संघटन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संघटन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

विवेकवाहिनी : वाटचाल




विवेकवाहिनी : वाटचाल
दाभोलकर, विवेकवाहिनी, स्वयंविकास, संघटन, उपक्रम
विवेकवाहिनीची वाटचाल आश्वासक पद्धतीने सुरू आहे, असे मला वाटते; मात्र अजून खूपच प्रगतीला वाव आहे. प्रारंभ योग्य प्रकारे झाला आहे, एवढे खरे.

विवेकवाहिनी ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मित्रसंघटना असली, तरी एक पूर्णत: स्वतंत्र संघटना आहे. सध्याच्या विद्यार्थी संघटनेपेक्षा तर ती वेगळी आहेच; परंतु महाविद्यालयातील शैक्षणिक अनुदान असलेल्या अन्य सामाजिक उपक्रमांपेक्षाही ती वेगळी आहे. मूल्यात्मक स्वयंविकास-संवादातून व कृतिशीलपणा हे त्याचे सूत्र आहे. या स्वरुपाचे काम करणारी अन्य संघटना आज महाराष्ट्रात नाही.

विवेकवाहिनीमागील विचार व संघटना बांधणी कशी करावी, याचे दोन दिवसांचे एक शिबीर श्रीरामपूर येथे ता. २३ व २४ ऑगस्ट रोजी उत्तमपणे संयोजित झाले. यामध्ये रयत विचार मंच या रयत शिक्षण संस्था कर्मचारी मंचाने अतिशय तळमळीने पुढाकार घेतला होता. नगर-नाशिक विभागाचे रयतचे अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कॉलेजच्या प्राचार्यांनी याबाबत भरीव सहकार्य दिले. मीनाताई जगधने यांचाही मोलाचा सहभाग होता. प्रा. सदाशिव कदम यांनी मनोरंजनाची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारली होती. रयत विचार मंचने असा निर्णय घेतला आहे की, शाळेतील विचार व्यासपीठ विवेकवाहिनी या नावाने उभे करावयाचे. यामुळे रयतच्या पन्नास शाळेतील प्रत्येकी दोन शिक्षक शिबिरास होते. विवेकवाहिनी चालू करू इच्छिणारे नगर जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांतील प्राध्यापकही आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्यशोधकी चळवळीची वाटचाल यावर फार प्रभावी मार्गदर्शन केले. हिंदू-मुस्लिम प्रश्न व राखीव जागा याबाबत पन्नालालजी सुराणा यांनी सविस्तर चर्चा केली. जळगावचे डॉ. प्रदीप जोशी हे व्यसनमुक्ती व व्यक्तिमत्त्व विकास यासंदर्भात बोलले. नरेंद्र दाभोलकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद हे विषय घेतले. रात्री मच्छिंद्र वाघ यांनी चमत्कारांची बहारदार प्रात्यक्षिके सादर केली. संघटना बांधणीच्या सत्रात सर्व शिबिरार्थींनी आपापल्या कॉलेज व शाळेत विवेकवाहिनी चालू करण्याचा निर्धार व्यक्त केला. रयत विचार मंच याचा पाठपुरावा प्रत्यक्ष शाळा, कॉलेजात जाऊनही करणार आहे. संगमनेरचे डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शिबिराचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी जगधनेताई होत्या.
विवेकवाहिनी सुरू करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयांना पत्रे पाठविली आहेत. सुमारे १४० महाविद्यालयांनी याबाबत अनुकुलता दर्शविली आहे. या सर्व महाविद्यालयांतून विवेकवाहिनीची संघटनात्मक निर्मिती दीपावलीपूर्वी व्हावी, असा प्रयत्न आहे. दिवाळीच्या सुट्टीत पुणे येथे महाराष्ट्रातील महाविद्यालयांत सुरू झालेल्या विवेकवाहिनीच्या सर्व कार्यकर्त्यांचे शिबीर होईल. त्यामुळे वैचारिक मांडणी, संघटनात्मक बांधणी व कार्यक्रमाची आखणी केली जाईल. डिसेंबर, जानेवारी महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात विवेक वाहिनीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडे शिबीर होईल. या रचनेतून विवेकवाहिनीची वैचारिक व संघटनात्मक मांडणी आणखी स्पष्ट होत जाईल. विवेकवाहिनीचे संघटन थोड्या नीट प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उभे राहण्याची अनुकुलता जाणवते.
     
महाविद्यालयीन विवेकवाहिनी कोणते कार्यक्रम घेऊ शकेल, याबाबत आणखी कल्पक विचार करावयास हवा. सर्वांनी आपली प्रतिभा त्यासाठी वापरावी. कार्यक्रम असा हवा की, जो नाविन्यपूर्ण आहे. उपयुक्त आहे. बिनखर्चिक आहे व त्याबरोबरच परिणामकारकही. यामुळे कार्यकर्त्यांची उमेद व उत्साह वाढतो. लोकांचे लक्षही वेधून घेतले जाते. केवळ कल्पनेसाठी दोन उपक्रम पुढे सुचवीत आहे. हे प्रत्यक्षात आणलेले उपक्रम आहेत. एक उपक्रम असा की, ज्या विचाराचा प्रसार आपणास करावयाचा आहे, त्या विषयाबाबत ठरवून विविध वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्रे लिहून पाठवणे. त्यामुळे अनेक फायदे होतात. विषय समजावून घ्यावा लागतो. मुद्देसूद नेमके लिहिण्याची सवय लागते. पत्र छापून आल्यास त्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढतो; शिवाय वाचकांचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात वाचला जात असल्याने विचारांचा प्रसार होतो. दुसरा उपक्रम असा की, आपण अगर आपल्या मित्रमैत्रिणीने हुंडा न घेता लग्न करणे अगर आंतरजातीय लग्न करणे असा निर्णय घेतला आहे, असे समजून आपल्या अगर मित्राच्या पालकांना आपल्या निर्णयाचे समर्थन करणारे आणि त्यांनी मोठ्या मनाने यास पाठिंबा द्यावा, असे विनंती करणारे पत्र पाठविणे. अशा पत्रलिखाणाच्या प्रयत्नातून आपला मुद्दा नेमकेपणाने आर्जवीपणे कसा योजला, याचा सराव काहीसा होतो. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी काही वेगळे उपक्रम शोधण्याची गरज आहे.

विवेकवाहिनी हे समाज विवेकशक्तीच्या सहाय्याने बदलण्याचा प्रयत्न करणारे अभिनव संघटन आहे. अनेकांच्या सर्जनशील विचारांची घुसळण त्यात झाली, तर हे मंथन अधिक चांगले होईल. त्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण !
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर २००३)




रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद




वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, परिषद, विवेकवाहिनी, संघटन
आज समाजात वैचारिक चर्चा करण्यात कोणाला रस राहिलेला नाही; कृती तर दूरच. सर्वत्र मरगळ आली आहे. या दृढ होत चाललेल्या नेहमीच्या समजांना महाराष्ट्रातल्या शिक्षणक्षेत्राच्या वैज्ञानिक जाणिवा कृती परिषदेने जोरदार धक्का दिला. ३० जून आणि १ जुलैला लातूरला ही परिषद संपन्न झाली. महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातून आलेले व्यापक प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, कार्यकर्ते यांची ओसंडून वाहणारी संख्या; या सर्वांत प्रामुख्याने वयाने तरुण असलेल्यांचा सहभाग, उदंड उत्साह, चोख व्यवस्था व शिस्त आणि कृतीचा निर्धार या सर्वच बाबी मनाची उमेद वाढविणाऱ्या होत्या.

अंधश्रद्धा निर्मूलन पुढच्या टप्प्यावर
गेले एक तपाहून अधिक काळ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला काहीसे यश लाभले, तशाच मर्यादाही जाणवू लागल्या. चळवळीमधील सामर्थ्य कायम ठेवून मर्यादा ओलांडण्याचा लक्षणीय प्रयत्न म्हणजे ही परिषद. विज्ञानाची करणी हरघडी वापरताना विज्ञानाची विचारसरणी मात्र दूर ठेवण्याच्या प्रवृत्तीला या परिषदेने धक्का दिला. याची सुरुवात शिक्षण क्षेत्रातून होणेही उचितच होते. खरे तर भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, हे सर्व नागरिकांचेच कर्तव्य सांगितले आहे. पण शिक्षण क्षेत्रात त्याचे महत्त्व अधिक. कारण शिक्षणाचा गाभाघटकातील महत्त्वाचा घटक आहे, वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती. शिक्षण म्हणजे जर वर्तनबदल असेल तर त्याबाबत शिक्षण क्षेत्राने विचार देणे व कृतीचा संस्कार करणे, दोन्ही मोलाचे ठरते. महाराष्ट्रातील सत्यशोधकी विचारांचा पैलू देखील याला पूरकच आहे. व्यवहारात मात्र आज माणसे, युवक डोळस विचारांच्या आधारे कृती करून समाजजीवन अनुकूल पद्धतीने बदलता येते, हा वैज्ञानिक दृष्टिकोनातील आत्मविश्वास गमावताना आढळतात. फलज्योतिषाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, पंतप्रधानांना आराम पडण्यासाठीचा यज्ञ, समाजधुरिणांचे चमत्कार करणाऱ्या बाबापुढचे लोटांगण, ही त्याची एक बाजू वाढता दैववाद, छद्मविज्ञानाचा प्रभाव, प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात दीर्घदृष्टीचा अभाव व विवेकहिनता ही त्याची दुसरी बाजू. देशाचे वैज्ञानिक धोरण मांडताना पंडित नेहरू यांनी Scientific temperament is spirit of a free man असे उद्गार काढले होते. ते पुन्हा कसे आणावयाचे, हा खरा प्रश्न होता. याची सुरुवात केवळ विचारमंथनातून नव्हे, तर स्वत:च्या जीवनात आग्रहाने व निर्धाराने बदलण्यापासून व्हावी. हा संकल्प सामूहिक स्वरुपात व्यक्त व्हावा, ही कल्पना शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद संयोजनामागे होती.

विचारमंथन - वैज्ञानिक दृष्टिकोन
हेमू अधिकारी, ना. य. डोळे, विकास आमटे व दत्ता देसाई यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर सखोल चर्चा घडवून आणली. त्यातील सकारात्मक भाग पुढे आणला. ही विचारपद्धती मानवाच्या अंगभूत समतेचा विचार करून उत्तरे शोधता येतात, याकडे लक्ष वेधले गेले. राखीव जागांनी शिक्षणाचा दर्जा घसरला, मुसलमानांची संख्या या देशात एकदा हिंदूंना मागे टाकेल, मोठी धरणे हेच पाणी नियोजनाचे प्रभावी उत्तर आहे, या सर्व (गैर) समजाची चिकित्सा करतानाही वैज्ञानिक विचारपद्धती वापरता येते. मात्र यासाठी खुली चर्चा व चूक स्वीकारण्याची प्रवृत्ती आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नीतीसाठी काहीच उपयोग नाही, हेही खरे नाही. मूल्यनिर्मितीसाठीही त्याचा वापर करता येतो. देवावरची श्रद्धा ही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी विसंगत; पण हा दृष्टिकोन रोज प्रश्न विचारावयास शिकवते, ही प्रवृत्ती केवळ निसर्गविज्ञानात नाही, तर मानवी दैनंदिन जीवनात वाढीला लावावयास हवी. विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेला, अनुयायांनी नेत्याला, सज्जनांनी गुंडाला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावयास हवी. ही मनोवृत्ती वाढीस लागली, तरच आपण ही अवघड लढाई हरतो आहोत, असे वाटते. तिचे विजयात रूपांतर होऊ शकेल, असा प्रतिपादनाचा सूर होता.

धर्मांधता, धर्मनिरपेक्षता, धर्मचिकित्सा
गोविंद पानसरे, पुष्पाताई भावे, डॉ. आ. ह. साळुंखे व रावसाहेब कसबे यांच्या सहभागाने रंगलेले हे चर्चासत्र परिषदेचे परमोच्च बिंदू ठरावे. माणसाने चांगला माणूस होण्यासाठी स्वत:च्या गरजा निर्माण केल्या, त्यात धर्म आहे. जगात सर्व लोकसमूह धर्म मानणारे. त्यात एक असले तरी धर्माचा विनियोग तपासावयास हवा. माणुसकीचे वर्तन करणारा धर्म मान्य करावयास हवा. शोषण करणारा धर्म नाकारावयास हवा. यासाठीच चिकित्सा हवी. धर्माचे विलक्षण सामर्थ्य हे की, त्याच्यामुळे ज्यांचे शोषण वाढते, तेच त्याच्यासाठी रक्त सांडतात. ही माणसे सश्रद्ध व अगतिक फसवली गेलेली आहेत त्यांच्याबद्दल कणवच हवी. त्यांना योग्य बाजूने आणण्यासाठी केवळ शुष्क युक्तिवाद नाही, तर हृदय त्यांच्याशी जोडावे लागेल. जे चूक असेल ते निर्भयपणे नाकारावे लागेल. याचबरोबर धर्मग्रंथ, कर्मकांड, व्रतवैकल्य या सर्वांची चिकित्सा करावी लागेल. जनसमुदायाला असेच अंधश्रद्ध ठेवण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, ते या चिकित्सेवर हिंसक हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्याचा मुकाबला शक्तीने करावा लागेल आणि भौतिक वास्तव सामान्यांना सुखकर करणाऱ्या लढ्याशी त्यासाठी जोडून घ्यावे लागेल.

उद्घाटन-समारोप
परमेश्वर नाकारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन अशक्य, ही आपली नेहमीची भूमिका उद्घाटनाच्या सत्रात डॉ. श्रीराम लागू यांनी रोखठोक मांडली. मात्र पुढच्या काही सत्रात दत्ता देसाई व पुष्पाताई भावे यांनी त्याचा समर्थ प्रतिवाद केला. धर्म, विज्ञान व समाज यातील गुंतागुंत प्रा. य. दि. फडके यांनी समर्थपणे मांडली. शिक्षणक्षेत्राचे भगवेकरण करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाकडेही लक्ष वेधले. समारोपाच्या सत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा विचार अजून शिक्षण क्षेत्राच्या बाहेर अडकलेल्या लक्षावधी तरुणांपर्यंत पोचविण्याचा सल्ला प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला. अतिशय छोटे; पण आशयसंपन्न बोलताना निळूभाऊ फुले यांनी वैज्ञानिक जाणिवा रूजवण्यासाठी स्वत:च्या पातळीवर यासंदर्भातील कथनी आणि करणी यातील फरक नष्ट करावा, असे आवाहन केले. निर्धाराने केलेल्या कृती कार्यक्रमाने काय घडू शकते, याची उदाहरणे दिली. महाराष्ट्रातील विविध पुरोगामी प्रवाह या परिषदेनिमित्त एकत्र आले, याचा आनंद आवर्जून व्यक्त केला आणि हे शहाणपण पुढेही चालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कृती कार्यक्रम
सर्व प्रतिनिधींना विवेकजागर ही पुस्तिका नोंदणी करताना देण्यात आली होती. त्यामध्ये पंचवीस कृती कार्यक्रम देण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा त्याला आधार होता. यापैकी काही कार्यक्रमांबाबतचे अनुभवकथनही एका सत्रात झाले. वटसावित्रीच्या व्रताचे केलेले व्यापक सर्वेक्षण, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, भानामती निर्मूलनाची धडक मोहीम, पंधरा हजारांहून अधिक गणपती दान मिळवणारी विसर्जित गणपती दान करा ही मोहीम, फलज्योतिषाला आव्हान देण्याची शास्त्रीय पद्धती, याबाबतची माहिती प्रतिनिधींना उद्बोधक वाटली. खरे तर इतर उपक्रमही अनेक आहेत. प्रश्न आहे ते निर्धाराने अमलात आणण्याचा. याबाबतही ठोस निर्णय झाले. येत्या १५ ऑगस्टपर्यंत दीडशे महाविद्यालयांत याबाबत व्याख्याने, चर्चा घडविल्या जातील. जे विद्यार्थी, प्राध्यापक यासाठी स्वत:हून पुढे येतील त्यांचे गट करण्यात येतील, त्यांना विवेकवाहिनी समर्पक नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मान्यतेने व त्यांच्यामार्फतच चालविली जातील. त्यांना मदत, मार्गदर्शन, प्रशिक्षित करण्याचे कार्य परिषद संयोजन समिती करेल. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वैज्ञानिक जाणिवा कृतिशील करण्याच्या निर्धाराने केलेला उठाव, असे त्याचे स्वरूप असेल. याचा प्रभाव त्या-त्या महाविद्यालयातील युवकांवर व सर्वांचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर पडावा, अशी अपेक्षा आहे. हा प्रभाव समाजजीवनाला डोळसपणे, विवेकाने स्वत:चे आत्मभान जागृत करून अधिक समर्थ बनवेल, कृतिशील करेल, असा विश्वास परिषदेने निर्माण केला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि लातूर जिल्हा शिक्षणसंस्था चालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद, लातूर.
ठराव
समाजात आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. त्यामुळे समाजापुढील खरे प्रश्न बेकारी, दारिद्र्य, विषमता, जाती निर्मूलन, धर्मांधता यांचा डोळसपणे विचार करून उपाय शोधण्यास समाज अपुरा पडत आहे. मूल्याधिष्ठित वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अंग आहे, याचा जाणीवपूर्वक उल्लेख आम्ही करत आहोत. यामुळे सामाजिक मूल्यनिर्मितीसाठीही वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी भूमिका बजावू शकतो, असे आम्हाला वाटते. या विचाराचा उठाव महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात व्हावयास हवा. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने जनमानसात प्रभावी व कृतिशील बनण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहनही परिषद करीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)




गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

शैक्षणिक जाहीरनाम्याचा वैचारिक आशय




शैक्षणिक जाहीरनाम्याचा वैचारिक आशय
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संघटन, विवेकवाहिनी, जातिव्यवस्था
१)    महाराष्ट्राला समाजसुधारकांचा वारसा आहे. दुसऱ्या कोणत्याही प्रांताला असा उज्ज्वल वारसा नाही. महाराष्ट्रात सर्वचजण फुले, शाहू, आंबेडकर असा नामजप करतात. बाळ ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे कडवे सत्यशोधक होते. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची नावे  विद्यापीठाला देण्यात आली आहेत. मात्र या महापुरुषांचा वारसा नीटपणे समजावून सांगितला जात नाही. शिक्षण, शेती, स्त्री-पुरुष समानता या स्वरुपाच्या अनेक बाबींवर या महापुरुषांनी विचार मांडले, कृती केली. परंतु या सर्वांच्या विचाराचा मुख्य गाभा हा सत्यशोधकी विचार म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद अथवा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच होता आणि त्यासाठी स्वाभाविकपणे त्यांनी धर्मचिकित्सा केली. कारण त्याशिवाय सत्यशोधन शक्यच नव्हते. महाराष्ट्रात हा विचार शिक्षणक्षेत्रात पाठ्यपुस्तकाचा भाग म्हणून फारसा नाही आणि जो काही थोडा आहे तो नीटपणे शिकवला जात नाही. यासाठी शिक्षणसंस्थांनी निर्णय घेऊन जाणीवपूर्वक काही शिक्षकांना यासाठी तयार करावयास हवे व त्यांच्यामार्फत हा विचार विद्यार्थ्यांत व समाजात पोचवावयास हवा.
२)    वैज्ञानिक दृष्टिकोन हा निसर्गातील; तसेच समाजातील सर्व घटनांच्याकडे एका विशिष्ट वेगळ्या पद्धतीने पाहावयास शिकवणारा आहे. सध्या फार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरले जाते. विज्ञानाच्या नियमाचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्यासाठी शास्त्रीय विचारपद्धती लागते. तंत्रज्ञानात पुढारलेल्या आपल्या देशात ती आहे. मात्र निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग या पद्धतीने कार्य करणारी शास्त्रीय विचारपद्धती ही वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे, ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची पूर्वतयारी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. सृष्टीतील प्रत्येक कार्यामागे कारण आहे आणि ते माणसाच्या बुद्धीला समजू शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. मानवाच्या इतिहासात ही कल्पना अलिकडची म्हणजे अवघ्या ४०० वर्षांतील आहे. (माणसाचा इतिहास किमान १० लाख वर्षांचा आहे.) अजूनही तंत्रज्ञानात प्रवीण असलेल्या व्यक्तीकडेही हा दृष्टिकोन अनेकदा नसतो. आजही बहुतेक लोक असेच मानतात की, माणसाच्या जीवनात जे काही घडते, त्यामागे देव अथवा दैव यांची शक्ती असते. वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो की, व्यक्तीच्या समाजाच्या जीवनात जे काही घडते, त्यामागे नशीब नसते तर काही ना काही कारण असते, ते प्रत्येक माणसाला शोधता येते व बदलण्यासाठी प्रयत्न करता येतात. या दृष्टिकोनामुळे पराधीन माणूस स्वाधीन होतो, परतंत्र माणूस स्वतंत्र होतो. कारण नशीब नावाच्या कल्पनेच्या मानसिक गुलामगिरीतून तो मुक्त होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन एवढा महत्त्वाचा असल्यामुळेच भारतीय घटनेत हा दृष्टिकोन बाळगणे, हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. शिक्षणामध्येही गाभाघटकात व मूल्यशिक्षणात त्याचा समावेश केला आहे.
३)    वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व आणखी एका प्रकारे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ यशपाल यांनी सांगितले आहे. त्यांचे मत असे आहे की, वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता जनसामान्यांच्यात निर्माण करू शकतो. यामुळे सामान्य माणसे आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात स्वत:च्या हिताचे निर्णय अधिक योग्य    प्रकारे घेऊ शकतील. उदा. देशाचे उत्पन्न प्राधान्यक्रमाने कोणत्या बाबीवर खर्च व्हावे, याचे निर्णय गरिबांच्या नावाने आज भलतेच होत आहेत. सामान्य माणसात वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे आकलनाची परिपक्वता निर्माण झाली तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल.
४)    वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा आग्रह धरणे यामुळे कोणत्याही प्रकारे व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्याला आडकाठी येत नाही. भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला उपासनेचे व धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे. त्या स्वातंर्त्याचा पूर्ण आदर करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार पसरवता येतो.
५) समाजाचे मतपरिवर्तन करून शकणाऱ्या तीन प्रधान शक्ती आहेत. एक प्रसारमाध्यमे, दुसरे राजकीय सामाजिक नेतृत्व तिसरे शिक्षणक्षेत्र. यापैकी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे बेजबाबदार वागत आहेत. छापील प्रसारमाध्यमेदेखील पुरेशी सजग नाहीत. राजकीय व सामाजिक नेतृत्व, मूल्याचा विचार न करता स्वत:च्या मतलबाचा व मताचा विचार करते. अशावेळी शिक्षण हे एकच क्षेत्र या परिवर्तनाला मदत करणारे ठरू शकते. महाराष्ट्रात २००० महाविद्यालये, १५ ,००० माध्यमिक शाळा व ७२,००० प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये काही लाखांच्या घरात शिक्षक असून कोटीच्या घरात विद्यार्थी आहेत. तसेच संस्कार करणे वा वर्तन बदलणे हे शिक्षण क्षेत्राचे कामच आहे, हे लक्षात घेता हा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

संघटन
१)    हा जाहीरनामा शिक्षणसंस्थांनी स्वीकारावा, अशी विनंती करणारी पत्रे सर्व शिक्षण संस्थांना पाठविण्यात येतील.
२)    हा जाहीरनामा शिक्षणसंस्था पूर्णत: अथवा अंशत: स्वीकारू शकेल. शिक्षणसंस्थेच्या प्रमुखांनी अथवा व्यवस्थापन समितीने तसा तो स्वीकारला आहे, असे कळवावे, अशी अपेक्षा आहे.
३)    हा जाहीरनामा स्वीकारणाऱ्या सर्व संस्थांनी आपला एक प्रतिनिधी याबाबतच्या कार्यवाहीच्या चर्चेसाठी पाठवावा, अशी कल्पना आहे. अशा सर्व प्रतिनिधींच्या बैठकीत जाहीरनामा स्वीकृतीची एक भव्य राज्यव्यापी परिषद घेण्याचा निर्णय होऊ शकेल.
४)    यासाठी शिक्षणसंस्थांत स्वेच्छेने जे माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक कार्यरत       होऊ इच्छित असतील, अशांचे एक प्रशिक्षण संस्थानिहाय अथवा विभागून घेण्यात येईल. हे शिक्षक वा प्राध्यापक व्यक्तिगत पातळीवर या विचाराचे संदेशवाहक बनावेत, अशी अपेक्षा आहे.
५)    या शिक्षक अथवा प्राध्यापकांचा प्रामाणिक प्रयत्न व त्याला शिक्षणसंस्थेची मान्यता, यामुळे या विचारांचा प्रसार करणारा विद्यार्थ्यांचा गट शाळा अथवा महाविद्यालयात तयार झाल्यास तो गट विवेकवाहिनी या नावाने       कार्यरत होऊ शकेल. विवेकवाहिनी हे प्रारूप सध्या काही महाविद्यालयांत कार्यरत आहे व त्याला उच्च शिक्षण संचालकांची मान्यताही आहे. शाळेमध्ये मात्र शिक्षणसंस्थेच्या अनुमतीने ते कार्यरत करावे लागेल.
६)    समाजबदलाचे विचार, उच्चार, प्रसार, आचार, संघटन व संघर्ष हे सहा टप्पे मानता येतील. यापैकी प्रामुख्याने विचार-उच्चार-प्रसार या मार्गाने कार्य होईल. विचार मांडणाऱ्या व्यक्ती त्याप्रमाणे आचार करणाऱ्या असतील तर चांगलेच; परंतु याबाबतच्या मर्यादा लक्षात घेता तसा आग्रह राहणार नाही. संघटन विवेकवाहिनी या नावाने पूर्णत: शिक्षणसंस्थांच्या अखत्यारित चालेल. संघर्षाचे लढे अपेक्षित नाहीत.
७)    जाहीरनामा अंमलबजावणीचा सर्व कार्यक्रम या उपक्रमात स्वत:हून सामील होणाऱ्या शिक्षणसंस्थांमार्फत त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रात राबवला जाईल. मात्र या सर्व शिक्षणसंस्थांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्यास हा जाहीरनामा   शासनाने स्वीकारावा, असा प्रयत्न करण्यात येईल.

कृती कार्यक्रम
पुढे कृती कार्यक्रमाची रूपरेखा आहे. मात्र यातील तपशील सहभागी होणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या सूचनांनुसार विकसित होऊ शकेल. वैचारिक आशयाशी सुसंगत अशा स्वरुपाच्या कोणत्याही नव्या कृती कार्यक्रमाचे स्वागतच आहे.
१) शाळेच्या प्रार्थनेत अशा अनेक गीतांचा आवर्जून समावेश करता येईल की, ज्या गीतांच्यामध्ये महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांचा खरा वारसा असेल. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल. स्त्री-पुरुष समता, जातधर्म यापलिकडे जाणारा विचार, श्रमाचे महत्त्व वगैरेंचा समावेश असेल.
२)    अंधश्रद्धा कोणती व श्रद्धा कोणती, या चर्चेमध्ये प्रबोधन अडकून पडण्याचे कारण नाही. महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा बनवला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या कायद्याच्या परिशिष्टात एकूण १२ प्रकारच्या अंधश्रद्धांचा उल्लेख केला आहे व त्या दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये जादूटोणा, भानामती, डाकीण प्रथा, मंत्राने विष उतरवणे, भुताने झपाटले असे समजून छळ करणे वगैरेचा समावेश आहे. या बाबी गुन्हेगारी स्वरुपाच्या आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या बाबींना अंधश्रद्धा समजावे, असे थेट मान्य करणे शक्य आहे.
३) विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून कार्यकारणभावाचे गाभातत्त्व नीटपणे समजावून सांगावे. चमत्कार होतो असे मानल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन खोटा पडतो, हे सांगावे. पूर्वी घडून गेलेल्या चमत्काराबद्दल ते तपासता येत नसल्यामुळे निर्णायक भूमिका घेता येत नाही. परंतु सध्याच्या युगात चमत्कार घडत नाहीत, हे सांगावयास हवे. तसेच फलज्योतिषासारखे विषय खगोलशास्त्राच्या विज्ञानाशी कसे जोडून पाहावेत, याची सवय लावावी.
४)    वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणात बाहेरून उपरा या पद्धतीने रूजवण्याची गरज नाही, तर विज्ञान शिक्षण घेत असतानाच ते वैज्ञानिक दृष्टिकोनाने आणि त्याच वेळी आनंददायी व कृतिशील करता येते, याबाबत पुरेसे तज्ज्ञांचे सहाय्य उपलब्ध आहे. शिक्षण संस्थांचे जे विज्ञान शिक्षक वा प्राध्यापक यात उत्सुकता दाखवतील, त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.
५)    कालबाह्य कर्मकांडांच्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मानसिकता तयार करणे व विधायक पर्याय देणे उदा. होळीमध्ये शेणी, लाकूड जाळण्याऐवजी आपला भाग स्वच्छ करून कचऱ्याची होळी करावी. विवाहात तांदळाच्या अक्षतेऐवजी फुलांचा पर्याय वापरावा.
६)    वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तीला एका उन्नत जीवनाची दिशा दाखवतो. विवेकी जगणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचेच मूल्यात्मक रूप आहे. यामुळेच अविवेकाला प्रोत्साहन देणाऱ्या अवैज्ञानिक आत्मघातकी जीवनशैलीमुळे होणाऱ्या सर्वंकष व दीर्घकालीन नुकसानीची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यामध्ये फास्ट फूड सेवन, व्यसनाची ओढ, व्यायाम व वाचन यांचा अभाव यांचा समावेश असावा. चालू काळातला एक महत्त्वाचा रोग या अंगाने वाढत्या हिंसाचाराकडे आज तज्ज्ञ पाहत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा त्याग हे मूल्य रूजवावयास हवे. तसेच नियमित वाचन करावयाचा आग्रह निर्माण करणारी वाचनसंस्कृती निर्माण करावयास हवी.
७)    भारतातील जातिव्यवस्था ही एकाच वेळी एक प्रचंड शोषण व्यवस्था व त्याचवेळी तेवढीच मोठी अंधश्रद्धा आहे. जातिव्यवस्थेतील शोषणाच्या विरोधात भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाच्या कल्पनेला पाठिंबाच द्यावयास हवा. मात्र जन्मजात उच्च-नीचता मानणे व त्यामुळे आंतरजातीय विवाहाला विरोध करणे हे अनेक कारणांनी अनुचित आहे, हे देखील बिंबवण्याची गरज आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २००८)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...