सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

सहचिंतन



सहचिंतन 
दाभोलकर, संघटन, चळवळ
भ्रमंती हे सदर बराच काळ सुरू होते. महाराष्ट्रातून चळवळीच्या कामासाठी हिंडत असताना भेटणारे लोक, घडणाऱ्या घटना, कार्यकर्त्यांचे कमी-अधिक, जाणवणाऱ्या बाबी, येणारे विचार यांचे धागेदोरे तुमच्यापर्यंत पोचवावे, ही यामागील कल्पना होती.

समितीचे कार्य, चळवळीकडून लोकांच्या अपेक्षा वाढत्या आहेत. महाराष्ट्रातला पहिला समाजकार्य पुरस्कार मिळाल्यामुळे मान्यतेच्या दृष्टीनेही चळवळ पुढच्या टप्प्यावर गेली आहे. अशा वेळी चळवळीच्या कामाबाबत सहचिंतनाची गरज फार जाणवते. हे चिंतन घटापटादी वैचारिक चर्चेसाठी नाही. (त्याचीही गरज असते व त्यासाठी स्वतंत्र प्रयत्नही लागतील; पण तो भाग वेगळा.) तर समितीचे प्रत्यक्ष कार्य कसे चालले आहे, त्यावर समितीचे कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याशी प्रत्यक्ष सूचनांच्या द्वारे केलेले आदानप्रदान असे त्याचे रूप मला अभिप्रेत आहे.

शाखांचा विस्तार, महिलांचा संघटनेत प्रभावी सहभाग, समविचारी संघटनांशी संपर्क, भारतभर समितीच्या कार्याचा विस्तार, निधी संकलन, चळवळीचे संस्थीकरण, युवकांना कार्यात अग्रहक्काने संधी देण्याची यंत्रणा, असे अनेकविध विषय समोर आहेत. शंभराच्या आसपास अडलेल्या शाखांच्या संख्येची वाढ कशी होईल? महिलांचा कायमस्वरुपी सहभाग मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचे भान बाळगावे लागेल? भारतातील अनेक राज्यात आज समितीच्या कार्याबद्दल आस्था, कुतूहल आढळते. त्याला संपर्कात आणणे, फलदायी बनवणे हे कसे करता येईल? निधी संकलन ही नेहमीची डोकेदुखी. त्याची यंत्रणा कशी हवी? चळवळीचा जोर कमी-अधिक होत राहणारच. अशा वेळी चळवळीतून मिळालेली ताकद टिकवून धरणारे रचनात्मक काम कसे हवे? युवकांच्या शक्तीवरच कोणतीही संघटना मोठी होते. त्यांना अधिकाधिक संधी संघटनेत कशी देता येईल? विचार करावयास लागल्यावर असे अनेक मुद्दे पुढे येतात.

यापैकी एक मुद्दा एका वेळच्या अंकात टिपण स्वरुपात असेल. अंक ५ पर्यंत वाचकांना पोचतो. अंक वाचणारे कार्यकर्ते असोत, चळवळीचे सहानुभूतीदार असोत वा नुसतेच वाचकही; ज्यांना-ज्यांना असे वाटते की, त्यांना याबाबत काही म्हणावयाचे आहे, त्यांनी त्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत त्याबाबतच्या आपल्या कल्पना, सूचना, मते मला कळवावीत. त्या सर्वांचा आधार व आढावा घेत हे सहचिंतन सिद्ध होईल. त्या सर्वांची नावे ही लेखाच्या खालील येतीलच.
संघटना विस्तार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून काम सुरू झाले, त्यावेळी एकत्र आलेल्या शाखा होत्या १५-१६. हळूहळू वाढत त्यांची संख्या ८०-८५ पर्यंत पोचली. संपर्क शाखा धरून ती संख्या शंभराच्या आत-बाहेर होईल. गेली चार वर्षे जवळपास ही संख्या कायम आहे. काही नव्या शाखा उभ्या राहतात; काही जुन्या नावापुरत्या उरतात. महाराष्ट्रातील या शाखांची संख्या दुप्पट करण्याचा आपला संकल्प आहे. या वाढीसाठी काय करावे? कामाची कोणती पद्धत उपयोगी ठरेल/ती कशाप्रकारे वापरावी लागेल? पुणे शाखेने एक वेगळा मार्ग आखला आहे. त्यांनी स्वत:च निधीची तरतूद केली आहे. व्यवस्थित मानधन देऊन त्यांनी पूर्ण वेळ कार्यकर्ता नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ता एम.एस.डब्ल्यू.ची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल. रीतसर मुलाखती, लेखी परीक्षा यामधून त्याची निवड होईल. सत्यशोध परीक्षा सर्व तालुक्यात घेणे, तालुक्या-तालुक्यात शाखा उभ्या करणे हे कार्य तो करेल. दुसरा मार्ग सातारा शाखेचा. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आपापल्या भागात घरोघरी फिरून लोकांना हॅन्डबिले वाटली. चळवळीचा विचार ऐकण्यासाठी त्यांना त्याच भागात एकत्र केले. यातून वार्तापत्राचे काही वर्गणीदार मिळाले, काही जणांनी समितीशी अधिक संपर्क वाढवण्याची इच्छा प्रकट केली. आपापल्या ठिकाणी वा सर्व ठिकाणी उपयोगी पडू शकतील, असे या स्वरुपाचे आणखी कोणकोणते मार्ग तुम्हाला सुचतात?

लोकांना एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आपण जसा मांडतो, त्याचे आकर्षण आहे. दुसऱ्या बाजूला मनात अनेक आशंका आहेत. तिसरीकडे प्रत्यक्षात कृती करताना जी ओढाताण होईल, त्याची भीती आहे. शंका दूर व्हाव्यात, सहभागी होण्याची इच्छा वाढावी, यासाठी लोकमानसाला साद घालण्याचा उपयुक्त शक्यतो अचूक मार्ग कोणता? सप्रयोग व्याख्याने? शिबिरे-किती दिवसांची? अनौपचारिक गप्पा? यामधून अधिक वाढणारे आकर्षण हे प्रत्यक्ष संघटित व्हावे, यासाठी प्रयत्न कसा करावा?

महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीला एकूण मरगळ आहे (असे अनेकांना वाटते), अशावेळी संघटना बांधणीच्या आपल्या अपेक्षाही माफकच हव्यात, हे खरे काय? माफक म्हणजे किती? तीन अथवा पाच जणांचा गट एखाद्या शहरात असणे आणि त्यांनी उपक्रम साजरे करणे (वर्षातून तीन-चार) एवढे पुरेसे आहे की, संघटनात्मक नियमितता शिस्त आवश्यक आहे? समिती उपक्रमाच्या पातळीवर राहिली तर बोलबाला कमी होत नाही (कारण तो नेहमी उपक्रमाद्वारेच होत असतो); पण संघटनात्मक ढिलेपणाने प्रभाव मात्र मर्यादित होतो. आपल्यासारख्या विषयावरच्या संघटनेत हे अटळ आहे की, आपण ही पळवाट शोधतो आहोत?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विस्तार, प्रभावक्षेत्र याची स्वाभाविक मर्यादा काय? प्रत्येक तालुक्यात एक शाखा (पाच-सहा जणांचा एक गट) ही कमाल मर्यादा की किमान दहा हजार वस्तीच्या गावापर्यंत पोचणे शक्य आहे, अशा शाखांना अनेक मर्यादा पडतात. त्यांचा उत्साह, काम थंडावते. असे घडू नये म्हणून संघटनांतर्गत काय यंत्रणा उभी करता येईल? या सगळ्यासाठी वेळ द्यावा की, ठळक लक्षवेधक, धडाकेबाज कार्यक्रम घेत राहून संघटनेचे आकर्षण सतत जागते आणि नाव चमकते ठेवावे, विचारांचा एक दरारा उभा करावा? कोणत्या मार्गाने संघटना चालवावी? या दोन्ही प्रकाराचा समन्वय साधावयाचा, ही कल्पना शक्यता आहे की, कल्पनाविलास?

एक ना अनेक प्रश्न. तुमच्या संघटनेसाठी तुम्हीच विचारा, उत्तरेही तुम्हीच शोधा.

कामाची डायरी-काही नोंदी
ता. ३० मार्च डॉ. लढ्ढा पती-पत्नी लिखित आरोग्य आणि अंधश्रद्धा या पुस्तकाचे; तसेच डॉ. प्रदीप पाटकर लिखित भूतबाधा-मानसिक आजार या पुस्तकांचे पुणे येथे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते प्रकाशन. डॉ. बाबा आढाव यांची विशेष उपस्थिती. पुस्तक प्रकाशनानिमित्त जाहीर कार्यक्रम ता. ३१ मार्च रोजी शेवगाव (जि. नगर), व पनवेल (जि. रायगड) येथे ता. २४ एप्रिल रोजी झाले. ता. १६ मार्च - गोवा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील समितीच्या कामाशी संबंधित कार्यकर्त्यांची कामे वाढविणे व नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्यावरील कारवाई संबंधात सावंतवाडी येथे बैठक. ५० जणांची उपस्थिती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे कार्य संयुक्तपणे वाढविण्याचा निर्णय.

ता. ३१ मार्च - पाथर्डी (जि. नगर) येथील शाखेचे नरेंद्र दाभोलकरांच्या हस्ते उद्घाटन. बाबा आरगडे, मच्छिंद्र वाघ यांचे सप्रयोग व्याख्यान.

ता. ६ एप्रिल - मराठवाडाव्यापी भानामती प्रबोधन मोहीम संयोजनाची बैठक लातूर येथे, चाळीस जणांचा सहभाग (तपशील अंकात अन्यत्र)

ता.१३ एप्रिल - वार्तापत्र संपादक मंडळाची बैठक. दिवाळी अंकाची तयारी सुरू- सत्यशोध प्रज्ञा संयोजन, महाराष्ट्रव्यापी बैठक. पुढील वर्षाच्या संयोजनाचा तपशील ठरवला.

ता.२० एप्रिल -रत्नागिरी शाखेचे उद्घाटन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हस्ते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथील कार्यकर्त्यांची दुसरी बैठक.

ता.२६, २७ एप्रिल - बुवा कसा पकडावा? याबाबत जिल्हा प्रतिनिधींचे शिबीर सातारा.

ता.१५, १६ एप्रिल - उमरी पोहरा (जि. अकोला) येथे बंजारा समाजाच्या यात्रेत ३५ ते ४० हजार पशुबळी होतात. त्याविरोधात यात्रेत प्रबोधन सत्याग्रह युवा बंजारा दल व कृषी गोसेवा संघ मालेगाव यांच्या सहकार्याने.

ता. १३, १४ एप्रिल - मुंबई (गोरेगाव) येथे प्रशिक्षण शिबीर

ता. ७ एप्रिल -धुळ्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. हिराजी पाटील यांचा अमृतमहोत्सवी नागरी सत्कार.

ता. २८ मार्च, २५ एप्रिल - सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अंधश्रद्धा व व्यसनविरोधी विशेष मोहीम समाज संजीवन दिंडी या नावाने. कार्यक्रमांना महिलांचा मोठा सहभाग.

ता. ३०, ३१ मे व १ जून - राज्य कार्यकारिणी शांतीवन-रायगड.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...