शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

महिलांचा सहभाग



महिलांचा सहभाग
दाभोलकर, चर्चासत्र, महिला, समाजबदल
मुंबईत आपले महाराष्ट्रव्यापी चर्चासत्र झाले. स्त्री आणि अंधश्रद्धा या विषयावर मुंबईत संयोजनासाठी स्थळ मिळणे ही महाकठीण बाब; मिळालेच तर त्याचे अव्वाच्या सव्वा दर, संयोजकांचे डोळे फिरवणारे. पण हा सगळा प्रश्न सांताक्रुझच्या साने गुरुजी विद्यालयाचे प्रमुख लीलाधर हेगडे यांनी एकदम सोपा करून टाकला.

शाळेचा प्रशस्त हॉल, राहण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृहे, खुर्च्या, सतरंज्या, टेबले, भोजन करण्याची, वाढण्याची जागा हे सर्व त्यांनी समितीच्या कार्यासाठी तीन दिवस देऊन टाकले. प्रयोगशाळेतील टेबले देखील बाहेर काढण्यास परवानगी दिली. व्यासपीठ सजावटीची व्यवस्था स्वत:कडे घेतली. ध्वनिक्षेपक व्यवस्था माणसासह ताब्यात दिली. स्वत: जातीने उभे राहून राबले आणि भाडे किती घेतले? एक पैसाही नाही. पूर्णत: विनामूल्य. पण एवढ्यावरच संपत नाही. या चांगल्या कार्याला मदत करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना विनंती केली. त्यांच्या देणगीतून सतराशे रुपये मिळवून दिले. आणखी एक-दोन हजाराची जाहिरात व तीन हजारांची देणगी मिळवून दिली.

हे सारे कशाकरिता? कोणत्या फायद्यासाठी?
फक्त यासाठीच की, आपल्याला मनापासून पटणाऱ्या कामासाठी आपले पाऊल स्वत:हून पुढे पडावयास हवे. माझ्या मनात येते की, आपण किती जण मनाची ही उमदी धडपड दाखवतो? आपले काम आपण करत असतोच, त्यात विशेष काय? पण जे काम समाजात घडावे, असे आपल्याला वाटते आणि करणे तर जमत नाही. असे काम कुठे घडत असेल तर त्याच्या गरजेच्या वेळी निरपेक्षपणे सरसावून आपण मदतीला जातो का? आपण स्वत:शीच याचे उत्तर शोधायला हवे. स्वत:ला बदलायला, घडवायला हवे.

मुंबईच्या चर्चासत्राला महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाखांचे प्रतिनिधी येऊ शकले नाहीत. मला जाणवते की, यापैकी एक कारण नक्कीच प्रवासखर्च हे आहे. वार्षिक बैठकीला येतानाही ही अडचण जाणवतेच. प्रवासभाडी वाढली आहेत. एका कार्यकर्त्याच्या येण्याजाण्यात शंभर रुपये जातात, हे सर्व खरे; पण वर्षातून एक-दोनदा आपण एखादा तरी प्रतिनिधी मध्यवर्तीच्या कार्यक्रमाला पाठवणे ही खरेच आर्थिकदृष्ट्या इतकी कठीण बाब आहे? चळवळ, उपक्रम यासाठी आपण नेहमी पैसे जमवतो, खर्चही करतो; मग संघटना कामासाठी वर्षासाठी ठरवून दोन-चारशे रुपयांची सोय करणे एवढे अवघड का असावे? समितीच्या कामाला आज समाजातील एका वर्गाची सहानुभूती नक्कीच आहे. थोडी चिकाटी, शिस्त दाखवली तर नियमित स्वरुपी छोटा-मोठा निधी गोळा होणे अजिबात अवघड नाही आणि तो हाताशी असला तर महाराष्ट्रव्यापी कार्यक्रमाला शाखांचा प्रतिनिधी हटकून येईल. सर्वांशी ओळख होईल. स्नेह वाढेल. नवे विचार समजतील, एकत्रितपणे नवे संकल्प उगवतील. आपल्या सामुदायिक सामर्थ्याची जाणीव चांगल्या प्रकारे होईल. ती उमेद पुन्हा आपल्याला केंद्रावर पोचेल. एवढे सारे आज घडत नाही, केवळ आपल्या प्रवासनिधीच्या अभावामुळे. थोड्या निर्धाराने आपण सहज यावर मात करू शकू.

महाराष्ट्रव्यापी चर्चासत्र घेतले; पण आपल्या शाखांच्यात महिला सहभागांची स्थिती काय? उत्तर निराशाजनकच. दोन-तीन शाखांचे अपवाद वगळता सर्वत्र उत्तर शून्यच. ज्या शाखांच्यात सहभाग आहे, तेथेही परिस्थिती कशी बदलता येईल? चळवळीत एवढा कच्चा दुवा ठेवून आपण समाजबदलाचा लढा लढणार कसे? काय चुकतंय? कमी पडतंय? बदलावयास हवंय? तुम्ही काय सुचवाल?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...