बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी



मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, अभियान, संघटन, पुस्तक विक्री, जनसंवाद
कोल्हापूरला डॉ. श्रीराम लागूंच्या सोबत कार्यक्रमाला गेलो होतो. रात्री कॉ. गोविंद पानसरे यांच्याबरोबर गप्पा झाल्या. पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस आहेत. कम्युनिस्ट संघटनेत हे पद त्या-त्या पातळीवरील सर्वोच्च असते. पानसरे हे चळवळीचे ज्येष्ठ मित्र आहेत. बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, ‘खरे सांगू, तुमची ही चळवळ मी गेली काही वर्षे पाहत आहे, ऐकत आहे; पण त्याकडे माझे फारसे लक्ष नव्हते. यावे असेही वाटले नाही; पण गेल्या दोन वर्षांत मला लक्षात आले की, चळवळ अंधश्रद्धेविरुद्ध चालवीत असला तरी तुम्ही भाषा बोलत आहात व्यापक परिवर्तनाच्या चळवळीची आणि ती मनापासूनची आहे; म्हणून मला तुमच्या कार्यात आस्था आली. समितीच्या कामाला व्यापक समाजबदलाच्या कामाचा भाग बनवण्याच्या आपल्या प्रयत्नाची ही उचित नोंद आपल्याला समाधान देणारी वाटावयास हवी.

याच विचाराचा एक भाग म्हणून आपण लढा नव्या स्वातंत्र्याचा, बेड्या तोडू गुलामीच्या हे अभियान घेत आहोत. त्यामागचा विचार व त्याबाबतचा व्यवहार हा दोन्ही चळवळीची बिरादरी वाढवण्यास उपयुक्त आहे. नगर जिल्ह्यात ता. २४ ते २८ हे अभियान प्रथम चालेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबरच, स्वातंत्र्य सैनिकांची संघटना, कामगार संघटना, युवावर्ग त्यामध्ये सहभागी होत आहे. ज्यासाठी स्वातंत्र्य मिळाले, त्यापेक्षा काही विपरीतच देशात घडत आहे. व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, फुटीरता, धर्मांधता जनजीवनात वाढते आहे, याची खंत स्वातंत्र्य सैनिकांना आहे. नवे आर्थिक धोरण हे बरोबर की चूक, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यामुळे लोकांच्या समोर प्रसारमाध्यमातून सादर होणारे बेबंद चंगळवादी जीवन हे निश्चितच घातक आहे. सरळपणे अर्थार्जन करून ते जीवन लाभणे केवळ अशक्य; मग भ्रष्टाचार वा दैववाद याचा आश्रय माणसे घेऊ लागली आहेत. अंधश्रद्धा वाढवण्याचा उद्योग राजकारणी लोक, शासन, प्रसारमाध्यमे करीत आहेत. गुलामगिरीची ही विविध रूपे आहेत. स्वातंत्र्यसैनिक राजकीय गुलामगिरीविरुद्ध लढले, कामगार लढू इच्छितो मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची धडपड आहे. या साऱ्यांनी आपली बिरादरी एकच आहे, हे ओळखून खांद्याला खांदा भिडवण्यास नको काय? ‘लढा नवा स्वातंत्र्याचा ही या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. आपण आपापल्या ठिकाणी प्रत्यक्ष कामातून ही बिरादरी बळकट करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

संघटनेच्या आघाडीवर या महिन्यात...
चळवळ सशक्त, मजबूत करावयाची तर संघटनाही तशीच हवी. संघटना तशी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हवा. क्रियाशील कार्यकर्त्यांचा, सामान्य सभासदांचा, वार्तापत्र वर्गणीदारांचा आणि वार्तापत्राचे केवळ वाचक असणाऱ्या हितचिंतकांचा देखील. हा सहभाग कसा असावा, याचे एक वेळापत्रकच आपण तयार केले आहे.

हा अंक तुम्हाला पोचेल, त्यावेळी आपला पुस्तक विक्री पंधरवडा सुरू झाला असेल. १ ते १५ ऑक्टोबर हा त्याचा कालखंड. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्रात स्वतंत्र चळवळ म्हणून अलिकडेच सुरू झाले. दलित चळवळ जशी दलित साहित्य घेऊन आली, तसे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू झाल्यावर या विषयाची पुस्तके मोठ्या प्रमाणात बाजारात आली. आपल्या समितीने देखील गेल्या तीन वर्षांत मिळून दहा पुस्तके-पुस्तिका प्रकाशित केल्या.
     
पण लक्षात घ्या, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. प्रकाशक पुस्तकांच्या प्रती काढतात. एक हजार वा दोन हजार आणि त्या खपतात दोन-तीन वर्षांत, आपल्याला हे परवडणारे नाही आणि महाराष्ट्रव्यापी संघटनेला शोभणारेही नाही.
     
आपली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेलीच पाहिजेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपण काही सर्वदूर पोचू शकत नाही. पण पुस्तके अनेकांच्या हातातून जातात. ठिकठिकाणी लोकांच्या मनात विचाराचे बीज टाकत जातात. चळवळीला हे खूप उपकारक ठरते. पुस्तके विकताना अनेकांशी संवाद होतो. चळवळीबद्दलचे जनमानस अधिक चांगल्या प्रकारे समजते. कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना एक कृती कार्यक्रम मिळतो. आपल्या पुस्तकांच्या किमती फारच माफक आहेत आणि ती विकत घ्या, असे सांगायला आपण तोंड उघडले तर लोकांचा हात विषयाच्या उत्सुकतेने, चळवळीच्या प्रेमापोटी, कमी किमतीमुळे-कारण कोणतेही असो; त्याच्या खिशात जातोच, असा अनुभव आहे.

तेव्हा १५ ऑक्टोबरपर्यंत; पण उशिरात उशिरा ऑक्टोबरअखेर क्रियाशील सचिव यांच्याकडून रोखीनेच घ्यावयाची. स्वत:चे शंभर रुपये घालायचे ते शाखा पातळीवर एकत्र करून वा स्वतंत्रपणे मारुतराव पांगे, ४०, शिवनेरी हौसिंग सोसायटी, अजिंक्यतारा रोड, गोडोली, सातारा. ४१५ ००१ या पत्त्यावर पाठवावयाचे. संघटनेच्या पोस्टेज खर्चाने, सवलतीच्या दरात पुस्तके आपल्याकडे येतील. पुस्तके विकायला बाहेर पडायचे. ती विकली जातातच, असा अनुभव आहे; परंतु समजा नाहीच विकली गेली तर पुस्तके परत पाठवा. संघटना आपले पैसे परत पाठवेल. पण ही पाळी येणारच नाही. मित्रांच्यात, शाळेत, ऑफिसात पुस्तके सहज विकली जातील. भाषणानंतर लोक हौसेने घेतील आणि वाढदिवस, लग्न अशा वेळी भेट म्हणून पुस्तकेच देण्यास विसरू नका.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...