महाराष्ट्राच्या
पोलिसांना कोणत्या सूचना असतात?
दाभोलकर, विरोध, पोलीस बळ
मी गेली वीस वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतो. त्याला वाढता
प्रतिसाद आहे. प्रथमच गेल्या दोन-अडीच महिन्यांत दादर, महाड व विलेपार्ले येथील माझ्या सभा उधळण्याचा
प्रयत्न स्वत:ला हिंदूहितरक्षक म्हणवणाऱ्या संघटनेने नियोजनबद्ध पद्धतीने केला. पद्धत
सर्वत्र एकच - माझे भाषण सुरू झाल्यावर वीस-पंचवीस लोक उभे राहतात. प्रश्न विचारावयाचा
आहे म्हणून गलका करतात, ‘जय शिवाजी..... जय भवानी’च्या घोषणा देतात ‘ॐ नम: शिवाय’चा जप करतात. दाभोलकर धर्मद्रोही आहेत, असे कंठरवाने ओरडून सांगतात. पोलीस पूर्वसूचनेमुळे
हजर असतात. ते सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतात. मग नरमाईने संबंधितांना सभागृह सोडण्यास
सांगतात. काही काळाने त्याचा एवढाच उपयोग होतो की, घोषणा देणारे सभागृहाच्या बाहेर जाऊन,
दारात उभे राहून घोषणा देत सभा उधळण्याचा
प्रयत्न चालू ठेवतात. पोलीस बळाचा वापर करीतच नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या
आरोपाखाली संबंधितांवर खटले भरणे तर दूरच; त्यांची साधी नावेही लिहून घेत नाहीत. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे
गोंधळ घालणाऱ्यांना एक मूक मान्यता मिळते.
मोठ्या संख्येने आलेला प्रेक्षकवर्ग बसून असतो. कार्यकर्ते जागच्या
जागी याचा प्रभावीपणे प्रतिकार करू शकतात; पण तसे करणे म्हणजे विरोधकांना जे हवे तेच देणे होय. विवेकी वर्तनाशीही
ते विसंगत ठरते. त्यामुळे कार्यक्रमाची लय बिघडण्यात आणि अर्धा-पाऊण तास वाया घालविण्यात
संबंधितांना यश मिळते. नव्यानेच विचारप्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांच्या मनात काही प्रमाणात
दहशत व साशंकता निर्माण करण्यात हिंदूहितरक्षकांना (!) यश येते.
मी स्वत:च्या भाषणाची पूर्ण जबाबदारी घेऊन बोलतो. त्याची ध्वनिमुद्रित
फीत कोणीही घ्यावी, आक्षेप
असल्यास संवाद करावा वा रास्त मार्गाने कोणतीही कारवाई करावी. हिंदूहितरक्षकांकडून
याची अपेक्षा धरणे भाबडेपणाचे होईल, हे मी जाणतो. पण पोलिसांचे काय? परिवर्तनाच्या क्षेत्रात जो मुकाबला आम्ही
करीत आहोत, तोच मुकाबला महाराष्ट्रातील
सत्तारूढ पक्ष राजकीय क्षेत्रात करत आहे. असे असतानाही पोलीस इतकी बोटचेपी भूमिका घेत
असतील तर त्यांना हे सरकार सूचना तरी कोणत्या देते?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे २००३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा