महिला
आघाडी हवी
दाभोलकर, महिला आघाडी, संघटन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य महाराष्ट्रभर विस्तारले
आहे. शंभराच्या आसपास शाखा आहेत. क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे; पण संपूर्ण संघटनेत महिला कार्यकर्त्या किती आहेत, याचे गणित मांडावयाचे म्हटले तर दोन्ही हाताची
बोटे पुरी पडतात. संघटनात्मक बांधणीतील आपली ही सगळ्यात मोठी उणीव आहे.
चळवळीत आपल्याकडे काही महिला कार्यकर्त्या होत्या; त्याही मोजक्याच आणि पुण्या-मुंबईच्या केंद्रातच. आजही आहेत; त्यादेखील बहुतांशी तेथे अपवादात्मकरित्या. अन्य केंद्रातही महिला
कार्यकर्त्या आढळतात; पण तो अपवादच.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे आपले कार्य हे प्रामुख्याने प्रबोधनाचे
आहे. स्वाभाविकच हे कार्य घरातूनच प्रभावीपणे सुरू व्हावयाचे, तर त्यामध्ये महिलांचा सहभाग हवा. यासाठी आपण सहा वर्षांपूर्वी
‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा : स्वरूप, कारणे
व उपाय’ याबाबत मुंबई येथे एक महाराष्ट्रव्यापी
चर्चासत्र घेतले. त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या न्यायमूर्ती (त्यावेळी त्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती होत्या) सुजाता मनोहर; तसेच एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुमा चिटणीस व पुष्पाताई
भावे अशा अनेक मान्यवर महिला; तसेच स्त्री संघटनांचे प्रतिनिधी, आपले कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चा चांगली झाली. मात्र त्यातून
पुढे महिलांच्या सहभागाची यंत्रणा उभी करता आली नाही.
समितीच्या कार्याचे संघटनात्मक यश कशात आहे? महाराष्ट्रात आता हे मान्य झाले आहे की, समितीच्या कामात असलेले ७० टक्के कार्यकर्ते हे नव्या दमाचे, ताजे आहेत. त्यांना चळवळीचा पहिला स्पर्श
झाला, तोच मुळी समितीच्या माध्यमातून. याबरोबरच
या कार्यकर्त्यांच्यात बहुजन समाजातील ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांची
संख्या सर्वांत जास्त आहे. महिलांच्या सहभागाबाबतीत मात्र हे खरे नाही. मुळात सहभागच खूप कमी आणि आहे तोही शहरी
पांढरपेशा वर्गातील. त्यांच्या सहभागाचे अगत्य आपल्याला निश्चितच आहे. परंतु समजा समितीची
चळवळ नसती तर या कार्यकर्त्या या ना त्या अन्य चळवळीत दिसल्या असत्या. कारण त्यासाठीचे
कर्तृत्व त्यांच्याकडे होतेच.
स्त्री ही अंधश्रद्धेची बळी तर असतेच; परंतु ती त्याची वाहकही असते. स्वत:चे व्यक्तिमत्त्व
चिरडून टाकणारे वा पांगळे करणारे अवजड जू मानाने मिरवायचे, असा हा विपरीत प्रकार. याचा भेद करावयाचा तर उठाव त्यांच्यातूनच
हवा. यासाठी स्वाभाविकच महिलांचा वाढता सहभाग संघटनेत हवा, हा का मिळत नसेल? कारणे अनेक संभवतात. एक
साधे; पण कदाचित अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे
शाखांच्या बैठकीच्या वेळा. बहुसंख्य शाखांची बैठकीची वेळ सायंकाळी असते. रात्रीचा स्वयंपाक
ही अपरिहार्य जबाबदारी असलेल्या बहुसंख्य स्त्रियांना ही वेळ गैरसोयीची आहे, हे उघड आहे. पण हे झाले प्रपंचात गुंतलेल्या महिलांचे. कॉलेजमध्ये
शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे काय?
एक शक्यता अशी असू शकते
की, समितीच्या कार्यात जो संघर्ष गृहीत धरला
जातो, त्याची सुप्त भीती या मुलींना किंवा त्यांच्या
पालकांना वाटत असणार. सातारा येथे दोन-तीन तरुण मुली काही महिने नियमाने बैठकीस आल्या
आणि मग एकदा त्या निर्मलामातेविरुद्धच्या निदर्शनातही हौसेने सहभागी झाल्या. या निदर्शनांचे
निर्मलामातेच्या भक्तांनी त्यावर हल्ला केल्याने प्रत्यक्ष दंगलीत रूपांतर झाले. याचा
धसका घेऊन त्या मुलींनी समिती सोडली किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना सोडावयास लावली.
हीच बाब थोड्या अधिक व्यापक पातळीवर समजावून घेता येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची
विचारधारा स्वीकारल्यानंतर त्याप्रमाणे आचार करावयाचा, तर घरातील संस्कार आणि कुलाचार सांभाळण्याचे माहेरी आणि सासरी दोन्हीकडे
मिळणारे संस्कार आणि येणारी बंधने झुगारावयास हवीत. हा साराच प्रकार खूप मानसिक ताणाचा
असतो. दुसऱ्या बाजूला संघर्ष न करता तडजोड केली तर स्वत:चे मन स्वत:ला खाऊ लागते. तेव्हा
चळवळीत येण्याचा मार्ग हा तसा सुखाचा नाही. क्षणाक्षणाला वादविवादाचे प्रसंग निर्माण
होण्याच्या संभाव्य शक्यतेकडे वळण्यापेक्षा, आहे तसे मागील पानावरून
पुढे चालू केले तर काय बिघडले? असा व्यावहारिक विचार केला जात असण्याची
शक्यताही खूप आहे.
अडचणी तर असणारच; परंतु उपाय सुचायला हवेत, सुचवायला हवेत आणि प्रत्यक्षात प्रयोग करूनही पाहायला हवेत. कार्यकर्त्या
आहेत आणि प्रत्यक्ष संघटनेत नसल्या तरी काही कार्यकर्त्यांच्या पत्नी चळवळीचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
करत असतात. या सर्वांना एकत्र बसवून त्यांच्या अनुभवातून मार्ग शोधणे, ही प्रयत्नाची एक दिशा होऊ शकते. दुसरीकडे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे महिलांच्यातील कार्य हे त्यांच्या जीवनाशी
अधिक निगडित क्षेत्रापासून सुरू केले तर प्रतिसाद वाढेल की नाही? उदा. स्त्रियांचे शारीरिक, मानसिक आरोग्य व अंधश्रद्धा
याचा जवळचा संबंध आहे. या विषयावर विद्यार्थिनी अथवा महिला यांच्या बैठका घेतल्या किंवा
सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पात हा विषय स्वतंत्रपणे राबविला, तर कदाचित महिलांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर थेट संपर्क साधता
येईल. यासाठी कन्याशाळा व महिला महाविद्यालयांचे सहकार्यही अधिक प्रमाणात मिळू शकेल.
कोणत्याही मार्गाने थेट महिला किंवा निदान महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांच्यापर्यंत
भिडण्याची पद्धती व विचार निर्माण केला पाहिजे. अर्थातच काहीसा प्रयोगाचा आणि प्रतिभेचा
भाग आहे. रत्नागिरी शाखेत एक काहीसे वेगळेपण, अतिशय आश्वासक चित्र दिसते.
तेथील प्रमुख कार्यकर्ते सपत्नीक संघटनेत सहभागी आहेत. बैठका, कार्यक्रमाचे संयोजन, व्याख्यान देणे या सर्वांमध्ये
जर पती-पत्नी दोघांचाही उत्साही सहभाग असेल, तर अशा शाखेत महिलांचा
सहभाग अधिक सुलभपणे वाढण्याची शक्यता मला दिसते.
मला वाटते, चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि सहानुभूतीदारांनीही
या विषयावर खुलेपणाने मला लिहावे. त्यांच्या विचारांचे संकलन या सदरात प्रसिद्ध तरी
होईलच; परंतु त्याबरोबरच ते चळवळीला पुढेही नेईल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जून १९९७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा