फॅसिस्ट
शक्तीविरोधी रान उठविणार
दाभोलकर, फॅसिझम, दैववादाची होळी, फलज्योतिष, विरोध
‘महाराष्ट्र अंधश्रद्धा
निर्मूलन समिती, सातारा.’ सातारकरांना आवाहन ‘दैववादाची होळी या कार्यक्रमात सहभागी व्हा’ अशा मथळ्याचे एक पत्रक ज्योतिष संमेलनात ‘अंनिस’तर्फे काढण्यात आले. त्याचा आशय असा होता
-
अखिल भारतीय ज्योतिष संमेलन दिनांक ३ नोव्हेंबर ९५ ते ५ नोव्हेंबर
९५ रोजी सातारला होत आहे. यापूर्वी ते महाराष्ट्रात जेथे-जेथे झाली, त्या-त्या ठिकाणच्या परिवर्तनवादी संघटनांनी त्यांच्यासमोर जे प्रश्न
मांडले, त्यांची समाधानकारक उत्तरे कधीही मिळाली
नाहीत. या संमेलनाआधी त्या संमेलनाचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष, महाराष्ट्र ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष या सर्वांना आम्ही प्रश्न
पाठविले त्यांची योग्य उत्तरे मिळाली नाहीत. ही वस्तुस्थिती सातारकरांच्या समोर यावी
म्हणून हे पत्रक आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.
ग्रहताऱ्यांची भ्रमणे ही खगोलशास्त्र व गणिताच्या
आधारे वर्तवता येतात; मात्र व्यक्तीच्या जीवनात बरे-वाईट, शुभ-अशुभ असे घडविण्याची कोणतीही शक्ती या
ग्रहात नसते. दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा दावा करणाऱ्या तथाकथित फलज्योतिषशास्त्राने
याबाबत कोणताही पुरावा आजपर्यंत पुढे आणलेला नाही. भारताच्या घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे
हे नागरिकांचे कर्तव्य सांगितले आहे. त्याचा विचार करून अशास्त्रीय फलज्योतिषाला लोकांनी
मनोरंजनापलिकडे अधिक स्थान आपल्या आयुष्यात देऊ नये, अशी विनंती आम्ही करीत
आहोत.
फलज्योतिष हे ग्रहगोलाद्वारे व्यक्तीला नियतीचे संकेत देते, असे ज्योतिषी सांगतात. याचा अर्थ व्यक्तीचे सर्व जीवन नशिबावर अवलंबून
असते, असा होतो. माणसाचे कर्तृत्व, समाजाची स्थिती व्यक्तीचे जीवन घडविते. नवग्रह
आणि नशीब याच्याशी त्याचा अजिबात संबंध नाही, असे
आम्हाला ठामपणे वाटते.
म्हणूनच समाजमन दैववादी बनविणाऱ्या ज्योतिषाला माणसांनी दूर ठेवावे, असे आमचे आवाहन आहे. महात्मा फुले, विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित नेहरू या सर्व थोरांनी म्हणूनच ज्योतिषाबाबत विरोधी मत प्रदर्शित
केले आहे, हे आम्हाला महत्त्वाचे वाटते.
व्यक्तीच्या लहानपणी तिची जन्मकुंडली तयार होते. व्यक्तीच्या लहानपणीच
तो दैववादाला आधार देणारा पांगुळगाडा आहे. तो निर्धाराने टाकून देण्यासाठी या जन्मकुंडल्यांची
आम्ही दि. ४ नोव्हेंबर ९५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गांधी मैदान, सातारा येथे जाहीर होळी करीत आहोत. चांगल्या हेतूने व प्रामाणिक
प्रयत्नाने काम करण्यासाठी सर्व वेळा सारख्याच असतात. शुभ वेळ व अशुभ वेळ या केवळ मानसिक
कल्पना आहेत, हे लोकांना समजावे यासाठी पंचांगातील शुभवेळाच्या
पानांचीही होळी यावेळी केली जाणार आहे.
प्रयत्नवादाचा स्वीकार करण्यासाठी नियतीवादाला ठोकरण्यासाठी, निर्भय बनण्यासाठी, समाजसुधारकांचा वारसा
चालविण्यासाठी ‘दैववादाची होळी’ या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे, ही विनंती. १) लोकरंगमंच, सातारा, २) राष्ट्रसेवक क्रांती दल, सातारा, ३) राष्ट्रसेवा दल सातारा, ४) राष्ट्रीय एकता मंच, सातारा, ५) एस.एफ.आय., सातारा, ६) छात्रभारती, सातारा, ७) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा-सातारा, ८) धुमकेतू विज्ञान मंडळ, सातारा, ९) सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळ, सातारा, १०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅकॅडमी, सातारा, ११) एकता शिक्षण प्रसारक संस्था, सातारा, १२) एम. एस. ई. बी. वर्कर्स फेडरेशन, सातारा, १३) सातारा म्युनिसिपल कामगार युनियन, सातारा, १४) जिल्हा परिषद पुरोगामी नोकर संघटना, सातारा, १५) विमा कामगार संघटना, सातारा, १६) एस.टी. कामगार संघटना, सातारा, १७) ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन सातारा.
‘हिंदू एकजूट’ या संघटनेने या कार्यक्रमाला विरोध केला. दाभोलकर, मंडपे, देशमुख यांची नावे गाढवावर लिहून त्यांची
मिरवणूक काढली. त्याच दिवशी डाव्या पक्षांची जिल्हा बैठक होती. हे वृत्त कळताच, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन महासंघ, भारिप या सर्व पक्षांनी उत्स्फूर्तपणे याबाबत कडाडून टीका केली, निषेध नोंदविला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यास पाठिंबा
जाहीर केला. गावागावात या फॅसिस्ट शक्तींविरोधी प्रचाराचे रान उठवण्याचे ठरवले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे १९९६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा