मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

आपली बिरादरी



आपली बिरादरी
दाभोलकर, हुसेन जमादार, दि. य. देशपांडे, आजचा सुधारक, मे. पुं. रेगे, डॉ. आ. ह. साळुंखे
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आपण चालवतो, हे खरेच. पण त्याबरोबरच आपल्या समितीचा हा सततचा आग्रह राहिला आहे की, समाजपरिवर्तनाच्या एका व्यापक चळवळीचे आपण भागीदार आहोत. आपले दैनंदिन काम आणि त्यांचे काम हे वरवर दिसायला भले वेगळे असो; परंतु माणसाला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि विवेकशील दृष्टी देऊन एक नवा माणूस, एक नवा समाज घडवण्याचेच हे वेगवेगळे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच या स्वरुपाच्या काम करणाऱ्या संघटना या आपली बिरादारी आहे, भावकी आहे, ही समज अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी बाळगली की, आपली हिंमत वाढते आणि जबाबदारीही.

अडचण अशी आहे की, आपल्याला या आपल्या बिरादरीचे भानच नसते; मग संपर्क, सहभाग या तर पुढच्या पायऱ्या झाल्या. संघटनात्मक राज्यव्यापी दौरा मे व जूनमध्ये झाला. जिल्हा मेळाव्यात मी बहुतेक ठिकाणी हा प्रश्न विचारत असे की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेने मराठी साहित्य विश्वात अगदी अलिकडे दिलेला पुरस्कार कोणता? आणि तो ज्यांना मिळाला त्या चळवळीच्या मित्रांचा कर्तृत्वाचा आलेख कोणता? जवळपास सर्वत्र उत्तराऐवजी मौन पाळले जाई वा क्वचित प्रसंगी अपुरे उत्तर येई.

महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकन संस्थेने (जी अमेरिकेत गेलेल्या महाराष्ट्रीयन माणसांनी स्थापन केली आहे.) यावर्षी साहित्य क्षेत्रासाठी घसघशीत पुरस्कार सुरू केले. ललित साहित्य व वैचारिक साहित्य यामध्ये दीर्घकाळ प्रभावी योगदान देणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील एका मान्यवरांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गेल्या तीन वर्षांतील उत्तम साहित्यकृतीबद्दल प्रत्येकी २५ हजार रुपयांचे चार पुरस्कार आणि दर्जेदार वैशिष्ट्यपूर्ण वैचारिक कामगिरी बजावणाऱ्या नियतकालिकांना प्रत्येकी ५० हजारांचे तीन पुरस्कार असे या बक्षिसांचे स्वरूप होते.

दीर्घकालीन वैचारिक लेखनकार्याबद्दलचा पुरस्कार श्री. मे. पुं. रेगे यांना मिळाला. रेगे यांचा तत्त्वज्ञान विषयावरील अधिकार सर्वमान्य आहे; परंतु अशा विषयाची सोबत करताना आपल्या समितीच्या कार्याला वैचारिक सोबत करण्यात त्यांनी सतत हक्काची मदत देऊ केली आहे. आपल्या अनेक शिबिरांत त्यांची व्याख्याने झाली आहेत. विवेकवादासारख्या विषयावर तर त्यांनी दोन दिवसांचे स्वतंत्र शिबीर आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी घेतले आहे. या सर्व ज्ञानदानासाठी मानधन सोडाच; पण प्रवासखर्चाचे पैसेही त्यांनी घेतले नाहीत. चळवळीला मदत करणाऱ्या प्राज्ञपाठ शाळा, अरुण लिमये ट्रस्ट अशा अनेक संस्थांच्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वाययाची अलिकडे जी निर्मिती झाली, त्यातील पहिले पुस्तक म्हणजे जवळपास १३ वर्षांपूर्वीचे अनिल अवचट यांचे संभ्रम. त्याला रेगे सरांची अतिशय चांगली प्रस्तावना आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अस्तिक शिरोमणी चार्वाक या पुस्तकाला एक पुरस्कार मिळाला आहे. धर्म की धर्मापलिकडे, धर्मातील स्त्रियांचे स्थान, महाभारतातील स्त्रिया, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती ही त्यांची आणखी काही पुस्तके. भारतीय प्राचीन संस्कृती तपासावयाची. धर्माची चिकित्सा करायची. त्याचा वेगळा अन्वयार्थ शोधावयाचा, त्यामागचे शोषण उघडे करावयाचे, हेतुत: डावलले गेलेले सत्य समोर मांडावयाचे, हे काम डॉ. साळुंखे यांनी मोठ्या धैर्याने केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच बुद्धिप्रामाण्यवादाच्या, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या, इहवादाच्या विचाराला या देशात काही हजार वर्षांची भक्कम परंपरा चार्वाकाच्या रूपाने आहे, हे सत्य ताकदीने पुढे आले. या वैचारिक योगदानाबरोबर डॉ. साळुंखे यांनी प्रत्यक्षातला सहभागही सतत दिला आहे. मग तो शिबिरातील असो, व्याख्यानमालेतील असो किंवा एखाद्या उपक्रमातील.

हुसेन जमादार कोल्हापूरचे शे-दीडशे वर्षांची सत्यशोधकी विचारांची परंपरा असलेल्या हिंदू समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे, धर्मचिकित्सेचे काम मुस्लिम धर्माच्या तुलनेने तसे सोपेच. इस्लाममध्ये सत्यशोधनाला परवानगी नाहीच. अशा समाजाच्या मानसिकतेत हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ सुरू केली. त्यांच्या अकाली निधनानंतर ही चळवळ ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न केला, त्या शिलेदारांपैकी हुसेन जमादार एक. जिहाद हे त्यांचे आत्मचरित्र. सामान्य, गरीब मुस्लिम कुटुंबाचे हलाखीचे जिणे पुस्तकाच्या पहिल्या भागात आपल्याला दिसते; तर त्यानंतर इस्लाम धर्मातील अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विरोधी लढणारे जमादार आपल्याला भेटतात. हे काम खूप अवघड आहे आणि धोकादायक देखील. ते करत असतानाच झुणका-भाकर केंद्र, मुस्लिम महिला वसतिगृह, मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण अशी अनेक कामेही जमादार करत आहेत. आपल्या चळवळीचे ते पहिल्यापासून मित्र आहेत. मे महिन्यात कोल्हापूरला झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास ते आवर्जून उपस्थित होते.

आजचा सुधारक हे मासिक गेले काही वर्षे अतिशय नियमित आणि दर्जेदारपणे नागपूरहून प्रा. दि. य. देशपांडे चालवतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला ज्या सखोल विचारमंथनाची गरज आहे, ती भूक आजचा सुधारकमुळे भागवली जाते. गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सांभाळण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या समितीतर्फे जो सुधारककार आगरकर पुरस्कार दिला जातो, त्या पहिल्या पुरस्काराचे दि. य. देशपांडे मानकरी होते.

आपल्या चळवळीशी जोडली गेलेली ही आपली कुटुंबीय मंडळी एकमेकांच्या साथीनेच आपण आज चालत असलेली बिकट वाट वहिवाट बनू शकेल. त्यासाठीच या भावकीचं भान हवं; अगत्यही हवं....!
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...