सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

पाथेय


पाथेय
दाभोलकर, चमत्कार  




माहिमचा समुद्र अचानक गोड झाल्याने आलेला उन्माद आता ओसरला आहे. या घटनेची शास्त्रीय मीमांसा समजते आहे; परंतु याकडे दैवी चमत्काराच्या श्रद्धेने बघणाऱ्यांना (तेच बहुसंख्य आहेत) त्यामुळे फरक पडत नाही. घटनेत नागरिकांचे कर्तव्य सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला यामुळे आपण जाहीर सोडचिठ्ठी देतो, याचे त्यांना सोयरसुतक नसते. कथित चमत्काराने निर्माण झालेला मास हिस्टेरिया हा माहिती व तंत्रज्ञानाच्या स्फोटाचे २१ वे शतक, जगातील चौथ्या क्रमांकाचे विज्ञान-तंत्रज्ञान बळ असलेला भारत, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसा, क्षणोक्षणी प्रगत विज्ञानाच्या तालावर जगणारे मुंबई महानगर या सर्वांना कमीपणा आणतो, हे समाजमानसाला जाणवतच नाही. शासन व समाजधुरिणही याकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, रोगराई न पसरणे याच मर्यादेत पाहतात. व्यापक दृष्टिकोन काय सांगतो?



विश्वकोषाने चमत्काराची व्याख्या अशी केली आहे, निसर्गाचा कार्यकारणभाव ज्या घटनांना लागू पडत नाही, अशा घटनांना अद्भुत म्हणतात. वैज्ञानिक दृष्टिकोनांद्वारे ज्या घटनांची उपपत्ती लागत नाही, त्यांना चमत्कार म्हणतात. चमत्काराचा पसारा खूप मोठा व प्राचीन आहे. जगातील सर्वच धर्मग्रंथांत किंवा धर्माच्या इतिहासात त्याची असंख्य उदाहरणे खच्चून भरलेली आहेत. व्रतवैकल्ये हे खरे तर उपासनेचे मार्ग; परंतु त्यांनाही प्रभावीपणे चमत्कार चिकटवलेले आहेत. शिर्डीचे साईबाबा अथवा शेगावचे गजानन महाराज यांच्या नावावर ढीगभर चमत्कार जमा आहेत. त्याचा तपास करणे आजही शक्य नाही आणि त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना याबाबत ब्र उच्चारलेला चालत नाही. येशूच्या प्रार्थनेने रोग बरे होतात किंवा मकबूल बाबा अथवा अशाच दर्गाहच्या पिरांच्या कृपाप्रसादानं घडणारे चमत्कार सांगणारे जागोजाग भेटत असतात. बुद्धाच्या एका शिष्याने चमत्कार करून भिक्षापात्र तयार केले, ते बुद्धाने फोडून टाकले आणि शिष्यांना निक्षून सांगितले की, ‘त्यांनी कधीही चमत्कार करता कामा नयेत. पण आजही चमत्कार हे बुवाबाजीचे, तथाकथित दैवीशक्तीच्या सामर्थ्याचे आणि त्यातून मानसिक गुलामगिरी निर्माण करू इच्छिणाऱ्यांचे मोठे हत्यार आहे. चमत्कारापुढे त्याची सत्यता तपासण्यास कधीच उत्सुक नसलेला भक्तगण सदैव माथा टेकून उभा असतो. या विश्वाच्या निर्मिकाची लीला अगाध आहे, त्याच्या अथांग सामर्थ्यापुढे विज्ञानाचे सारे नियम किस झाड की पत्ती ठरतात, अशी त्या बहुसंख्यांची खात्रीच असते. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, ज्यांना सरळ-सरळ भिडण्याची ताकद फारच थोड्यांकडे असते. या प्रश्नांची उत्तरे चमत्कार घडून मिळावीत, अशी त्यांची मनोमन इच्छा असते. या फॅन्टसीच्या आधारे जगणे ही माणसाच्या जगण्याची एक पद्धत आहे. ज्ञात कार्यकारणाच्या पलिकडे जाणाऱ्या निसर्गाच्या आणि मनाच्या शक्तीवर बहुतेकांची श्रद्धा असते. विज्ञानाचे काही नियम त्यांना माहीत असतात; परंतु त्याचे उपनियम, सूक्ष्मता, आवाका आणि वैविध्य यांची माहिती नसते, नियमांचे अपवाद तर ठाऊकच नसतात. अज्ञात असणाऱ्या या गोष्टी चमत्काराला जन्म घालतात.



वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव; चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. हे नाते प्रकाश-अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजेच अपरिहार्यपणे दुसऱ्याचे नसणे. विज्ञानात चमत्कार नसतातच. चमत्कार म्हणजे रासायनिक, भौतिक, यांत्रिक करामत असते अथवा हातचलाखी असते. बदमाषीही असू शकते आणि प्रसंगी निसर्गाचे अजून न उलगडलेले एखादे कोडेही चमत्कारात जमा होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जीवन स्वीकारणे, याचा अर्थ हे अज्ञान, कार्यकारणभाव आज वा उद्या वैज्ञानिक विचारपद्धतीनेच समजतील, यावरचा विश्वास. आपण विज्ञानाची करणी घेतली; परंतु विचारसरणी दूर ठेवली. त्यामुळेच विसंगती जन्माला येतात. चमत्कारांना आव्हान देणे, खोटे ठरवणे याबाबतची भूमिका नीटपणे समजून घ्यावयास हवी. प्रत्येक व्यक्तीला घटनेने उपासना, पारलौकिक जीवन, अध्यात्मिक कल्याण याचे स्वातंत्र्य दिले आहे, याचा आदर करावयास हवा; परंतु चमत्कारावर विश्वास ठेवणे, त्याच्या तपासास नकार देणे आणि अशा चमत्कारांचा प्रसार करत राहणे, हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन या कर्तव्याशी तो विसंगत ठरतोच; परंतु व्यक्ती व समाज यांचा बुद्धी-श्रम-वेळ-पैसा वाया घालवतो. चमत्कारातून गूढतेचे वातावरण निर्माण होते; प्रश्नाची खरी सोडवणूक करण्याचे माणसाचे भान हरपते.



असाच एक धक्का गणेशमूर्तीच्या दुग्धप्राशनाने १९९५ मध्ये बसलेला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांची व्यक्तिगत पत्रे मिळवून ती महाराष्ट्र अंनिसने तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पाठवली होती. मजकूर थोडक्यात असा होता - ‘‘ता. २१ सप्टेंबर रोजी भारतभर देवादिकांच्या मूर्तींचा दुग्धप्राशनाचा कथित चमत्कार घडला आणि थोड्याच वेळात सर्व देशात गोंधळाचे वातावरण तयार झाले. हा सर्व योजनाबद्ध बनाव होता, असे मला वाटते. लोकांचा वेळ-श्रम-पैसा आणि विवेक यांचा त्यात बळी गेला, ही गंभीर बाब आहे. यासाठी सी.बी.आय.मार्फत या सर्व प्रकाराची चौकशी करावी.’’ अशी पत्रे लिहिणाऱ्यांमध्ये जयंत नारळीकर, वसंत गोवारीकर, पु. ल. देशपांडे, श्रीराम लागू, निळू फुले, जयवंतराव टिळक, मोहन धारिया, ग. प्र. प्रधान, बाबा आढाव आदींचा समावेश होता. पंतप्रधान कार्यालयाकडून एका ओळीचेही उत्तर आले नाही. ही घटना घडली त्यावेळी ओरिसाचे मुख्यमंत्री असलेल्या जे. बी. पटनाईक यांनी मंदिरे बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला; प्रसंगी पुजाऱ्यांना अटक करण्यास सांगितले. कर्नाटकच्या विधानसभेतच मुख्यमंत्री देवेगौडा यांनी या गोष्टीचा इन्कार करून मंदिरातील गर्दी हटविण्याचे आदेश दिले. अशा स्वरुपाची कोणतीही तत्परता व तडफ पाणी गोड होण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाकडून दाखविली गेल्याचे दिसले नाही.



भारतीय समाज सहज भीतिग्रस्त बनतो. दैववादी मनोवृत्तीमुळे आलेली संकटे ही नशिबाचेच भोग आहेत, असे मानतो. समस्यांचा खंबीर व निर्भयपणे मुकाबला करण्याऐवजी, दैवीशक्ती लाभलेला एखादा बुवा अथवा एखादे धार्मिक स्थळ अडचणींतून आपल्याला अलगद बाहेर काढेल, असे बहुसंख्यांना वाटते. ही विचारसरणी बाळगणारा समाज नेहमीच स्वाभिमानशून्य, पळपुटा, भ्याड वृत्तीचा आणि बुद्धी गहाण टाकणारा असतो. स्वाभिमानी, प्रयत्नवादी व निर्भय समाज बनवण्यासाठी चमत्काराला विरोध आवश्यक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो, की हे विश्व स्वायत्तपणे अस्तित्वात आहे. कोणत्याही चांगल्या वा वाईट शक्तीच्या उपासनेने आपोआप काहीही चांगले-वाईट घडत नाही. घटना या कार्यकारणभावाप्रमाणेच घडतात आणि आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा हाच सर्वात खात्रीचा व प्रभावी मार्ग आहे.

     

माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे बुद्धी; मानवी संस्कृतीचा सारा विकास हा मानवी प्रज्ञेच्या विकासाशी निगडित आहे. बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन, ही शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती प्रतिज्ञा विसरून गेल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. कोणतीही शंका उपस्थित न करता, चमत्काराला सत्य मानून शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. माणसे सहजासहजी सैरभैर का होतात, याचे एक व्यापक स्पष्टीकरण दिले जाते. ते असे की, समाजजीवनातील अनेकांगी शोषण, अगतिकता, चंगळवाद यामुळे मोडकळीस आलेले मन अशा मूर्खपणावर सहज विश्वास ठेवते. याचा अर्थ सर्वंकष समतावादी समाजपरिवर्तन होईपर्यंत हे असेच चालणार, या प्रतिपादनामध्ये तथ्यांश आहे; परंतु संपूर्ण समाजपरिवर्तनाचा दिवस येईपर्यंत फसवणुकीचा ताबडतोब प्रतिकार हे सूत्र दूर ठेवण्याची गरज नाही. दूरवरच्या उद्दिष्टांचे भान हवेच; पण शोषणाशी सत्वर संघर्षही हवा. चमत्कारांना शरण गेलेले मन या संघर्षासाठी उठू शकत नाही. माणसाच्या हात-पायात बेड्या असल्या आणि त्याला त्याबद्दल राग येत असला तर त्याला सांगता येते, ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या.’ पण या बेड्यांनाच माणसे फुलं-गजरे समजू लागली तर निर्माण होणारी मानसिक गुलामगिरीविरुद्धची झुंज अवघड बनते. मानसिक गुलामगिरीची सर्वांत भयानकता ही की, त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही; मग पटणे तर दूरच राहिले. चमत्कार हे माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करतात व मानसिक गुलामगिरीचे हत्यार बनतात. माणसाचा पुरुषार्थच मग नाहीसा होतो व चमत्कार करणाऱ्या त्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या हाती स्वत:ला सोपवून तो मोकळा होतो. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचार करण्याची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात, व्यक्ती परतंत्र बनते.

     

चमत्काराला सत्य मानणे ही त्याची सुरुवात बनते. चमत्कार खोटे असतातच; परंतु परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेच्या मुळावरच ते येतात. हे अधिक धोकादायक असते. परिवर्तनाची लढाई मग स्वाभाविकच अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळीसाठी तयार करावयास हवे. यासाठी असा संकल्प करावयास हवा की, ‘मी स्वत:वरचा विश्वास गमावणार नाही आणि चमत्कारावर विश्वास ठेवण्यासारख्या पळपुटेपणाच्या मार्गाचा आधार घेणार नाही. स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धैर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत:चे प्रश्न काय आहेत व ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात, याचे भान आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यांचा वापर करून येते.

     

खरी गरज असते जीवनाच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत व ताकद कमविण्याची, त्याला चमत्कार उपयोगी नाहीतच; उलट चमत्कारावरील श्रद्धा व्यक्तीच्या कर्तृत्वाला पांगळेपण देणारी ठरते. स्वत:ला सजग, समर्थ, डोळस बनविण्यासाठी स्वत:च्या विवेकबुद्धीच्या रूपाने एक गुरू प्रत्येकाजवळ असतोच असतो. त्याच्यापासून पाथेय घेऊन वाटचाल करणे, यातच व्यक्तीच्या जीवनाची सार्थकता आणि निकोप समाजधारणेची शक्यता आहे!

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(सप्टेंबर २००३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...