सत्कार्य
चालूच ठेवा...
दाभोलकर, खुनीहल्ला, निषेध, विवेक जागर, विवेकवाद, नीतिमत्ता
३१ मार्चला माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मला दोन बुक्के
मारण्यात आले. कार्यकर्ते मध्ये पडल्याने हल्लेखोर व त्यांची हातघाई झाली. त्यामध्ये
दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली. डॉ. लागूंच्या गाडीला अडवण्यात आले. धक्काबुक्की
झाली. त्याबद्दल दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातून आलेली बातमी सोबत लावली आहे. त्यावरून
सविस्तर कल्पना येईल.
ही बातमी ‘दूरदर्शन’वर सांगण्यात आली. वृत्तपत्रातूनही
आली. या बातम्यांच्यामध्ये मला उपचारासाठी सर्वसाधारण रुग्णालयात नेल्याची बातमी होती.
स्वाभाविकच प्रेमाने, काळजीने, जिव्हाळ्याने असंख्य फोन
सातारला खणखणले, खूप पत्रे आली.
अनेक प्रकारे निषेध नोंदविले गेले. मराठवाड्यातून प्रसिद्ध होणाऱ्या
जवळपास सर्व वृत्तपत्रांनी (अपवाद सामना व दै. तरुण भारत) विस्तृतपणे पहिल्या पानावर
निषेधपर बातमी दिली. दुसऱ्या दिवशी डॉ. लागू व मी यांच्या झालेल्या वार्तालापालाही
ठळकपणे प्रसिद्धी दिली. दै. मराठवाडा व लोकपत्र यांनी पहिल्या पानावर स्वतंत्र स्फुटे
लिहिली. दै. ‘महानगर’ने ‘श्रीरामा यांना माफ कर’ असा, तर ‘देशदूत’ने ‘सत्कार्य चालूच ठेवा’ या नावाचे विचाराला पाठिंबा देणारे चांगले अग्रलेख लिहिले. मराठवाड्याबाहेर
लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स वगैरे
अनेक दैनिकांत, त्यांच्या विविध आवृत्त्यांत बातम्या आल्या.
अनेक संघटनांनी तातडीने निषेध नोंदविले. महाराष्ट्रातील ‘छात्रभारती’च्या अनेक शाखांनी ताबडतोब बैठका घेऊन निषेधपत्रे
काढली. कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट) भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी जन परिषद यांनी; तसेच रिपब्लिकन पार्टीने
कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन अशा घटनांचा प्रतिकार करण्याचे जाहीर केले. अन्य
अनेक संघटनांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. भ्याड हल्ल्याचा निषेध केला. त्यामध्ये
सामाजिक संस्था आहेत, वाचनालये आहेत. छोटी-मोठी वृत्तपत्रे, साप्ताहिके आहेत.
आपल्या समितीच्या शाखांना ही बातमी समजताच प्रतिक्रिया स्वाभाविकच
उत्स्फूर्त संतापाची आणि कळकळीची होती. निषेधाची पत्रके काढण्यात आली. त्या-त्या भागातील
वृत्तपत्रांनी ती ठळकपणे दिली. निषेधाचे बोर्ड गावात लावण्यात आले. काही शाखांनी आपापल्या
ठिकाणच्या शासनाच्या प्रतिनिधीला याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये कडक कारवाईचा आग्रह
धरला. सातारा येथे ‘दूरदर्शन’ची बातमी ऐकताच आपले व
अनेक मित्रसंघटनांचे कार्यकर्ते तातडीने एकत्र आले. त्यांनी निषेधाच्या मशाल मोर्चाला
सुरुवात केली. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे हा मोर्चा पूर्ण होऊ शकला नाही.
सनातन्यांच्या
हल्ल्यामुळे ‘विवेकजागरा’ची मोहीम थांबणार नाही
आमच्या प्रतिनिधीकडून - औरंगाबाद दि. १ - समाजामध्ये सध्या असहिष्णू
आणि विद्वेषाचे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न संघटितपणे चालू असल्यामुळे हे वातावरण
अधिकाधिक निकोप, निर्भय आणि विवेकी होण्यासाठी आपण ‘विवेकजागरा’ची ही मोहीम चालवीत आहोत. काल झालेल्या सनातन्यांच्या
हिंसक हल्ल्यामुळे आपली मोहीम थांबणार नाही. पण या प्रयत्नाबद्दल असहिष्णुता दाखविण्याऐवजी
त्याला पद्धतशीर विरोध करण्याचे रूप सत्तेच्या आशीर्वादाने यावे, ही बाब चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम
अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आज येथे केले.
रविवारी रात्री सरस्वतीभुवन सभागृहामध्ये डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर
यांचे भाषण झाल्यानंतर पतितपावन व काही सनातनी हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्यावर हिंसक
हल्ला केला. त्या पार्श्वभूमीवर आज बोलताना डॉ. लागू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण कोणत्याही प्रकारचे अनुदार उद्गार
काढलेले नाहीत; पण याबाबत पूर्णपणे खोटी, विपर्यस्त आणि प्रक्षोभक अशी बातमी येथील ‘देवगिरी तरुण भारत’ या दैनिकाने ‘शिवाजी महाराजांबद्दल अनुदार उद्गार : डॉ. श्रीराम लागूंना पळता
भुई थोडी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली. असे वृत्त
प्रसिद्ध करणे आणि हिंदुत्ववाद्यांनी हल्ला करणे ही एकाच समाजविघातक प्रवृत्तीची रूपे
आहेत. या प्रकाराबद्दल आपण प्रेस कौन्सिलकडे दाद मागणार आहोत. सनदशीर आणि कायदेशीर
मार्गाने या प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढा देऊ, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की,
परवाच्या कार्यक्रमामध्ये
एका प्रश्नकर्त्याने असे विचारले की, साधारणपणे पौराणिक, ऐतिहासिक दंतकथांमध्ये त्याला नैतिक प्रमाण देण्याचा हेतू आहे, असे वाटत नाही का? त्या वेळी मी म्हणालो
की, यातून काही प्रश्न उभे राहतात. बालशिवाजीची
एक गोष्ट लहानपणी पाठ्यपुस्तकात सांगितली जात होती- बालशिवाजी सवंगड्यांसह खेळत होता.
तेव्हा एक गाय घाबरून धावतपळत आली. त्यामागून यवन आला आणि त्याने विचारले, ‘पोरांनो गाय कोठे गेली?’ त्यावेळी बालशिवाजीने
मोठी नैतिक कामगिरी केली; पण त्याकरिता खोटे बोलण्याची अनैतिकता त्याने
पत्करली. पण खरे बोलला असता तर गायीचे प्राण वाचले नसते. आता या कथित दंतकथेमध्ये शिवाजी
महाराजांबद्दल कोणतेही अनुद्गार काढले नाहीत. पण काही वर्तमानपत्रांनी हे विपर्यस्तपणे
प्रसिद्ध केले. ही प्रचाराची पद्धती मला कळत नाही. पण ज्यावेळी मी हे काम हाती घेतले, त्यावेळीच मला कल्पना होती. पण असा धाकदपटशा दाखविल्याने मी
बधणार नाही, असेही म्हणाले.
डॉ. लागू म्हणाले की, अलिकडे समाज भावनांच्या आहारी चालला आहे.
त्या माणसाने विवेकवादी बनण्याची आजची गरज आहे. स्वातंत्र्य हे स्वयंभू मूल्य आहे.
समाजातील अनाचार थांबवायचा असेल, तर
या स्वयंभू मूल्याचा आदर करण्याचे प्रत्येकाने शिकले पाहिजे. हे मूल्य शिकवणे म्हणजे
माणसाला विवेकवादी बनविणं इतकं हे साधं आहे. विवेकवादी मनुष्य सहिष्णू होता. त्याला
नीतिमत्ता शिकवण्याची गरज नाही. त्यासाठी ही ‘विवेकजागरा’ची मोहीम आपण
हाती घेतली आहे, असेही डॉ. लागू यांनी सांगितले.
डॉ. लागू आणि डॉ. दाभोलकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर
कडक कारवाई करावी, अशी मागणी डाव्या लोकशाही आघाडीने केली आहे.
हिंदुत्ववाद्यांचा हा हल्ला पूर्वनियोजित होता. पण पोलिसांनी सूचना मिळाल्यावरही घटनास्थळी
येण्यास विलंब केला, असा आरोप केला आहे. या पत्रकावर उद्धव भवलकर, अॅड. प्रीतमकुमार शेगावकर, सुभाष लोमटे, पंडित मुंडे,
बुद्धिनाथ बराळ आदींच्या
सह्या आहेत. ‘छात्रभारती’च्या औरंगाबाद शाखेनेही या घटनेचा निषेध गेला आहे. (दै. महाराष्ट्र
टाईम्स)
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा