बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

गुंतागुंत समजून घेणे



गुंतागुंत समजून घेणे

दाभोलकर, संघर्ष, पाठपुरावा, तरुण पिढी
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा केंद्र. शोध भुताचा, बोध मनाचा मोहिमेत जाहीर कार्यक्रमासाठी तेथे गेलो होतो. ता. १० डिसेंबर. बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीचा आगडोंब सगळीकडे उसळला होता. कुडाळला असे झाले. सकाळी ११ वाजता जिजामातेच्या पुतळ्यास कोणी समाजकंटकाने चपलांचा हार घातला. संपूर्ण गाव धडाधडा बंद झाले. जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी होणारा मोठा जाहीर कार्यक्रम कसा होणार, असे प्रश्नचिन्ह उभे राहिले. कुडाळ येथील कार्यकर्त्यांच्या समवेत जिल्हा पोलीसप्रमुखांना भेटून काही मार्ग निघतो का, हे बघावयाचे ठरले. आम्ही जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयात पोचलो. त्यांच्यासमोर बसल्यानंतर लक्षात असे आले की, टेबलावरच गगनगिरी महाराजांचा मोठा फोटो आहे. त्यांनाही वेळ होता आणि आम्हाला तर होताच होता. त्यामुळे ऐसपैस चर्चा झाली. त्यांची मते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मतांच्या अगदी विरोधात होती. रात्री पुन्हा त्यांच्या आग्रहावरून त्यांच्या बंगल्यावर चर्चा झाल्याने ही  मतभिन्नता अधिकच स्पष्ट झाली. परंतु हे सगळे लिहिण्याचे प्रयोजन हे की, या आपल्या व्यक्तिगत मताचा परिणाम त्यांनी आपल्या निर्णयप्रक्रियेवर होऊ दिला नाही. आमची मागणी एवढीच होती की, गावाच्या मध्यवस्तीत आमची जाहीर सभा आहे. तेथे ती घेणे शक्यच नसेल तर निदान बंदिस्त हॉलमध्ये तरी सभा घेण्याची आम्हाला परवानगी द्या. आपल्या कार्याचा हेतू दौऱ्यातील महत्त्वाचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे होणारी अडचण हे लक्षात घेता त्यांनी आपल्या मागणीच्याही पुढे दोन पावले जाऊन अनुकुलता दाखवली. ते म्हणाले, तुम्ही ठरल्या ठिकाणी, ठरल्यावेळी जाहीर सभा घ्या. आम्ही कशाकरिता आहोत? कुणाला सभा घ्यावयास द्यावयाची व कोणाला नाही, हे आम्हाला समजते. एवढेच नव्हे, तर दंगलीचे वातावरण, गावातील ताण हे सर्व असताना रिक्षावर ध्वनिक्षेपक बसवून सभेचा धुमधडाक्यात प्रचार करण्यासही त्यांनी परवानगी दिली. हे सारे लिहिण्याचे कारण आपण चळवळीतील कार्यकर्ते आग्रही आणि म्हणूनच काहीसे एकांगी असतो. त्यामुळे समोरच्या माणसाचे मूल्यमापन आपण सुद्धा एका फटक्यात करून रिकामे होतो. परंतु मला वाटते हे योग्य नाही. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे गुंतागुंतीचे असते आणि आपल्यासारख्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची चळवळ करणाऱ्यांनी तरी ही गुंतागुंत सजगपणे समजून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असावयास हवे. ते आपल्या फायद्याचे आहे आणि अर्थात हिताचेही.

मुंबईत एका कार्यक्रमासाठी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग या मान्यताप्राप्त संस्थेचे संचालक श्री. एकनाथ ठाकूर व सौ. ठाकूर यांच्याकडे उतरलो होतो. बराच वेळ एकत्र असल्याने गप्पा झाल्या. त्यातील एक मुद्दा असा होता की, आमच्या पिढीच्या (ठाकूर यांच्या पिढीच्या) मर्यादा आहेत. अनेक बाबी विचाराला पटल्या तरी प्रत्यक्ष आचारात येण्यासाठी अनेक अडथळे येतात. परंतु नव्या पिढीचे तसे नाही. त्यांना तुमचे विचार पटतात आणि ते सरळ तारुण्यसुलभ उत्साहाने त्याची अंमलबजावणी करतात. यासाठी त्यांनी स्वत:च्या घरातील एक उदाहरणही दिले. मला असे वाटते, ही जाणीव दोन प्रकारे आपल्याला मदतीची ठरू शकते. एक तर आपल्या कार्याचे क्षेत्र हे प्रामुख्याने किशोर अथवा गटातील मुले-मुली यांच्यात असावयाला हवे, याचे एक भान आपण सतत बाळगावयास हवे. त्यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करावयास हवी. तसेच हे असे आहे; परंतु हे असे असणार नाही, दिवस आपुला येत आहे, तो घरी बसणार नाही,’ हा आशावादही बळकट करावयास हवा.

लोकप्रभेच्या संपादकांच्याकडून एक पत्र आले. मुंबईतील एका मोठ्या बुवाबाजीच्या प्रकरणाबद्दल वाचकांनी त्यांना लिहिलेली काही पत्रे त्यांनी मला पाठवली होती. त्यांचे म्हणणे होते की, याबाबत काय करता येईल ते पाहावे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या बुवाबाजीबद्दल अशी पत्रे येत असतात. सर्वच ठिकाणी संघर्ष करणे आपल्याला शक्य नाही. परंतु संघर्ष हेच काही चळवळीचे एकमेव हत्यार नाही. अशा प्रकरणांचा काही महिने; प्रसंगी काही वर्षे आपल्या सवडीने; पण सातत्याने व चौकसपणे पाठपुरावा करून ती सर्व माहिती लोकांच्यासमोर नीट मांडणे, हे देखील एक मोठेच काम आहे. अशा स्वरुपाचे कार्य कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे अनिल अवचट यांचे बुवाबाजीविरोधात केलेले विविध स्वरुपातील लिखाण. आपली लेखणी कदाचित तेवढी प्रभावी नसेल. परंतु सत्यशोधनाच्याबाबत जे कोणी असे लिखाण करतील, ते चळवळीला दीर्घकाळ उपयोगी ठरणारी मदत निश्चितच करू शकतील. या अशा लिखाणातूनच अंधश्रद्धेचे व्यावहारिक अनेक पैलू ठसठशीतपणे लोकांच्या समोर येतील, आपल्या कामाचे महत्त्व त्यांना पटेल, चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष संघर्षात उतरता येत नाही. कौटुंबिक जबाबदारीने वा नोकरीच्या कारणाने; असे काही जण असतात की, जे चळवळीचे हितचिंतक वा मदतनीस असतात. परंतु संघटनेच्या दैनंदिन बांधणीत येणे त्यांना या-ना-त्या कारणाने शक्य नसते. अशांपैकी काही जणांनी तरी स्वत:च्या आवडीनुसार, कुवतीनुसार ही पाहणी सुरू करावयास हवी. चळवळीचे तेही एक महत्त्वाचे कामच आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 मार्च 1993

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...