प्रबोधन
हवेच; पण संघर्षही हवा
दाभोलकर, स्थानिक अंधश्रद्धा, संघर्ष
कासारी हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गाव. धुळे जिल्ह्याच्या
दौऱ्यावर असताना आग्रह झाला म्हणून व्याख्यानास गेलो. विषय नेहमीचाच ‘अंधश्रद्धा निर्मूलन.’ विषय भलताच ऐसपैस. प्रत्येक
विभागात वेगवेगळे रूप धारण करणारा. त्या-त्या भागातील माहिती घेतली की, तो जिवंत व अर्थपूर्ण होतो, असा माझा अनुभव. म्हणून
मी कार्यकर्त्यांशी आधी गप्पा मारत होतो. एक प्रकार ‘भालदेव.’ म्हणजे असे की, विशिष्ट कारण झाले तर मग दूध विकायचे नाही, घरीपण वापरायचे नाही. दुधाचे विरजण लावून
दही, ताक करायचे. फुकट वाटून टाकायचे, नाही तर
गटारात ओतायचे. दुसरा प्रकार ‘कान्हुबाईंचा.’ घरातल्या मोठ्या मुलाच्या लग्नावर कान्हुबाई
आली, असे देवीच्या पुजाऱ्याने सांगितले की, मग त्या कान्हुबाईचे सर्व विधी साग्रसंगीत
करायलाच हवेत. त्या पंधरवड्यात, महिन्यात घरी येणारी प्रत्येक गोष्ट वाजत-गाजत घरी
आणायची. पुन्हा विधी करायचे ते वेगळेच. दहा-वीस हजारांचा चुराडा व्हायचा.
अलिकडे हे प्रकार बऱ्याच प्रमाणात कमी झालेत. पण आणखी काही प्रकार
जोर टिकवून आहेत. लग्न झाले की,
मांडव तोडून आणावयास हवा.
म्हणजे पूर्वी कधी काळी झाडाच्या फांद्यांनी दारात मांडव घालत असतील. त्याची आठवण म्हणून
दोन-तीन बैलगाड्या पाठवून झाडाच्या मोठ्या फांद्या तोडून आणावयाच्या. त्या घराच्या
खिडकीत, दारात, छपरावर ठेवायच्या. शहादे
भागात सुरू असलेली सुकडीची प्रथा तर अजबच. दहनासाठी शव स्मशानात न्यावयाचे आणि तिकडे
कवटी फुटली की, आलेल्यांना इकडे चिवडा, बर्फी वाटायला सुरुवात करायची. पूर्वीच्या काळी लोकांना आपापल्या
गावी परतायला उशीर व्हायचा म्हणून त्यांच्या पोटा-पाण्याचीही सोय सुरू केली असावी.
आता सर्वदूर एस.टी.चे जाळे विणलेले असताना त्याची गरज काय? पण रूढी आहे ना,
ती पाळायला हवी. आधी गरिबी; त्यात आजारपणासाठी कर्ज झालेले, तरी स्मशानात येणाऱ्या
भावकीला सुकडी वाटण्यासाठी पुन्हा सावकार बघितला जातो वा प्रसंगी शेताचा तुकडा गहाण
टाकला जातो.
तुमच्या लक्षात आले, हे काय आहे? पशुहत्येविरोधी आपण लढतो. त्याच्या या छोट्या-मोठ्या
आवृत्त्या आहेत. कशा ते कळलं? सर्वत्र
सूत्र एकच आहे. गरिबाने अधिक गरीब व्हावे, त्याचा
भांडवल संचय होऊ नये, त्यांना चांगले दिवस दिसू नयेत. प्रकार नवसाला
बळी देण्याचा असो वा दूध ओतून देण्याचा, कान्हूबाईच्या
नावाने करायच्या उधळामाधळीचा असो वा सुकडीच्या नावाने पाळावयाच्या प्रथेचा. शेवटी मतितार्थ
एकच. अडाणी गरीब माणसाचा अटळ
कर्जबाजारीपणा वाढतो. शोषण, हुंडा, थाटामाटाची लग्ने ही याचीच
पुढची आवृत्ती. या साऱ्याविरुद्ध मी व्याख्यानात बोललो. मला जाणवत होते आपल्याच ज्ञानात
भर पडतेय. सारा भारत देश सोडाच;
परंतु उभा-आडवा पसरलेला
महाराष्ट्र घेतला तरी त्यामध्ये सामाजिक पातळीवर पसरलेल्या अशा रूढी, कर्मकांडे, परंपरा, प्रथा यांचे केवढे मोठे
जाळे असेल की, त्यामध्ये अडकलेल्या जनसमूहाचे सुखेनैव शोषण
सुरू असेल आणि त्याविरुद्ध बंड करण्याऐवजी त्या प्रथा मानाने मिरवण्याची मानसिक गुलामगिरी
त्या समूहात तयार झाली असेल. बुवाबाजी, भूत, भानामती या प्रकारापेक्षा ही लढाई सर्वदूर, सर्वव्यापक आहे. आपण सर्वांनीच यासाठी सर्वेक्षण, प्रबोधन, संघर्ष याला उभे ठाकायला हवे.
कासारीचे तरुण कार्यकर्ते प्रकाश देसले यांनी स्वत:पासून याची सुरुवात
केली. नुकतेच घरात झालेले लग्न साधेपणाने, नोंदणीपद्धतीने, अर्थातच हुंड्याशिवाय केले. वधू-वरांनी अर्थपूर्ण शपथा घेतल्या.
आपले धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. भास्कर दरवडे यांनीच त्या लिहिल्या होत्या. घरी
कधी सत्यनारायण घातला नाहीच. वडिलांच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक संस्कार केले नाहीत.
बोलताना त्यांनी प्रबोधनाचा एक अभिनव मार्ग सुचविला. ते म्हणाले, ‘‘अंधश्रद्धाविरोधी पुस्तकाची छोटी लायब्ररी सुरू करतो. पण ती पुस्तकपेटी
रोज संध्याकाळी दोन तास पाराच्या जवळ ठेवतो. गप्पा मारायला अनेक जण येतात. काहीजण नक्की
वाचतील; शिवाय असेपण करतो, गावात लाऊडस्पीकर लावून रोज पुस्तकातील काही महत्त्वाचे
भाग अर्धा तास वाचून दाखवतो. घरबसल्या लोकांच्या कानावरून जाईल.’’
हे सगळे आश्वासक आहे, पण अपुरेही; याचे भान मात्र आपण बाळगायला हवे. कासारी गाव ते कोठे; पण त्यामध्ये स्वामी समर्थ, अक्कलकोट, प्रजापिता ब्रह्माकुमारीपर्यंतचे अनेक पंथ आपले आसन जमवून बसले
आहेत. त्यांना माणसे, पैसा मिळत आहे. एकट्या स्वामी समर्थांच्या
मंदिराचा प्लॅनच तेवीस लाख रुपयांचा आहे. याचा अर्थच असा की, पाहणी हवी, प्रबोधन हवेच; पण लढाईपण हवी. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध उपक्रमांचे त्या
पलिकडे जाऊन नव्या जाणिवाच्या लोकचळवळीत रूपांतर व्हावयास हवे. काय करता येईल त्यासाठी? विचार करून कळवाल?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जुलै १९९२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा