वाचन
मनन, चिंतन
दाभोलकर, सत्याग्रह, पशुहत्याविरोध, वाचन
१७ फेब्रुवारीला बार्शीला पोचलो. १८ तारखेला चाळीसजणांसह निपाणीकरांच्या
नेतृत्वाखाली चिवरीच्या यात्रेत सत्याग्रहासाठी दाखल झालो. मागच्या वर्षीच्या आठवणी
मनात जाग्या होत्या. निवडणुकीच्या प्रचारासारखी रणधुमाळी मागील वर्षी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यात उठवली होती. शासनाची साथ होतीच. देवीसमोरच्या
जागेवरचे बळी थांबले हे खरे; पण बाजूबाजूला हजार-बाराशे पशुहत्या झालीच.
शिवाय दुसऱ्या दिवशी भुताच्या यात्रेच्या वेळी प्रबोधन करणाऱ्या सत्याग्रहींना मार
खावा लागला. या वर्षी काय होणार याचे प्रश्नचिन्ह मागील वर्षीपेक्षा मोठे होते. मागील
वर्षीची स्थिती यावर्षीही कायम राहावी, असा आपला आग्रह होता.
यंदा पशुहत्या करावयाचीच, असा शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अट्टाहास
होता. शासन सांगत होते की, प्रबोधन मोहीम चालवू नका, सत्याग्रह करू नका, आम्ही सारे बघून घेतो.
अशा तणावाच्या वातावरणात लाख-दीड लाखाच्या यात्रेत काय होणार, याचा दबाव आणि चिंता सर्वांनाच होती. १८ तारखेला सकाळी यात्रास्थळावर
गाडी पोचली आणि लक्षात आले प्रश्न खरा सोडवलाय भाविकांनीच, यात्रेकरूंनीच. म्हणजे असे की, ते यात्रेला फिरकलेच नाहीत.
लाखाची यात्रा मांडली जाणाऱ्या त्या विस्तीर्ण माळरानावर जेमतेम पाच-दहा हजार यात्रेकरूच
आले होते. अनेक गावांत तर आठवडा बाजाराला यापेक्षा जास्त गर्दी असते; शिवाय येताना
त्यांनी रेडे, बकरी, कोंबड्या काहीच आणले नव्हते.
त्यामुळे हत्या होण्याची शक्यता मुळातच निकालात निघाली होती. तापलेल्या वातावरणाचा
हा सारा अप्रत्यक्ष परिणाम होता.
मला आणि सोबतच्या अनेकांना प्रश्न पडला. यात्रा जवळपास मोडलीच.
हे चांगले घडले की वाईट? योग्य की अयोग्य? यात्रेतील पशुहत्या थांबायला हवीच, अंगात येऊन बेभान घुमणे बंद व्हायला हवेच, याबद्दल शंकाच नाही. पण यापलिकडे जाऊन यात्रा
भरण्यालाच आपला विरोध आहे का? यात्रा
म्हणजे त्याला येणाऱ्यांच्या दृष्टीने जणू स्नेहसंमेलनच. हजारोंच्या संख्येने जथ्थ्या-जथ्थ्याने
येऊन लहानमोठे, पुरुष-बाया, अडाणी, ग्रामीण समाजाला सामुदायिक आनंद लुटण्याचे
ठिकाण म्हणजे त्यांच्या यात्रा. त्यामध्ये पशुहत्या होऊ नये हे बरोबर; पण पूर्ण यात्राच बंद पडणे किती श्रेयस्कर? आपला विरोध नेमका कशाला? उत्तर वाटते तितके सोपे नाही; पण टाळता येणारेही नाही. आपण साऱ्यांनीच
स्वत:च्या विचाराला यासाठी ताण द्यावयास हवा. तो तुम्ही द्यावा, मनमोकळेपणाने यावर बोलावे, लिहावे असे मला आग्रहाने सुचवावेसे वाटते.
मुंबईला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. जहागीरदार यांच्याशी
गप्पा मारण्याचा योग आला. ते अलिकडेच निवृत्त झाले. विवेकनिष्ठ, वैज्ञानिक विचारसरणीचे न्या. जहागीरदार हे कृतिशील उपासक. खंदे
पुरस्कर्ते. निवृत्तीनंतर न्यायमूर्तींना या ना त्या स्वरुपात सन्मानित कामे व पदे
सहज मिळतात; पण जहागीरदार यांनी निर्णय घेतला की, वेळ फक्त वाचन-मननात घालवायचा आणि एवढेच नाही, तर आपल्याला कोणीही कार्यक्रमाला बोलवले तर आपल्या खर्चाने सामाजिक
भावनेने जायचे. त्यांना वाटते, निवृत्ती आधीच घेतली असती तर बरे झाले असते.
कारण वाचायला महासागर पडलाय आणि वेळ तर इतका अपुरा. मी त्यांना विनंती केली, दर महिन्यातून एखादा दिवस मुंबईतील आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही
तुमच्या या वाचनातले काही कण देत चला. त्यांनी ती आनंदाने मान्य केली.
मला वाटतं, आपला प्रश्न दुहेरी आहे. महाराष्ट्रात
फिरताना मला सतत जाणवतं की,
कार्यकर्त्यांचे नवे मराठी
वाचनही थांबले आहे. मग त्यांचे मनन, चिंतन
आणि स्वत:च्या मांडणीत त्याचा समावेश तर दूरच राहिला. हा विचारांचा शिळेपणा घालवायला
निर्धारपूर्वक कंबर कसायला हवी. चळवळ पुढे जाते आहे आणि कार्यकर्ता विचारात मागे रेंगाळतो
आहे, हे चित्र बदलावयास हवे. पण समजा अगदी नाहीच झाला वेळ तर निदान आपापल्या
ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशा कार्यकर्त्यांना, मित्रांना आणि सहानुभूतीदारांना
एकत्र घेऊन महिन्यातून किमान एकदा तरी एक बैठक घ्यावी आणि आपल्याकडे असलेल्या चळवळीवरील
एखाद्या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करायला हरकत नाही. सुरुवातीला एखादा विषय घ्यायचा, त्यावर वाचन करायचे, चर्चा करायची, असा प्रयत्न केला तरी विचारांची देवाणघेवाण होईल. पुढच्या बैठकीकरिता
प्रत्येकाने काहीतरी वाचन करून यायचे आणि मग त्यावर चर्चा करायची. या चर्चेच्या अनुरोधाने
आपल्या समोरील प्रश्नांकडे पाहण्याची एक वैचारिक पातळी निर्माण होण्यास मदत होईल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा