बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

प्रतिसाद द्याल



प्रतिसाद द्याल
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, चळवळ, जनआंदोलन   
५ जूनला अण्णा हजारे यांनी बोलाविल्यामुळे राळेगणसिद्धी येथे गेलो होतो. अण्णांचा व माझा थोडाबहुत परिचय असला, तरी भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीच्या संदर्भात ही पहिलीच भेट होती. डॉ. श्रीराम लागू व मी पुण्याहून एकत्रितच गेलो. माझा जाण्याचा हेतू चळवळ समजून घेणे हा होता आणि डॉक्टरांना व मला दोघांनाही या चळवळीबाबत स्वत:च्या मर्यादा सांभाळून अण्णांना मदत करता येणे शक्य आहे काय? त्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत, याबाबत चर्चा करण्यात रस होता.

मेळाव्यासाठी सुमारे ४०० जण महाराष्ट्रभरातून आलेले होते. केवळ एका पत्राने स्वखर्चाने इतक्या जणांनी लांबलांबून येणे हे चळवळीचे आवाहन सर्वदूर पोचल्याचे एक लक्षण होते. विश्वस्त मंडळातील अण्णा व त्यांचे अन्य निवडक सहकाऱ्यांची (बाबा आढाव, गोविंदभाई श्रॉफ, पुष्पाताई भावे, ग. प्र. प्रधान, अविनाश धर्माधिकारी) एक स्वतंत्र बैठक झाली. त्यात देखील काही काळ मी सहभागी होतो.

मेळाव्यात मी बोलणार नव्हतो. पण नाव पुकारण्यात आले म्हणून मी बोललो. माझी व्यक्तिगत मते मी मांडली. मेळावा संपल्यानंतर अनेकजण भेटले. महाराष्ट्रात सतत फिरत असल्याने आणि अनेक संघटनांशी संबंधित असल्याने आलेले बरेच जण स्वाभाविकपणे ओळखत होते. पण आश्चर्य म्हणजे त्यातील बऱ्यापैकी संख्या ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणाऱ्या किंवा केलेल्या कार्यकर्त्यांची होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य हे प्रामुख्याने अंधश्रद्धा दूर करण्याचे आहे, हे खरेच तरी तेवढेच आहे, असे आपण कधी मानले नाही. व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे, हे आपण आपले काम मानलेच आहे. आपल्या समितीतील काही कार्यकर्ते अन्य पक्षसंघटनांत काम करतात. तसेच त्यापैकी काहींनी भ्रष्टाचार निर्मूलन जनआंदोलनात केले तर ते त्यांचे स्वातंत्र्य आहेच. खरा प्रश्न आहे तो यापेक्षा थोडा वेगळा आणि त्याचा निर्णय आपल्याला आज ना उद्या घ्यावाच लागेल.

समितीचे संघटन आज महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी उभे आहे. समिती स्वत:ला पुरोगामी चळवळीचा भाग मानते, हेही सर्वांना माहीत आहे. स्वाभाविकच अन्य जनआंदोलनातील प्रश्न ज्यावेळी ऐरणीवर येतात, त्यावेळी समितीचे कार्यकर्ते किंवा एक संघटना म्हणून समिती काय करणार, असा प्रश्न विचारला जातोच. विशेषत: ही जनआंदोलने जेव्हा राजकीय पक्षाची नसतात, त्यावेळी हा प्रश्न अधिक जोरात विचारला जातो. अलिकडच्या काळातील अशी दोन जनआंदोलने म्हणजे एन्रॉनच्या प्रश्नावर मेधा पाटकर यांनी सुरू केलेले आंदोलन आणि दुसरे अण्णा हजारेंचे. एन्रॉनच्या प्रश्नावर एप्रिलअखेरपासून सत्याग्रहाने उचल खाल्ली. त्यानंतरच्या काळात आपण ठरविले असते, तर सत्याग्रहींची एक छोटी तुकडी आपण त्या चळवळीत उतरवू शकलो असतो आणि आपला भातृभाव सिद्ध करू शकलो असतो. अण्णा हजारे उपोषणाला बसले त्याही वेळी आपण लाक्षणिक पाठिंब्यासाठी एक दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपोषण करू शकलो असतो. अर्थात, ही पाठिंब्याची क्षमता आहे म्हणून केवळ तो देणे असे त्याचे स्वरूप असता कामा नये. काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत आणि त्याबाबत सगळ्यांनी; कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी मोकळेपणाने मला लिहावे, अशी विनंती आहे. त्यामुळे संघटनेची वाटचाल अधिक अचूक होऊ शकेल. सहजपणे उपस्थित होणारे मुद्दे असे-

१)    ज्या चळवळीत आपण प्रतीकात्मक सहभागी होणार, त्या चळवळीबरोबर आपले संपूर्ण मतैक्य नसणार, हे उघड आहे. एक तर ते प्रश्न गुंतागुंतीचे व मतभिन्नतेचे आहेत आणि दुसरीकडे समितीच्या कार्यकर्त्यांच्या विचारमंथनात ते आलेले नाहीत. वृत्तपत्रीय बातम्यांतून आणि पुरोगामी चळवळीशी संबंधित व्यक्ती म्हणून कार्यकर्त्याला या प्रश्नाची तोंडओळख आहे, एवढेच. अशा परिस्थितीत कोणत्या चळवळी आणि त्यातले कोणते कार्यक्रम याची निवड करण्यात यावी? त्याचे निकष काय असावेत?
२)    समितीचे काम विस्तारत आहे. संघटनेत वाढ, उपक्रमात वाढ आणि विचारात सकसपणा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये असलेला कार्यकर्ता आधीच गुंतून पडलेला असतो. अशावेळी आणखी जबाबदारी घेणे शक्य नाही. पाठिंबा जाहीर करावा; पण कृतीच्या क्षेत्रात उतरू नये.
३)    समितीच्या कामाबद्दल एक आक्षेप मित्रमंडळींच्याकडूनच असा येतो की,  तुम्ही मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात इतके कसे गुंतून पडलात? आपल्या आजूबाजूस महत्त्वाचे जीवन-मरणाचे लढे सुरू आहेत. त्यात  काही योगदान देणार की नाही?
४)    आपला सहभाग एकतर्फीच असावा की संबंधित संघटनेने आपल्या कामाला अशीच मदत द्यावी, या देवाणघेवाणीवर अवलंबून असावा?
५)    सहभाग घ्यावा तो समिती म्हणून संघटित करावा. संबंधितांना याची कल्पना द्यावी; परंतु प्रत्यक्ष सहभाग हा समितीचे नाव न वापरता द्यावा.       त्यामुळे समितीच्या कार्याचे अनेक हितचिंतक त्यांच्या मनात समिती आणखी काय-काय करू लागली (किंवा विनाकारण कशाकशात नाक खुपसू लागली?) ही प्रतिक्रिया उमटणार नाही, असे करणे योग्य की अयोग्य?
६)    आपण बरे, आपले बरे या पद्धतीने समितीचे काम जोमात सुरू ठेवावे. बाकीच्या घडामोडीत लक्ष घालण्यास आपले वेळ, श्रम व पैसे वाया घालवू नयेत.
वरील मुद्दे आहेत विचारार्थ. यापेक्षा वेगळे काही आपणांस सुचू शकतील. आपण त्यावर जरूर लिहावे.

संघटनेचा विस्तार आणि महिलांचा अधिक सहभाग या पहिल्या दोन्ही लेखांना प्रतिसाद आला नाही. हे फारसे चांगले लक्षण नाही. सततचे विचारमंथन, त्यातून नव्या कल्पनांचा स्वीकार आणि त्यामधून संघटनेसाठी वाढते बळ आणि पाठिंबा मिळवणे, हे कुठल्याही चळवळीला वर्धिष्णु राहण्यासाठी आवश्यक असते. आपण आता या टप्प्यावर आलो आहोत आणि म्हणूनच आव्हान म्हणा अथवा कर्तव्य, आपण ही जबाबदारी स्वीकारायलाच हवी.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जुलै १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...