वार्तापत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वार्तापत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

खरा केंद्रबिंदू



खरा केंद्रबिंदू
दाभोलकर, संघटन, जाहिरात संकलन, वार्तापत्र
आपल्या दिवाळी अंकाची तयारी जोरात सुरू होती. सुरुवातीच्या काळात संपादकांचा सूर काळजीचा होता. अपेक्षित तारखेपर्यंत ८५ हजारांच्याच जाहिराती ताब्यात आल्या होत्या. अंकाचा खर्चही त्यापेक्षा बराच जास्त होता. पण हळूहळू चित्र बदलत गेले. चारही बाजूंनी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी जाहिरातींचा ओघ सुरू झाला आणि बघता-बघता जाहिरातींच्यामधून मिळणाऱ्या रकमेचा आकडा दोन लाख ७५ हजार ओलांडून गेला. मला समाधान, आनंद, अभिमान सगळ्याच भावना मनात दाटून आल्या. जाहिरातीसाठी कोणाही बुजुर्ग व्यक्तीचा वरदहस्त नसताना महाराष्ट्रात दूरदूर पसरलेल्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या चिकाटीने ही झेप मारावी आणि त्यांना तसा प्रतिसाद मिळावा, ही बाब कार्यकर्ते आणि चळवळ दोघांनाही भूषणावह आहे, असे वाटले. वेगळ्या चळवळीशी संबंधित एका दिवाळी अंकाबद्दल चर्चा झाली. त्यावेळी जाहिरातीचा ताळेबंद आणि हिशेब बघताना तर समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावयास हवी, याची खात्री पटली.

यानंतर थोड्याच दिवसात नवनाथ लोंढे, राजगुरूनगर, पुणे यांचे पत्र आले. श्री. लोंढे हे बऱ्याच प्रतिकुलतेला तोंड देत अत्यंत तळमळीने चळवळीला वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्रात चळवळीच्या वाढत्या प्रभावाच्या वर्णनाबरोबर खंतही होती. गेल्या वर्षभरातील त्यांच्याशी संबंधित घटनांचा आढावा होता. त्यांनी असे मत व्यक्त केले की, काही बाबतीत आपण बरेच कमी पडतो. उदाहरणासह त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि त्यामध्ये तथ्यांश होताच. बुवाबाजीच्या एका प्रकरणाचा नेटाने पाठपुरावा करावयास न जमणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अंधश्रद्धा निर्मूलन शिबिराची बातमी प्रसिद्ध न होणे, ज्या ठिकाणी कार्यक्रम जाहीर व चांगले झाले, त्या ठिकाणी नवसासाठी कोंबडे मारले जाणे राजरोसपणे सुरू राहणे; अशा स्वरुपाची त्यांची खंत होती. माझ्यापुढे एक प्रश्नचिन्ह उभे राहिले.

प्रतिभा आणि आकर्षण टिकणार नाही!
जाहिराती चांगल्या प्रकारे मिळाल्या, याबद्दल कार्यकर्त्यांच्या करावयाच्या अभिनंदनाची शाई वाळते न वाळते, तोच डिसेंबर महिन्यात वार्तापत्राच्या वर्गणीदारांची पुढील वर्षाची नोंदणी सुरू करावी, हा तगादा लावावा लागणार. ते काम होईपर्यंत राज्य मेळावा आणि परिषद यासाठी अधिकाधिक संख्येने क्रियाशील कार्यकर्ते येतील. यासाठी उठाव करणे आलेच. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाचे काही विशेष अभ्यासक्रम आपण सुरू करत आहोत. त्यापैकी एखाद्या विषयाचे एकतरी शिबीर जानेवारी महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात व्हावयास हवे. फेब्रुवारी महिन्यात मार्चमध्ये धरणे विधानसभेसमोर धरण्याच्या कार्यक्रमाची आखणी झाली. चळवळीने ज्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत त्या पूर्ण करायच्या तर मार्ग खडतर व कष्टाचा आहे. सवडीसवडीने जमेल तसे काम केले तर मार्ग सोपा आणि सवलतीचा आहे. काम वाढले म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. आपल्यातील कार्यकर्त्यांच्याही संघटनेकडून अपेक्षा वाढल्या असणार. त्यामुळे कठोर काम केले तरच लोकांच्या अपेक्षाभंगाच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार नाही. सवडीचा आणि सोयीचा मार्ग आता उपलब्ध नाही.

