बुवाबाजीवर
हल्लाबोल
दाभोलकर, बुवाबाजी, निळूभाऊ फुले, डॉ. लागू, प्रबोधन, आर्थिक सहाय्य
सुप्रसिद्ध अभिनेते निळूभाऊ फुले आपल्या चळवळीसाठी नेहमीच वेळ देतात.
नम्रपणे असंही सांगतात, ‘माझ्यामुळे गर्दी जमते, तुमचे काम होते, तेवढीच मदत.’ पाच मिनिटांचे छोटेसे भाषणही
करतात. त्यापेक्षा जास्त अंधश्रद्धेवर बोललेले मी त्यांना कधीच ऐकलेले नाही.
बार्शीला
काय झालं?
बुवाबाजीवर हल्लाबोल मोहिमेसाठी निळूभाऊंचा सोलापूर जिल्हा दौरा
होता. १९ डिसेंबरला सायंकाळी बार्शीला जाहीर कार्यक्रम. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम
केलेले. प्रचंड गर्दी. कार्यक्रम सुरू झाला आणि लक्षात आले ध्वनिक्षेपक साथ देत नाही.
गर्दीच्या निम्म्यापर्यंतही आवाज पोचत नाही. स्वागतगीत, पाहुण्यांचा परिचय, प्रास्ताविक सारे उरकले
गेले. श्रोत्यांच्यापर्यंत न पोचताच पर्यायी ध्वनिक्षेपकासाठीही धावाधाव सुरू झाली.
गर्दीवर ताबा मिळविण्यासाठी राम नगरकरांचा हुकमी एक्का वापरला. निपाणीकरांनी प्रयोग
पाहण्याचे आवाहन केले; पण प्रेक्षकांची गडबड सुरूच. या सर्व गोंधळात
दुसरा कुठलाही ज्येष्ठ अभिनेता संयोजकांना दोष लावून कधीच निघून गेला असता. निळूभाऊ
शांतपणे बसून होते. शेवटी अखेरचे वक्ते म्हणून ते उठले. लोक एकदम शांत झाले. तोपर्यंत
ध्वनिव्यवस्थाही सुधारली होती. निळूभाऊंचा आवाज सर्वत्र पोचत होता. नेहमी पाच मिनिटात
भाषण आटोपणाऱ्या निळूभाऊंनी ओळखले की, किल्ला लढवायला फक्त आपणच
शिल्लक आहोत. पाच-सात हजार लोकांच्यापर्यंत काही विचार तर
पोचायला हवा आणि त्यांनी मोठ्या तळमळीने, सामर्थ्याने, कार्यकर्त्यांच्या पोटतिडकीने ते काम केले. ते खाली बसले. सभा पूर्ण
ताब्यात आली होती. मग चमत्काराच्या प्रयोगापासून सारे सुरळीत झाले.
निळूभाऊंना याची काय गरज होती? ते निघून जाऊ शकत होते, बोलायचे नाकारू शकत होते, दोन मिनिटांचे भाषण करून थांबू शकत होते.
पण त्यांनी ते केले नाही. कारण त्यांच्या श्रेष्ठ कलावंताच्याही पलिकडे असलेला सच्चा
कार्यकर्ता जागा होता.
माझ्या मनात विचार येतो, आपण जे कार्यकर्ते आहोत त्यांच्यामध्ये तरी
स्वत:च्या पलिकडे जाण्याचा हा सच्चेपणा जागा आहे काय? क्षुल्लक राग-लोभ, खरे-खोटे, रूसवे-फुगवे,
मानापमान, व्यक्तिगत हवेदावे यांचे दर्शन काम करत असताना अनेकदा होते. चळवळीबाबत
तरी सहजपणे स्वत:ला विसरण्याची जी वृत्ती हवी, ती दिसत नाही. सगळ्या जगाची चिकित्सा
करावयास निघालेलो आपण तरी याबाबत स्वत:ची चिकित्सा करावयास नको काय?
सोलापूर जिल्ह्यातील प्रतिसाद मन सुखावणारा होता. सर्व शाखांनी
केलेले संघटन कौतुकास्पद होते. मात्र अशा कार्यक्रमाला आणि अंधश्रद्धांविरुद्ध लढताना
दिसणारा उत्साह संघटनात्मक कामात कुठे लुप्त पावतो, हे मला एक कोडेच आहे.
हा प्रश्न कोणत्या एका जिल्ह्याचा नाही, तर सर्व महाराष्ट्राचा
आहे. शिबिरे जोरात होतात; पण त्यानंतर पाठपुरावा करून संघटना वाढ होत
नाही. धडाकेबाज कार्यक्रम होतात;
पण त्याचे रिपोर्टिंग
आपल्या वार्तापत्राला कधीच होत नाही. शाखेच्या चळवळीची वृत्तपत्रात बातमी येते; पण शाखेने संलग्नता फी पाठवलेलीच नसते. पत्रे पाठवूनही किमान गरजेच्या
संघटनात्मक बाबींची पूर्तताही होत नाही. त्यामुळे होते असे की, आपले दोष सुधारणे राहूनच जाते.
साधे प्रयोग सादरीकरणाचे बघा ना! हा आपल्या
चळवळीतील सर्वाधिक आकर्षण असलेला भाग आहे. हे प्रयोग सादर कसे करावेत, ते आटोपशीर; पण परिणामकारक कसे घडवावेत, केवळ जादूचे प्रयोग असे स्वरूप त्याला न
येता बुवाबाजी व अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यासोबत कसा पोचवावा, नवनवे चमत्कार कसे शिकत राहावे, याबाबत आपणा सर्वांनाच खूप शिकण्यासारखे
आहे. ते आता आवश्यकही होऊन
बसले आहे. नाहीतर मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांची निराशा होते, असा अनुभव येतो. हा गलथानपणा मग विचारात तर येतोच. मूलभूत वैचारिक
मांडणी हा भाग जांभया येणारा. त्यात शिस्तीचा अभाव असला की, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. डॉ. श्रीराम लागू हे आपल्या चळवळीचे ज्येष्ठ मित्र. त्यांनी
‘महाराष्ट्र टाईम्स’सारख्या मातब्बर दैनिकात लेख लिहिला, ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी परमेश्वराला निवृत्त करा.’ महाराष्ट्रभर त्यामुळे काही खळबळ उडालेली मला जाणवली. पण आपल्या
केंद्रांचे काय? कोणकोणत्या शाखेवर या लेखकावर चर्चा झाली? वादविवाद झडले?
आपली बाजू काय, हे मांडण्याचा प्रयत्न झाला. आपल्यासारख्या बुद्धिवादी चळवळीत विचारमंथनही
पूर्वअटच नाही का?
हे विचारमंथन सतत घडत राहिले की काय होते? कोकणातल्या संकल्पित ‘शोध भुताचा’ मोहिमेसाठी दापोलीला वक्ता प्रशिक्षण शिबीर होते. पुण्याहून कार्यकर्ते
गेले होते. भुताची तीच ती माहिती आणि किस्से आता बहुतेक कार्यकर्त्यांना पाठ झालेत.
मग विषयाचे नाविन्यच संपते. पुण्याहून गेलेले डॉ. विद्याधर बोरकर, उज्ज्वला परांजपे, शुभांगी शहा यांनी मन, मनाचे आजार,
भ्रम घडणे ही घटना याबाबत
बरीच नवी माहिती अभ्यासपूर्वक देण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय वक्तृत्वकलेबद्दलही
सांगितले. शिबिरार्थींना बरेच काही नवीन मिळाल्याचे मला नंतर शिबिरार्थींकडून समजले
आणि खूप बरे वाटले.
आणखी एक जाता-जाता. भाषणाची बरीच निमंत्रणे येतात. तुम्हालाही कमी-जास्त
प्रमाणात येत असणारच. अलिकडे मला असे जाणवू लागले आहे की, तथाकथित प्रतिष्ठित संस्थांना आपाल्याला बोलवण्याचे अगत्य वाटू
लागले आहे. मला विचाराल तर हे समाजमान्यतेचे लक्षण आहे; तसेच धोक्याचा इशाराही. आपण कोणाकरिता लढत
आहोत? अंधश्रद्धेच्या जोखडातून आपण कोणाला मुक्त
करू इच्छितो, याचे नि:संदिग्ध उत्तरात पहिल्यांदा ग्रामीण
गरीब जनता, दलित वस्त्या, झोपडपट्ट्या; त्यातही प्राधान्याने महिला आणि संस्कारक्षम
विद्यार्थी असे आहे.
याठिकाणी पोचणे अवघड असेल, त्रासाचेही. सुरुवातीस संस्थांच्या निमंत्रणाची
सोय तेथे नसेल, तरीही आपण मात्र आपली ताकद, श्रम, वेळ, पैसा कोठे द्यावयाचा, याबाबत पुरेसे डोळस आणि कृतिशील असले पाहिजे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी १९९२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा