शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

निर्मलबाबाचा दूषित बोध



निर्मलबाबाचा दूषित बोध

दाभोलकर, निर्मलबाबा, सिक्स्थ सेन्स, आव्हान, फसवणूक, चमत्कार, संत तुकाराम, अंधश्रद्धा 
झारखंडमधील एका दैनिकामुळे आणि त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे निर्मलबाबाचा पर्दाफाश झाला. गेली अनेक वर्षे तो स्वत:ला सहावे अद्भुत इंद्रिय लाभले आहे, असे सांगून लोकांची फसवणूक करत असे. विविध असाध्य आजार बरे करणे, वेगवेगळे प्रश्न सोडवणे यासाठी आपण मदत करतो, असे सांगून तो लोकांकडून हजारो रुपये उकळत असे. ऐसे कैसे झाले भोंदूसारख्या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला साडेतीनशे वर्षांपूर्वीच सावध करून ठेवलेले आहे. पण इतक्या वर्षांनंतरही बुवांच्या नादी लागणाऱ्या आणि स्वत:चे नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत बदल झालेला नाही.      
निर्मलबाबाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आणि देशभर जी चर्चा सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला होता. त्यामध्ये ते म्हणतात -
ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू।
अंगा लावूनिया राख। डोळे झाकुनी करती पाप।
दावूनी वैराग्याच्या कळा। भोगी विषयाचा सोहळा।
तुका म्हणे सांगू किती। जळो तयांची संगती।।
आज साडेतीनशे वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या बुवांची संगती जळो सोडाच; पण संगती मिळो, अशा पद्धतीने समाजाची वाटचाल सुरू असलेली दिसते. निर्मलबाबाचे कारनामे हे त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. निर्मलबाबाच्या बाबतीत जी माहिती बाहेर आली आहे, त्याप्रमाणे तो त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या नोंदणीसाठी दोन हजार रुपये आकारत असे. माझ्या शक्तीच्या माध्यमातून मी विविध रोग, अगदी असाध्य रोगही बरे करू शकतो, लोकांच्या अडचणी, त्यांच्या चिंता, समस्या दूर करतो, कोणाला नोकरी नसेल तर ती मिळावी यासाठी उपाय सुचवतो, कोणाकडे काही तंटे असतील तर ते सोडवतो, असे तो सांगत असे. हे उपायही कार्यकारणभावाशी विसंगत आहेत. त्याच्याकडे उपाय करून घेण्यासाठी शेकडो लोक येत असत. सामान्यपणे माणसाला पाच इंद्रिये असतात. पण निर्मलबाबा मात्र स्वत:ला सहावे इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) हे अद्भुत इंद्रिय प्राप्त झाले आहे, ज्याद्वारे आपण संबंधित रोगाचे निदान करतो आणि त्यावर उपचारही करतो, असे सांगत असे. त्यासाठी तो लोकांकडून त्यांच्या पगाराच्या १० टक्के रक्कम घेत असे.
खरे तर त्याचे बुवाबाजीचे स्वरूप, स्वरूप म्हणून नवे काहीच नाही. असे बाबा याआधीही झाले आहेत आणि लोक असेच अंधश्रद्धेला बळी पडत राहिले तर यापुढेही होत राहणार आहेत. निर्मलबाबा हा हायटेकबाबा. त्याचे ताजे ढळढळीत उदाहरण आहे. ज्यावेळी काही चॅनेल्सनी त्याच्याविरोधात आवाज उठवला, त्यावेळी त्याचे हे कारनामे पुढे आले आणि त्याची अमाप संपत्ती उघड झाली. ज्या गोष्टीला आव्हान देणे, कायद्याच्या चौकटीत बसवणे शक्य होते, त्या गोष्टीला याआधीच खरे तर आव्हान द्यायला हवे होते. बाबा अशा प्रकारे रुग्णांवर उपचार करत असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून त्याला दहा रुग्ण देण्यात येतील. त्याने त्या रोगावर उपचार करणे दूरच; पण त्या रोगाचे निदान केले तरी त्याला समितीतर्फे २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच असे उपचार हा आजदेखील द ड्रग्ज अँड मॅजीक रेमिडिज ऑब्जेक्शन अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅक्ट १९५४ प्रमाणे दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे तो बाबा, त्याचे कथित चमत्कार दाखवणारे चॅनेल्स यांच्यावर पोलीस कारवाई करू शकतात. यापुढे जाऊन विज्ञानसंस्थांनी जाहीर करावे की, विज्ञानात सहावे इंद्रिय याला काडीचेही स्थान नाही. त्याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. त्याचप्रमाणे लोकांची फसवणूक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करणाऱ्या बाबाकडे आयकर विभागाची तरी नजर जायला हवी होती. याचा अर्थ असा की, आहे त्या परिस्थितीतही त्याच्या विरोधात जाणे शक्य होते. आमच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने संकल्पित जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला, त्याचप्रमाणे तो केंद्रानेही मंजूर केला तर अशा बाबांना पाच ते सात वर्षे खडी फोडायला जावे लागेल. मात्र गंमत अशी की, लोक दीर्घकाळ स्वत:ची फसवणूक का आणि कशी करून घेतात? या मानसिकतेविरुद्ध मंगेश पाडगावकर यांची बुवाबाजी ही कविता डोळे उघडायला लावणारी आहे. बुवा नाम जपण्याची नशा देई असे ते आपल्या कवितेत म्हणतात. अशा भोंदू बाबांकडे जाणाऱ्यांची मानसिकता याच्यावरच प्रकाश टाकणारी आहे. पण त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, माणसे अडचणीत असतात, अगतिक असतात. त्यातून आपली सुटका व्हावी, असे त्यांना वाटत असते. त्यासाठी ते अशा बाबांकडे जातात. पण अशा बाबांकडचे असे उपचार हे त्या रोगापेक्षाही भयंकर असतात. याबरोबरच हेही भान असले पाहिजे की, मनाची अगतिकता हा अशा बाबांसाठी शोषणाच्या धंद्याचा विषय होता कामा नये. याविरोधात काय करता येईल, याची स्पष्ट त्रिसूत्री समितीने मांडली आहे. पहिली बाब अशी की, घटनेत, शैक्षणिक धोरणात, मूल्यशिक्षणात, समाजसुधारकांच्या धोरणात वैज्ञानिक आग्रह आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ कार्यकारणभाव तपासणे. एखाद्या गोष्टीचे कारण काय आहे, ते माझ्या बुद्धीने समजू शकते आणि म्हणून ते कारण बदलताही येऊ शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. तो असेल तर पराधीन स्वाधीन होतो, परतंत्र स्वतंत्र होतो. ज्यावेळी निर्मलबाबाकडे लोक त्यांचे प्रश्न घेऊन जात असत, तेव्हा तो त्यांना सांगत असे की, तुझे कल्याण कशात आहे ते मला समजते. तू सांगितले नाहीस तरी, मला ते कळते. त्यामुळे मी सांगतो त्याच्यावर श्रद्धा ठेव. याचा अर्थ अशा भोंदू बाबांच्या मागे लागताना आपल्याला शिक्षणाचा, घटनेचा, समाजसुधारकांच्या विचारांचा विसर पडतो. हे थांबणे गरजेचे आहे.
निर्मलजितसिंह नरूला असे या बाबाचे मूळ नाव आहे. आज तो निर्मलबाबा म्हणून ओळखला जातो. इंटरनेटवर त्याच्या तीस लाखांहूनही अधिक लिंक्स आहेत. निर्मलबाबाचे मोठे बंधू मंजितह सध्या लुधियानामध्ये राहतात. निर्मलबाबा छोटा असून तो पतियाळाच्या सामना गावात रहिवासी आहे. देशाची फाळणी झाली, त्यावेळी निर्मलबाबाचे कुटुंबीय भारतात आले. निर्मलबाबा विवाहित असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. झारखंडमधील मेदिनीनगर येथील दिलीपसिंह बग्गा यांच्या तिसऱ्या मुलीशी त्याचा विवाह झाला. छतराचे खासदार आणि झारखंड विधानसभेचा माजी अध्यक्ष इंदरसिंह नामधारी यांचा निर्मलबाबा हा मेहुणा आहे. नामधारी याने दिलेल्या माहितीनुसार १९६४ मध्ये निर्मलबाबाचा विवाह झाला, त्यावेळी तो १३-१४ वर्षांचा होता. १९७०-७१ मध्ये तो मेदिनीनगरमध्ये आला आणि १९८२ पर्यंत तेथेच राहिला. रांचीमध्येही त्याचे घर होते. पण १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उडालेल्या शीखविरोधी दंगलीच्या वेळी त्याने आपले रांचीतील घर विकून टाकले.     
रांचीमध्ये असताना त्याने मेदिनीनगरमधील कंकारी येथे वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला होता. पण, त्यामध्ये त्याला यश आले नाही. त्यानंतर त्याने गढवालमध्ये कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. पण त्यामध्येही त्याला अपयशच आले. नंतर त्याने आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याचा दावा केला आणि तो लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करू लागला.
झारखंडमधील एका दैनिकाला निर्मलबाबाच्या बँक खात्यांची माहिती मिळाली आणि त्याने बाबाचा पर्दाफाश केला. या दैनिकाला मिळालेल्या माहितीनुसार या बँक खात्यामध्ये फक्त यावर्षी (जानेवारी २०१२ ते एप्रिल २०१२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत) १०९ कोटी रुपये जमा झाले आहेत. याचा अर्थ रोज सुमारे १.११ कोटी रुपये जमा झाले. हे पैसे केवळ झारखंड, बिहार, बंगालमधून जमा झालेले नसून ते संपूर्ण देशातून जमा झाले आहेत; एका बँक खात्यामध्ये १२ एप्रिल २०१२ ला १४.९३ कोटी रुपये; तेही सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत जमा झाले आहेत. संध्याकाळपर्यंत या खात्यामध्ये सुमारे ९६ कोटी रुपये जमा झाले. हे खाते ‘निर्मल दरबार’ या नावाने आहे. एका बँकेमध्ये बाबाच्या नावावर २५ कोटी रुपयांचे फिक्सड् डिपॉझिटही आहे. बाबा जाहिराती, न्यूज चॅनेल्स यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतो. ही रक्कम २५ हजारांपासून ५.५ लाख प्रतिएपिसोड असते. बाबाचे चॅनेल्सवर जेवढे कार्यक्रम होतात, ते सारे पेडच असतात. बाबाच्या सत्संगमध्ये भाग घेण्यासाठी फक्त सर्वसामान्य माणसेच येतात, असे नाही तर मोठमोठे अधिकारी, राजकीय नेते, सॉफ्टवेअर इंजिनिअरही येथे येतात.
अशा प्रकारांमध्ये माध्यमांनी; विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बेजबाबदारपणा दाखवला. त्यांनी  निर्मलबाबाला सतत आपल्या वाहिन्यांवर दाखवल्याने तो देशभर पसरला. स्वत:च्या धंद्यासाठी लोकांची फसवणूक करणारा निर्मलबाबा सातत्याने प्रेक्षकांसमोर दाखवण्यात येत होता, त्यावेळी आपण काय दाखवत आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत, याचे भान माध्यमांनी; विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ठेवायला हवे होते. या माध्यमांना सेन्सॉरशिप नको असेल तर त्यांनी स्वत:ची आचारसंहिता तयार करावी. राजकीय नेतृत्वानेही निर्मलबाबा प्रकरणातून धडा घ्यायला हवा. बुवाबाजी हा स्पष्ट भ्रम आहे. १७ वर्षे पंतप्रधानपदी असणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे कधीही कोणत्याही बाबाच्या मागे गेले नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात शरद पवार यांचे वर्तनही तसेच आहे. तेही कधी कोणत्या बाबाकडे गेले नाहीत. पण, इतर अनेक राजकीय नेतेही बुवांच्या नादी लागतात.
   
निर्मलबाबा प्रकरणातून सामान्यांनीही बोध घ्यायला हवा. प्रत्येक व्यक्तीने असा निर्धार करावा की, मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही. मी माणुसकीने, प्रामाणिकपणे, निर्भयपणे जगेन. यातच खरी प्रतिष्ठा आहे. विवेकाने जगत असताना प्रश्न काय आहेत, ते सोडवण्यासाठी काय करायला हवे, याचे भान येते. हे आत्मभान हा जीवनाचा पाया आणि कणा आहे. जीवनातील प्रश्नांची सर्वकालीन उत्तरे देण्याचा दावा करणारे बाबा हे व्यक्तीला मानसिक गुलाम करतात आणि कायमचे पांगळे करून टाकतात. हा विचार आपल्या मनामध्ये कायम असायला हवा आणि तो सर्वदूर पोचवायला हवा.
निर्मलबाबाविरुद्ध एफआयआर दाखल
स्वयंघोषित देवदूत निर्मलबाबा याच्याविरुद्ध फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरविण्याच्या आरोपांवरून प्राथमिक माहिती अहवाल (एफ.आय.आर.) दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्या दोन मुलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी  एफ.आय.आर. दाखल करण्याचे आदेश दिले. या तक्रारीवरील आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
-दैनिक सकाळ (१३ मे २०१२)
निर्मलबाबाविरोधात अटक वॉरंट
स्वत:ला दिव्यसाक्षात्कारी मानणाऱ्या निर्मलसिंह निरूला ऊर्फ निर्मलबाबाविरोधात बिहारमधील अररिया जिल्ह्यात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट येथील स्थानिक न्यायालयाने लागू केले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख शिवदीप लांडे यांनी सांगितले की, निर्मलबाबा याच्यावर फसवणूक व धोकेबाजी केल्याचा आरोप आहे.
-दैनिक पुढारी (२० मे २०१२)

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जून २०१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...