खरी अडचण येथून सुरू होते. यापुढील टप्प्यावरचे काम अवघडच आहे. बुवाबाजीच्या चमत्काराचे सादरीकरण, चमत्कारांना आव्हान वा बुवाचा पर्दाफाश किंवा भुताचा शोध याच्या पुढील टप्प्यावर जाणारे हे काम आहे. आपली एक मर्यादा अशी आहे की, कार्यकर्ता लहानपणापासून आपल्याकडे घडलेला नाही. तो चळवळीला मध्येच कोठेतरी जोडलेला आहे. त्याला नोकरी आहे, कुटुंब आहे, अन्य अवधाने आहेत आणि हे सारे सांभाळत तो कार्य करीत आहे. त्याला जी मर्यादा असणार ती लक्षात न घेता चळवळीच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षा पेलणार नाही आणि चळवळीचा महत्त्वाकांक्षी पुढच्या टप्प्यावर विचार केला नाही, तर आजची प्रतिभा आणि आकर्षण टिकणार नाही.

हा सुवर्णमध्य कसा साधायचा? काहीही झाले तरी आगेकूच सुरूच ठेवायची असेल, तर शॉर्टकट नाही. स्वत:चा वेळ काटेकोरपणे वापरणे आणि त्यामुळे उपलब्ध होणारा वेळ समितीच्या कार्याला देणे, याची निकड आहे. व्यक्तिगत आणि संघटनात्मक पातळीवर जेवढी शिस्त आणता येईल, तो प्रयत्न कसोशीने करावयास हवा. छोटी-मोठी साधनसामग्री जोडावयास हवी. सर्व थरातील नवीन लोक चळवळीकडे खेचले जातील आणि त्यातील काही कार्यकर्ते बनतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावयास हवे. या साऱ्यासाठी किमान समर्पणाची भावना त्याबद्दल कोणतेही अवडंबर न माजवता आचरणात आणावयास हवी. उत्तम दिवाळी अंक, भरपूर जाहिराती, भव्य राज्यव्यापी मेळावा हे सारे विस्तारण्याचे लक्षण आहेच; पण ही बाह्यलक्षणे काही वेळा पुरेशी यथार्थ ठरत नाहीत. संघटनेच्या खऱ्या विस्तारण्याचे प्रतिबिंब त्यातून पडतेच असे नाही. खऱ्या अर्थाने विस्तारणाऱ्या क्षितिजाचा केंद्रबिंदू आहे, कार्यकर्त्यांची बांधिलकी.            
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९७)

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना



कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना
दाभोलकर, कौटुंबिक जिव्हाळा, शनि-शिंगणापूर, वार्तापत्र, संघर्ष
वेळ रात्री १०.३० ची. पुण्याहून फोन मिळाला, अनिल इंगवलेला अपघात झाला होता. सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे अपघात झाला. एक दिवस तेथे उपचार. पुढे दोन दिवस औरंगाबादला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार अपुरे. हाताची सूज प्रचंड. शर्टातून हात निघाला नाही. म्हणून शर्टाची बाही फाडावी लागली. शेवटी अनिल पुणे ससूनमध्ये दाखल झाला. अनिल इंगवले हा आपला कबनूर शाखेचा धडाडीचा कार्यकर्ता. हात राहतो की जातो, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. उपचार तातडीने हवेत. खात्रीचे हवेत; शिवाय आर्थिक मदत हवी आणि मानसिक आधारसुद्धा. पुणे हे गाव तसे धावपळीचे. आपले सगळे कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात व्यग्र. मी रात्रीच श्री. दीपक गिरमे यांना फोन केला. सकाळपासून पुणे शाखेचे कार्यकर्ते अनिलच्या दिमतीला हजर झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गाठण्यात आले. सर्व काही काळजीपूर्वक होईल, याची खात्री करण्यात आली. आवश्यक पैशांची तातडीने तरतूद झाली. चंदू चव्हाण, भालचंद्र जोशी हे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये अनिल होता तोपर्यंत रात्री झोपण्यास गेले. ही सगळी धावपळ जेव्हा मला समजली, तेव्हा खूप बरे वाटले. संघटना म्हणजे सभासदत्वाचा फॉर्म नव्हे अथवा साप्ताहिक बैठका नव्हेत. वैचारिक वादविवाद आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष एवढ्यातूनही समितीचे काम उभे राहू शकत नाही. कुठल्याही संघटनेत एक कौटुंबिक जिव्हाळा असावा लागतो. आपला सहकारी अडचणीत आल्यावर स्वत:चे काम बाजूला ठेवून धावून जाण्याची वृत्ती असावी लागते. प्रसंग आला म्हणजेच त्याची परीक्षा होते आणि या परीक्षेत ज्या संघटनेचे कार्यकर्ते उतरतात, तीच संघटना सर्व प्रतिकूल परिस्थितींना टक्कर देत टिकून राहते, वर्धिष्णू होते. आपल्या संघटनेत हे घडत आहे. हा दिलासा पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिला. इतरांच्यासाठी एक वस्तुपाठ उभा केला.

नगरच्या साहित्य संमेलनात शनि-शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) हे देवस्थान महिलांच्यासाठी खुले व्हावे म्हणून आपण चळवळ करणार होतो. तशा बातम्याही येऊन गेल्या. पुढे तीन आठवडे उलटले. संमेलन जवळ आले. त्यावेळी काही बाबी पुढे आल्या.
१)    या बातमीमुळे महाराष्ट्रात ज्या प्रमाणात चर्चा होईल असे वाटले होते, तशी ती झाली नाही. खुद्द नगर जिल्ह्यातही झाली नाही.
२)    नगरमध्ये जनमताची एक बाजू अशी होती की, आमचा या मागणीला पाठिंबा आहे. पण कधी नव्हे ते साहित्य संमेलन होत आहे, या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही बाहेरून तुमचे संघर्ष कशाला घुसवता?
३)    चळवळीचा मुद्दा धर्माशी जोडलेला आणि म्हणूनच संवेदनशील आहे. या मुद्द्यावर आंदोलन करताना प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आल्यास प्रचंड गर्दीत त्याचे गोंधळात वा दंगलीत रूपांतर होऊ शकेल. समितीच्या कार्यावर नाराज असलेल्या काही विघ्नसंतोषी लोकशक्ती हे कदाचित मुद्दामहून घडवून आणतील आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहून भलतेच वळण लागेल.

२६ डिसेंबरला मी नगरला होतो. नगर जिल्ह्यातील बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जमलेले होते. त्यांच्यासमोर मी वरील वस्तुस्थिती मांडली आणि तीन पर्याय सांगितले. पहिला म्हणजे घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आंदोलन करायचे आणि जे काही सोसावे लागेल ते सर्व सोसायचे. दुसरा पर्याय आंदोलन पूर्ण रद्द करायचे आणि तिसरा म्हणजे आंदोलन न करता फक्त प्रबोधन करावयाचे. त्याबाबत आपली भूमिका मांडणाऱ्या छोटेखानी पुस्तिकेचे वितरण करावयाचे आणि संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांच्या पाठिंबादर्शक सह्या घ्यावयाच्या.

सर्व कार्यकर्त्यांना मत विचारण्यात आले आणि सर्वांनी एकमुखाने असे सांगितले की, मोहीम प्रबोधनापुरती मर्यादित करावी. याबरोबरच या प्रश्नांवर महाराष्ट्र पातळीवर महिलांची परिषद घेणे, देवस्थानच्या दारात सद्भावना जागृती उपोषण करणे आणि त्यातूनही प्रश्न नाही सुटला तर सत्याग्रह करणे. ही पुढील वाटचालही नक्की करण्यात आली.

समितीमधील नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयातून मला असे जाणवले की, चळवळीतील कार्यकर्त्यांचे मन प्रगल्भ होत चालले आहे. आततायीने एखादी गोष्ट करणे किंवा एकदम घूमजाव करणे यापेक्षा चिवटपणे संघर्ष करण्याचा हा दीर्घकालीन मार्ग आहे, याची समज त्यांना येत नाही. मला ही खूण आशादायी वाटते.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांत तरी गेलो. सर्वत्र चौकशी करत होतो. वार्तापत्र वर्गणीदार नोंदणी कशी चालली आहे? प्रतिसाद अजिबात उत्साहवर्धक नव्हता आणि त्याचे एकमेव खरे कारण म्हणजे कार्यकर्ते वर्गणी मागण्यास बाहेरच पडलेले नव्हते. हे चित्र अस्वस्थ करणारे. वर्षाकाठी कार्यकर्त्यावर असलेली राज्य पातळीवरील जबाबदारी ती फक्त एवढीच. त्यातही आपली वर्गणी निश्चितच कमी, अंक नियमित, दर्जा चांगला. चळवळीला मर्यादित का होईना; पण अनुकुलता. हे सर्व असताना केवळ उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे जर आपण वर्गणीदार वाढवण्याच्या कर्तव्यात कसूर करणार असू तर चळवळ वेगाने पुढे कशी सरकणार? कार्यकर्त्याने जिद्द दाखवली तर काय घडते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंदखेड्यामध्ये या डिसेंबरला दोनशे वर्गणीदार केले. धुळे जिल्ह्यातील एकट्या तालुक्यात जर हा प्रतिसाद मिळू शकतो आणि कर्तृत्वाने मिळवला जातो, तर महाराष्ट्रातील सर्व शाखांनी मनावर घेतले तर केवढी झेप आपण मारू शकू?
पण लक्षात कोण घेतो?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी ११९७)

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

वार्तापत्राची भूमिका



वार्तापत्राची भूमिका
  
दाभोलकर, वार्तापत्र, लेखनशैली, तात्त्विक मतभेद, संयम, कार्यकुशलता
महाराष्ट्रभर फिरत असताना वार्तापत्र पोचते आहे, आवडते आहे, हे आता जाणवू लागले आहे. वर्गणीदारांची संख्याही वाढू लागली आहे. (अर्थात ती अजून बरीच वाढवावयास हवी); परंतु एक उणीव मला सातत्याने जाणवत आहे, ती म्हणजे प्रत्यक्षात चळवळ करणारी, धडपडणारी आपली कार्यकर्ती मंडळी लिहिताना हात भलताच आखडता घेतात.

वार्तापत्राची मूळ भूमिका काय? ते सर्वप्रथम वार्तापत्र आहे. महाराष्ट्रभर आपल्या संघटनेत, उपक्रमात, आपण केलेल्या चळवळीत आणि लढ्यात जे घडते त्याचे प्रतिबिंब वार्तापत्राच्या पानातून उमटावे, ही सर्वांची अपेक्षा अगदी स्वाभाविक आहे. शिवाय हे सगळे त्या-त्या वेळी घडावयास हवे म्हणजे त्यात ताजेपणा राहतो आणि पुन्हा नव्याने घडणाऱ्या घटनांच्यासाठी पाने मोकळी राहतात. १३ डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी उमरगा तालुक्यातील अनेक भूकंपग्रस्त गावात शोध भुताचा मोहीम राबवली. हा उपक्रम भूकंपग्रस्तांच्या दृष्टीने वेगळा होता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचे चळवळीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून वेळ काढून पदरमोड करून कार्यकर्ते आले. परंतु कोणत्या गावातून हा कार्यक्रम झाला? कसा झाला? सहभागी होणाऱ्या गावकऱ्यांना काय वाटले? याची नीटपणे नोंद आणि रिपोर्टिंग एकत्रितपणे तयारच झाले नाही; मग ते वार्तापत्रात येणार कुठून? आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाखांना, आपल्या अन्य वाचकांना ते कळणार कसे? शिवाय खरे तर रिपोर्टिंग म्हणजेच सर्व काही नव्हे. आपण काही केवळ त्यात भाग घेणारे नव्हतो तर संयोजकही आपणच होतो; मग या संयोजनात त्रुटी कोणत्या जाणवल्या? चांगले काय झाले? काय फसले? भावी काळात असे कार्यक्रम घेताना कोणती काळजी घ्यावयास हवी? याचा विचारविनिमयही वार्तापत्रातून कोणीतरी उपस्थित केल्याशिवाय पोचणार कसा?

मल्लिनाथ महाराज हे लातूर भागातील प्रस्थ. लातूरच्या कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून त्या महाराजाविरोधी यशस्वी झुंज दिली. त्याची हकिकत यावयास हवीच; परंतु त्याबरोबरच यामुळे चिडून जाऊन आपल्या लातूरच्या कार्यवाहांवर खुनीहल्ला झाला. पंधरा कार्यकर्त्यांच्यावर दरोड्याच्या आरोपाखाली खोटे खटले घालण्याचा प्रयत्न झाला. हे वार्तापत्रात ताबडतोबीने यावयास नको काय? त्यामुळे अशा हल्ल्यांचा महाराष्ट्रव्यापी निषेध करता येतो. आपापल्या ठिकाणी बुवाबाजीविरोधी लढताना घ्यावयाची काळजी ही अधिक काटेकोर बनते.

व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते बोले तैसा चाले... असा प्रयत्न करतात. हा रस्ता खडतर असतो. विशेषत: ज्यावेळी भावना गुंतलेले प्रसंग असतात, त्यावेळी तर चांगलीच सत्त्वपरीक्षा होते. घरातल्यांची नाराजी पत्करून कार्यकर्ते आपले ब्रीद सांभाळतात. घटना व्यक्तिगत असते; पण तिची चौकट पूर्ण सामाजिक असते. बहुसंख्य कार्यकर्त्यांना व्यक्तिगत जीवनात हे या ना त्या स्वरुपात सोसावे लागणार असते. समाजही या कसोटीकडे साक्षेपी बघत असतो. आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडतात. ते कसोटीला उतरतात. पण त्यावेळची स्वत:च्या मनातली, कुटुंबातील, समाजातील घालमेल शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न जवळपास होत नाही. एक अनुभव तसाच व्यक्तिगत बनून राहतो.

असे बरेच काही-काही सतत घडत असते की, ज्याची नोंद आवश्यक असते; पण होत नाही. खरे तर आपण वार्तापत्र विकतो ते सवलतीच्या दरात. वार्षिक ४० रुपये खर्च एका अंकामागे आपल्याला सहज येतो. परंतु आपण मात्र अंक देतो अवघ्या वार्षिक २० रुपयांत. हे यासाठीच की, वार्तापत्र जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावे सुलभपणे आणि त्याबरोबरच आपली चळवळ ही त्यांच्यापर्यंत पोचावी; परंतु त्यासाठी लिहिण्याचा जो स्वाभाविक प्रतिसाद हवा, तो मात्र मिळताना दिसत नाही.

असे का होते? शक्य आहे की, याचे महत्त्वच लक्षात आले नसेल. कदाचित महत्त्व लक्षात येत असेल; परंतु आळस कुरघोडी करत असेल. काहीही असले तरी त्यावर मात करणे सहज शक्य आहे. एक अडचण अशीही दिसते की, इच्छा आहे, सवड आहे; पण लेखन जमतच नाही. तसे असेल तर ती चुकीची कल्पना मनातून पहिल्यांदा हद्दपार करा. महत्त्व आहे तुमच्या अनुभवाच्या जिवंतपणाला. ते तुम्हाला जमतील तशा भाषेत लिहा. गरज वाटली तर त्यासोबत त्या विषयाला धरून जे छापून आले त्याची कात्रणे पाठवून द्या. या सगळ्या घटना आणि त्यामागचा आशय संपादक स्पष्ट करून मांडतील व आपले काम साध्य होईल. काही जणांची अशीही तक्रार असते की ‘आम्ही लिहितो हो; पण ते छापले जात नाही.’ खरे तर अशी तक्रार करण्याची पाळी तुमच्यावर आली तर अपवादानेच. कारण तुमच्यासाठी तर वार्तापत्र सुरू आहे. परंतु लिहीत असताना (विशेषत: ज्यांना या ना त्या स्वरुपात लिहिण्याची सवय आहे) विषय नेमक्या शब्दांत मांडला जावा. लिखाण चांगले उतरावे, यासाठी थोडे अधिक परिश्रम घेण्यास काय हरकत आहे? आणि याबरोबरच एक गोष्टही मनात बाळगावयास हवी ती अशी की, आपल्याला चांगले वाटणारे आपले लेखन संपादित व संस्कारित करण्याचा अधिकार आपणच संपादकांना दिला आहे, तो त्यांनी बजावला तर ते आपण मान्य करावयास हवे.

तेव्हा थोडक्यात काय? लिहिते व्हा, इतरांना लिहिते करा आणि अगदीच अडचण आली तर संपादक मंडळाशी संपर्क साधून त्यांचा प्रतिनिधी बोलावून; पण आपली लढाई सर्वांच्यापर्यंत पोचेल याचा सजग प्रयत्न करा.

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी, जि. नाशिक यांच्या शाखा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पसरलेल्या आहेत. त्यांच्या शिकवणुकीत अनेक अवैज्ञानिक व अंधश्रद्धा वाढवणाऱ्या गोष्टी असतात. जळगाव जिल्ह्यात त्यांच्या प्रचारकांशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे वादविवाद केला. त्यांना जाहीर आव्हान दिले आणि स्वाभाविकच सांगण्यात येणारी मते विज्ञानाच्या निकषांवर टिकण्यासारखी नसल्यामुळे स्वामी समर्थ संप्रदायांच्या सेवेकऱ्यांना (भक्तांना) माघार घ्यावी लागली. हा एक प्रभावी व परिणामकारक कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शाखेच्या कार्यकर्त्यांनी केला.

खरा मुद्दा आहे तो पुढचा,

यानंतर त्या संप्रदायाचे सेवेकरी, निफाडच्या कॉलेजचे प्राचार्य व्यवहारे यांची व नाशिकच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली. या चर्चेतदेखील ‘करणी खरी असते, अग्निहोमामुळे मनातील विकार नाहीसे होतात, नागनारायण बळी पूजेत (नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या पूजेचा वैशिष्ट्यपूर्ण व लोकांना लुबाडणारा प्रकार) तथ्य असते, असे सांगण्यास सेवेकऱ्यांनी सुरुवात केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोधही केला.

परंतु स्थानिक प्रमुख वृत्तपत्रात मात्र बातमी झळकली की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समर्थ सेवेकरी यांच्यात यशस्वी चर्चा होऊन उभय बाजूत समझोता झाला, असे पत्रक नाशिकच्या कार्यकर्त्यांनी काढले आहे. बरे, तर याचा त्वरित खुलासा कडक शब्दांत त्याच वृत्तपत्रात छापावयास लावणे, ही नाशिक शाखेची जबाबदारी होती. कारण अशा बातम्यांतून समितीबाबत लोकांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता असते. वृत्तपत्राने हा खुलासा छापला नसता तर त्यांनी मध्यवर्तीकडे ताबडतोब कळवणे आवश्यक होते. अकारण व हेतुपुरस्सर चळवळीची बदनामी करणाऱ्या अशा मजकुरांचा प्रतिवाद ताबडतोब करणे शक्य, इष्ट व योग्य असते; परंतु नाशिकची शाखा यात उणी पडली.

परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. रावेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना हा अधिकार कुणी दिला?’ असे खडसावणारे पत्रक काढले व ते दै. ‘लोकमत’मध्ये छापून आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक शाखा दुसऱ्या शाखेविरोधात उभी आहे, असे एक विचित्र चित्र यामधून निर्माण झाले. खरे तर असे पत्रक काढण्याची अजिबात गरज नव्हती. खरोखर काय झाले आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांची चूक आहे की, वृत्तपत्रांची याची शहानिशा प्रत्यक्ष भेटून वा निदान पत्राने करून घ्यावयास हवी होती आणि संयुक्तपणे समितीच्या कार्याला सुसंगत अशी भूमिका कणखरपणे घ्यावयास हवी होती. वृत्तपत्रातून वाद वाढवणे, त्यामध्ये आपल्याच अन्य शाखांना अकारण गुंफणे, यातून काय साधले? मला ही गोष्ट उशिरा कळली. धुळे, जळगाव, नाशिक या भागातील वृत्तपत्रे महाराष्ट्रात अन्यत्र मिळत नाहीत. परंतु त्या भागातील कार्यकर्त्यांनी एक तर जागरूकपणे ताबडतोब कळवावयास हवे होते किंवा खरे तर पुढाकार घेऊन प्रकरण लगेच संपवावयास हवे होते. आपल्याबद्दल लोकांच्या मनात हेतुत: गैरसमज करून देण्याचा उद्योग अनेकांचा सुरू असतोच. शिवाय आपली चळवळ आहे प्रवाहाविरुद्ध पोहण्याची. यासाठी तरी आपला संयम, समज व कार्यकुशलता प्रभावीपणे वापरण्याचा आपला प्रयत्न हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९३)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...