गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

देश-विदेशातील कौतुकाची थाप



देश-विदेशातील कौतुकाची थाप
दाभोलकर, महाराष्ट्र फौंडेशन, व्यापक वैचारिक भूमिका, कौतुक
श्री. सुनील देशमुख हे नाव महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींना आता नवीन नाही. मराठी वाङ्मयासाठी दोन लाखाचे घसघशीत पुरस्कार आणि तेही कायमस्वरुपी सुरू केले, ते अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या श्री. सुनील देशमुख यांनी. या पुस्तकांची निवडही विधायक, पुरोगामी निकषावर नि:पक्षपातीपणे केली जाते. जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या या पुरस्कार वितरणप्रसंगी श्री. देशमुख यांनी जे छोटे भाषण केले, त्यामध्ये या पुरस्कारासाठी ज्या कसोट्या मानण्यात आल्या आहेत, त्यांचा उल्लेख आहे, त्या अशा आहेत-
१)    जे साहित्य मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय यासारख्या चिरकालीन मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेने उद्युक्त झाले आहे.
२)    ज्या साहित्यातून मानवी जीवनाचे समर्थ जीवनदर्शन घडते.
३)    ज्या साहित्यातून सार्वकालीन व सार्वत्रिक मानवी मूल्यांचा आविष्कार आढळतो.
हे सारे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्यापक वैचारिक भूमिकेशी किती जवळचे आहे.

आज हे सारे लिहिण्याचे कारण असे की, श्री. सुनील देशमुख यांना त्यांच्या काही मित्रांनी असे सुचविले की, तुम्ही साहित्य पुरस्कार देताच; परंतु महाराष्ट्रात सामाजिक कार्यासाठी तळमळीने झटणाऱ्या काही संस्था आहेत, चळवळी आहेत, त्यांनाही आपण मदत करावी. देशमुखांनी मोठ्या मनाने ते मान्य केले व ५० हजार रुपयांची व्यक्तिगत देणगी समितीला पाठवली. त्यासोबत आलेल्या पत्रात ते लिहितात, आपले कार्य समाजप्रबोधनाचे आहे व २१ व्या शतकाच्या दाराशी पोचताना अजून गणपती दूध पित आहे. अशावेळी आपल्या कार्याचे सामाजिक महत्त्व अनमोल आहे. याला हातभार लावता यावा, हीच माझी इच्छा आहे. अशी मनापासून मनमोकळी कौतुकाची थाप पाठीवर पडली की, कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत होतोच व बिरादरी सातासमुद्रापलिकडे विस्तारित आहे याचीही सुखद भावना होते. ही बिरादरी प्रखरपणे कशी सहविचाराची असते, यासाठी त्यांच्याच वरील भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा मुद्दामहून लिहितो.

अगदी अमेरिकेसारख्या यांत्रिकदृष्ट्या प्रगत देशात धर्मांधता आणि निरनिराळ्या जमातीतला विसंवाद वाढत आहे. म्हणजे एका बाजूला अलोट यांत्रिक प्रगती, तर दुसऱ्या बाजूने अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीयता आणि इतर संकुचित विचाराची लाट. या एकाच काळी, स्थळी आढळणाऱ्या विसंगत गोष्टींचे आकलन कसे करायचे? अशीच वरकरणी विसंगत गोष्ट वैयक्तिक पातळीवरही आढळते. अगदी सुशिक्षित माणसंसुद्धा दैनंदिन जीवनाच्या धकाधकीतून येणाऱ्या वैफल्यानं बुवाबाजी, भ्रष्टाचार, धर्मांधता यांच्या आहारी जातात आणि त्यांच्या कलानं किंवा कालबाह्य मुहुर्तावर दैनंदिन जीवनातले निर्णय घेतात. याचं तरी कारण काय?’

आणखी एक अनाकलनीय गोष्ट म्हणजे जगातल्या कुठल्याही राष्ट्रांच्या किंवा मानवसमूहाच्या बुद्धिमत्तेत काहीही फरक नसतो, हे वारंवार आणि शास्त्रीय पद्धतीनं सिद्ध झालं असतानाही निरनिराळ्या राष्ट्रांच्या भौतिक प्रगतीत जमीन- अस्मानचा फरक का आढळतो?’

या सर्व गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी प्रगत आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची आज आवश्यकता आहे. ज्या-ज्या समाजात किंवा राष्ट्रात सामाजिक प्रगतशील आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रूजला, जोपासला गेला आणि आचरला जातो, त्या-त्या लोकांचं भौतिक जीवन समृद्ध झालंच; पण सांस्कृतिकदृष्ट्याही ते सरस समजलं गेलं. त्यांच्या प्रगतीत आणि अन्य समाजाच्या अवस्थेत प्रगत आणि विज्ञाननिष्ठ म्हणजे पुरोगामी दृष्टिकोनाचं आचरण किंवा अभाव हाच मूलभूत फरक राहिलेला आहे.

नास्तिकवाद्यांच्या जागतिक परिषदेत गौरव
सध्या जगभर, म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा, धर्मांध मूलतत्त्ववाद्यांचा जोर वाढत आहे. दैनंदिन जीवनाच्या धकाधकीतून वैफल्य येऊन हा समाज अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, बुवाबाजी आणि जातीयता यांच्या आहारी जाणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. यात भरडल्या जाणार आहेत त्या जगभरच्या स्त्रिया आणि समाजातले दुर्बल घटक. समितीच्या विचारविश्वाशी अशी स्पष्टपणे सुसंगत असलेल्या मान्यवर व्यक्ती जगभर असाव्यात आणि त्यांनी सहकार्याचा हातही आपणास पुढे करावा, ही बाब नक्कीच उमेद वाढवणारी आहे

हीच बाब आहे लंडनमध्ये गेली ४० वर्षे वास्तव्य करणाऱ्या श्री. गोविंद देवधेकर यांची. ते मूळचे मुंबईचे. दरवर्षी ते भारतात मुंबईला एक महिना येतात. आपल्या वार्तापत्राचे सर्व अंक आवर्जून वाचतात. तसेच त्या दरम्यान वृत्तपत्रातून काही ना काही चळवळीबद्दल येतच असते. त्यांना या चळवळीबद्दल खूप आस्था व प्रेम वाटते. ते स्वत: विवेकवादी व नास्तिक आहेत. परंतु देव व धर्म याबद्दल तटस्थ असल्याची आपली भूमिका त्यांना भारताच्या संदर्भात व प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीने योग्य वाटते. समितीच्या कार्याला ते सतत मदत करत असतात. यावर्षी त्यांनी गैरसमजांच्या प्रदेशात हे आपले पुस्तक बघितले. त्यांना ते आवडले. त्याच्या दोन हजार प्रतींसाठी त्यांनी २० हजार रुपये त्यांच्या ट्रस्टमार्फत देऊ केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याबद्दल त्यांनी परदेशातही तेथील मासिक, साप्ताहिकातून काही लिखाण केले आहे.

न्या. आर. ए. जहागीरदार हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत. त्यांनी स्वत:च्या उत्पन्नातून रॅशनॅलिस्ट फौंडेशन स्थापन केले. त्यामार्फत चळवळींना मदत करण्याची त्यांची इच्छा. प्रथा ही न्यारी हे उत्तम कांबळे लिखित पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. पुस्तकाची निर्मिती आपण दर्जेदार करू शकलो आणि तरीही किंमत खूपच कमी राखू शकलो, याचे कारण त्यांच्या ट्रस्टने आपल्याला या पुस्तक प्रकाशनासाठी २० हजार रुपयांची देणगी दिली. त्याही पलिकडे जाऊन चळवळीच्या कार्याशी ते सतत जिव्हाळ्याने संबंधित असतात. संधी असेल तेथे चळवळीच्या कार्याबद्दल गौरवाने बोलत असतात.

विजूभाई देसाई हे पुण्याचे यशस्वी व्यावसायिक, कट्टर बुद्धिप्रामाण्यवादी. हैदराबाद येथे अलिकडेच श्री. गोरा यांनी नास्तिकवाद्यांची जागतिक परिषद भरवली. त्यासाठी ते गेले होते. तेथे ते १० मिनिटे बोलले आणि ते सर्व भाषण त्यांनी केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची माहिती देणारे. ही सर्व माणसे आपल्या बिरादरीतील ज्येष्ठ मंडळी, मनापासून अंतरीच्या उमाळ्याने चळवळीला सहकार्य करणारी, सांभाळणारी, वाढवणारी. शेवटी बिरादरी याचसाठी असते ना?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...