सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

कृतिशील प्रबोधन



कृतिशील प्रबोधन
दाभोलकर, उपक्रम, प्रबोधन
लोकप्रभा हे मराठीतील भरपूर खपाचे लोकप्रिय साप्ताहिक. त्यांच्या संपादकांचे मला पत्र आले हल्ली दोन महिन्यांत तुमच्याकडून काही मजकूर नाही. चळवळ थांबली की काय, असे मलाच नव्हे, तर काही वाचकांनाही वाटू लागले आहे. तेव्हा लिहिते व्हा. याचा अर्थ काय? अर्थ असा की, आपल्या मालाला चांगली मागणी आहे. महाराष्ट्रभर फिरत असल्याने मला तर चांगले माहीत आहे की, चळवळ ही सर्वत्र सुरू आहे; परंतु ती लोकांच्यापर्यंत पोचविण्यास आपण परिश्रमात अपुरे पडतो. दुसऱ्या बाजूला, आपल्यामध्ये जे लिहितात वा लिहू इच्छितात त्यांची तक्रार अशी की, ‘आम्ही लिहू हो; पण छापते कोण?’ या नाराजीत काही तथ्य आहे. ते दूर करणे पुन्हा आपल्याच हातात आहे.

आपल्यापैकी कितीजण आपण लिहिलेले आपल्या शाखेच्या बैठकीत किंवा निदान मित्रांना वाचून दाखवतात? त्यांच्या सूचना स्वीकारून सुधारून पुन्हा लिहितात. छापून नाही आले तर नाराज होऊन लिहावयाचे थांबवत नाहीत? पुण्या-मुंबईच्या साप्ताहिक, दैनिकात लेख आल्यास उत्तमच; पण ते सुरुवातीच्या काळात नाही शक्य झाले तरी आपापल्या भागातील दैनिके, साप्ताहिके यात छापायला काय हरकत आहे? अगदी वाचकांच्या पत्रव्यवहारात योग्य प्रकारे लिहिलेले पत्र हे देखील परिणाम साधू शकते. या सर्वांमुळे कमी-जास्त प्रमाणात; परंतु चळवळीचा विचार लोकांसमोर सतत राहतो. लिहिण्याची आपली सवयही वाढते. लिखाणातील भाषाशैली, मुद्देसूदपणा, विषय, मर्यादित शब्दसंख्येत साक्षेपाने मांडण्याचे कसब, यामुळे लिखाण आपोआप अधिक वाचनीय बनत जाते. मुळात आपला विषय वाचनीय आहेच. अर्थात, वाचनीय लिखाणाबरोबर वैचारिक प्रतिवादाची सवयही लावून घ्यावयास हवी. त्यात तर आपण खूपच कमी पडतो. रविवारच्या लोकसत्तेत (२४, ३१ मे) अंधश्रद्धा निर्मूलन की समाजवादी राजकारण?’ या नावाने दोन तथाकथित विद्वतप्रचुर लेख आले. आपल्यापैकी अनेकांनी ते वाचले असणार; परंतु मुद्दे काढून त्यातील खोडसाळ मांडणीला वैचारिक उत्तर देण्याचा प्रयत्न, अपवाद वगळता घडलाच नाही. असे होऊन कसे चालेल?

आपली मोहीम मूलत: कृतिशील प्रबोधनाची. त्यामुळे लोकांपर्यंत आपला विचार सतत पोचणे आवश्यक. त्यासाठी इचलकरंजीच्या डॉ. रवी कोठारी या आपल्या उत्साही कार्यकर्त्याचा उपक्रम विचार करण्यासारखा आहे. ते डेंटिस्ट आहेत. रूग्ण भरपूर. वेटिंगरुममध्ये ते अंधश्रद्धेची पुस्तके, पुस्तिका अन्य माहिती सतत ठेवतात. बराच वेळ बसणारा रुग्ण ते वाचून काढतो. अनेकदा बरोबर घेऊनही जातो. वर्षाला हजार रुपये यासाठी खर्च करायचे, असे त्यांनी ठरवलंय आणि करतातही. इचलकरंजी शाखेचे काम थंडावले होते. ते पुन्हा गतिमान करण्यासाठी बैठक झाली. मी गेलो होतो. दोन सूचना पुढे आल्या. त्या दोन्ही मला स्वागतार्ह वाटल्या. आचार्य शांताराम गरूड, प्रताप होगाडे, डॉ. पत्की ही सारी तेथील सार्वजनिक जीवनातील ज्येष्ठ मंडळी. समितीशी पदाधिकारी म्हणून संबंधित. त्यांनी स्वत:हून सांगितले. सर्व कामात शक्य तेवढ्या मदतीला आम्ही राहूच. पण जे प्राधान्याने याच कामाला वेळ देतात, त्यांनी कार्यकारिणीवर यावे, पदाधिकारी व्हावे, तो त्यांचा हक्क आहे आणि तेच रास्त आहे. नव्या उमेदीला संधी मिळण्यासाठी स्वत:हून दाखविलेली ही तयारी मला मोठेपणाची वाटली. तरुण रक्ताला असा जाणीवपूर्वक वाव देण्याचा प्रयत्न सर्वत्र व्हावयास हवा. त्यांनी असाही निर्णय घेतला की, नव्या सभासदांची नोंदणी करतानाच त्याला पत्रिकेचा वर्गणीदारही करायचे. शक्य तेवढ्यांचे एकूण २५ रुपये एकाच वेळी गोळा करायचे. सर्वच शाखा दरवर्षी सभासद नोंदणी करतात (अशी मला आशा आहे) त्यावेळी थोडा जास्त प्रयत्न केला, नेट लावला तर वर्गणीचा उगाच रेंगाळत पडणारा विषय चांगल्या प्रकारे मार्गी लागेल. आपले वार्तापत्र नीटपणे उभे राहील.

बाबा, बुवा, मांत्रिक, देवऋषी यांना पकडणे, त्यांचा कबुलीजबाब घेणे आणि त्यांचा धंदा बंद करणे याला काही जिल्ह्यात तरी चांगले यश येते आहे. परंतु आता हा प्रश्नही उभा राहतो आहे की, ही बदमाष मंडळी काही काळ थांबतात. पुन्हा जोमानं धंद्याला लागतात, त्याचे काय? प्रश्न महत्त्वाचा आहेच आणि आपण सर्वांनीच सामुदायिक चिंतन करण्याची गरज आहे. एक गोष्ट तर चटकन जाणवते. बुवाबाजी बंद पाडण्याच्या प्रकाराला बहुधा पोलिसांच्या व वृत्तपत्रांच्या मदतीने केलेल्या कारवाईचे स्वरूप येते. त्याला जनप्रबोधनाच्या कृतिशील चळवळीचे रूप यावयास हवे. ज्या गावात ही बुवाबाजी चालत होती, त्या ठिकाणी तरी सभा घेऊन त्याबाबतचा जाहीर पंचनामा व्हावयास हवा. लोकजागृती, लोकसहभाग प्रत्यक्षात घडायला हवा. कोणी नवा कार्यकर्ता यामधून चळवळीस मिळावयास हवा. आपल्या बुवाबाजीविरोधी लढ्याचे परिणाम टिकाऊ स्वरुपात दिसण्यासाठी आणखी काय-काय करावे? विचार करून कळवाल?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...