गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी




सामाजिक समतेचे मन्वंतर घडविणारी वारी
दाभोलकर, वारकरी संप्रदाय, समता, जाती निर्मूलन
वारीला काही शतकांची परंपरा आहे. वारीच्या माध्यमातून विराट जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला पायी चालत निघतो. दरवर्षी त्यात भर पडते आहे. तरुणांची, महिलांची संख्या लक्षणीय वाढते आहे. अशा सामाजिक शक्ती अधिकाधिक विधायकतेकडे कशा वळतील, याचे चिंतन सर्व समाजालाच पुढे नेणारे ठरेल.

लक्षावधी लोकांनी तीन आठवडे अडचणी सोसत, पावसा-पाण्यात भिजत, कामधाम सोडून असे चालण्याने काय साधते?’ हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना परंपरा आणि आधुनिकता या दोन्हीचे सामर्थ्य कळलेले नाही. कोणतीही अपेक्षा न धरता, नवस फेडण्याचा कसलाही संबंध नसताना, सश्रद्धेने लक्षावधींचा जनसमूह एक विशिष्ट प्रकारची वागणूक करतो, त्यावेळी ती त्याची जीवन जगण्याची रीत आहे. म्हणून समजून घ्यावयास लागते. आधुनिक पद्धतीने विचार केला तरी प्रत्येकाला आपल्या जीवनात काही बाबी प्राधान्यक्रमाच्या वाटतात. कोणासाठी ते गिर्यारोहण असेल, आणखी कोणासाठी ते वनभ्रमण असेल; तर आणखी कोणाला संगीताची मैफील अथवा चित्रकलेचे संग्रहालय पाहण्यात ब्रह्मानंद लाभेल. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडील श्रम, वेळ, पैसा यांची शक्यतेनुसार गुंतवणूक करत असते. व्यक्तीला असलेल्या या स्वातंत्र्याचा आदरच करावयास हवा. मोठ्या संख्येने ज्यावेळी जनसमुदाय बाहेर पडतो, त्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतातच. शारीरिक विधीमुळे स्वच्छतेचे काही प्रश्न येत असणार; परंतु नव्या कल्पनांचा, वापर करून जनता, शासन, उद्योगसमूह यांच्यामार्फत ते सोडवणे सहज शक्य आहे; परंतु खरा मुद्दा यापेक्षा वेगळाच आहे.

संत नामदेवांनी या संप्रदायाची सुरुवात केली. वारकरी संप्रदायात जात, धर्म, शुद्र आदी भेदाभेद मनात नाहीत. या अर्थाने वारकरी संप्रदायाचे वर्तन हे अध्यात्मिकतेच्या अंगाने जाणारे क्रांतिकारी आहे. अध्यात्म या शब्दाच्या घटापटादी चर्चेत मी जात नाही. माझ्या मते, खरी अध्यात्मिकता असे मानते, की भौतिक सुखाच्या पलिकडे जीवनाचे एक श्रेयस आहे आणि ते भौतिक सुखापेक्षा अनंतपटीने मोलाचे आहे. ही जाणीव अंतरंगात उमटलेली व्यक्ती संयमी, सदाचारी असते. ती करुणेने मानवसन्मुख कृती करते. या मार्गावरून जाण्याच्या साधनेचा प्रारंभ वारीच्या मार्गावरून चालण्याने होतो, असे अनेक वारकऱ्यांना वाटते. उत्तम खाणे, निवास, विश्रांती, सर्व सुविधा या सर्व भौतिक सुखाच्या बाबी आहेत. याउलट वारीच्या काळात वारकरी रोज २०-२० किलोमीटर चालतो. प्रवासातील भोजन, निवास, पावसाने झोडपणे, चिखल तुडवणे हे सारे आनंदाने स्वीकारतो, यामागची भावना समजून घ्यावयास हवी. वारकरी (बहुतेक) माळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात. मांसभक्षण, धूम्रपान, पेयपान, दुर्व्यवहार आपोआप वर्ज्य होतात. ज्या गोष्टी करावयाच्या त्यामध्ये नामस्मरण, पंढरीची वारी, भगवद्भक्ती, पुण्यकर्म, शुद्ध आचार यांचा समावेश होतो. वारी शक्यतो पायीच केली जाते. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांतीची प्रस्थापना, मानवतेची समानता हा असतो.

पंढरपूरची वारी ही अंधश्रद्धा असेल तर त्याला विरोध का करत नाही व जर ही श्रद्धा असेल तर त्यात पुरोगामी खुल्या दिलाने सामील का होत नाहीत, असा प्रश्न विचारला जातो. श्रद्धा म्हणजे काय, हा एक बहुचर्चित प्रश्न आहे. १९ व्या शतकातील अव्वल धर्म प्रबोधनकार न्या. रानडे यांनी उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकबुद्धी अशी श्रद्धेची एक समर्पक व्याख्या केली आहे. त्यातील उत्कटपणा आणि कृतिशीलता या दोन्ही बाबी वारकऱ्यांमध्ये पुरेपूर दिसून येतात. त्याशिवाय कोणीही न बोलवता स्वखर्चाने एवढा मोठा जनसमूह शांतपणे येत राहिला नसता. या व्याख्येतील तिसरा शब्द फार महत्त्वाचा आहे. माणसाचे मूल्यविवेक उन्नत करते, ती श्रद्धा असते आणि अवनत करते, ती अंधश्रद्धा असते.

वारकरी संप्रदायाशी संबंधित दोन मूल्य, विवेकाच्या बाबी तरी आज महाराष्ट्राच्या समाजजीवनात ऐरणीवर आहेत. मद्यमुक्तीबाबत वारकरी आग्रही असतात. गळ्यात वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली तुळशीची माळ घातली की, तिच्या प्रभावाने व्यसनी व्यक्तीसुद्धा व्यसनमुक्त होते, असा त्या माळेचा दरारा आहे. मात्र आज महाराष्ट्रात याबाबत काय स्थिती आहे? विकासासाठी अधिकाधिक पैसा कररुपाने गोळा करण्याच्या मोहापोटी राज्य शासन मद्यवर्धक धोरण राबवत आहे. दुसऱ्या बाजूला व्यसन हा लोकांचा जीवन आनंदाने जगण्याचा मार्ग आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क बनला आहे. राज्य शासनाला मद्यविक्रीच्या करापासून मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षात २५० कोटीवरून २,६०० कोटी रुपयांपर्यंत म्हणजे दहापटीने वाढले. वारी हा सज्जन शक्तीच्या स्रोतांचा आविष्कार बनू शकतो. या शक्तीने भूमिका घेतल्यास शासनाला काही प्रमाणात जाग येईल आणि दुसरीकडे लोकांना जीवन आनंदाने जगण्यासाठी मद्यसेवनातील व्यर्थता आणि धोकादायकपणा कळू शकेल. याहीपेक्षा मोठे आव्हान आहे, ते समतेचे. वारकरी संप्रदायाचा पायाच क्रांतिकारी आहे. समतेकडे घेऊन जाणारा हा संप्रदाय आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी जातिअंताच्या दिशेने जाणारी आहे. वारकरी संप्रदाय निर्माण झाला, त्याकाळी समाजात जाती, उपजाती यांचा कमालीचा बुजबुजाट झाला होता. बाह्यांगाच्या खुणांपासून ते जीवनाच्या सर्व व्यवहारात दुसऱ्यापासून वेगळे आणि श्रेष्ठ असल्याचे दाखवणारा अट्टाहास समाजात चालू होता. अशा वेळी वारकरी संप्रदायाने समतेचा विचार मांडला आणि आचरला. ज्याच्या कपाळी टिळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जो चुरमुरे-बत्ताशे यांचा गोपालकाला सर्वांसमवेत आनंदाने घेतो, तो जाती-धर्माने कोण आहे, याची क्षुद्र चौकशी न करता वारीची वाटचाल चालू झाली.
वैष्णव ते जन। वैष्णवाचा धर्म।। भेदाभेद भ्रम। अमंगळ।।
ही वारकरी संप्रदायाची प्रतिज्ञा होती. आजही वारीतले सगळे वारकरी एकमेकाला ‘माऊली’ म्हणून संबोधतात. जात-धर्म यांचा विचार न करता समोरच्या माऊलीच्या पायावर नतमस्तक होतात.

मात्र चंद्रभागेच्या तीरावर उभा राहिलेला हा समतासंगर गावोगावच्या सीमा ओलांडून गावातील जाती-पातीचे गडकोट उद्ध्वस्त करण्याइतका अजून प्रभावी ठरलेला नाही. सामाजिक समतेच्या चळवळीत असे भान आर्य समाजाने दाखविले आहे. आर्य समाजाच्या मांडणीबाबत मतभिन्नता संभवते. मात्र जाती निर्मूलनाबाबत आर्य समाजाने एके काळी प्रबोधन आणि चळवळ जोरदारपणे चालवली होती. ज्या वेळी सहभोजने हा जाती निर्मूलनाचा प्रभावी उपक्रम होता, त्यावेळी विविध जातींच्या लोकांची सहभोजने हजारो नव्हे, लक्षावधी आर्य समाजाने घडविली होती. मराठवाड्यात आर्य समाजाचा काही भागात अधिक प्रभाव होता. त्या भागात अनेक व्यक्तींच्या आई-वडिलांचे विवाह हे ५०-६० वर्षांपूर्वी आंतरजातीय झाले होते, असे लक्षात येते. महाराष्ट्रात सामाजिक समतेचा प्रश्न हा ऐरणीवरचा आहे. एका जातीची व्यक्ती ही दुसऱ्या जातीच्या व्यक्तीपेक्षा उच्च किंवा नीच आहे, असे जातिव्यवस्थेची मानसिकता म्हणते. ही एक निखालस आणि जीवघेणी अंधश्रद्धा आहे. आधुनिक विज्ञान असे सांगते की, जगातल्या सर्व मानवांचा जीनोम पॅटर्न ९९.९७ एकच आहे. मात्र या वैज्ञानिक सत्याला पुरून उच्च-नीचतेची जातीची भावना टणकपणे उरली आहे. सावरकरांची सहभोजने, एक गाव-एक पाणवठा चळवळ, साने गुरुजींचे उपोषण, संविधानातील तरतुदी, शासनाचे प्रयत्न या सर्वांमधूनही जातीची मानसिकता बदलण्यात यश आलेले नाही. जात ही व्यवस्था म्हणून एक भौतिक रचनाही आहे आणि या व्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर भौतिक उपाययोजनांची गरजही आहे. मात्र याबरोबरच जन्माधिष्ठित उच्च-नीचता ही एक मानसिकताही आहे; अन्यथा अजूनही जातवार वस्त्या दिसल्या नसत्या. भूकंपाने उद्ध्वस्त झालेले गाव पुन्हा बांधताना जातवार वस्त्यांचे आग्रह धरले गेले नसते. आंतरजातीय विवाहाला आजही ज्या प्रमाणात व ज्या प्रकारे विरोध होतो, तो या बाबतीतील सामाजिक चळवळींचे अपयश आणि जातिव्यवस्थेचे जहर किती जालीम आहे, याचे दर्शन घडवतो. हे आव्हान बिकट आहे आणि तरीही स्वीकारणे अत्यावश्यक आहे -
जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत।
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत।।
ही वारकरी संप्रदायाची मनोभूमिका आहे. सगळे जग मानवातील कृत्रिम बंधने गळून पडण्याची वा पाडण्याची स्वप्ने पाहत आहे. अशा वेळी सामाजिक समतेचे मन्वंतर घडविण्याचे वारकरी संप्रदायाने मनावर घेतले, तर एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला ती मोठीच भेट ठरेल.


अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...