गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

अंधश्रद्धेमागील धार्मिक आशय



अंधश्रद्धेमागील धार्मिक आशय
 
दाभोलकर, प्रबोधन, विरोध, अंधश्रद्धा
ता. १८ एप्रिल. वेळ रात्रीची १०.३०. स्थळ - सांगलीचे रेल्वे स्टेशन. डॉ. श्रीराम लागू, डॉ. प्रदीप पाटील, उज्ज्वला व मी असे काहीजण गाडीची वाट बघत उभे. देवाचे अस्तित्व, धर्मकल्पना, धर्मांधता, धर्मनिरपेक्षता या विषयावरच्या खुल्या चर्चेचे सांगली जिल्ह्यातील समितीने आयोजित केलेले चार कार्यक्रम संपवून डॉ. लागू परत निघालेले असतात. एवढ्यात १५-२० तरुणांचा घोळका आमच्याकडे येतो. स्वत:ची ओळख जहाल हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून ते करून देतात. वागण्यात अरेरावी, उद्धट आक्रमकता पुरेपूर भरलेली. एकेरीवर येण्याच्या तयारीनेच आलेले. डॉ. लागूंना त्यांचा सवाल, ‘तुमची हिंदुत्ववादी व्याख्या सांगा?’ डॉ. लागूंचा स्पष्ट नकार व सडेतोड उत्तर मला जे सांगावयाचे आहे, मी स्पष्ट आणि सविस्तरपणे जिल्ह्यामध्ये दोन दिवस सांगितले आहे. यात काही बोलण्याची मला अजिबात गरज वाटत नाही. तरुणांचे हुज्जत घालणे सुरूच. हिंदुत्वाची व्याख्या डॉ. लागूंच्याकडून त्यांना ताबडतोब आणि रेल्वे स्टेशनवरच हवी असते. थोडी वादावादी होते. ताणतणाव थोडा वाढतो; परंतु हाताबाहेर जात नाही. सियावर रामचंद्र की जय, जय भवानी, जय शिवाजी घोषणा देत घोळका फलाटावरून निघून जातो. निघून जाण्यापूर्वी हिंदू धर्माबद्दल काही बोलायचे नाही, असा सल्ला (की आदेश?) देण्यास विसरत नाहीत.

प्रसंग छोटासाच; पण अंतर्मुख करावयास लावणारा. अंधश्रद्धा या केवळ अज्ञानातून येत नाहीत त्यामागे कळत-नकळत; परंतु अनेकदा प्रभावीपणे धार्मिक आशय लपलेला असतो. खरा धर्म कोणता आणि धर्माच्या नावाने उभे केलेले अवडंबर कोणते? नीतीचा संबंध कशाशी आहे? आणि कोणत्या बाबी अर्थशून्य, निरर्थक कर्मकांडे आहेत, याचा सारासार विवेक स्वत: करणे, जनमानसाला करावयास लावणे, त्याआधारे नीतिमान आचार-विचारासाठी प्रवृत्त करणे हे सारे म्हणूनच आपल्या चळवळीचे महत्त्वाचे व पायाभूत काम ठरते. अलिकडच्या काळातील समाजात धर्मांध वातावरण उभे करण्याच्या काही प्रवृत्तींच्या प्रभावामुळे धर्मचिकित्सेचे हे काम बरेचसे अवघड झाले आहे. वर लिहिलेला अनुभव हा याच वास्तवाची एक झलक आहे. शिवाय या शक्तींना वैचारिक वादविवादाची आवश्यकताच वाटत नाही. तसे असते तर या चर्चेचे आपण सदैव स्वागतच केले असते. या शक्तींचा वैचारिक चर्चेपेक्षा दुसऱ्यांच्या हिंसक मुस्कटदाबीवर अधिक भर असतो. आपले मतच खरे, यापेक्षा वेगळे मत मांडणारे धर्मद्रोही, देशद्रोही आहेत. त्यांना ठोकून काढणे हेच केवळ इष्ट नव्हे, तर अभिमानास्पद आहे, अशी या शक्तींची, संघटनांची धारणा असते. या शक्ती आपल्या महाराष्ट्रात सध्या बलशाली बनत आहेत. यात दूरगामी धोका संभवतो. परिवर्तनाचे कोणतेच काम या शक्ती यशस्वी होऊ देत नाहीत. त्यांना चिकित्सा नको असते आणि धर्मचिकित्सेला तर त्यांचा कडवट विरोध असतो. धर्माचे विधायक; पण परखड मूल्यमापन करू इच्छिणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला या सामाजिक वातावरणाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. डॉ. लागू यांच्यावर ओढवलेल्या छोट्या प्रसंगातून हा इशारा स्पष्टपणे पुढे येतो. मला वाटते, या वास्तवाचे पुरेसे भान आपल्यातील अनेक कार्यकर्त्यांना जवळपास नाही. मग त्यापलिकडे जाऊन या देशातील धर्मनिरपेक्षता कशी आहे, कशी असावी याबद्दलचे वाचन, चिंतन तर दूरच राहिले. बुवाबाजी, चमत्कार, अंधश्रद्धांचे ढोबळ प्रकार यापलिकडे आपण काही करत आहोत व करू इच्छित आहोत, याची सजगता संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना जेवढ्या लवकर येईल, तेवढे चळवळीचे पाऊल दमदार पुढे पडेल. कौतुक आणि प्रसिद्धी याच्या पलिकडे जाऊन चळवळीकडे अनेक अपेक्षा समाजातील विविध थर व्यक्त करताना स्पष्टपणे जाणवते. याचे भान बाळगून कृती करण्यासाठी आपणही आपला वैचारिकरित्या बरोबरच संघटनात्मक कसही वाढवावयास हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...