संघटनात्मक
चिंतन व कृती
दाभोलकर, संघटन, संवेदनशीलता
भ्रमंती सुरू असतेच. ठिकठिकाणी जाणे होतेच. तसेच अनेकवेळा उलटेही
घडते. भ्रमंती करून आपल्याला भेटायला कोणी येते; कधी पत्ररूपाने, तर कधी प्रत्यक्षात. अलिकडे असाच एकदा सकाळी फोन आला आणि नंतर थोड्या
वेळाने महाराष्ट्राच्या उद्योग खात्याचे सहसंचालक भेटावयास आले. माझ्याकडे त्यांचे
काय काम, याचा मला अंदाज येईना.
बोलताना लक्षात आले, त्यांना ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ विषयात व्यक्तिगत रस
होताच; परंतु शिवाय त्यांच्या पदाच्या दृष्टीने
त्यांच्या मनात आणखी एक विषय घोळत होता. घडले होते ते असे- त्यांच्या खात्यामार्फत
त्यांनी एक महत्त्वाचे शिबीर घेतले होते. नवा व्यवसाय सुरू करून अल्पावधीतच ज्यांनी
यश कमावले, अशा पन्नास उद्योजकांना त्यांनी बोलविले
होते. त्यांच्या कार्याची पद्धती इतरांना मार्गदर्शक ठरावी, यासाठी खुली चर्चा सुरू होती. आपले अनुभव सांगताना एकजण आग्रहाने
म्हणाला, ‘बाकीचे सगळे खरे; पण नशिबाची साथ हवीच, त्याशिवाय तरणोपाय नाही.’ एकजात सगळ्यांनी संमतीदर्शक माना जोरजोरात हलवल्या. आपल्या कर्तृत्वाचे
माप असे सहजासहजी नियतीच्या पदरात टाकण्याच्या या वृत्तीने संचालक मात्र अंतर्मुख झाले
होते. त्यांच्या मते एक तर ही विचारपद्धतीत चुकीची होती. दुसरे म्हणजे नियतीचा पाठिंबा
एकदा आवश्यक ठरला की, उद्योगवाढीसाठी करावयाच्या प्रयत्नातला काही
भाग हा नशिबाची साथ मिळवण्यासाठी करावयाचे उपचार याच्या विचारात व कृतीत जाणार. त्याचा
तोटा होणारच. तिसरा धोका म्हणजे उद्योगात या ना त्या कारणाने अडचणी येत गेल्या तर
त्याचा वस्तुनिष्ठ विचार करण्याऐवजी आणि त्यातून कल्पकतेने, परिश्रमाने मार्ग काढण्याऐवजी हा उद्योग
लाभणे आपल्या नशिबातच नाही. म्हणून निष्फळ, निरर्थक
गोष्टींच्या मागे लागणे वा प्रसंगी पूर्ण उद्योगच गुंडाळून दैवाला दोष देत बसणे हेही
अशक्य नाही.
या व अशा सगळ्यांबाबत अशा उद्योजकांशी त्याच्या शिबिरात येऊन मी बोलावे, असे त्यांना वाटत होते.
हा अनुभव मला सतत येतो. तो असा की, आपापल्या क्षेत्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाबाबत आपल्याशी
संवाद साधायला लोक आता उत्सुक असतात, मग ते शिक्षण क्षेत्रातले
असोत वा आदिवासी क्षेत्रातील. पोलीस खात्यातले असोत वा समाजकल्याण वा आरोग्य खात्यातील; तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हालाही हे जाणवू लागले असेल, अशी मला आशा आहे. आता या अपेक्षांना पुरे पडावयाचे तर आपल्या कसात
वाढ करणे आलेच.
याबाबतची स्थिती काय? संघटनेत प्रथमपासून असलेल्या एका कार्यकर्त्याच्या
मला आलेल्या पत्रातील हा मजकूर पाहा ‘जाहीर कार्यक्रम, व्याख्याने,
शिबिरे याद्वारा आपण लोकांच्यापर्यंत
पोचतो. प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या कुवतीनुसार विषय मांडतो. परंतु बहुधा त्यात सुसूत्रता
नसते. अंधश्रद्धांविरोधाची भूमिका लोकांच्यापर्यंत पोचावयास हवी तशी ती पोचतच नाही.
बुवाबाजीचे प्रयोग व अंगात येणे,
झपाटणे एवढ्यावरच कार्यक्रम
गुंडाळला जातो. हे प्रकार घडायला उद्युक्त करणारी मानसिकता व समाजस्थिती यावर जवळपास
बोललेच जात नाही. आरोग्यविषयक अंधश्रद्धांबाबत तर आधी सर्वच कार्यकर्त्यांना पुरेशी
माहिती हवी, ती नसतेच. कार्यक्रमाची दीड-दोन तासाची मर्यादा, एकूण वातावरण,
प्रेक्षकांचा उत्साह, कार्यकर्त्यांची शैली या सर्वांच्याच मर्यादा असतात. परंतु आपली
परिणामकारकता साधण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक सुसूत्रीकरण केले पाहिजे, झालेल्या कार्यक्रमाचे पुनर्मूल्यांकन व आत्मपरीक्षण करावयास हवे.
हे घडत नाही. अजूनही आपले काही कार्यकर्ते उत्साहाच्या भरात लोकांना तुच्छ लेखणारी
उपरोधात्मक मांडणी करताना दिसतात. ज्या लोकांना आपण बदलावयास निघालो आहोत, ते टिंगलटवाळी व उपहासाने कदापि बदलणार नाहीत, तर विचाराने बदलतील. आपण वरील मांडणीमुळे स्वत:ला (अति) शहाणे व
लोकांना मूर्ख समजतो. अशी आपली प्रतिमा लोकांत तयार होते, जी चळवळीत अत्यंत घातक आहे. आपल्या चळवळीचा वेगळा ठसा व प्रतिमा
निर्माण करावयाची असेल तर भाषणबाजीऐवजी विचारमंथन आणि व्यवहारात इतरांच्याबद्दल आदर
व वर्तणुकीत नैतिकता ही पथ्ये पाळावी लागतील.’ आपल्या लक्षात पेच आला
का? एका बाजूला चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे
अनेक क्षेत्रातले मान्यवर मदत करायला, स्वत:च्या क्षेत्रात चळवळीचा
विचार न्यावयाला उत्सुक आहेत. दुसरीकडे, यासाठी संघटन म्हणून जी पूर्वतयारी लागते, कार्यकर्ते म्हणून जो कस लागतो त्यासाठी आणि पुरेसे सक्षम व क्रियाशील
आहोत ना, याची चिंता आपल्यातीलच एका जबाबदार कार्यकर्त्याला
वाटते (मीही त्याच्याशी सहमत आहे.)
आपण प्रत्येकाने व्यक्तिगत व संघटनात्मक
चिंतनातून व कृतीतून या कसोटीला उतरायला हवं. मला तर वाटतं, चळवळीच्या यापुढच्या झेपेची ती पूर्वअटच
आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(नोव्हेंबर १९९२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा