प्राथमिक
अध्ययनाची गरज
दाभोलकर, विवेकवाद, वैचारिक शिबीर, अध्ययन, वाचन
विवेकवादाचे शिबीर सातारला झाले. मे महिन्यातील महाराष्ट्र पातळीवरच्या
बैठकीत असे शिबीर घेण्याचे ठरले होते. कार्यकर्त्यांचे वैचारिक
भान सकस करण्यासाठी. शिबीर घेतले, या विषयाचे भारतीय पातळीवरचे
गाढे अभ्यासक प्रा. मे. पु. रेगे यांनी. या विषयावरचा त्यांचा व्यासंग व अधिकार सर्वमान्य
आहे. कोणत्याही स्वरुपात प्रवासखर्च वा मानधन न घेता ते आले होते. निवास, भोजनाचा सर्व खर्च एकता शिक्षण प्रसारक संस्थेच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर अकादमीने उचलला होता. थोडक्यात, चळवळीच्या वैचारिक वर्धिष्णुतेसाठी आपल्याला
निरपेक्षपणे मदत करण्यास लोक तयार होते, आहेत.
आठ जिल्ह्यांतले आपले चाळीसहून अधिक कार्यकर्ते शिबिराला आले होते.
ही बाब मला आश्वासक वाटली. प्रा. रेगे यांना आम्ही विनंती केली होती की, विषयाची मांडणी शक्य तेवढी साधी सोपी करावी. प्रा. रेगेंनी ती मानली, प्रत्यक्षात आणली. युरोपमधला प्रबोधनाचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा उदय, प्रभात, त्याची चिकित्सा, विवेकवादाचा उदय, त्याचे सामर्थ्य, त्याबाबत निर्माण होणारे
महत्त्वाचे काही प्रश्न, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना, त्याचा विवेकवादाशी संबंध, हे त्यांनी थोडक्यात नेमकेपणाने
मांडले.
शिबीर कसे वाटले, याच्याबद्दल माझ्याशी
फारसे कुणी बोलले नाही. परंतु कार्यकर्त्यांच्यात आपापसांत झालेली चर्चा कानावर आली.
चौकशी केल्यावर थोडे अधिक कळले. कळले ते असे की, शिबिरातील मांडणी नीटपणे
फारशी कोणाला उमगली नाही. बऱ्याच जणांना तर ती दुर्बोधच वाटली. आपण सातत्याने सांगत
आलो आहोत की, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही केवळ बुवाबाजी, भूत, भानामती, फलज्योतिष अशा अंधश्रद्धांना विरोध यासाठी
नाही.’ या प्रकारावर व्यक्ती विश्वास ठेवते. त्याचे
कारण या चुकीच्या बाबींचा तिच्यावर झालेला संस्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तिच्यामधील
अभाव. हा संस्कार दूर करणे,
शास्त्रीय जाणीव रूजविणे, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह धरणे, खऱ्याखुऱ्या राष्ट्राच्या उभारणीला मदत करणे, हा आपल्या चळवळीचा व्यापक आशय आहे. याबाबत आपली चळवळ पुरेशी स्पष्ट आहे; परंतु ही झाली कागदावरची भूमिका. ती स्वत:च्या जीवनात उमटावयाची, इतरांवर संस्कारित करायची, समाजजीवनावर प्रभावी करावयाची
तर स्वत:च्या अध्ययनात ती स्पष्ट हवी. मला हल्ली स्पष्टपणे जाणवू लागले आहे की, याबाबत आपण अजून फार म्हणजे फारच मागे आहोत. अंधश्रद्धेच्या लोकप्रिय
प्रकाराबाबतची खुमासदार भाषणे, ठराविक पुस्तकातील तेच ते मुद्दे यापलिकडे
व्यापक विचाराला भिडण्याचेही आपण टाळतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आपण शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगू का, याचा विचार प्रत्येकाने केला तर स्वत:लाच त्याचे काय उत्तर मिळेल.
धर्माचा इतिहास, विवेकवाद, नीती, धर्मनिरपेक्षता हे तर मग फार पुढचे झाले.
एक मला मान्य आहे की, या अभ्यासाची गरज काय? असा प्रश्न आपल्यातील बहुतेकांना पडत नाही, त्यांना गरज जाणवते, आवश्यकता पडते; परंतु प्रत्यक्षात त्या पलिकडे पाऊल पडत नाही. वाचन, लेखन, चिंतन याची एक स्वाभाविक अनिच्छा, वैचारिक परिश्रम घेण्याबद्दल निरुत्साह आणि
बुवाबाजी, भूत, भानामतीविरोधी लढताना उदंड उत्साह, असे चित्र जाणवते. चळवळीला कृतीची गरज असतेच; परंतु कृती म्हणजेच चळवळ नव्हे. आपल्यासारख्या
समाजपरिवर्तनाच्या व्यापक चळवळीला एक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लागते. आपले अधिष्ठान
आहे धर्मनिरपेक्ष विवेकवादी नीतीचे. पण हा शब्द उच्चारून भागत नाही. तो नीट समजावा लागतो, पचावा लागतो. स्वत:च्या जीवनात चळवळीच्या कृतीत उतरावा लागतो.
यासाठी प्राथमिक अध्ययनाची गरज अनिवार्य असलेली मला वाटते. चळवळीतील
ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यासाठी सजगपणे सुरुवात करावयास हवी. इतर समविचारी संघटनेतील
मित्रांचेही सहाय्य घेण्यास हरकत नाही. पण महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतातील समाजसुधारणांचा इतिहास, प्रमुख धर्मतत्त्वज्ञानाची
प्राथमिक नीट ओळख, मानवेंद्रनाथ रॉय, बर्ट्रांड रसेल यांचे लेखन, नीतिशास्त्राबद्दलची प्राथमिक
माहिती. धर्मनिरपेक्षतेबाबतची मांडणी या व अशा अन्य गोष्टी आपल्या वाचनाच्या, अध्ययनाच्या भाग बनवावयास हव्यात. आपापल्या ठिकाणी केंद्रातील अन्य
कार्यकर्त्यांपर्यंत हा विचार पोचवायला हवा. चर्चेतून, चिंतनातून स्पष्टता वाढवावयास हवी, बुवाबाजी आणि इतर अंधश्रद्धा या विरोधातील संघर्ष महत्त्वाचा आहेच; पण तो पुरेसा नाही. शिवाय अनेक जण या ना त्या कारणाने त्या रणधुमाळीत
नसतात. तेव्हा कसाही विचार केला तरी खोल पाण्यात उतरण्याचे महत्त्व वादातीतच राहतं.
तुमच्या विवेकाला काय वाटतं?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा