शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

शेवटी साध्य महत्त्वाचे



शेवटी साध्य महत्त्वाचे
दाभोलकर, सावरकर, जमातवाद, हिंदुत्ववाद

प्रति संपादक,
आपल्या जून ९९ च्या अंकात माझ्या पत्रासोबतच डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यांचा खुलासाही आपण प्रसिद्ध केला. त्यामुळे समाधान वाटले. ते म्हणतात की, ‘हिंदू हे एका धर्माचे नाव नसून एका राष्ट्राचे नाव आहे. हेच स्वा. सावरकरांचे वाक्य आज भाजपही सांगत आहे. भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने केव्हा हे सांगितले? भाजप हे आर.एस.एस.चे अपत्य आहे. त्यांना सावरकरांपेक्षा गोळवलकर गुरुजींचे विचार अधिक जवळचे वाटतात आणि हे गुरुजी तर सावरकरांबद्दल, ते राष्ट्रीयदृष्ट्या मुसलमान आहेत’, असे म्हणाले होते. गोळवलकर गुरुजींचे विचार सावरकरांना चिकटवणं सावरकरांवर अन्यायकारक होईल, असे वाटते.

मुसलमान, ख्रिश्चन यांनी स्वत:ला हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन म्हणवून घेत या राष्ट्रात राहावे, असे सावरकर कुठं व केव्हा म्हणाले? गोळवलकर गुरुजी असे म्हटले असण्याची खूप शक्यता आहे. ही भूमिका धर्मनिरपेक्षतेच्या मुळावरच येते, हे मला मान्य आहे; पण भाजपने ती सावरकरांकडून उचलली, याला आधार काय? बलाचा वापर फक्त जमातवादीच करतात काय? स्वत:ला ‘सेक्युलर’ समजणारे त्यापासून अलिप्त आहेत काय? स्वत:ला गांधीवादी म्हणणारे सुद्धा अपवाद नाहीत. मुळातच बलाचा वापर यावर डॉक्टरांचा एवढा कटाक्ष का?
     
स्वातंत्र्यवीरांनी सत्यनारायणाची पूजा घातली असेल तर ती कशी? हे कोडं कॉ. डांगे सत्यनारायणाचा (कामगारांनी केलेल्या) प्रसाद घेत व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांनी एका उद्ध्वस्त मंदिराच्या पुनरुत्थान विधीचं पौरोहित्य केलं होतं, या कोड्याइतकच अनाकलनीय वाटतं. अशी आणखी उदाहरणे आहेत. डॉ. दाभोलकरांच्यात अशी विसंगती नसेल तर ते नि:संशय अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी, माझा युक्तिवाद बालिश व घोर अज्ञान दाखविणारा आहे. असा आहेरही मला दिलेला आहे. त्यावर अधिक भाष्य करणं मला उचित वाटत नाही. कारण मी लहान आहे. हे सर्व प्रकरण प्रा. शेषराव मोरे, नांदेड त्यांच्यापर्यंत अवश्य पोचवावे, असं मला प्रकर्षाने वाटतं.
य. ज. महाबळ, जळगाव

संपादक,
श्री. महाबळ यांचे पत्र वाचले. मला वाटते, ते समजून घेण्यात घोटाळा करत असावेत किंवा समजून देण्यात मी अपुरा पडत असावा. म्हणून अगदी थोडक्यात,
१) सावरकरांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा विचार हा जमातवादीच होता.
२) यासाठी हिंदू कोण याची व्याख्या करणे भाग होते. पितृभू आणि पुण्यभू भारत असणारे ते हिंदू, अशी सावरकरांनी व्याख्या केली. ज्यांची पुण्यभू भारताबाहेर आहे, म्हणजे विशेषत: इस्लाम व ख्रिश्चन हे अर्थातच यामुळे अहिंदू ठरले. हिंदू राष्ट्रनिर्मितीत दुय्यम दर्जाचे ठरले.
३) सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह हा हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी सहाय्यकारी म्हणून होता, तो मानवतावादी नव्हता.
४) धर्मनिरपेक्षता हा घटनेच्या मूळ ढांचाचा भाग आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जणांच्या खंडपीठाने एकमताने सांगितल्यावर धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र निर्माण करू इच्छिणाऱ्या संघाची पंचाईत झाली. मग त्यांनी पवित्रा बदलला व सांगावयास सुरुवात केली की, देशातले सर्व हिंदूच आहेत. कारण ती एकच जीवनपद्धती आहे. बाकीच्या उपासनापद्धती आहेत. म्हणून या देशातला मुसलमान ख्रिश्चन हा ख्रिश्चन-हिंदू आहे, असे प्रतिपादन आहे. म्हणजे धर्म व संस्कृती या अर्थाने हिंदू उपासनापद्धतीचे स्वातंत्र्य म्हणून मुस्लिम. स्वाभाविकच ही भूमिका खरी धर्मनिरपेक्ष आहे, अशी मल्लिनाथी ते करतात.
५) या देशातील कोट्यवधी मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांना हे कधीही मान्य होणार नाही. त्यांना मान्य करण्याचा उपाय काय तो राहतो. बलाचा, हिंसेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर. अर्थातच तो त्याज्यच मानावयास हवा.
६) सत्यनारायणाची पोथी व पूजा ही पूर्णत: भाकड आहे, यावर सावरकरांचा विश्वास होता. पण ती करण्याची लोकांची इच्छा असेल तर करावी आणि हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी धर्मांतरित हिंदू पुन्हा हिंदू धर्मात येण्यासाठी साकडे घालावे, यात त्यांना काही गैर वाटत नव्हते. शेवटी साध्य महत्त्वाचे; साधन कोणते का असेना, अशी ही भूमिका होती. ती नैतिक म्हणून चूक आहे. सावरकरांच्या प्रमाणे तर्कतीर्थ वा डांगे यांनी याबाबत स्वत:ची भूमिका लिहून ठेवली आहे का? भाषणरूपाने, बातमीरूपाने उपलब्ध आहे का? हा मूळ भूमिकेबद्दलचा प्रश्न नाहीसा होत नाही, असे मला वाटते. माझ्याकडून ही चर्चा आता मी थांबवत आहे.

नरेंद्र दाभोलकर
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑक्टोबर १९९९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...