बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

ठामपणे उभे राहा



ठामपणे उभे राहा
दाभोलकर, विवेक जागर, विरोध, चळवळ
, , ३ जुलै रोजी डॉ. श्रीराम लागू व मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. विवेक जागराच्या वादसंवादाचे कार्यक्रम होते. नाशिक, सटाणा, निफाड येथे कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद. हॉल ओसंडून वाहणारे. सटाण्याहून निफाडकडे जातानाच बातमी कळली की, शिवसेना (कळवण) ३ तारखेच्या कार्यक्रमाला विरोध करण्याच्या तयारीत आहे. नंतर असेही कळले की, तेथील शिवसेनेत दोन गट आहेत. त्यापैकी पदभ्रष्ट गट आपला कडवेपणा सिद्ध करण्यासाठी या खटाटोपीत आहे; परंतु एकूण प्रकरण फारसे गंभीर नाही.

दोन तारखेचा सटाण्याचा कार्यक्रम आटोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कळवणला जाण्यासाठी निघायचे होते. पण रात्री एक वाजताच कळवणहून सात-आठ जण निफाडला थडकले. त्यांनी मला उठविले. कळवणला आपली सक्रिय शाखा नाही, संपर्क आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कामाची उभारी धरण्याचा प्रयत्न करणारा जो गट होता, तोच सगळा आला होता. त्यांचे चेहरे चिंताक्रांत आणि निराश वाटत होते. त्यांनी गावातील घडामोडी सांगितल्या. शिवसेनेच्या शाखेने आक्रमक रूप घेतले होते. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती. कार्यक्रम बाजारपेठेत भर वस्तीत बँकेच्या हॉलमध्ये होता. मुलाखत घेणाऱ्या प्राचार्यांना एकेकाळी त्यांचेच विद्यार्थी असणाऱ्या शिवसैनिकांनी खबरदार..! मुलाखत घ्यायला आला तर... असा सज्जड दम भरला होता. कार्यक्रम झालाच तर दंगल होईल, असा इशारा देण्यात आला होता. हे सगळे टाळायचे असेल तर एक मार्गही सुचविला होता. तो म्हणजे दाभोलकरांनी असे लिहून द्यावे की, देव आणि धर्म याबाबत एक शब्दही कार्यक्रमात उच्चारला जाणार नाही. या सगळ्या ताणातून सुटका होण्यासाठी स्थानिक मंडळींनी पोलिसांना कार्यक्रम रद्द केल्याचे सांगून मला सांगण्यास ते आले होते. पोलीस हे देखील पक्षपाती आहेत आणि त्यांचे सहकार्य देखील खात्रीचे नाही, अशी त्यांची भावना होती.

...तर आमच्यावर खटला भरावा
त्यांच्या बोलण्याचा आवेग ओसरल्यानंतर मी त्यांना शांतपणे; पण ठामपणे सांगितले, ते थोडक्यात असे, उद्या आम्ही कळवणला येणारच. योग्य वाटेल ते बोलणारही. आम्ही काय बोलावे, यासाठी कोणाचीही सेन्सॉरशिप अजिबात मान्य नाही. बँकेच्या संचालकांनी हॉल नाकारला आणि प्राचार्य आलेच नाहीत, तर बँकेसमोरच्या रस्त्यावर आम्ही सभा घेऊ. ध्वनिक्षेपक मिळाला नाही तर त्याच्याशिवाय भाषण करू. आमचे मत मांडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो घटनात्मक हक्क असल्याने पोलिसांनी आम्हाला संरक्षण देणे आणि गुंडांना प्रतिबंध करणे, ही त्यांची जबाबदारी आहे; विशेषत: शिवसेनेचे राज्य असताना शिवसैनिकच घटना मोडीत काढत असतील तर ती आणखी गंभीर बाब आहे, असे मी मानतो. आमची भाषणे कोणत्याही कारणाने पोलीस वा शिवसैनिक यांना प्रक्षोभक वाटल्यास त्यांनी आमच्यावर खटला भरावा. तो आम्ही लढवू आणि भाषण देण्यालाच पोलिसांनी प्रतिबंध केल्यास तोंडाला पट्टी बांधून, हातात निषेधाचा फलक घेऊन फेरी काढू; परंतु आम्ही कळवणला येणारच. संयोजन समितीला अडचणीचे वाटत असल्यास त्यांनी दूर राहावे. अर्थात, हे सर्व माझे मत आहे. उद्या पहाटे मी डॉ. लागूंच्या बरोबर चर्चा करेन. तुम्हीही रात्री चार तास इथेच थांबावे व पहाटे डॉक्टरांच्याबरोबर बोलून निघावे, असे मी त्यांना सांगितले. ते सर्वजण निफाडच्या कार्यकर्त्यांसोबत निघून गेले. पहाटे ५.३० ला डॉ. लागूंना हा विषय मी सांगू लागलो. तेवढ्यात त्यांच्याबरोबर रात्री आलेला निफाडचा श्रीवास्तव हा कार्यकर्ता आमच्या खोलीवर थडकला. त्याने सांगितले की, माझ्या बोलण्याने कार्यकर्त्यांची मानसिकताच बदलली. स्वत:च्या भित्रेपणाबद्दल ओशाळलेपण आले आणि पडेल ती किंमत देऊन ३ तारखेला सकाळचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ते रातोरात कळवणला परतले होते.

कळवण गावाला कलंक
सकाळी ठीक ९.३० वाजता मी व डॉ. लागू नाशिकचा कार्यकर्ता महेंद्र दातरंगे हे कळवणला पोचलो. कार्यकर्त्यांनी ठामपणे घेतलेल्या भूमिकेचा परिणाम वातावरणात जाणवत होता. आमच्या कार्यक्रमाचा बोर्ड चौकात ठळकपणे लिहिलेला होता. शिवसेना कार्यालयासमोरील विरोधाचा बोर्ड पुसलेला होता. बँकेसमोर गाडी उभी केली तर त्यावर दगडफेक होईल, ही आधीची भीतीदेखील खरी वाटली नाही. त्यामुळे आम्ही भर बाजारात बँकेच्या बाजूला आमची गाडी उभी केली. बँकेत यथोचित स्वागत झाले. प्राचार्यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र दातरंगेने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कार्यक्रम सुरू झाला. एवढ्यात खाली निषेधाच्या घोषणा देत १५-२० जणांचे टोळके आले. पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी थोडीशी वादावादी केली. काहीतरी केले याचे समाधान मिळविले आणि काढता पाय घेतला. हॉलमधील कार्यक्रमाला त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दोन तास कार्यक्रम उत्तमपणे पार पडला. बऱ्यापैकी गर्दी होती. कॉलेज सुटल्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रम संपता-संपता आल्या. त्यामुळे गर्दीत भरच पडली. पोलिसांनीदेखील काम चोख बजाविले. अध्यक्षस्थानावरून बोलताना बँकेच्या चेअरमननी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि अशा स्वरुपाची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा कळवण गावाला कलंक असल्याचे सांगितले.
कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहार घेऊन निघण्यापूर्वी रात्री जाणवलेल्या दहशतीच्या उदास वातावरणाचा मागमूसही राहिला नव्हता. कळवण येथे शाखा कशी वाढवता येईल, वार्तापत्राचे वर्गणीदार कसे नोंदवता येतील, शिबीर कधी घेता येईल, याची चर्चा सुरू होती. कार्यक्रम जिद्दीने आणि निर्भयपणे यशस्वी करून दाखवल्याचा उत्साह आणि समाधान चेहऱ्यावर जाणवत होते. निर्धाराने, ठामपणे, कणखरपणे उभे राहिले तर धमकावणारे वाघ कागदीच निघतात, या प्रचितीचा तो आनंद होता.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर १९९६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...