शैक्षणिक
जाहीरनाम्याचा वैचारिक आशय
दाभोलकर, शैक्षणिक जाहीरनामा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संघटन,
विवेकवाहिनी, जातिव्यवस्था
१) महाराष्ट्राला समाजसुधारकांचा
वारसा आहे. दुसऱ्या कोणत्याही प्रांताला असा उज्ज्वल वारसा नाही. महाराष्ट्रात सर्वचजण
फुले, शाहू, आंबेडकर असा नामजप करतात. बाळ ठाकरे यांचे
वडील ‘प्रबोधन’कार ठाकरे हे कडवे सत्यशोधक होते. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांची
नावे विद्यापीठाला देण्यात आली आहेत. मात्र
या महापुरुषांचा वारसा नीटपणे समजावून सांगितला जात नाही. शिक्षण, शेती, स्त्री-पुरुष समानता या स्वरुपाच्या अनेक
बाबींवर या महापुरुषांनी विचार मांडले, कृती केली. परंतु या सर्वांच्या विचाराचा मुख्य गाभा हा सत्यशोधकी
विचार म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद अथवा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच होता आणि त्यासाठी
स्वाभाविकपणे त्यांनी धर्मचिकित्सा केली. कारण त्याशिवाय सत्यशोधन शक्यच नव्हते.
महाराष्ट्रात हा विचार शिक्षणक्षेत्रात पाठ्यपुस्तकाचा भाग म्हणून फारसा नाही आणि जो
काही थोडा आहे तो नीटपणे शिकवला जात नाही. यासाठी शिक्षणसंस्थांनी निर्णय घेऊन
जाणीवपूर्वक काही शिक्षकांना यासाठी तयार करावयास हवे व त्यांच्यामार्फत हा विचार विद्यार्थ्यांत
व समाजात पोचवावयास हवा.
२) वैज्ञानिक दृष्टिकोन
हा निसर्गातील; तसेच समाजातील सर्व घटनांच्याकडे एका विशिष्ट वेगळ्या पद्धतीने
पाहावयास शिकवणारा आहे. सध्या फार मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरले जाते. विज्ञानाच्या
नियमाचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्यासाठी शास्त्रीय विचारपद्धती लागते. तंत्रज्ञानात
पुढारलेल्या आपल्या देशात ती आहे. मात्र निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग या पद्धतीने कार्य करणारी शास्त्रीय
विचारपद्धती ही वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे, ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची पूर्वतयारी आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. सृष्टीतील प्रत्येक कार्यामागे
कारण आहे आणि ते माणसाच्या बुद्धीला समजू शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. मानवाच्या
इतिहासात ही कल्पना अलिकडची म्हणजे अवघ्या ४०० वर्षांतील आहे. (माणसाचा इतिहास किमान
१० लाख वर्षांचा आहे.) अजूनही तंत्रज्ञानात प्रवीण असलेल्या व्यक्तीकडेही हा दृष्टिकोन
अनेकदा नसतो. आजही बहुतेक लोक असेच मानतात की, माणसाच्या जीवनात जे काही घडते, त्यामागे देव अथवा दैव यांची शक्ती असते.
वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो की, व्यक्तीच्या
समाजाच्या जीवनात जे काही घडते, त्यामागे
नशीब नसते तर काही ना काही कारण असते, ते प्रत्येक माणसाला शोधता येते व बदलण्यासाठी प्रयत्न करता येतात.
या दृष्टिकोनामुळे पराधीन माणूस स्वाधीन होतो, परतंत्र माणूस स्वतंत्र होतो. कारण नशीब
नावाच्या कल्पनेच्या मानसिक गुलामगिरीतून तो मुक्त होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन एवढा
महत्त्वाचा असल्यामुळेच भारतीय घटनेत हा दृष्टिकोन बाळगणे, हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले आहे. शिक्षणामध्येही
गाभाघटकात व मूल्यशिक्षणात त्याचा समावेश केला आहे.
३) वैज्ञानिक दृष्टिकोनाचे
महत्त्व आणखी एका प्रकारे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व भारतातील ज्येष्ठ
शास्त्रज्ञ यशपाल यांनी सांगितले आहे. त्यांचे मत असे आहे की, वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता जनसामान्यांच्यात
निर्माण करू शकतो. यामुळे सामान्य माणसे आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात स्वत:च्या
हिताचे निर्णय अधिक योग्य प्रकारे घेऊ शकतील. उदा. देशाचे उत्पन्न प्राधान्यक्रमाने
कोणत्या बाबीवर खर्च व्हावे, याचे
निर्णय गरिबांच्या नावाने आज भलतेच होत आहेत. सामान्य माणसात वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे
आकलनाची परिपक्वता निर्माण झाली तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल.
४) वैज्ञानिक दृष्टिकोन
व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा आग्रह धरणे यामुळे कोणत्याही प्रकारे व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्याला
आडकाठी येत नाही. भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला उपासनेचे व धर्मपालनाचे स्वातंत्र्य
दिले आहे. त्या स्वातंर्त्याचा पूर्ण आदर करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार पसरवता
येतो.
५) समाजाचे मतपरिवर्तन करून शकणाऱ्या तीन प्रधान शक्ती आहेत.
एक प्रसारमाध्यमे, दुसरे
राजकीय सामाजिक नेतृत्व तिसरे शिक्षणक्षेत्र. यापैकी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे बेजबाबदार
वागत आहेत. छापील प्रसारमाध्यमेदेखील पुरेशी सजग नाहीत. राजकीय व सामाजिक नेतृत्व, मूल्याचा विचार न करता स्वत:च्या मतलबाचा
व मताचा विचार करते. अशावेळी शिक्षण हे एकच क्षेत्र या परिवर्तनाला मदत करणारे ठरू
शकते. महाराष्ट्रात २००० महाविद्यालये,
१५ ,००० माध्यमिक शाळा व ७२,००० प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये काही लाखांच्या
घरात शिक्षक असून कोटीच्या घरात विद्यार्थी आहेत. तसेच संस्कार करणे वा वर्तन बदलणे
हे शिक्षण क्षेत्राचे कामच आहे, हे
लक्षात घेता हा शैक्षणिक जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
संघटन
१) हा
जाहीरनामा शिक्षणसंस्थांनी स्वीकारावा, अशी विनंती करणारी पत्रे सर्व शिक्षण संस्थांना पाठविण्यात येतील.
२) हा
जाहीरनामा शिक्षणसंस्था पूर्णत: अथवा अंशत: स्वीकारू शकेल. शिक्षणसंस्थेच्या प्रमुखांनी
अथवा व्यवस्थापन समितीने तसा तो स्वीकारला आहे, असे कळवावे, अशी अपेक्षा आहे.
३) हा
जाहीरनामा स्वीकारणाऱ्या सर्व संस्थांनी आपला एक प्रतिनिधी याबाबतच्या कार्यवाहीच्या
चर्चेसाठी पाठवावा, अशी
कल्पना आहे. अशा सर्व प्रतिनिधींच्या बैठकीत जाहीरनामा स्वीकृतीची एक भव्य राज्यव्यापी
परिषद घेण्याचा निर्णय होऊ शकेल.
४) यासाठी
शिक्षणसंस्थांत स्वेच्छेने जे माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक कार्यरत होऊ इच्छित असतील, अशांचे एक प्रशिक्षण संस्थानिहाय अथवा विभागून
घेण्यात येईल. हे शिक्षक वा प्राध्यापक व्यक्तिगत पातळीवर या विचाराचे संदेशवाहक बनावेत,
अशी अपेक्षा आहे.
५) या
शिक्षक अथवा प्राध्यापकांचा प्रामाणिक प्रयत्न व त्याला शिक्षणसंस्थेची मान्यता,
यामुळे या विचारांचा प्रसार करणारा विद्यार्थ्यांचा
गट शाळा अथवा महाविद्यालयात तयार झाल्यास तो गट ‘विवेकवाहिनी’ या नावाने कार्यरत
होऊ शकेल. ‘विवेकवाहिनी’ हे प्रारूप सध्या काही महाविद्यालयांत कार्यरत आहे व त्याला उच्च
शिक्षण संचालकांची मान्यताही आहे. शाळेमध्ये मात्र शिक्षणसंस्थेच्या अनुमतीने ते कार्यरत
करावे लागेल.
६) समाजबदलाचे
विचार, उच्चार, प्रसार, आचार, संघटन व संघर्ष हे सहा टप्पे मानता येतील.
यापैकी प्रामुख्याने विचार-उच्चार-प्रसार या मार्गाने कार्य होईल. विचार मांडणाऱ्या
व्यक्ती त्याप्रमाणे आचार करणाऱ्या असतील तर चांगलेच; परंतु याबाबतच्या मर्यादा लक्षात घेता तसा
आग्रह राहणार नाही. संघटन ‘विवेकवाहिनी’ या नावाने पूर्णत: शिक्षणसंस्थांच्या अखत्यारित चालेल. संघर्षाचे
लढे अपेक्षित नाहीत.
७) जाहीरनामा
अंमलबजावणीचा सर्व कार्यक्रम या उपक्रमात स्वत:हून सामील होणाऱ्या शिक्षणसंस्थांमार्फत
त्यांच्या-त्यांच्या कार्यक्षेत्रात राबवला जाईल. मात्र या सर्व शिक्षणसंस्थांनी एकत्रितपणे
निर्णय घेतल्यास हा जाहीरनामा शासनाने स्वीकारावा,
असा प्रयत्न करण्यात येईल.
कृती
कार्यक्रम
पुढे कृती कार्यक्रमाची रूपरेखा आहे. मात्र यातील तपशील सहभागी
होणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या सूचनांनुसार विकसित होऊ शकेल. वैचारिक आशयाशी सुसंगत अशा
स्वरुपाच्या कोणत्याही नव्या कृती कार्यक्रमाचे स्वागतच आहे.
१) शाळेच्या प्रार्थनेत अशा अनेक गीतांचा आवर्जून समावेश करता येईल
की, ज्या गीतांच्यामध्ये महाराष्ट्रातील
संत आणि समाजसुधारकांचा खरा वारसा असेल. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल. स्त्री-पुरुष समता,
जातधर्म यापलिकडे जाणारा विचार, श्रमाचे महत्त्व वगैरेंचा समावेश असेल.
२) अंधश्रद्धा कोणती व
श्रद्धा कोणती, या
चर्चेमध्ये प्रबोधन अडकून पडण्याचे कारण नाही. महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा
बनवला आहे. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या कायद्याच्या परिशिष्टात एकूण १२ प्रकारच्या
अंधश्रद्धांचा उल्लेख केला आहे व त्या दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आल्या
आहेत. यामध्ये जादूटोणा, भानामती,
डाकीण प्रथा, मंत्राने विष उतरवणे, भुताने झपाटले असे समजून छळ करणे वगैरेचा
समावेश आहे. या बाबी गुन्हेगारी स्वरुपाच्या आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या बाबींना अंधश्रद्धा
समजावे, असे थेट मान्य करणे शक्य
आहे.
३) विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून कार्यकारणभावाचे गाभातत्त्व
नीटपणे समजावून सांगावे. चमत्कार होतो असे मानल्यास वैज्ञानिक दृष्टिकोन खोटा पडतो, हे सांगावे. पूर्वी घडून गेलेल्या चमत्काराबद्दल
ते तपासता येत नसल्यामुळे निर्णायक भूमिका घेता येत नाही. परंतु सध्याच्या युगात चमत्कार
घडत नाहीत, हे सांगावयास हवे. तसेच
फलज्योतिषासारखे विषय खगोलशास्त्राच्या विज्ञानाशी कसे जोडून पाहावेत, याची सवय लावावी.
४) वैज्ञानिक दृष्टिकोन
हा शिक्षणात बाहेरून उपरा या पद्धतीने रूजवण्याची गरज नाही, तर विज्ञान शिक्षण घेत असतानाच ते वैज्ञानिक
दृष्टिकोनाने आणि त्याच वेळी आनंददायी व कृतिशील करता येते, याबाबत पुरेसे तज्ज्ञांचे सहाय्य उपलब्ध
आहे. शिक्षण संस्थांचे जे विज्ञान शिक्षक वा प्राध्यापक यात उत्सुकता दाखवतील,
त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल.
५) कालबाह्य कर्मकांडांच्यामुळे
होणारे नुकसान टाळण्यासाठी मानसिकता तयार करणे व विधायक पर्याय देणे उदा. होळीमध्ये
शेणी, लाकूड जाळण्याऐवजी आपला
भाग स्वच्छ करून कचऱ्याची होळी करावी. विवाहात तांदळाच्या अक्षतेऐवजी फुलांचा पर्याय
वापरावा.
६) वैज्ञानिक दृष्टिकोन
व्यक्तीला एका उन्नत जीवनाची दिशा दाखवतो. विवेकी जगणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचेच
मूल्यात्मक रूप आहे. यामुळेच अविवेकाला प्रोत्साहन देणाऱ्या अवैज्ञानिक आत्मघातकी जीवनशैलीमुळे
होणाऱ्या सर्वंकष व दीर्घकालीन नुकसानीची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यामध्ये
फास्ट फूड सेवन, व्यसनाची
ओढ, व्यायाम व वाचन यांचा
अभाव यांचा समावेश असावा. चालू काळातला एक महत्त्वाचा रोग या अंगाने वाढत्या हिंसाचाराकडे
आज तज्ज्ञ पाहत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हिंसेचा त्याग हे मूल्य रूजवावयास
हवे. तसेच नियमित वाचन करावयाचा आग्रह निर्माण करणारी वाचनसंस्कृती निर्माण करावयास
हवी.
७) भारतातील जातिव्यवस्था
ही एकाच वेळी एक प्रचंड शोषण व्यवस्था व त्याचवेळी तेवढीच मोठी अंधश्रद्धा आहे. जातिव्यवस्थेतील
शोषणाच्या विरोधात भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाच्या कल्पनेला पाठिंबाच द्यावयास
हवा. मात्र जन्मजात उच्च-नीचता मानणे व त्यामुळे आंतरजातीय विवाहाला विरोध करणे हे
अनेक कारणांनी अनुचित आहे, हे
देखील बिंबवण्याची गरज आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २००८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा