शनिवार, २ डिसेंबर, २०१७

कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना



कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना
दाभोलकर, कौटुंबिक जिव्हाळा, शनि-शिंगणापूर, वार्तापत्र, संघर्ष
वेळ रात्री १०.३० ची. पुण्याहून फोन मिळाला, अनिल इंगवलेला अपघात झाला होता. सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे अपघात झाला. एक दिवस तेथे उपचार. पुढे दोन दिवस औरंगाबादला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार अपुरे. हाताची सूज प्रचंड. शर्टातून हात निघाला नाही. म्हणून शर्टाची बाही फाडावी लागली. शेवटी अनिल पुणे ससूनमध्ये दाखल झाला. अनिल इंगवले हा आपला कबनूर शाखेचा धडाडीचा कार्यकर्ता. हात राहतो की जातो, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. उपचार तातडीने हवेत. खात्रीचे हवेत; शिवाय आर्थिक मदत हवी आणि मानसिक आधारसुद्धा. पुणे हे गाव तसे धावपळीचे. आपले सगळे कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात व्यग्र. मी रात्रीच श्री. दीपक गिरमे यांना फोन केला. सकाळपासून पुणे शाखेचे कार्यकर्ते अनिलच्या दिमतीला हजर झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गाठण्यात आले. सर्व काही काळजीपूर्वक होईल, याची खात्री करण्यात आली. आवश्यक पैशांची तातडीने तरतूद झाली. चंदू चव्हाण, भालचंद्र जोशी हे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये अनिल होता तोपर्यंत रात्री झोपण्यास गेले. ही सगळी धावपळ जेव्हा मला समजली, तेव्हा खूप बरे वाटले. संघटना म्हणजे सभासदत्वाचा फॉर्म नव्हे अथवा साप्ताहिक बैठका नव्हेत. वैचारिक वादविवाद आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष एवढ्यातूनही समितीचे काम उभे राहू शकत नाही. कुठल्याही संघटनेत एक कौटुंबिक जिव्हाळा असावा लागतो. आपला सहकारी अडचणीत आल्यावर स्वत:चे काम बाजूला ठेवून धावून जाण्याची वृत्ती असावी लागते. प्रसंग आला म्हणजेच त्याची परीक्षा होते आणि या परीक्षेत ज्या संघटनेचे कार्यकर्ते उतरतात, तीच संघटना सर्व प्रतिकूल परिस्थितींना टक्कर देत टिकून राहते, वर्धिष्णू होते. आपल्या संघटनेत हे घडत आहे. हा दिलासा पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिला. इतरांच्यासाठी एक वस्तुपाठ उभा केला.

नगरच्या साहित्य संमेलनात शनि-शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) हे देवस्थान महिलांच्यासाठी खुले व्हावे म्हणून आपण चळवळ करणार होतो. तशा बातम्याही येऊन गेल्या. पुढे तीन आठवडे उलटले. संमेलन जवळ आले. त्यावेळी काही बाबी पुढे आल्या.
१)    या बातमीमुळे महाराष्ट्रात ज्या प्रमाणात चर्चा होईल असे वाटले होते, तशी ती झाली नाही. खुद्द नगर जिल्ह्यातही झाली नाही.
२)    नगरमध्ये जनमताची एक बाजू अशी होती की, आमचा या मागणीला पाठिंबा आहे. पण कधी नव्हे ते साहित्य संमेलन होत आहे, या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही बाहेरून तुमचे संघर्ष कशाला घुसवता?
३)    चळवळीचा मुद्दा धर्माशी जोडलेला आणि म्हणूनच संवेदनशील आहे. या मुद्द्यावर आंदोलन करताना प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आल्यास प्रचंड गर्दीत त्याचे गोंधळात वा दंगलीत रूपांतर होऊ शकेल. समितीच्या कार्यावर नाराज असलेल्या काही विघ्नसंतोषी लोकशक्ती हे कदाचित मुद्दामहून घडवून आणतील आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहून भलतेच वळण लागेल.

२६ डिसेंबरला मी नगरला होतो. नगर जिल्ह्यातील बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जमलेले होते. त्यांच्यासमोर मी वरील वस्तुस्थिती मांडली आणि तीन पर्याय सांगितले. पहिला म्हणजे घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आंदोलन करायचे आणि जे काही सोसावे लागेल ते सर्व सोसायचे. दुसरा पर्याय आंदोलन पूर्ण रद्द करायचे आणि तिसरा म्हणजे आंदोलन न करता फक्त प्रबोधन करावयाचे. त्याबाबत आपली भूमिका मांडणाऱ्या छोटेखानी पुस्तिकेचे वितरण करावयाचे आणि संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांच्या पाठिंबादर्शक सह्या घ्यावयाच्या.

सर्व कार्यकर्त्यांना मत विचारण्यात आले आणि सर्वांनी एकमुखाने असे सांगितले की, मोहीम प्रबोधनापुरती मर्यादित करावी. याबरोबरच या प्रश्नांवर महाराष्ट्र पातळीवर महिलांची परिषद घेणे, देवस्थानच्या दारात सद्भावना जागृती उपोषण करणे आणि त्यातूनही प्रश्न नाही सुटला तर सत्याग्रह करणे. ही पुढील वाटचालही नक्की करण्यात आली.

समितीमधील नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयातून मला असे जाणवले की, चळवळीतील कार्यकर्त्यांचे मन प्रगल्भ होत चालले आहे. आततायीने एखादी गोष्ट करणे किंवा एकदम घूमजाव करणे यापेक्षा चिवटपणे संघर्ष करण्याचा हा दीर्घकालीन मार्ग आहे, याची समज त्यांना येत नाही. मला ही खूण आशादायी वाटते.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांत तरी गेलो. सर्वत्र चौकशी करत होतो. वार्तापत्र वर्गणीदार नोंदणी कशी चालली आहे? प्रतिसाद अजिबात उत्साहवर्धक नव्हता आणि त्याचे एकमेव खरे कारण म्हणजे कार्यकर्ते वर्गणी मागण्यास बाहेरच पडलेले नव्हते. हे चित्र अस्वस्थ करणारे. वर्षाकाठी कार्यकर्त्यावर असलेली राज्य पातळीवरील जबाबदारी ती फक्त एवढीच. त्यातही आपली वर्गणी निश्चितच कमी, अंक नियमित, दर्जा चांगला. चळवळीला मर्यादित का होईना; पण अनुकुलता. हे सर्व असताना केवळ उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे जर आपण वर्गणीदार वाढवण्याच्या कर्तव्यात कसूर करणार असू तर चळवळ वेगाने पुढे कशी सरकणार? कार्यकर्त्याने जिद्द दाखवली तर काय घडते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंदखेड्यामध्ये या डिसेंबरला दोनशे वर्गणीदार केले. धुळे जिल्ह्यातील एकट्या तालुक्यात जर हा प्रतिसाद मिळू शकतो आणि कर्तृत्वाने मिळवला जातो, तर महाराष्ट्रातील सर्व शाखांनी मनावर घेतले तर केवढी झेप आपण मारू शकू?
पण लक्षात कोण घेतो?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी ११९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...