकर, वाचन-लेखन-चिंतन, अध्ययन, व्यापक परिवर्तन
एका शाखेची बैठक. नियमित कार्यरत असलेले आठ-दहा कार्यकर्ते उपस्थित. मला एका ठिकाणी विचारलेला प्रश्न चर्चेला घेतला. प्रश्न होता, ‘मानसिक आजार बरे होतात का हो?’ सर्वांना विचारले. उत्तरे अपुरी होती. काही चक्क चुकीची होती. नेमके मुद्देसूद उत्तर एकही नव्हते. मन आजारी का पडते? सौम्य व गंभीर मानसिक आजारातील फरक, उपाय कोणते? त्याची परिणामकारकता व मर्यादा, या मुद्द्यांना स्पर्श करणारे, समोरच्या व्यक्तीचे समाधान करू शकणारे उत्तर मिळाले नाही. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाची शिबिरे आता खूप होतात. शिबिरार्थी शिक्षक असतात. त्यांचेही चपखल समाधान होत नाही, असे अनेकदा कळते. असे का घडते? वाचणे, वाचलेले पचवणे, ते मुद्देसूदपणे प्रकट करणे, याला वैचारिक चळवळीत पर्यायच नाही. याकडे गांभीर्याने आणि आवडीने आपण लक्षच देत नाही, असे घडते आहे का? चमकदार उपक्रम आणि सतत काही कामाचा रेटा यामुळे वाचणे तेवढेसे महत्त्वाचे नाही, असे तर आपणास वाटू लागलेले आहे काय? कार्यकर्त्यांनी संघटनेत, वार्तापत्रात यावर मनमोकळेपणे बोलावयास, लिहावयास हवे. हा प्रश्न तसा जुनाच आहे. अंधश्रद्धांच्या बाबत लोकांच्या मनात जे प्रश्न सतत येतात, त्यांची उत्तरे पटतील अशी देणे, हे तर आपले कर्तव्यच आहे. परंतु त्यापलिकडेही आता त्याचा संघर्ष गेला आहे म्हणून तो पुन्हा घेतला. पुण्याच्या मेळाव्यात आलेल्या सहकाऱ्यांना हे निश्चित जाणवले असणार की, समिती व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग होण्याची गरज मेळाव्यात आलेले अनेक मान्यवर वक्ते व्यक्त करत होते. त्याचा अर्थ असा नव्हे की, भ्रष्टाचार, पर्यावरण, स्त्री-पुरुष समता आणि अशा अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांच्या लढ्यात समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट उतरावयाचे. मग काय करावयाचे? त्याचे सूत्र म्हणजे विचार वैश्विक करा, कृती स्थानिक करा. आपल्या आजूबाजूला बरेच काही घडत असते. अंधश्रद्धा जोपासणारे, अविवेकी बनणारे, अपरिहार्यपणे अंधश्रद्धांना शरण जाणारे व्यक्तिगत सामाजिक मन त्यामधून घडत असते. वैचारिक पातळीवर हे समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कार्याचे व्यापक सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ, समाजातील आपली वृत्ती अंधश्रद्धेच्या क्षेत्रात राहील; पण जाणीव वैश्विक राहील. हे घडावे कसे?




अड्डा संस्कृती व वालेचिं
अड्डा या शब्दाचा अर्थ गप्पा-टप्पा करण्याची, चहा पिण्याची, पत्ते खेळण्याची ठराविक मंडळींची जागा, असा केला जातो आणि एका मर्यादेत तो खराही अहे. पण पुरोगामी चळवळीत या शब्दाला विचारांची अनौपचारिक; पण जोरकस देवाणघेवाण जेथे घडते ते केंद्र असा देखील एक अर्थ अनुभवसिद्धपणे चिकटला आहे. संघटनेच्या बैठकीची शिस्त अड्ड्यावर नसते, वेळेचे बंधन नसते आणि यावयास हवेच, असा आग्रहही नसतो; पण तरीही अधून-मधून अड्ड्यावर चक्कर टाकली नाही, तर संबंधितांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत असते. याचे कारण एक मनमोकळी, निकोप, ताजीतवानी देवाणघेवाण तेथे सुरू असते. विचाराला नवनवे खाद्य मिळत असते, संदर्भ मिळत असतात. समज आपोआप प्रगल्भ होत असते. पुस्तके वाचणे, शिस्तशीरपणे विषय ठरवून चर्चा करणे, यापेक्षा स्नेहबंधातील अनौपचारिक संवाद एक वेगळी समज व समृद्धी देत असतो. डाव्या चळवळीत त्यांच्या जनसंघटना जेव्हा जोरात होत्या, तेव्हा अर्थातच ही अड्डा संस्कृती बहरात होती. आज ती सर्वत्र याच स्वरुपात असेल, असेही नाही; पण नवीन वाचावे, वाचलेले इतरांना सांगावे, त्यांच्याशी वाद-संवाद-विवाद करावा, अशी भूक असणारी माणसे, छोटे-मोठे गट सर्वत्र असतात. शिस्तशीर वैचारिक अभ्यास करावयाला वेळ नसला तर अशा अड्ड्याशी कार्यकर्त्यांनी जरूर संपर्क ठेवावा. स्वत:चा अड्डा तयार करता आल्यास फारच चांगले. त्यामुळे वैचारिक कक्षा सहजपणे रुंदावल्या जातील. स्थानिक संघर्ष करता-करता व्यापकतेचे भान वाढत जाईल.

 वालेचिं’ मंडळ
वालेचिं मंडळ हा खरे तर आपल्याच धुळे शाखेने केलेला उपक्रम. वा-वाचन, ले-लेखन, चिं-चिंतन. हे तसे ठरवून करावयास हवे आणि शक्य तर सामूहिकपणे. आपल्या चळवळीच्या विचारस्पष्टतेसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. वाचन आपण करतोच (असे आपण गृहीत धरूया) वाचलेले वा वाचनाशी सुसंगत असलेले विचार लिहून काढणे हे बहुधा कोणीच करत नाही. लिखाणाचा सर्वात सोपा; पण प्रभावी मार्ग म्हणजे वृत्तपत्रीय पत्रलेखन. त्या-त्या जिल्ह्यातील वा विभागातील वृत्तपत्रात आपल्या विचाराचे प्रतिबिंब पाडण्याचा एक परिणामकारक मार्ग पत्रलेखनातून मिळतो. आपल्या चळवळीशी संबंधित विचाराला तर तोटाच नसतो आणि बहुधा ती पत्रे छापली जातात आणि वाचलीही. अर्थात लेखन म्हणजे ते हेच, असा गैरसमज मात्र कृपया याबाबत कोणी करू नये. वाचलेले नीटपणे शब्दबद्ध करण्याची सवय लागली तर ती खूप फायद्याची ठरतेच; शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू मिळतो. लेखन दैनिकातील पत्रव्यवहाराचे असो वा चळवळीच्या वैचारिक मांडणीचे; पण त्यासाठी चिंतन हे लागतेच. याची जाणीवपूर्वक तयारी करण्याचा प्रयत्न करणारा वालेचिं मंडळाचा उपक्रम म्हणून महत्त्वाचा. जो वाचेल, तो वाचेल असे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते. वाचणे, पचविणे, लिहिणे आणि दुसऱ्याला समजावणे हीच तर आपल्या चळवळीची शस्त्रे आणि अस्त्रे. ती सदैव धारदारच ठेवावयास हवीत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९७)

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

प्राथमिक अध्ययनाची गरज



प्राथमिक अध्ययनाची गरज

दाभोलकर, विवेकवाद, वैचारिक शिबीर, अध्ययन, वाचन
विवेकवादाचे शिबीर सातारला झाले. मे महिन्यातील महाराष्ट्र पातळीवरच्या बैठकीत असे शिबीर घेण्याचे ठरले होते. कार्यकर्त्यांचे वैचारिक भान सकस करण्यासाठी. शिबीर घेतले, या विषयाचे भारतीय पातळीवरचे गाढे अभ्यासक प्रा. मे. पु. रेगे यांनी. या विषयावरचा त्यांचा व्यासंग व अधिकार सर्वमान्य आहे. कोणत्याही स्वरुपात प्रवासखर्च वा मानधन न घेता ते आले होते. निवास, भोजनाचा सर्व खर्च एकता शिक्षण प्रसारक संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने उचलला होता. थोडक्यात, चळवळीच्या वैचारिक वर्धिष्णुतेसाठी आपल्याला निरपेक्षपणे मदत करण्यास लोक तयार होते, आहेत.

आठ जिल्ह्यांतले आपले चाळीसहून अधिक कार्यकर्ते शिबिराला आले होते. ही बाब मला आश्वासक वाटली. प्रा. रेगे यांना आम्ही विनंती केली होती की, विषयाची मांडणी शक्य तेवढी साधी सोपी करावी. प्रा. रेगेंनी ती मानली, प्रत्यक्षात आणली. युरोपमधला प्रबोधनाचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा उदय, प्रभात, त्याची चिकित्सा, विवेकवादाचा उदय, त्याचे सामर्थ्य, त्याबाबत निर्माण होणारे महत्त्वाचे काही प्रश्न, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना, त्याचा विवेकवादाशी संबंध, हे त्यांनी थोडक्यात नेमकेपणाने मांडले.

शिबीर कसे वाटले, याच्याबद्दल माझ्याशी फारसे कुणी बोलले नाही. परंतु कार्यकर्त्यांच्यात आपापसांत झालेली चर्चा कानावर आली. चौकशी केल्यावर थोडे अधिक कळले. कळले ते असे की, शिबिरातील मांडणी नीटपणे फारशी कोणाला उमगली नाही. बऱ्याच जणांना तर ती दुर्बोधच वाटली. आपण सातत्याने सांगत आलो आहोत की, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही केवळ बुवाबाजी, भूत, भानामती, फलज्योतिष अशा अंधश्रद्धांना विरोध यासाठी नाही. या प्रकारावर व्यक्ती विश्वास ठेवते. त्याचे कारण या चुकीच्या बाबींचा तिच्यावर झालेला संस्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तिच्यामधील अभाव. हा संस्कार दूर करणे, शास्त्रीय जाणीव रूजविणे, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह धरणे, खऱ्याखुऱ्या राष्ट्राच्या उभारणीला मदत करणे, हा आपल्या चळवळीचा व्यापक आशय आहे. याबाबत आपली चळवळ पुरेशी स्पष्ट आहे; परंतु ही झाली कागदावरची भूमिका. ती स्वत:च्या जीवनात उमटावयाची, इतरांवर संस्कारित करायची, समाजजीवनावर प्रभावी करावयाची तर स्वत:च्या अध्ययनात ती स्पष्ट हवी. मला हल्ली स्पष्टपणे जाणवू लागले आहे की, याबाबत आपण अजून फार म्हणजे फारच मागे आहोत. अंधश्रद्धेच्या लोकप्रिय प्रकाराबाबतची खुमासदार भाषणे, ठराविक पुस्तकातील तेच ते मुद्दे यापलिकडे व्यापक विचाराला भिडण्याचेही आपण टाळतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आपण शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगू का, याचा विचार प्रत्येकाने केला तर स्वत:लाच त्याचे काय उत्तर मिळेल. धर्माचा इतिहास, विवेकवाद, नीती, धर्मनिरपेक्षता हे तर मग फार पुढचे झाले.

एक मला मान्य आहे की, या अभ्यासाची गरज काय? असा प्रश्न आपल्यातील बहुतेकांना पडत नाही, त्यांना गरज जाणवते, आवश्यकता पडते; परंतु प्रत्यक्षात त्या पलिकडे पाऊल पडत नाही. वाचन, लेखन, चिंतन याची एक स्वाभाविक अनिच्छा, वैचारिक परिश्रम घेण्याबद्दल निरुत्साह आणि बुवाबाजी, भूत, भानामतीविरोधी लढताना उदंड उत्साह, असे चित्र जाणवते. चळवळीला कृतीची गरज असतेच; परंतु कृती म्हणजेच चळवळ नव्हे. आपल्यासारख्या समाजपरिवर्तनाच्या व्यापक चळवळीला एक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लागते. आपले अधिष्ठान आहे धर्मनिरपेक्ष विवेकवादी नीतीचे. पण हा शब्द उच्चारून भागत नाही. तो नीट समजावा लागतो, पचावा लागतो. स्वत:च्या जीवनात चळवळीच्या कृतीत उतरावा लागतो.

यासाठी प्राथमिक अध्ययनाची गरज अनिवार्य असलेली मला वाटते. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यासाठी सजगपणे सुरुवात करावयास हवी. इतर समविचारी संघटनेतील मित्रांचेही सहाय्य घेण्यास हरकत नाही. पण महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतातील समाजसुधारणांचा इतिहास, प्रमुख धर्मतत्त्वज्ञानाची प्राथमिक नीट ओळख, मानवेंद्रनाथ रॉय, बर्ट्रांड रसेल यांचे लेखन, नीतिशास्त्राबद्दलची प्राथमिक माहिती. धर्मनिरपेक्षतेबाबतची मांडणी या व अशा अन्य गोष्टी आपल्या वाचनाच्या, अध्ययनाच्या भाग बनवावयास हव्यात. आपापल्या ठिकाणी केंद्रातील अन्य कार्यकर्त्यांपर्यंत हा विचार पोचवायला हवा. चर्चेतून, चिंतनातून स्पष्टता वाढवावयास हवी, बुवाबाजी आणि इतर अंधश्रद्धा या विरोधातील संघर्ष महत्त्वाचा आहेच; पण तो पुरेसा नाही. शिवाय अनेक जण या ना त्या कारणाने त्या रणधुमाळीत नसतात. तेव्हा कसाही विचार केला तरी खोल पाण्यात उतरण्याचे महत्त्व वादातीतच राहतं. तुमच्या विवेकाला काय वाटतं?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९३)  

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...